गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

कोणे एके दिवशी : पूर्वार्ध

पहाटेचे साडेसहा वाजले होते..
भक्त निवासाच्या गेट मधून एक राखाडी तवेरा  आत येत होती.. आतमध्ये 'माणूस' आणि त्याचा कुटुंबकबीला होता..
माणूस खुश होता..
आदला दिवस :
राहतं घर ते सद्गुरूचं संस्थान हि त्याची दरवर्षीची वारी.. आठ-साडेआठशे किलोमीटरचा प्रवास आणि पुन्हा तेवढाच परतीचा रस्ता.. दरवर्षी एसटी महामंडळावर भिस्त ठेवून त्याचा हा प्रवास असे. डायरेक्ट बस सेवा उपलब्ध नसल्याने एकतर तीन टप्प्याचा प्रवास.. प्रत्येकवेळी रिझर्वेशनमुळे सीट नक्की असे पण हक्काची सीट मिळवायला देखील कोण कष्ट पडत.. आधी स्थानकावर जावून गुर्मीत असणा-या आणि उलट उत्तरं करणा-या अधिका-यांकडून रिझर्वेशन मिळवायचं, नन्तर गर्दीमध्ये घुसून आपल्या  बायकोला आणि पोरांना आता घ्यायचं, मग बसमध्ये नाही नाही त्या लोकांच्या नादाला लागावं लागायचं, त्यांनी practically अडवलेली सीट कायदेशीररित्या आपण कशी रिझर्व केली आहे हे त्यांना पटवून द्यायचं..एक ना दोन! एक टप्पा संपला  कि स्थानकावरच पुढची बस येईतो वाट पहा.. मग बस बदला पुन्हा तोच कंटाळवाणा खेळ..

जरी सद्गुरुंच्या अस्तित्वाचं दर्शन त्याला कधी झाल नव्हत तरी त्यांच्यावरची निस्सीम भक्ती त्याला दरवर्षी तिकडे खेचून नेत असे.. 'हि ओढ आहे म्हणजेच त्यांचं अस्तित्व आहे' असं समजून, बारा -चौदा (किंवा त्यापेक्षा जास्तच ) तासांचा प्रवास आणि मग नंतरची चार तासांची भक्तांची रांग पूर्ण करून तो समाधीपाशी पोचला कि शीण कुठल्याकुठे  पळून जात असे.. त्यांच्या मूर्तीचे आश्वासक डोळे मन प्रफुल्लीत करत असत. दोन मिनिटं भक्तिभावाने केलेली आराधना ; त्याला आधीचे दगदगीचे चोवीस तास विसरायची आणि पुढच्या सगळ्याला सामोरं जायचं बळ देत असे.

पहिल्यांदाच तो गाडी ठरवून सदगुरुंच्या पायाशी आला होता.. दरवर्षी जातात म्हणून यावेळेला 'मी पण येते' म्हणून त्याच्या सासूने सुद्धा टुमणं लावलं होतं, आई सुद्धा 'मला एकदा घेऊन जा' म्हणत होती.. आता एवढ्या म्हाता-या लोकांना घेऊन बस प्रवास करणं तोही अश्या पद्धतीने म्हणजे जीवाला अजूनच घोर. त्यामुळे हे गाडीचं प्रकरण करावं लागलं होतं.. मेव्हण्याला गाडी चालवता येत असे त्यामुळे त्याने त्याच्या मित्राची गाडी घेतली होती.

आदली
रात्र :
आता सगळे म्हणतात, पण गाडी सुद्धा तितकीशी आरामदायी नसते हे त्याला एव्हाना कळून चुकलं होतं. दिवसाचा साडेचारशे किलोमीटरचा पहिला टप्पा सुखरूप झाला पण पुण्यातल्या नातेवाईकांकडे घेतलेल्या   थोड्याश्या विश्रांती नंतरच्या रात्रीच्या प्रवासात एका रिकाम्या आणि सरळसोट  रस्त्यावर मेव्हण्याला डुलकी लागल्यासारखी झाली होती. त्यामुळे गाडीला छोटासा झटका बसला होता.
"तू झोपतोस का जरा? " विचारल्यावर 'घाबरू नका हो भावोजी,परत असं नाही होणार असं सांगून' मेव्हण्याने त्याला आश्वस्त केलं होतं पण हे कारण, अख्ख्या प्रवासभर माणसाची झोप उडायला पुरेसं होतं. मागे सासूबाई, आई आणि बायको निश्चिंत झोपल्या होत्या , एकदम शेवटच्या सीट्स वर मुलं आणि मेव्हण्याची बायको झोपली होती..

सारखं सारखं एका जागेवर बसून मुलं वैतागली होती . माणसाच्या आईला मुळात एवढ्या लांबच्या प्रवासाची सवय नव्हती .. इतका वेळ बसून ती फार अवघडून गेली होती . त्यात वय जास्त आणि वरून ब्लड प्रेशर अर्थात बीपी चा त्रास.. तिला संध्याकाळी निघतानाच भ्रम वाहायला सुरुवात झाली होती ..  'काय झालं रे? कधी पोचणार आपण? नको तो प्रवास .. परत मागे जावूया ..'  असं काहीबाही सांगून ती आपल्या मुलाचं मन वळवू पाहत होती . पण माणूस आधीच शिणला होता . 'गप बस ग आई जरा.. अगं ए तिच्या बी पी च्या गोळ्या दे तिला घेतल्या नसतील तर... ' असं बायकोला ओरडून तो पुढे बघत बसला.. आता ते आठवल्या नन्तर त्याला जरा भरून आलं. ' आपण तेव्हा पुढचे परतीचे प्लान्स करत होतो. दर्शन लवकर आटपल तर लगोलग निघायचं... तेवढीच एक सुट्टी वाचेल. वगैरे वगैरे. त्यामुळे आवाज चढला.. पण काही झालं तरी आपल्या म्हातारीची आपणच काळजी घ्यायला हवी' असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला.

त्यात रात्री एका ठिकाणी रस्ता चुकला!! मेव्हण्याने कुठेतरी चुकीचा रस्ता पकडला आणि २ एक किलोमीटर गाडी पळवली . मग माणसाच्या लक्षात आलं कि गडबड झाली ..  चिडचिड होणं ओघानं आलंच! मेव्हण्याला चार शब्द सुनावून झाले.  माणसाच्या वरच्या पट्टीतल्या आवाजाने गाडीतले सगळे जागे झाले होते.

"काय झालं, अहो? कशाला ओरडताय त्या बिचा-याला पण?" बायकोचा काळजीयुक्त सवाल..
"बघ याला.. झोप म्हटलं जरा वेळ, तर ते पण नाही. शेवटी चुकवला रस्ता. सांगत होतो, त्या टर्न वर लक्ष ठेव म्हणून... आता मागे जाण्याशिवाय पर्याय पण नाही"
"असेल अहो रस्ता इथून" तिने समजावणीच्या सुरात म्हटलं.
"कशाला उगाच? तो मागे जायचं म्हणतोय तर जाऊ या गं घरी.. कंटाळा आला या प्रवासाचा. किती वेळ गाडी चाललीच आहे. बसून बसून पाठीला रग लागली, हाडं दुखायला लागली माझी... पोरं पण कंटाळली आहेत " अर्ध्यात उठलेल्या म्हातारीने विषय समजून न घेताच रडगाणं सुरु केलं.

तिकडे दुर्लक्ष करून माणूस मेव्ह्ण्याला सूचना द्यायला लागला. गाडी वळवायला पण जागा नव्हती एवढ्या चिंचोळ्या रस्त्याला गाडी लागली होती. मग त्याने पण मान खाली घालून गाडी रिवर्स घेतली..म्हातारीची बडबड  चालूच होती. पण इतरांना झोप अनावर झाली होती. माणूस सवयीने तिचं बोलणं टाळायला शिकला होता आणि मेव्हण्याला तर जागं राहायला त्या आवाजाची मदत होत होती.

पहाटेचे  पावणेसात :

पहाटे  गावात शिरल्यानंतर संस्थानाचा पत्ता शोधताना परत नाकीनउ आले कारण एसटीची सवय. पण शेवटी ते पोचलेच! माणसाने धावतपळत जाऊन भक्त निवासाच्या बुकिंगच्या रांगेत जागा अडवली आणि थोड्या वेळात रूम्स च्या किल्ल्या घेऊन तो परत आला. एव्हाना मेव्हणा ड्रायव्हर च्या भूमिकेतून हमालाच्या भूमिकेत शिरला होता आणि त्याने सगळं सामान गाडीतून काढून खाली मांडलं होतं.

"चला,  बरं झालं रूम्स अवेलेबल होत्या. दोन रूम मिळाल्या आहेत.. चटचट सामान हलवूया आणि आंघोळी आटपून दर्शनाच्या रांगेत उभं राहू. लवकर गेलो तर गर्दी कमी असेल.' माणूस एकापाठोपाठ एक सूचना देत होता आणि बाकीचे त्या फॉलो  करत होते.

सकाळचे सव्वा आठ :

तासा दीड तासात सगळे रेडी होते. संस्थानाच्या दारात पोचताच माणसाला समजलं यंदापासून सगळ्या भक्तांसाठी वेगळी सोय करण्यात आलेली आहे. पुरुष, स्त्रिया आणि वृद्ध यांसाठी तीन वेगवेगळ्या रंग करण्यात आलेल्या आहेत. माणसाला बरं वाटलं. दर्शन देत नसले तरी सद्गुरू अनुभव देतात ते खरं आहे.त्याने स्वतःशीच विचार केला. म्हाता-यांना भल्यामोठ्या लायीन्मधून बसत उठत नेण्यापेक्षा हे बरं झालं. लगेच तो आणि मेव्हणा 'पुरुष', बायका आणि मुलं 'स्त्रिया' व सासुबाई  आणि आई 'वृद्ध' अशी विभागणी झाली.

दुपारचे पावणे दोन :
तब्बल साडे पाच तासांच्या भल्यामोठ्या रांगेनंतर दर्शन मिळाले. गाभा-यातून बाहेर पडताच त्यांच्या  'स्त्रिया' आणि लहान मुलं दिसली आणि माणसाच्या चेह-यावर हसू खुललं. 'चला, मुख्य काम झालं.'  तो पुटपुटला. कडकडून भूक लागली होती. पोरं मरगळलेली होती.
' आई आणि तुझी आई कुठेयत?' त्याने पृच्छा केली.
'येतीलच इतक्यात' बायको म्हणाली आणि सगळे  गाभा-याकडे डोळे लावून बसले. "छान झालं न दर्शन?'" म्हणेपर्यंत सासूबाई बाहेर पडल्या. आता पाठोपाठ आई येईल म्हणून त्याने डोकावून पाहिलं.

"आज्जी दिसत नाही ती?" मुलांनी एव्हाना ते हेरलं होतं.
"थांबा रे.. आई कुठे राहिली?" त्याने विचारलं.
'आई, अगं आई कुठायत?' पाठोपाठ बायकोने विचारलं.
"आई, अहो विसरलात कि काय त्यांना?" बायकोच्या भावजयीचा प्रश्न.
"कुठे मागे राहिल्या कि काय?' मेव्हणा 
"थांबा, थांबा" सासूबाई म्हणाल्या. " या माझ्या मागून" सगळे तिच्या मागून मुख्य दरवाज्याकडे जाऊ लागले.
"त्यांना उभं राहवेना, कालची दगदग खूप झाली. भ्रम पण व्हायला लागले आहेत. 'घरी जाऊया' म्हणायला लागल्या. म्हटलं अहो विहीणबाई  बरं वाटत नाही का? तुम्हाला झेपत नसेल तर रांगेबाहेर बसून विश्रांती घ्या. नंतर बोलावते तुम्हाला. तर म्हणाल्या मला काही झेपणार नाही. तुम्ही सगळे दर्शन घेऊन या. मी म्हटलं 'ठीक आहे ' आणि त्यांना आणून बाहेर बसवलं आणि तिथल्या शिपायाला सांगितलं 'आजींकडे लक्ष ठेवा' म्हणून" सासूबाईंची बडबड अखंड चालू होती. सगळे तिच्यामागून लगबग चालत होते.

एका बाकाकडे  आल्यानंतर सासुबाईन्चा चेहरा पांढराफटक पडला..
"काय झालं आई? कुठे बसवलं होतंस त्यांना?"
"इथेच.." सासूबाईंना काहीच सुधरेना.. घेरी आल्यासारखं व्हायला लागलं..
"कुठे इथेच? इथे तर कोणीच नाहीये"
माणसाची आई त्या बेंचवर बसलेली नव्हती!!

उत्तरार्ध :

२ टिप्पण्या:

  1. हं.. सुरुवात चांगली झाली आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद aativas.. या आठवड्यात पुढचा भाग टाकण्याच्या प्रयत्नात आहे..

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!