बुधवार, १५ जुलै, २००९

आपली शिक्षणपद्धती!

आपली शिक्षणपद्धती! आहे एकदम सुरेख. म्हणजे जो शैक्षणिक अभ्यासक्रम आहे तो योग्य आहे पण मुल्यमापनाची पद्धत मात्र एकदम चुकीची आहे.
एक एक मार्कासाठी मुलं लढताहेत.. ’बालपणीचा काळ सुखाचा’ हे केवळ कागदावरच राहिलंय.!

नववीचा इतिहास वाचल्यानंतर कधीही असं मनापासून वाटत नाही की भारतानं स्वातंत्र्य मिळवलंय. वाटतं की ते तर असंच मिळालंय.. जणू इंग्रजांनी भीक म्हणून दिलंय.ज्या पद्धतीचं वर्णन अभ्यासक्रमात आहे त्यात काहितरी कमी आहे हे नक्की!
[यावरून ही गोष्ट आठवते.. ]
भारताचा स्वातंत्र्यलढा पुस्तकातून दिसतच नाही.. शालेय अभ्यासक्रमातला इतिहास अडलाय तो स्वातंत्र्यापर्यंतच! जास्तीत जास्त पुढे येतो तो गोव मु्क्तिसंग्रामापर्यंत.. त्यापुढे नाही. (अरे... पूर्वीच्या नेत्यांची आश्वासनं त्यांचे वायदे.. यांची पूर्तता होऊन ते इतिहास जमा होणारेत कि नाही? ) तेच तेच तेच.. पण कितीवेळा? अन त्यावरचे प्रश्न म्हणजे तर मूर्खपणाची हद्द! घटना कालानुक्रमे लिहा, एखाद्या तहाची कलमं लिहा- ४ मार्क्स असतील तर ८ च ६ मार्क्ससाठी मात्र १२! काय हे? या प्रश्नांमुळे इतिहासातली रंजकताच जाते.. पण लक्षात कोण घेतो?

तसाच भूगोल.. सुदान गवताळ प्रदेश कि काय ते.. तैगा , टुंड्रा प्रदेश, निरनिराळे देश यांच्या स्थानांचा ढोबळ अंदाज असावा हे मी समजू शकतो.. पण म्हणून प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रदेशाचा अक्षवृत्तीय - रेखावृत्तीय विस्तार अगदी अंश आणि मिनिटांसहित विचारायचा का? तोदेखील ’रिकाम्या जागा भरा ’ असल्या प्रश्नांमध्ये?

त्यामुळे हल्ली मुलं एक्झाम ओरिएंटेड विचार करतात.. नॉलेज बेस्ड नाही.. यामध्ये ज्याचं पाठांतर जास्त तोच जिंकतो.’पुलं’नी त्यांच्या एका लेखात म्हटलंय की ’ आमच्या काळात जास्तीत जास्त निरुपयोगी माहिती असणा-याला ’हुशार’ म्हटले जाई..’ दुर्दैवाने हे विधान आजही तसंच्या तसं लागू होतं!

त्यापेक्षा क्षमताधिष्ठीत चाचण्या ब-या.. व्यक्तिमत्व विकासाच्याही दृष्टीने.शिक्षण असं हवं की ज्याचा सार्वजनिक जीवनात - ज्याला आपण डे-टू-डे लाईफ म्हणतो - उपयोग व्हावा. सर्वांगिण शिक्षण देण्याच्या अट्टाहासापायी निरर्थक शिक्षण देण्याचा फायदा काय? आपल्याकडे किमान दहावी व्हावं अशी समजूत आहे. कित्येक जण दहावीनंतर शिकू शकत नाहीत. पण मुळात अशा लोकांना त्या ज्ञानाचा कितपत फायदा होतो? बेरीज-वजाबाकी तर चौथी शिकलेलाही करू शकतो..पण प्राण्यांचे , वनस्पतींचे वर्गीकरण, कीपचे उपकरण यांचा त्यांना उपयोग काय? गावागावातल्या शाळांमध्ये प्रयोगही फळ्यावरच शिकवले जातात! प्रात्यक्षिक हे जर प्रत्यक्ष नसेल तर त्याला अर्थच काय? तसंच व्यवहारातले उपयोग माहिती नसतील तर कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्सनी सामान्य विद्यार्थ्याचं डोकं का शिणवायचं? त्यामुळे ही मुलं गणितात नापास होतात आणि दरवर्षी हे प्रमाण वाढतच आहे! केवळ हेच विषय नव्हे तर भाषेबद्दलही तेच!

कादंब-यामधले उतारे आउट ऑफ द कन्टेक्स्ट छापून त्यातल्या एखाद्या वाक्याचं संदर्भासहीत स्पष्टीकरण मागायचं, याला काय म्हणावं? उदाहरणार्थ..
’कोसला’ कादंबरीमधून घेतलेला काही भाग आम्हाला ’आणि बुद्ध हसला’ या नावाने धडा म्हणून होता.. तो वाचून मला ही कादंबरी नेमाड्यांचे प्रवासवर्णन असावं असं वाटत असे!अगदी हल्ली हल्ली ही कादंबरी वाचेपर्यंत!त्या भागातून ना नेमाड्यांचा परिचय झाला होता, ना त्यांच्या कादंबरीचा, ना त्यांच्या लेखनशैलीचा!! असो!

मला तरी असं वाटतं की ज्यांना पुढे शिकायच आहे त्यांना आठवीपासून गणित आणि विज्ञान इंग्लिशमधूनच शिकवावं. कारण या विषयांमधली बरिचशी पुस्तक त्या भाषेतूनच आहेत..मात्र इतर विषय मातृभाषेतच शिकले पाहिजेत तरच ते समजतील. कारण तानाजीची ’आधी लगीन कोंडाण्याचं नि मग माज्या रायबाचं’ ही घोषणा ’फर्स्ट मॅरेज इज ऑफ कोंडाणा ऍण्ड आफ्टर्वर्डज माय रायबाज!’ अशी ऐकायला कशी वाटते? तसाच सुर्याजीचा आवेश ’भ्याडांनो.. तुमचा बाप इथे मरुन पडलाय आणि तुम्ही पळताय काय? मागे फिरा.. परतीचे दोर मी केव्हाच कापून टाकलेत..’ इंग्लिश मध्ये कसा व्यक्त होईल?

हल्ली मात्र मुलांना इंग्लिश शाळात पाठवण्याचं फॅडच आलंय. अगदी गावोगावी सुद्धा.. असो.. कालाय तस्मै नमः!

गुरुवार, २ एप्रिल, २००९

माहित असणारी गोष्ट

ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण या भाषेत नाही..!


एक सुस्थापित राजा होता.खूप श्रीमंत. त्याचं एकच दुःख असतं.त्याच्या प्रचंड श्रीमंत कुटुंबियांमध्ये बेबनाव होता.कारण तेच..परंपरागत! जमिनीची वाटणी. वर्षानुवर्षे हा वाद चालूच होता.एक भांडण मिटलं की दुसरा वाद उफाळून येत असे.राजा हताशपणे पाहण्यापलिकडे काहीच करू शकत नव्हता. त्याचेच कुटुंबीय ते.. कोणाकोणाला आणि काय काय समजावणार?


...अशातच राज्यात एक फेरीवाला आला.विक्रेता.इतरत्र वस्तू खरेदी करुन त्या विविध राज्यांत विकणे हे त्याचे काम.राजाने त्याला राजवाड्याच्या अंगणात जागा दिली. त्याचा व्यापार सुरु झाला. राज्यातलं तमाम पब्लिक त्या फेरीवाल्याकडून वस्तुंची खरेदी-विक्री करत असे. राजानं पण जनतेची अशी काळजी घेतली होती की ती खाउन पिउन सुखी होती.


पण ’फ्यामिली म्याटर’चा तिढा मात्र काही सुटत नव्हता. जो तो आपापला हेका धरुन बसलेला! ही गोष्ट त्या विक्रॆता-जो आता व्यापारी म्हणण्याइतका मोठा झाला होता-त्याच्या नजरेतून काही सुटली नव्हती. राज्यभर आपल्या फ्रॅंचायझी ओपन करुन झाल्यावर तो वाड्याच्या अंगणातून पायरीवर आला. आत डोकावून पाहू लागला. दिसत तर काही नव्हते. पण अंतर्गत कलह जाणवत होत.. हळूहळू पठ्ठ्याने वैयक्तिक व वाड्याची अशा दोन्ही पाय-या ओलांडल्या आणि ओसरीवर प्रवेश केला. तेव्हा त्याला दिसलं की बाहेरून सुस्थापित दिसणा-या या वाड्यात काय चाललंय ते! एकमेकांच्या उरावर बसलेले कुटंब घटक एकमेकांची डोकीपण फोडायला तयार झाले होते! ’तापलेल्या तव्यावर पोळी भाजून नाय घेतली तर कसलं आलंय बिज्नेस माईंड?’ म्हणत या माज आलेल्या व्यापा-याने माजघरात प्रवेश केला.. ’मे आय हेल्प यू?’ चा सूर आळवत त्याने प्रत्येक मेंबरची/ला सहानुभुती मिळवायचा/द्यायचा सपाटा लावला. शेवटी बिझिनेसमनच तो! गोड बोलून काम साधणं हा तर त्याचा हातखंडा!


झालं!कित्येक वर्षांत गोड गोड ऐकायची सवय नसणारे मेंबर्स भुलले.त्याची आश्वासनं ती काय? तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देण्यात, इतरांविरुद्ध लढण्यास मदत करतो पण तुमच्या प्रांतात व्यापार करायला हरकत नसावी आणि कर कमी करावा. किती क्षुल्लक मागणी! सदस्यांनी त्याची मदत घ्यायची ठरवली...

घरात तर शिरकाव झाला होता..तोदेखील कुटुंबियांच्या संमतीनं. म्हणजे कोणी विरोध करायचा प्रश्नच उरला नाही.पुढचं काम तर अगदीच सोपं होतं.व्यापा-यानं आपलं खरं रूप दाखवायला प्रारंभ केला. गोडी-गुलाबीनं वागून त्यानं राजावरच ताबा मिळवला. घरच्यांच्या इच्छॆपुढॆ त्याचं तरी किती चालणार? तो बिचारा खचत गेला.. हतबल झाला.. गलितगात्र नेत्रांनी राज्याचा -हास पाहात राहिला.. व्यापा-यानं राजाचं धन, सोनं नाणं, संपत्ती आणि जे जे शक्य आहे ते ते पद्धतशीरपणे लुटायला सुरुवात केली.. राजाच्या हे लक्षात आलं आणि तो दुबळा विरोध करु लागला तेव्हा व्यापा-यानं सरळ त्याच्याच मुसक्या बांधून त्याला गुलाम बनवलं! मग काय.. राजरोसपणे लुटमार करून त्यानं स्वतःचं धन केलं... राजाची सगळी मालमत्ता स्वतःच्या खाती जमा केल्यावर त्यानं राजाकडे.. अंह.. गुलामाकडे पाहिलं.. तो शक्तिहीन विरोध करत असला तर त्याला भाकरतुकडा देउन वश करायला बघायचं..नाहीच बधला तर जोर जबरदस्ती करुन त्याचा विरोध दडपून टाकायचा.. हे साधं सरळ धोरण त्यानं अवलंबलं..


... कित्येक वर्ष हेच चालू राहिलं.. एव्हाना दिड-दोनशे वर्ष उलटून गेली होती. राजाच्या घरच्या मंडळींचेही तीन- तेरा वाजले होते.. गोड्बोल्या व्यापा-याने त्यांना हातोहात कफल्लक बनवलं होतं. त्यांच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जन्माला आल्या अन तशाच उलथल्या...

तेवढ्यात राजाला जाणवलं की व्यापारी आता अंगावरच्या वस्त्रांनाही हात घालू लागलाय.. तेव्हा राजानं असहायपणे टाहो फोडायला सुरुवात केली.. त्यानं नविन पिढी जागी झाली.तिनंही आक्रोश करायला सुरुवात केली. आता सगळ्यांनीच रडारड सुरु करुन हातपाय झाडायला सुरुवात केल्याबरोबर व्यापा-यालाही कीव आली.. त्यानं राजाला ’स्वतंत्र’ केलं आणि तो मायदेशी परत गेला..


आता राजा कृश झालाय.. सवय नसल्यानं राज्यकारभार कसा चालवायचा तेच विसरुन गेलाय..त्याच्याकडे त्याचं घर आहे पण मालकी नाहिये..त्या घराच्या भिंतींना कसलाही ठोस आधार नाहिये.. तो जेव्हा अभिमानाने स्वतःच्या घराकडे पाहतो तेव्हा त्याला दिसतं की स्वयंपाकघर आणि धान्याचं कोठार त्या व्यापा-याने परस्पर कुणा दुस-यालाच देउन टाकलंय तेही राजाचंच धन खर्ची घालून.. नव्या बि-हाडाला थोडी आर्थिक मदत नको का द्यायला? राजा ’उदार’ दिसला पाहिजे ना? त्याला अजून दिसतं की हॉलची कॉमन भिंत कोणाची यावर निर्णय होत नाहिये.. तो स्वतःकडे पाहतो तेव्हा त्याला दिसतं ते स्वतःचं अर्धनग्न शरीर, घरत दिसतात उघडी-नागडी फिरणारी मुलं - ’हे घर आता आपलं आहे’ या आनंदात इकडे तिकडे खिदळणारी..कोप-यात दिसते त्याची प्रिय पत्नी, जिच्यावर त्याने जिवापाड प्रेम केलं, जिच्या मदतीने त्याने ही संपत्ती कमावली होती.. अन जिच्या डोळ्यादेखत त्यानं सर्वस्व गमावलं होतं.. ती अब्रूहीन, लाचार, मूक साक्षीदार त्याच्या स्थित्यंतराची; बसलीये दीनवाण्या पण आशाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहात..! तो काहितरी करेल या एकाच अपेक्षेने!
राजानं ठरवलं- आपण प्रयत्न करायचे. ती भिंत -काही कामाची का नसेना- आपल्या मालकीची करण्यासाठी नाही; पण शेजा-यालाही मिळता नये म्हणून भांडायचं.. या राज्याला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी झगडायचं, मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची.. आणि राजानं निर्धारानं कंबर कसली..

तर अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण...