शुक्रवार, २७ जुलै, २०१२

अपुले मरण पाहिले म्या डोळा! : उत्तरार्ध

पूर्वार्ध :
आपली भडक लाल पिशवी नाचवत नाचवत रस्ता क्रॉस करत असताना भर रस्त्यातून शोधत येवून बैलोबाने यांनाच ढुशी दिली आणि साधी-सुधी नाही. शिंग डायरेक्ट पोटाच्या आतमध्ये आणि आतडं पोटाच्या बाहेर!!! शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यावर त्याला जे वाटलं असेल तेच फिलिंग गणपतरावांनी घेतलं असणार यात शंकेला वावच नाही. फक्त 'दगा दगा' ओरडत बसायची गणपतरावांची ताकद नव्हती. त्याऐवजी ते तत्क्षणी बेशुद्ध पडले.
हॉस्पिटलात डॉक्टर लोकांनी त्यांचं आतडं होतं तसं कोंबून पोटाला टाके घातले आणि त्यांच्या खिशाचे टाके मात्र उसवले! शुद्धीवर आल्यावर ते स्वतःच सांगायला लागले. लोक म्हणत होते, 'अहो एवढं रक्त गेलं वाहून.. आम्हाला वाटलं आता जगता कि नाही'
तर म्हणे " मी कसला मरतो? अजून पंधरा वर्ष आहेत माझी.. काही केलं नसतत ना तरी हातावर आतडं घेऊन जगलो असतो." कसंनुस हसत गणपतराव म्हणाले. (मला कल्पनेने शिसारी आली आणि )लोकांना पश्चाताप झाला. गणपतरावांना हॉस्पिटल मध्ये भरती केल्याचा आणि त्यापेक्षा त्यांचे पैसे वाया घालवल्याचा!

त्यात्क्षणी त्यांना साक्षात्कार झाला असावा कि 'मृत्यू माहित असताना कशाला मेंढरासारखं घाबरत घाबरत जगायचं?' मग तर काय विचारूच नका.. दरम्यानच्या काळात गणपराव उठसुठ ब-याच ठिकाणी धडपडले, अपघातातून वाचले, जिवावरच्या संकटातून बचावले.. विश्वास बसणार नाही पण मध्येच एकदा  श्वानदंशातूनही कोणतेही इंजेक्शन न देता विनाविषबाधा सुखरूप सुटले.
"हे अति झालं गणपतराव" मी म्हटलं..
"काही होत नाही हो मला"
"असं कसं, आता साधा कुत्रा होता म्हणून वाचला असाल.. उद्या पिसाळलेला कुत्रा चावला तर? बर आता इंजेक्शनही फ्री असतं सरकारी हॉस्पीटलात!"
"चौदाच्या चौदा? बेंबीत घ्यायची असतात ती ?"
"अहो हल्ली तीनच असतात.. आहात कुठे आणि हल्ली 'नेहमीच्या ठिकाणी' देतात.. कशाला उगीच रिस्क घेता?" मी म्हटलं. गणपतरावांनी मान हलवली पण त्यांनी काही ते फारसं मनावर घेतलं नाही असं वाटलं.
गणपतराव आता 'हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी' वगैरे सरंडर करत होते..
"बरोब्बर पंचाहत्तराव्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स घेणार आणि मोठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पण घेणार accident रायडर सोबत.. बसायचा तो बसूदेत प्रीमिअम. काय चिंता नाही!" गणपतराव म्हणायचे..
ते आता उजवीकडे-डावीकडे न बघता रस्ता ओलांडत होते..रियल इस्टेट मध्ये गुंतवणुका करत होते. बिनधास्त रिस्क घेत होते... ओ एन जी सी सारख्या १०-२० वर्षात ग्रोथ होणा-या ऑईल कंपन्यांचे शेअर्स घेत होते.. फार्मा कंपन्यांच्या स्टेक्समध्ये आर्थिक उलाढाल करत होते.. कशाची आणि कोणाची तमा बाळगत नव्हते.. कोणी काही म्हणालं तर सांगायचे "अजून बरीच वर्ष आहेत हो जायला मला, तो पर्यंत बायका मुलांची तजवीज करून घेतो!" तर थोडक्यात मृत्यू ची वेळ माहित असल्याचा ते पुरेपूर लाभ घेत होते.

या भानगडी करता करता त्यांचं घरातून लक्ष उडायला लागलं. मुलाच्या लग्नाचा विषय बाजूलाच पडला. फादरान्ची ही परिस्थिती बघता त्यांच्या कार्ट्याला आपल्या लग्नाचं काही खरं दिसेना. त्याने मग मारून मुटकून प्रेम बीम केलं आणि कुठूनतरी मुलगी पळवून आणली. (मुलीला बघताच 'प्रेम मारून मुटकून' केलेलं असाव यावर कोणाचापण विश्वास बसावा! असो..) मुलाने देवळात हार तुरे घालून लग्न उरकलं आणि दमदार हुंड्याची गणपतरावांची स्वप्न त्याने धुळीला मिळवली. मुलीने पण काही काळातच पोराची चॉईस कशी होती याबद्दलचं इतरांचं म्हणणं खरं ठरवत घरात भांडणं उकरून काढली.

बारीकसारीक कारणांवरून घरात आदळआपट व्हायला लागली. सासू सुनेचं वाजायला लागलं. गणपतराव आणि त्यांचा मुलगा मधल्या मध्ये भरडले जायला लागले.
काही झालं कि बायको त्यांच्याकडे यायची.. " बघा ना अहो.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... कसली भवानी घेऊन आलय कार्टं .. आम्हाला म्हातारपणी छळायला.. कोणास ठावूक? जरा इन्टरेष्ट घेऊन त्याचं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"
मग थोड्या वेळाने मुलगा यायचा.. "ओ पप्पा.. आईला समजावा ओ जरा.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... .. उच्छाद मांडलाय दोघींनी.. जरा इन्टरेष्ट घेऊन माझं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"
मग सूनबाई यायची.. " पप्पा.. कसली सासू मिळाली आहे मला.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... कसा संसार केलात या बाईबरोबर कोण जाणे.. झक मारली आणि लग्न करून इकडे यायची बुद्धी झाली.. तुम्ही तरी सांगायचं तुमची बायको असली आहे ते.. जरा इन्टरेष्ट घेऊन तुमच्या पोराचं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"

गणपतरावांच जगणं मुश्कील व्हायला लागलं.. त्यात पोरगी जावयाबरोबर बिनसलं म्हणून परत आली.. जावयाच्या नाकदु-या काढायला त्यांना मुंबईच्या खेपा वाढवायला लागल्या.. प्रचंड त्रास होत होता.. पण इतक्यात मरणार नाही या गृहितकावर गणपतराव सगळ्या गोष्टी आपापल्या परीनं सेट करायचा प्रयत्न करत होते.. तरीही आवाक्याबाहेर गेलेल्या गोष्टी सावरता येत नाहीत.. घरच्या कटकटीना वैतागून मुलानं वेगळा संसार थाटला.. गावातच भाड्याने राहायला लागला. आई वडिलांना एकटं टाकून! त्यांच्या बायकोने आकांत केला.. थयथयाट केला. कोणाला ती आवरता आवरेना.. सर्वांसमक्ष "तू 'आम्हाला' मेलास" म्हणून सांगितलं आणि गणपतरावांना न विचारताच आपल्या बाजूला करून घेतलं..
...जिवंतपणी मरण ते वेगळं काय असतं?

गणपतरावांच्या मागची साडेसाती काही सुटेना.. मुलाच्या उत्पन्नाच्या भरवशावर सगळे पैसे लाँग टर्म प्लान्स मध्ये इन्वेस्ट करून ठेवलेले आणि आता हातात काही नव्हत... बायकोच्या नकळत मुलाच्या दारात जावं लागलं. मुलानेही (त्याला न शोभणारा) समजूतदारपणा दाखवत महिन्याला पैसे द्यायला सुरुवात केली..
सगळं असून गणपतराव सगळं गमावून बसले होते. 'देवा यापेक्षा मरण बरं.. ' ते विनवणी करत होते पण हिशेबाप्रमाणे अजून दहा वर्ष तरी शिल्लक होती.

तब्बल पाच वर्षानंतर त्यांचा मुलगा घरी परतला. सून सुधारली होती.सासू सुधारायच्या पलीकडे होती पण तिला पण बरंच काही उमगलं होतं. तिच्यासाठी काय! आधी नवरा जिवंत झाला आणि आता मुलगा!

गणपतरावांना हर्षवायू व्हायचाच बाकी होता आणि आनंदाच्या भरात नको ते झालं.. सततच्या विचारांनी शारीरिक आणि मानसिक त्रास वाढला होताच.. आता अचानक हे अस झाल्याने वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी गणपतरावांना paralysis चा attack आला. डायरेक्ट अर्धी बाजूच निकामी. डॉक्टर लोकांनी सांगितलं, " तब्ब्येत खणखणीत आहे..फक्त हातपाय हलवता नाही येणार!"
"म्हणजे मग राहिलं काय?" गणपतरावांनी विचारलं.. पण डॉक्टरांकडे उत्तर नव्हतं ! सगळं सुरळीत होता होता दैवाने डाव टाकला..
"असल्या जगण्यापेक्षा मेलो असतो तर बरं.." गणपतराव उघडउघड म्हणत असत "पण कानात यमराज गुंजतोय ना.. म्हणतो 'अरे याला अठ्ठ्यात्तराव्या वर्षी आणायचा आहे' .. !!"

एकेकाळी मरण लांब आहे म्हणून हर्षोत्सव साजरा करणारा माणूस आता मरणाची आराधना करत होता ! आम्हाला त्यांचे हाल बघवत नव्हते

फ़िजिओथेरपिस्टच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना थोड फार उठता यायला लागलं.. पण स्वतःच्या पायांवर उभ राहता येईल कि नाही याबद्दल शंकाच होती.. दरम्यानच्या काळात बायको,मुलगा आणि सुनेने बरेच उपचार केले.. गणपतरावांच्या गुंतवणुकीचे थोडेफार रिटर्न्सही येवू लागले होते. 'बरोब्बर पंचाहत्तराव्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स' घ्यायचं त्यांचे मनसुबे 'नॉन एलीजीबिलीटी' मुळे उधळले गेले होते.
आयुष्याच्या पुढच्या अध्यायात अधाशासारखे कमावलेले पैसे शेवटच्या काळात संपले होते.. जेवढी गंगाजळी त्यांनी सुरुवातीला जमा करून ठेवली होती तेवढीच आता उरली होती.

हल्लीच गणपतरावांचा जावई आणि मुलगी तिच्या माहेरपणाला आलेली असताना एके दिवशी त्यांचा मुलगा त्यांची कुठल्या तरी गुंतवणुकीचे अनपेक्षितपणे आलेले रिटर्न्स पप्पांना दाखवायला घेऊन आला
"पप्पा किती पैसे मिळालेत बघा.. अमुक एक लाख"
"काय म्हणतोस? " म्हणत गणपतराव चक्क स्वतःहून स्वतःच्या पायावर ते उभे राहिले. अचानक.. "अरे हे बघ काय.." ते ओरडले!!
मुलगा दोन्ही आनंदाच्या बातम्या द्यायला स्वयंपाक खोलीकडे पळाला.. आणि इकडे गणपतराव छाती धरून कोसळले..
आम्ही त्यांच्या जावई आणि मुलाबरोबर जाऊन त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती करून आलो..

त्यांच्या घरी आल्यावर गणपतरावांच्या बायकोने सुनेला आमच्यासाठी चहा टाकायला सांगितला.. योगायोगाने वीस वर्षापूर्वी गणपतरावांच्या पहिल्या मृत्युच्या वेळी आम्हीच चार पाच जण असेच आणि इथेच बसलो होतो.. त्या आठवणी निघाल्या. त्यावेळी दणाणलेले धाबे आठवून आम्ही दबकत दबकत हसलो..
गणपतरावांच्या मुलीने चहा आणून दिला..

तेवढ्यात चार पाच जणांच एक टोळकं अंगणात येवून टपकलं.. वरच्या आळीतले होते ते सगळे. गणपत बारशिंगेच्या इथले. हा गणपत बारशिंगे सुद्धा साधा माणूस. कोणाच्या फारसा अध्यात मध्यात नसलेला. मुख्य म्हणजे आमच्या उठण्या बसण्यात नसलेला! असो.. तर तो स्वतः सुद्धा त्यांच्याबरोबर होता.

" काय गं  मुली.. पप्पा कुठे आहेत?' गणपतरावांच्या  मुलीला त्या ग्रुपमधल्या एका वयस्कर माणसाने विचारलं.
" पप्पांची तब्ब्येत बिघडलीय काका,  हस्पिटलात भरती केलंय..हे आणि दादा तिकडेच आहेत. हेपण गेले होते सगळे.. आताच आले."
आम्ही सगळेच अवाक होऊन एकमेकांची तोंडं बघायला लागलो! सेम टू सेम संवाद वीस वर्षापूर्वी घडला होता.. यावेळी जरी आम्ही दर्शक असलो तरी त्यावेळी आम्हीच त्या संवादाचे कर्ते होतो ! एखाद्या सिनेमाचा रिमेक बघावा अशी आमची अवस्था झाली होती. गणपत बारशिंगे आमच्याकडे बघून 'बघितलात? मी सांगत होतो ना?' या अर्थाने सूचक हसला आणि हळूच त्याच्या शेजारी उभ्या असणा-याच्या कानात पुटपुटला. तो काय बोलला असणार ते मी ताडलं!! तो नक्कीच बोलला असणार कि 'माझ्या मर्तिकाचं सामान परत नका करू, परस्पर इकडे आणायला सांगा..' कारण वीस वर्षापूर्वी हेच शब्द आमच्या गणपतरावांनी माझ्या कानात सांगितले होते! मी पुढचा प्रसंग आठवला आणि कानात जीव गोळा करून बसलो.. आता फोनची रिंग अपेक्षित होती. आणि तेच झालं.. कोणी काही बोलणार एवढ्यात फोन वाजला..सून लगबगीने आत गेली आणि थोड्या वेळाने तोंडावर पदर दाबून बाहेर आली.
"पप्पा गेले.. यांचा होता फोन.."

गणपतरावांच्या बायकोने आकांत करून गाव गोळा केला.. सून सैरभैर झाली. पोरगी पहिल्या वेळेसारखीच सुन्न  होऊन बसली..
तर अशा त-हेने अत्यंत नाटकी पद्धतीने गणपतराव ढू ss म झाले.. मी बारशिंगेच्या मंडळींकडे गेलो आणि शांतपणे म्हटलं.. " चिता रचलेली असेल तर विस्कटायला सांगू नका! आटपून टाकू तिथेच. जवळचे  इथेच आहेत आणि नातेवाईक पण पोचतील अर्ध्या एक तासात."
ते सगळे चकित होऊन माझ्याकडे बघत राहिले. 
काहीही असो पण मला राहून राहून एकच प्रश्न पडतोय कि सारखं सारखं कन्फ्यूज होणा-या त्या यमदूताला यमराजाने नोकरीवरून डिसमिस केलं असेल का?

(समाप्त )

१५ टिप्पण्या:

  1. धन्यवाद रवी! आनंद झाला. ब्लॉग वर मनःपूर्वक स्वागत आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. हल्ली तिकडेही वाशिल्यावर नोकरी मिळते असं दिसतंय :-)

    उत्तर द्याहटवा
  3. @रुपेश : आभारी आहे रे मित्रा..
    @अतिवास : :D.. खरंच! शंकेला वाव आहे खरा! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

    उत्तर द्याहटवा
  4. अफलातून यार...
    एकदम मस्तच. एक नंबर...
    वाह वाह वाह... क्या बात है...

    उत्तर द्याहटवा
  5. धन्यवाद विनायकराव... प्रतिक्रियेसाठी विशेष आभार!

    उत्तर द्याहटवा
  6. लिखाणामध्ये पुढे काय घडणार आहे याची उत्सुकता वाढविण्याची ताकत आहे मजेशीर आहे.
    खूप दिवसांनी अखंड , न थांबता वाचन केले, धन्यवाद
    यशवंत आपटे

    उत्तर द्याहटवा
  7. @yashwant Apte :आपण दिलेल्या पावतीबद्दल शतशः धन्यवाद.. माझं लिखाण आपल्याला आवडलं यातंच भरून पावलो. ब्लॉगला भेट देत राहाल अशी आशा बाळगतो

    उत्तर द्याहटवा
  8. @सरिता : प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!