समीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

एक चवदार कॉफी!!


तरुण मुलं आणि त्यांचं  लग्न हा त्यांच्या जिव्हाळ्यापेक्षा त्यांच्या घरच्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. काय? पटतंय ना हे स्टेटमेंट? जर तुमचं उत्तर हो असेल तर 'कॉफी आणि बरंच काही' तुमच्यासाठी आहे. तुमचं वय, तुमची जनरेशन, तुमचं कॉर्पोरेट स्टेटस यापैकी कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला फरक पडणार नाही ! खरंच!!

सेन्सॉर बोर्डानं किंवा निर्मात्यांनी 'बरंच काही आणि कॉफी' कि 'कॉफी आणि बरंच काही' या नावात घातलेल्या गोंधळामुळं पिक्चरचं पाळण्यातलं नाव आणि शाळेतलं नाव यामध्ये गडबड असली तरी एकदा सिनेमा चालू झाल्यावर त्या गडबडगोंधळाचं नामोनिशाण दिसत नाही. रवि जाधव हा माणूस निर्मात्यांमध्ये असेल तर डोळे झाकून सिनेमाच्या उच्च निर्मितीमुल्यांवर विश्वास दाखवावा एवढं स्टेटस  त्यानं जमवलं आहे! तो स्वतः डिरेक्टर नसला तरी!! 'रेगे' वरची त्याची छाप, अभिजित पानसे च्या आडूनही दिसून येते तसंच इथेही झालंय.

अगदीच तरुणपणी नोकऱ्या मिळायला लागल्यानंतर पहिल्यांदा  तरुणाई पसरली ती बिपीओ आणि केपीओ मध्ये त्यानंतर आय टी कंपन्यांमध्ये. मग कामाचा लोड, मिळणारा पैसा, प्रोजेक्टच्या अग्रेसिव्ह डेडलाईन्स आणि हायरार्कीत वर चढायची घाई या नादात लग्न, सेटलमेंट, पर्सनल लाईफ, आणि नाती मागे पडत गेली. नेमका याच विषयाला हात घालत  याच पार्श्वभूमीचा वापर करत  'कॉफी.. ' तयार व्हायला लागते आणि पुढे पुढे तीची रंगत वाढत जाते.

उपवर परंतु नॉन-लग्नेच्छुक मुलामुलींचा बराच सुकाळ आहे. निदान आताच्या काळात तरी. आपल्याला लग्न करायचं आहे का? किंबहुना  आपल्याला का लग्न करायचं आहे? आपल्याला कसा/कशी पार्टनर हवा/हवी आहे? असे असंख्य प्रश्न त्यांना पडलेले असतात परंतु कामाच्या धबडग्यात असेल किंवा इच्छा नसल्यामुळे असेल त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या भानगडीत हे लोक पडत नाहीत. आईवडील मात्र आपल्या कर्तव्य असल्याच्या थाटात किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या मुलांसाठी स्थळ शोधत असतात. 

असंच मित्राच्या मुलाचं 'स्थळ' लहानपणीच्या मित्राची (मोठी झालेली) मुलगी बघायच्या कार्यक्रमाला येतं आणि चित्रपट सुरु होतो. लिबरल कुटुंब आणि त्यात मोकळंढाकळं वातावरण असल्यामुळे हा कार्यक्रम काही तितकासा फॉर्मल होत नाही. अरेंज्ड लग्नाला दोघांचाही फारसा सपोर्ट नसतो त्यामुळे जाई (प्रार्थना बेहरे) त्याला- अनिष (भूषण प्रधान) ला आपल्या लाईफ  मधल्या घटना सांगत जाते आणि चित्रपट उलगडत जातो. तिची आणि निषादची झालेली पहिली भेट (जी फारशी लक्षात राहण्यासारखी पण नसते) इथपासून ती आजच्या दिवसापर्यंत छोट्या मोठ्या गोष्टींनी  भरलेला पेटारा ती अनिषसमोर उघडून टाकते. तिकडे कधी नव्हे ते जाई ला भेटायला बोलावून तिची (वेळेनंतरही) वाट पाहणारा  थोडासा अबोल असणारा निषाद (वैभव तत्ववादी) जे घडतंय त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न  करत असतो. 

ऑफिसमधला पहिला प्रोजेक्ट संपल्यावर आणि रिसोर्स रीअलोकेशन झाल्यानंतर त्यांना एकमेकांची उणीव जाणवायला लागते. सिनेमाचा प्रभाव असणा-या आपल्यावर 'हंसी  तो फंसी' किंवा 'प्यार है तो पलट के देखेगी' असल्या बालिश कल्पना म्हणजे प्रेम असलं काहीबाही जे बॉलीवूड ने ठसवलं आहे ते या दोघांच्याही डोक्यात आहे. तसलं काहीही वास्तव जीवनात होत नसल्यानं, जे होतंय ते प्रेम आहे कि नुसतं  infatuation आहे हेच त्या दोघांनाही कळत  नाही. जाईला एकदम मेमरेबल 'प्रपोज' हवाय आणि निषादला माहितीये कि त्याचं लाईफ ,त्याचा स्वभाव फिल्मी नाहीये. त्याला साधं I  like  you  बोलणंही कठीण जातं तर प्रेमाचा खुल्लमखुल्ला  इजहार करणं तर दूरची गोष्ट!! त्यामुळे कोणीही व्यक्त होत नाही आणि त्यामुळेच गोष्टी अडकून पडलेल्या असतात. त्यांना या प्रेमाची कोणीतरी जाणीव करून दिली पाहिजे ना? तशी जाणीव कोणी करून देतं का ? नुसती मैत्री आणि मैत्रीपलीकडचं नातं यातल्या सीमारेषा तशाच राहतात कि पुसल्या जातात? या प्रश्नांची उत्तरं  सिनेमागृहात जाऊन शोधायला पाहिजेत. 

संपूर्ण सिनेमात कुठेही 'कथा' नावाखाली कोंबलेला मेलोड्रामा नाही, भावनांचे विनाकारण हसू रडू आणणारे हिंदोळे नाहीत, खलनायक किंवा  प्रेमाच्या विरोधात असणारे आई-बाबा नाहीत, 'दुनिया कि कोई भी ताकत' च्या विरोधात लढणारे नायक नायिका नाहीत, समाजासाठी संदेश वगैरे तर नाहीच नाही तरी ही कंटेपररी पद्धतीने खुलत जाणारी लव्ह स्टोरी आहे! निखळ, हलकीफुलकी, रोमेंटिक! 

फक्त निषाद आणि जाईच नव्हे तर सिनेमातले इतरही लोक आपली छाप सोडतात. विशेष करून आभा! (नेहा महाजन)  तिने तिची वैचारिक दृष्ट्या 'मोठी' असणारी लहान बहिण मस्त साकारली आहे. दरवेळी नव्या  मुलीच्या प्रेमात पडून नंतर तोंडावर पडणाऱ्या  सुयश टिळकने निषादचा मावसभाऊ-निलेश म्हणून उत्तम काम केलं आहे. तो इनोसंटली देत असणारे सल्ले चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाहीत! बोजड संवाद आणि उदात्त तत्त्वज्ञान न सांगणा-या पटकथेमुळे सिनेमा आजूबाजूला घडणा-या घटना असल्यासारखाच वाटतो. 

वैभव तत्ववादी च्या वाट्याला पहिल्यांदा 'अमर प्रेम' सारखी टुकार सिरियल आणि त्यानंतर 'तुझ माझ जमेना' कि अशाच काहीतरी नावाची डेली सोप आली होती! त्याचं आणि टीव्ही सिरियलचं काही जमलं नाही पण या सिनेमात पहिल्यांदाच त्याला खरा अभिनय वगैरे करायची संधी मिळाली असं  वाटतंय, त्याने चीज केलंय. प्रार्थना बेहरे का कोण जाणे , क्लोज अप शॉट  मध्ये बऱ्याचदा ('मितवा' मधेही ) ऐश्वर्या राय सारखी दिसते असं  वाटतं. पण तिनेही चब्बी मराठी मुलगी खूप छान साकारली आहे. पुण्यातली  टिपिकल फमिली साकारण्यात दिग्दर्शक नव्वद टक्के तरी यशस्वी ठरला आहे हे मान्य करायलाच हवं!

सिनेमात दिसणारं ऑफिस असो, घर (जाईच्या भाषेतला साधा थ्री बी एच के चा flat !) असो कि कॉफी शॉप… प्रत्येक लोकेशनला एक प्रकारचा फ्रेशनेस आहे. तीच गोष्ट लागू होते charactersच्या कपड्यांच्या रंगसंगतीला! संपूर्ण सिनेमा संपेपर्यंत ते फ्रेश वातावरण प्रत्येक प्रसंगाला वेगळ्या  उंचीवर नेउन ठेवतं. 'रंग हे नवे नवे' हे मल्टीलिंग्वल गाणं तर खासच!! एकूणच काय तर मुलगा असो व मुलगी , स्त्री असो व पुरुष , आई असो व बाबा किंवा अशाच जोड्यांपैकी कोणीही असो, प्रत्येकाने किमान एकदा जाऊन या 'फिल्टर्ड' कॉफीचा आस्वाद घ्यायलाच हवा!! 

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

प्रेमाची (नवीन, टवटवीत आणि वेगळी) गोष्ट!!

चित्रपटसृष्टीत काही नावं उदाहरणार्थ राजकुमार हिरानी, आमिर खान, सतीश राजवाडे , अतुल कुलकर्णी वगैरे अशी असतात कि डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवावा आणि पैसे खर्च करून सिनेमाला जावं.. हमखास वसुली होण्याची हमी आणि चुकुनमाकून भ्रमनिरास झालाच तर अगदीच 'पैसे वाया गेले' असं म्हणण्याइतपत तरी दुःख होत नाही.. .. मात्र 'प्रेमाची गोष्ट' तुमचे पैसे वसूल करते हे नक्की!

आता सिनेमा म्हटला कि अवखळ नायिका आणि क्युट नायक यांची प्रेमकथा. बहुतेकदा 'पुरी दुनिया के कोई भी ताकत के साथ लडके झगडके ' वगैरे वगैरे नायिका नायकाला मिळते आणि सिनेमा संपतो.. प्रेमकथा संपते.. प्रेमाची गोष्ट संपते आणि 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' सुरु होते.. लग्न या विषयामध्ये फारसं रंजक काही नसावं त्यामुळे लग्न झालं कि नायक नायिकेमधलं हलकं फुलकं, खेळीमेळीच नातं लोप पावतं आणि पडद्यावर दाखवण्याइतकं काही नसतं या समजामुळे बरेचसे सिनेमे तिथेच संपत असावेत..

पण जिथे नेहमीचे सिनेमे संपतात अगदी तिथूनच 'प्रेमाची गोष्ट' सुरु होते.. 'डिवोर्सी'ज हे हलक्याफुलक्या प्रेमकथेचे नायक-नायिका होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं पण हा सिनेमा हा समज खोटा ठरवतो. फेल गेलेले लग्न जुळवून ठेवण्याची पराकाष्ठा करणारा नायक आणि लग्न टिकवण्यासाठी दोन वेळा प्रयत्न करूनही यश न मिळाल्यामुळे 'आपलं काय चुकलं' याचा शोध घेणारी नायिका यांची कौन्सिलर ऑफिसमध्ये (अगदीच चुकीच्या पद्धतीने) भेट होते आणि तिथून चित्रपटाची सुरुवात होते.

काही जोड्या मुळातच एकमेकांसाठी बनलेल्या नसतात.. पण नायकाला हे पटत नसतं आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना (इव्हन प्रेक्षकांना) हे उमजत असतं. मुळात लेखक असणारा नायक त्याच्या प्रतिभेने नवनवीन वाक्यं तयार करून त्याचा मुद्दा मांडू पाहत असतो आणि इतर लोक त्याला वास्तव जीवनात राहून , प्रत्यक्ष आयुष्याचे धडे शिकवत असतात.. ओघाओघानेच चित्रपटाची नायिका सेक्रेटरी म्हणून लेखकाच्या जीवनात येते आणि अप्रत्यक्षपणे ते एकमेकांमध्ये गुंतत जातात.. संपूर्ण चित्रपटात हा गुंता अजून वाढत जातो आणि शेवटच्या क्षणाला तितक्याच हळूवारपणे सोडवलाही जातो...

हि सहजता संपूर्ण चित्रपटभर आपल्याला दिसत राहते.. ' दोघेही घटस्फोटीत.. च्यायला म्हणजे बौद्धिकं असणार. सिरियस असणार सगळं' असा सुरुवातीला होणारा ग्रह किती फोल आहे याचा प्रत्यय जसजसा पिक्चर पुढे सरकत जातो तसतसा आपल्याला येत जातो. प्रेमात पडल्यावरही त्याची कबुली स्पष्टपणे द्यायचा गोंधळ.. लिहित असलेल्या स्क्रीनप्लेच्या माध्यमातून आपली मतं पटवून द्यायची नायक नायिकेची धडपड, दोघांचेही पार्टनर्स असताना त्यांना भेटल्यावर होणारी तगमग अतिशय यथार्थपणे पडद्यावर चितारण्यात आली आहे.

बरं फक्त लग्न, घटस्फोट आणि त्या अनुषंगाने तोच तो विषय चघळून चघळून त्यातला इंटरेस्ट निघून जाणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे हे विशेष. लेखक असलेल्या नायकाच्या तोंडी असलेले 'कितीही मोठा लेखक असला तरी कोरा कागद समोर आला कि मन बधिर होतंच'  किंवा
'सिनेमा म्हणजे काय गं ? आपल्या आजूबाजूच्या घटना...'
'देवाचा प्रत्यय तेव्हाच येतो जेव्हा तुमची त्याच्यावर गाढ श्रद्धा असते' असे संवाद आपले वाटून जातात..
'हे सिनेमावाले इमोशनल सीन इतके मेलोड्रामाटिक करतात कि आपल्याला रडण्याऐवजी हसू येतं आणि विनोदी सीनला जणू डोक्यावर बंदूक ठेवून 'हसा' म्हणतात'
'तूच म्हणायचास ना , कि ती तुझी बायको झाली पण मैत्रीण नाही होऊ शकली.'
'लग्न म्हणजे प्रोडक्ट नव्हे एक्सपायरी डेट असायला..'
'जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात आणि तरीही जुळवायचंच म्हटलं तर संसार होतो.. सहवास नाही' अथवा 'भांडण करून, नाती तोडून, वेगळं होऊन प्रश्न सुटत नाहीत' अशासारखे संवाद विचार करायला लावतात. (कदाचित संदर्भ नसल्यामुळे इथे वाचताना त्यांचा अर्थ लागणार नाही पण सिनेमा बघताना नक्कीच कळेल..)

'अतुल कुलकर्णीने नायक अगदी ताकदीने उभारला आहे' वगैरे कोणीही म्हणणं म्हणजे काजव्याने सूर्याची प्रतिभा जोखण्यासारखं आहे .. प्रचंड कॅलिबरच्या या अभिनेत्याने निर्विवादपणे अपेक्षांची पूर्ती केली आहे.. भूमिकेच्या, कथानकाच्या, दिग्दर्शकाच्या आणि प्रेक्षकांच्याही !! सागरिका घाटगेला पदार्पणातच सतीश सारखा दिग्दर्शक आणि अतुल सारखा सहकलाकार लाभला हे तिचं (आणि आपलंही ) भाग्य.. तिच्या फ्रेश आणि टवटवीत लूक मुळे अख्खा मूवी रीफ्रेशिंग होतो हे सुद्धा नाकारून चालणार नाही.. रोहिणी हट्टंगडीने मराठमोळ्या घराघरातून दिसणारी आई सर्वार्थाने साकारली आहे पण सासू म्हणून तिच्या इतका समजूतदारपणा फार कमी सापडेल.. :) सतीश राजवाडे हा उत्कृष्ट दिग्दर्शकाच्या जोडीने उत्तम अभिनेता आहे हे ही दिसतं.. थोडक्यात सगळेच कलाकार आपल्या भूमिका जगले आहेत.

'ओल्या सांजवेळी' सारखं मुळातच सुंदर शब्दरचना असणारं गीत स्वप्नील आणि बेलाने आपल्या सुरेल आवाजाने जिवंत केलं आहे. कैलाश खेरनं देखील सागरिका घाटगेसारखी मराठीतल्या पदार्पणातच दमदार सेन्चुरी मारली आहे.. एकंदर म्युझिक आणि गाणी संपूर्ण चित्रपटात कुठेही उपरी वाटत नाहीत. आणि नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रायोजकांच मन न मोडता चित्रपटात केलेली एका प्रोडक्ट ची जाहिरात! यासाठी दिग्दर्शकाला मनापासून दाद द्यावीशी वाटते! ('आम्ही सातपुते' वाला सचिन पिळगावकर यातून नक्कीच काही 'आयडीयेची कल्पना' घेईल अशी भाबडी आशा!!)

तर अशी ही 'प्रेमाची गोष्ट'! प्रोमोजमध्ये  म्हटल्याप्रमाणे सहज,साधी,सोपी नसली तरी सुंदर आणि हळुवार तरी नक्कीच. सिनेमागृहातून बाहेर पडताना तुम्हाला अपेक्षित संदेश मिळत नसेल कदाचित पण एक समाधान मिळतं आणि तुमच्या असलेल्या / नसलेल्या लाईफ पार्टनरसाठी गुणगुणायला एक सुंदर गाणं..
"ओल्या सांजवेळी..उन्हे सावलीस बिलगावी..तशी तू जवळी ये जरा..
को-या कागदाची कविता अन जशी व्हावी.. तशी तू हलके बोल ना..."

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

द गोल्डन आईड लायन!!

'आम्ही' (आदरार्थी मी या अर्थी) 'वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर' या नावाने दाखवल्या जाणा-या चित्रपटांपैकी एक अतिप्रचंड टुकार रिमेक बघितला.. आणि हे लिहायचे सुचले. सदर टुकार हे विशेषण सिनेमा साठी नसून रिमेक साठी आहे हे लक्षात घ्यावे! नाव 'रावडी राठोर..' मूळ 'व्हर्जिनल' चित्रपट ज्यांनी पहिला असेल त्यांना हे पटेल.. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी लेखाचा पहिला प्याराग्राफ वगळून लेख वाचायला सुरुवात केली तरी हरकत नाही. अर्थात इथपर्यंत पोचायला तो वाचवा लागणारच पण असो..

लेखाचा मूळ मुद्दा मुव्ही नसून मुव्हीचा हिरो आहे .. पहिला नव्हे दुसरा नव्हे तर तिसरा हिरो. यापूर्वी दबंग स्टाईल मध्ये पदार्पण केलेला आणि उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळवलेला हिरो. यावर बरेच दिवस लिहावं लिहावं म्हणत होतो पण जमलं नाही.. हा सिनेमा पाहिल्यावर मात्र म्हटलं आता 'आळस सगळा झाडोनी' हे काम हातावेगळं केलंच पाहिजे नाहीतर प्रकरण हाताबाहेर जायचं. तर त्या हीरोचं नाव आहे....
सोनाक्षीबाई सिन्हा!! द गोल्डन आईड लायन!!
म्याडमची तथाकथित 'मादक' अदा !

हो हो.. बरोबरच लिहिलं आहे मी! सोनाक्षी सिन्हा या व्यक्तिमत्वाला 'हिरोईन' या क्याटेगरीत क्लासिफाय करायचं आमचं धाडस नाही बुवा! तिला एकतर हिरोतरी समजा नाहीतर बाईतरी!मुळात सोनाक्षी सिन्हा कोणत्याही चित्रपटात जो कोणता 'किरदार' करते त्यावेळी हिरोचं तिच्याबरोबर अफेअर आहे असं न वाटता एक्स्ट्राम्यारीटल अफेअर आहे असं आम्हाला वाटतं.

बाप इंडष्ट्री  मध्ये मोठा माणूस असेल तर कोण, कसं आणि काय होऊ शकतं याची जी मोजकी उदाहरणं आहेत त्यापैकी सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा हि मजबूत नावं! सोनाक्षी हे तर अंगापिंडाने
सुद्धा मजबूत असणारं उदाहरण!!

चेह-यावरची रेघ अथवा माशीसुद्धा (ज्यावेळी हलायला पाहिजे त्यावेळी) हलू  न देता ज्या मख्खपणे ही अभिनेत्री वावरते तिला जर उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळू शकतो तर आमचा तमाम सिनेसृष्टीला सवाल आहे कि याच न्यायाने आतापर्यंत एकदापण अजय देवगणला उत्कृष्ट नृत्याचा पुरस्कार का बरे मिळाला नाही? आणि डायलॉग काय तर म्हणे "थप्पड से डर नही लगता साब..प्यार से लगता है!" आम्ही तर पुढे जाऊन असे म्हणतो कि हिला डरायची काहीच जरुरी नाही, 'डर' त्याला वाटायला पाहिजे ज्याच्या प्रेमात ही पडेल..

एखाद्या अभिनेत्रीला आवश्यक असणारं, जरा बरं दिसण्याचं, सौजन्य तरी दाखवावं कि नाही या बयेनं (कि या बाईनं)? तर ते पण नाही. हां...आता रुंद भाल प्रदेश हे सौन्दर्याच लक्षण असतं असं म्हणतात. पण हे (अव)लक्षण तिच्याबाबतीत जरा जास्तच ठळकपणे उठून दिसतं. भुवयांच्या वरून तिची कपाळपट्टी सुरु तर होते पण अर्धं डोकं संपलं तरी पट्टी काही संपायचं नाव घेत नाही. फेसवॉश च्या किती ट्युब्ज ती महिन्याकाठी संपवत असेल याचा हिशेबच न ठेवलेला बरा..

तिचे बलदंड बाहू पाहिल्यानंतर तिचं रक्षण करायला कोण्या सलमान खान ची गरज का पडावी हा बाळबोध प्रश्न आम्हाला 'दबंग' हा सिनेमा पाहताना पडला होता.त्या चित्रपटात तर तिच्या पडद्यावरच्या एन्ट्रीलाच तिने विस्तीर्ण पाठ दाखवल्यानंतर या दृश्याला 'सेन्सॉर'वाल्यांना 'किळस' या क्याटेगरी अंतर्गत कात्री कशी लावावीशी वाटली नाही कोण जाणे!

'ओ माय गॉड' या सिनेमातला न पाहण्यासारखा कोणता भाग असेल तर ते 'गो गो गोविंदा' वालं गाणं. बिचा-या प्रभुदेवाला तिला नाच शिकवताना काय यातायात करावी लागली असेल ते (प्रभू) देवालाच ठाऊक. त्या बिचा-याने केलेले वेडेवाकडे अंगविक्षेप हिरो लोकांना सुद्धा नाकी नउ आणत असतात मग एखाद्या बाईला शिकवताना तर विचारूच नका! ज्या पद्धतीने गरीब पद्धतीचे कपडे (फाटलेली प्यांट आणि बटनं तुटलेला आणि गाठ मारून अंगावर घातलेला शर्ट ) घालून तिने प्रभू देवासारखं नाचल्याचा आव आणत जो उच्छाद मांडला आहे त्यावरून तर आम्हाला हा पिक्चर बघायची सुद्धा छाती होत नव्हती परंतु काही पेपरवाल्यांनी या सिनेमात ती फक्त एवढ्याच गाण्यापुरती आहे आणि सिनेमाशी तिचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा केल्यामुळे आम्ही हा सिनेमा पहायचं धाडस केलं.

"कमर या कमरा?" संभ्रमावस्थेतील राठोडसाहेब
रावडी राठोर (कि राठोड ) मध्ये "चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया" हे गाणं आम्ही सुरुवातीला 'पतली कमर पे' असं ऐकलं होतं. जेव्हा आम्ही ते पुन्हा ऐकलं तेव्हा गाण्यात उल्लेखिलेली ती 'कमर' नेहमीसारखी 'पतली' नसून  'चिकनी ' आहे हे आम्हाला कळलं. ज्यावेळी आम्ही ते गाणं आमच्या या या चक्षुंनी पाहिलं तेव्हा गीतकाराने मूळ (आणि सर्वत्र वापरली जाणारी ) 'पतली कमर' ही टर्म बदलून 'चिकनी कमर' का केलं असावं हे आम्हाला उमगलं आणि पटलं सुद्धा! कारण त्या कमरेचा साईड  व्ह्यू हा सामान्य कमरांच्या  फ्रंट व्ह्यू इतका होता! काय बिशाद होती कोणाची तिला पतली कमर म्हणून हिणवायची? तिला जर गीतकाराने 'पतली' असं संबोधलं असतं तर त्याला बिचा-याला 'पतली गली' पकडून इंडस्ट्री सोडावी लागली असती. असो! पण ज्या पद्धतीने ती या गाण्यात नाचली आहे ते पाहिल्यावर 'बृहन्नडेने भर दरबारात जे नृत्य केलं होतं ते कसं दिसलं असावं' हे
आमचं ब-याच दिवसांपासून असणारं कुतूहल शमलं,तो भाग वेगळा. यासाठी आम्ही तिचे आयुष्यभर ऋणी राहू!

सोनाक्षी बाईंचे जोकर सारखे चित्रपट (सुरुवातीला आमचं मत होतं कि चित्रपटाचं नाव या बाईवरून ठेवण्यात आलं आहे कि काय? परंतु आधीच्या अनेक मतांप्रमाणे हे मत देखील चुकीचे निघाले! ) बघायचं धैर्य काही आम्हाला अखेरपर्यंत एकवटता आले नाही. अगदी केबल वरून तो फुकट प्रसारित झाला तरीही! आता तर 'सन ऑफ सरदार' नावाच्या सिनेमात ती दिसणार आहे. एकंदरीत (संजय दत्तशी [कि तो तिचा भाऊ आहे ?] तिचे लग्न होताना दिसते आणि अजय देवगण दुःखी कष्टी होतो तो ) प्रोमो बघताना सिनेमाचा विषय जरठ विवाह , विधवा पुनर्विवाह किंवा तत्सम काहीतरी सामाजिक बांधिलकी जपणारा असावा असा आमचा कयास आहे. अर्थात, आधीच्या चुकलेल्या कयासांप्रमाणे हा अंदाजदेखील चुकणार हे सांगणे न लगे!

चांगल्या ब्यानरच्या सिनेमांमुळे किंवा सिनेमाच्या हिरोंमुळे सोनाक्षी बाईंच करियर त्यांना सध्या हिरोईन म्हणून प्रमोट करून पाहत असलं तरी तिचं भवितव्य तीच जाणे. परंतु आम्हास मनापासून विश्वास आहे कि सोनाक्षीबाईंनी बॉलीवूडला हिरोईन दिली नाही तरी 'रेडीमेड आई' मात्र नक्कीच दिली आहे!

तिच्या भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देऊन (आणि तिची फ्यान मंडळी आम्हाला फटकावायच्या आत) आम्ही आवरतं घेतो !

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०

मुन्नी बदनाम हुई: एका खंडकाव्याचे रसग्रहण

भारतीय सांगीतिक इतिहासात उलथापालथ घडवून आणण्याची ताकद असणा-या "मुन्नी बदनाम हुई" या खंडकाव्यावर भारतातील आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख येणं तर सोडाच पण या काव्याची साहित्यविश्वाने साधी दखलही घेऊ नये याचं आम्हांस फार वैषम्य वाटलं म्हणूनच या काव्याला (ज्याला सामान्य लोकांनी 'गाणं गाणं' म्हणून हिणवलं) सदर मीमांसा अर्पण!
या कवितेतील वाक्य-वाक्यात दडलेल्या परिपूर्ण प्रतिभेचा रसास्वाद घ्यायचा आम्ही एक क्षीण प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीपासून स्टार्ट  करू!

मुन्नी बदनाम हुई, डार लिंग तेरे लिये..

मुन्नी म्हणतेय कि हे प्रियतम, फक्त तुझ्यासाठी ही मुलगी जिला सगळे लाडाने मुन्नी म्हणत असावेत,तिची बदनामी झाली.. ती कशी झाली याचं उत्तर गाण्यात सापडतं का ते आपण पाहूया. येथे डार लिंग हा शब्द डार्लिंग या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश असावा. त्यावरून मी 'प्रियतम' हा सर्वांना समजेल असा सुटसुटीत शब्द योजला आहे. या पहिल्या वाक्याचं समर्थन करताना ती पुढे म्हणते,

मुन्नीके गाल गुलाबी,नैन शराबी,चाल नवाबी रे....
..मुन्नीने नेहमीप्रमाणे मेकअप केला आहे त्यामुळे तिच्या गालावर त्याची गुलाबी छटा पसरली आहे, तसेच ती बहुधा जरा जास्तच व्होडका पिऊन आली असावी,ज्या पद्धतीने मलायका अरोरा या गाण्यात नाचली आहे त्यावरून कोणी आमच्या विधानाला हरकत घेईल असे वाटत नाही. आणि पुढे पहा.. अल्कोहोल चा ओव्हरडोस झाल्यावर पावलं राजेशाही थाटात पडणं साहजिकच आहे नाही का? तो थाट वर्णन करताना तिनं म्हटलंय कि माझं चालणं असं आहे कि जणू नवाब लोकांचा थाटच ! ती पुढे म्हणते..

ले झंडू बाम हुई, डार लिंग तेरे लिये..
म्हणून हे प्रियतम, तुझ्यासाठी मी 'झंडू बाम' झाले. म्हणजे अर्थातच तुझ्या सगळ्या दुखण्यावरचा उपाय झाले. फक्त एवढाच मर्यादित अर्थ नाहीये या ओळीचा;तर मतितार्थ लक्षात घ्या. बाम ही वस्तू डोकेदुखी दूर करण्यासाठी वापरली जाते, तसेच 'कमर मे मोच,पीठदर्द,घुटनों में दर्द' साठी प्रभावी उपचार म्हणून याचा प्राथमिक वापर होतो. माझं गाणं ऐकून होणारी डोकेदुखी, किंवा माझ्यासारखं नाचताना लचक आली तर त्यापासून सुटका कशी करायची? तर या ओळीतून मुन्नीने सर्वांसाठी इलाज सुचवला आहे.
पुढच्या नवरात्रात किंवा गणपतीत हे गाणं जेव्हा जोरजोरानं वाजेल तेव्हा म्हाता-या लोकांना डोकेदुखी हमखास सुरु होणारच. या वर्गाला होणारा स्मृतीभ्रन्शाचा विकार विचारात घेता सुनेला जेव्हा ते हाक मारतील तेव्हा त्यांना सोयीस्कर जावं यासाठी मुन्नी त्यांना ब्रांड देखील सुचवते. गाणं ऐकताच ते म्हणू शकतील "सुनबाई, जरा झंडू बामची बाटली आण गं!"
हेच या गाण्याचं धृवपद आहे. केवढी मोठी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून हे गाणं लिहिलं गेलं आहे याची कल्पना ऐरागैरा करूच शकणार नाही!

शिल्पासा फिगर बेबो सी अदा , बेबो सी अदा...
ती म्हणते माझा बांधा शिल्पा (ही शेट्टयांची असावी, कारण शिरोडकरांचा बांधा जाहीर उल्लेख करण्यासारखा राहिला नाहीये!) सारखा कमनीय आहे. वा! वा ! शब्दा-शब्दातून सौंदर्याचे नवीन मापदंड कसे उभे केले आहेत ते पहा.. माझ्या अदा म्हणजे नटणं मुरडणं हे कपूरांच्या करीनासारखं आहे. बहुधा सध्याच्या काळात तिची दखल घेण्याजोगी ही एकच गोष्ट असावी. तिची फिगर मुन्नीच्या नजरेतून कशी सुटली हा मात्र संशोधनाचा विषय होऊ शकतो.असो! तर मुन्नी म्हणते..

है मेरे झटके में फ़िल्मी मज़ा रे फ़िल्मी मज़ा...
मुळात 'फ़िल्मी मज़ा' हा काय प्रकार असतो हे माहित नसल्यास या वाक्यातून काही अर्थबोध होणार नाही. आम्ही संशोधनाअंती असा निष्कर्ष काढला कि भारतीय भाषेत फिल्मी म्हणजे 'आभासी'! त्यामुळे प्रत्येकाच्या कल्पनेमध्ये 'मजा' या शब्दाचा जो 'अर्थ' ऐकणा-याला अभिप्रेत आहे, तो त्याने घेतला कि या वाक्यातली मजा कळेल! (आधी हे वाक्य कळलं का बघा!) मुन्नीने अंगाला दिलेल्या प्रत्येक झटक्याबरोबर तुम्हाला 'ती मजा' घ्यायची असेल तर कल्पनाशक्तीला जेव्हढा वाव देता येईल तेवढा चांगलं! पण हे समजणारे फार थोडे लोक असतात आणि याची मुन्नीलादेखील जाणीव आहे बरं का? म्हणूनच ती पुढे म्हणते..

हाय तू न जाने मेरे नखरे पे..... हाय तू न जाने मेरे नखरे पे लाखों रुपैया उड़ा..
ज्याना ही उपरोल्लेखित 'मजेची जाण' आहे त्या सुजाण लोकांनी लक्षावधी रुपये या मुलीवर उधळले आहेत अशी कबुली ती स्वतःच देते. यावरून तिच्या व्यवसायाची साधारण कल्पना येते.

वे मैं टकसाल हुई , डार लिंग तेरे लिये..

म्हणजे पहा.. नुसत्या नख-यावर खो-याने पैसा ओढणारी ही (बार)बाला स्वतःला टांकसाळीची समर्पक उपमा देते. यावरून प्रियकर म्हणून तिचा रोख साधारण बारमालकाकडे अथवा तो फारच वयस्कर असल्यास त्याच्या मुलाकडे असावा असे वाटते. इथे मुन्नीच्या प्रतिभेला दाद द्यावी तितकी थोडी! पुढे मुन्नी म्हणते..

सिने माहॉल हुई , डार लिंग तेरे लिये..
म्हणजे संधीविग्रह केल्यानंतर हे वाक्य "सिनेमा हॉल हुई" असं असावं. मल्टीप्लेक्स मध्ये एंटरटेनमेंट ट्याक्सच्या नावाखाली ओढला जाणारा प्रचंड पैसा लक्षात घेता ते पैसा छापण्याच मशीन बनलं आहे यात शंका नाही. नेमका हाच मुद्दा उचलून मुन्नीने स्वतःच स्वतःला ती उपमा दिली आहे. 'मी नाचगाण्यातून  किती पैसा मिळवते आहे ते पहा, आणि ही गोष्ट विचारात घेता तू इकडे आकर्षित व्हायला काहीच हरकत नसावी' असे मुन्नीला येथे म्हणायचे असावे!

पुढील कडव्याला स्पर्श करण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते!
वास्तवात मुलींशी साधे बोलायचे देखील गट्स नसणारा एखादा नवखा खेळाडू, सोशल नेट्वर्किंग साईटवर मुलींचे प्रोफ़ाईल्स चाळून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी फोटोजवर "u look cool " "nic snap dear ! " "beutiful dear.. " "gorgius " अश्या (अशुद्ध लेखन असणा-या) कमेंट्स देऊन नंतर "माझ्यशी मैत्री कर्नर क ?" किंवा "wana b my frend?" वगैरे विचारतो. इथे खुल्ली ऑफर देणा-या मुन्नीने तिच्याबद्दल एवढ सांगितल्यानंतर तिथे असणा-या एखाद्याला तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली नाही तरच नवल! असाच एक जण लगेच आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो..
ओ मुन्नी रे, ओ मुन्नी रे..
तेरा गली गली में चर्चा रे...

कॉलेजात एखादी नवीन मुलगी आली तर ती गेटमधून बिल्डींगमध्ये पोहोचेपर्यंत तिची चर्चा वर्गावर्गात सुरु झालेली असते तर इथे स्वतः मुन्नीने घसा फोडून सांगितल्यानंतर तिची चर्चा कुठे होणार नाही हे शक्य आहे का? तेच इथे सांगितलं जातंय.. मुन्नीला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली जातेय कि गल्ली गल्ली मध्ये तुझ्या नावाची चर्चा चालू आहे. याच भावना पूर्वी शम्मी कपूरने "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे" या गाण्यातून व्यक्त केल्या होत्या.पुढे हा आशिक म्हणतो..

है जमा इश्क दा इश्क दा परचा रे जमा इश्क दा इश्क दा परचा रे ...
ओ मुन्नी रे !!

या ओळींवर (खालची मुन्नीला दिलेली हाळी वगळता ) आमचे अजूनही संशोधन चालू आहे.. काव्य प्रकाशित झाल्यानंतरदेखील हा लेख प्रकाशित करायला एवढा वेळ झाला या मागचं मुख्य कारण ह्या दोन ओळीच आहेत. भान हरपल्यानंतर मनुष्य काहीबाही बरळत सुटतो त्यापैकी हा प्रकार असावा असे आमचे प्रथमदर्शनी मत आहे. यातून खरेच काही अर्थबोध होत असल्यास त्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा अशी आमची विनंती आहे!

असे कितीतरीजण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात म्हणून मुन्नीने काय सगळ्यांनाच फ्रेंड लिस्ट मध्ये add करायचं की काय? छे छे.. अश्या लोकांशी कस वागायचं हे मुन्नीला चांगलंच ठाऊक आहे! म्हणून ती लगेच म्हणते..
कैसे अनाडी से पाला पड़ा जी पाला पड़ा.......हो कैसे अनाडी से पाला पड़ा जी पाला पड़ा...
या कडव्यात मुन्नीला एक गहन प्रश्न पडला आहे कि या कसल्या निर्बुद्ध माणसाशी आपली गाठ पडली आहे? तिला तो बेअक्कल का वाटावा? तर त्याचं उत्तर तिनं लगोलग देऊन टाकलं आहे.
बिना रुपैये के आके खड़ा मेरे पीछे पड़ा...
एखाद्या बारबालेच्या मागे लागणं तेदेखील हातात/खिशात एकही छदाम नसताना? हे निर्बुद्धपणाचेच लक्षण नव्हे काय? मुन्नीने ते बरोबर जोखले आहे म्हणून त्या मूर्खाचा पोपट असा उल्लेख करून ती म्हणते..
पोपट न जाने मेरे पीछे वो सैफू...
एखाद्याला हातोहात मूर्ख बनवला, किंवा त्याला वेड्यात काढला कि त्याचा 'पोपट' केला असं म्हणतात. तोच अर्थ मुन्नीला घ्यायचा असावा. आंबटशौकीन श्रोत्यांच्या डोक्यात जर चटकन कोणताही दुसरा अर्थ आला असेल तर त्यांनी तो लगेच काढून टाकावा ही विनंती आहे. ती म्हणते माझ्यापाठी सैफु लागलाय... सैफु म्हणजे सैफ अली खान, बरं का? तो तिच्या मागे आहे; तर या सगळ्या बिन पैसेवाल्या भिकारी लोकांनी त्यांच्या हद्दीत राहावं असा तिचा स्पष्ट सल्ला आहे! आता पहिल्या कडव्यात करीनाचा उल्लेख केल्यावर सैफ अली खानला अनुल्लेखाने टाळणे म्हणजे त्याचा घोर अपमान! याचं पातक डोक्यावर घ्यायचं मुन्नीनं खुबीनं टाळलंय. तिची ही शिताफी लक्षात येताच कोणालातरी दाद दिल्याशिवाय राहवत नाही..दबक्या आवाजात तो ओरडतो
हाय हाय मारही डालोगी क्या..
पण त्याला न जुमानता मुन्नी त्यालाही त्याची औकात (मराठीत..लायकी) दाखवून देते..
पोपट न जाने मेरे पीछे सैफू से लेके लम्बू खड़ा...
म्हणजे नुसता सैफच नव्हे तर लंबूही तिच्या मागे आहे. लंबू म्हणजे अमिताभ बच्चनच असावा यात डाउट नाही. बॉलीवूडच्या शहेनशाहचा 'लंबू' असा अपमानास्पद उल्लेख करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे. इतिहासाची पाने चाळल्यास गोविंदानेदेखील आपल्या नायिकेला भुलवण्यासाठी 'जो तू होती जया भादुरी.. हम भी तो लंबू होते... गोरी तेरे नैनो में हम बस जाते!' असं म्हणून अमिताभला लंबू म्हटले आहे. आता अमिताभची उंची आहे जरा जास्त म्हणून काय त्याचा सारखा सारखा असा उल्लेख करून त्याला पदोपदी हिणवायचं? आपल्याला नाही बुवा आवडलं! पण हे आमचं वैयक्तिक मत आहे. जाऊ दे.. विषय भरकटला.. तर मुन्नी म्हणते कि सैफ अमिताभ सारख्या थोरामोठ्यांची नजर तिच्यावर असताना देखील..

आयटम यह आम हुई , डार लिंग तेरे लिये..
आयटम यह आम हुई , डार लिंग तेरे लिये..

आयटम म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेत 'अनेकात एखादी'. 'आयटम' या शब्दाच्या प्रत्येकाच्या संज्ञा वेगवेगळ्या असू शकतात! जश्या कि 'लाखात एखादी' 'हजारात एखादी' इत्यादी इत्यादी.
तर ढोबळमानाने असणारा 'चारचौघात लक्ष वेधून घेणारी' हा अर्थ आपण घेऊ तर तो मुन्नीवर अन्याय होईल. 'सैफ' वगैरे म्हणजे जरा जास्तच पातळी आहे त्यामुळे इथे 'त्या' लेव्हलची बाला 'आम' झाली.. आता बघा.. इथे भाषेतला शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेलाय त्याला महत्व आहे. हा 'आम' खायचा नाही.. आय मीन..हा 'आम' खायचा 'आम' नाही. आम म्हणजे अतिसामान्य.. 'आम जनता' मध्ये असलेला अर्थ. या भाषेची हीच तर खासियत आहे! ही देखणी, लावण्यवती (असताना ती ) अतिसामान्य झाली.. आता आधीच्या वाक्याचा संदर्भ घेतला तर मुन्नी म्हणते कि सैफ अमिताभ सारख्या थोरामोठ्यांची नजर तिच्यावर असताना देखील.. ही खास आयटम जनसामान्यांसाठी उपलब्ध झाली (श्रोत्यांनी आणि वाचकांनी इथे आपल्या कल्पनाशक्तीला थोडासा लगाम घालावा..) कारण, हे प्रियतम फक्त तू आणि तुझ्यासाठी! बघा बघा.. अपूर्व त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण घालून दिलेलं आहे मुन्नीने! याला म्हणत असावेत खरखुर आकर्षण! आणि त्यामुळेच ती पुन्हा आठवण करून देते कि बाबा खरंच...
मुन्नी बदनाम हुई, डार लिंग तेरे लिये..

एवढं सगळं म्हटल्यानंतर (तेदेखील एका सुस्वरूप मुलीने !) कोणाच हृदय द्रवलं नाही तरच नवल!
है तुझमें पूरी बोतल का नशा,बोतल का नशा ..है तुझमें पूरी बोतल का नशा,बोतल का नशा...
इथे मुन्न्याची एन्ट्री झालेली आहे.. आम्ही पहिल्यांदा केलेल्या 'मुन्नी बहुधा जरा जास्तच व्होडका पिऊन आली असावी' या विधानाला पुष्टी देणारी वाक्य तो स्वतः इथे फेकत आहे पहा.. 'तुझ्यामध्ये पूर्ण बाटली पिल्यानंतर जेवढी नशा चढते तेवढीच नशा आहे' असा या वाक्याचा जरी वरवरचा अर्थ असला तरी छुप्या अर्थाकडे कोणाचं लक्ष जाणार नाही म्हणून स्पष्ट करत आहे.. 'एका बाटलीमुळे जेवढी नशा चढते तेवढी नशा तुला चढली आहे..झेपत नाही तर कशाला प्यायची एवढी' अशी मुन्नाला तिच्याबद्दल वाटणारी काळजी त्यातून व्यक्त होते.

कर दे बुढापे को कर दे जवाँ रे कर दे जवाँ...
आता तरणीताठी पोरगी बेधुंद होऊन जर बेफाम नाचायला लागली तर त्यापासून स्फूर्ती घेऊन म्हाता-याकोता-यांनादेखील नाचावेसे वाटेल यात शंका नाही. याच अर्थाने मुन्नाने, मुन्नीच्या नशेची महती वर्णन करण्यासाठी एक दाखला म्हणून हे वाक्य उच्चारले असावे! तुझी नशा एवढी आहे कि म्हातारपणालासुद्धा तरुणाईत बदलायची असीम ताकद आहे त्यात! केवढ हे कौतुक.. केवढी ही स्तुती आणि उतू जाणारं प्रेम! यापुढे मुन्ना आणि मुन्नीची प्रेमकहाणी फक्त या एका काव्यामुळे लैला-मजनू, हीर-रांझा, सोनी-महिवाल अगदी आताच्या काळातले राधे-निर्झरा, वीर-झारा यांच्या बरोबरीने अजरामर होणार ही काळ्या दगडावरची (खडूने मारलेली पांढरी) रेघ आहे!!
पुढे मुन्ना फॉर्मात येऊन म्हणतो..
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली, हाये..
वा वा! ओठांवर शिव्या तुझ्या डोळ्यात दोन रंग.. बहुधा दारूमुळे लालपिवळे झालेले तिचे डोळे मुन्नाने अचूक हेरले असावेत.. आणि शिव्या हा अल्कोहोलचा काऊन्टर इफेक्ट आहे हे जाणकार श्रोत्यांना कळले असेलच! म्हणजे हे गाणं ऐकताना नुसते कान नव्हेत तर भानही हवे. तो पुढे म्हणतो कसा..
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली रे दे है जिया...
तू आयटम बॉम्ब हुई, डार लिंग मेरे लिए...
इथे आयटम हा शब्द atom या अर्थी योजला आहे.. एकाच शब्दाचा उपयोग दोन वेगवेगळ्या अर्थांनी करायची किमया इंग्रजी भाषेनंतर बॉलीवूडच्या गीतकारांनी साधली आहे यावर कोणाचेच दुमत नसेल! तू माझ्यासाठी जणू अणुबॉम्ब झालीस! प्रतिभा पहा.. 'बॉम्ब' हा शब्द तरुण मुलं कोणत्या अर्थाने वापरतात हे त्यांना तर सांगायला नको पण लेडीज वाचकांवर अन्याय नको म्हणून मी जरा सोज्वळ शब्दात हे संकल्पना सांगतो.. एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर जर पाहणा-याच्या मनामध्ये संमिश्र भावनांचा (म्हणजे सर्व भावना एकाचवेळी एकत्र! ) कल्लोळ माजला (जसा बॉम्ब फुटल्यावर माजतो) तर ती व्यक्ती 'बॉम्ब' आहे असं म्हणायला हरकत नाही!सहसा या विशेषणाचा वापर मुलींकरिताच केला जातो असा समज आहे. नुसता बॉम्ब म्हटलं तर एवढा कल्लोळ तर 'आयटम बॉम्ब' म्हणजे काय असेल याची तर कल्पनाच न केलेली बरी! मुन्नाने हे विशेषण मुन्नीला देऊन तिच्या नटण्या मुरडण्याचा, मेकपचा, नाचाचा, दारू पिऊन घातलेल्या धिन्गाण्याचा, थोडक्यात तिच्या ओव्हरऑल कार्याचा यथायोग्य सन्मान केलेला आहे असे आम्हास प्रामाणिकपणे वाटते.

मुन्नी बदनाम हुई,
मुन्ना आणि मुन्नी यांचा एक दुर्मिळ फोटो!
डार लिंग मेरे लिये..
मुन्नीके गाल गुलाबी,
नैन शराबी,चाल नवाबी रे....
ले झंडू बाम हुई,
डार लिंग तेरे  लिये..
मुन्नी बदनाम हुई,
डार लिंग तेरे लिये..

या ओळींचा अर्थ आधी दिलेलाच आहे.. तसेच यातील धृवपद आधीच स्पष्ट करून सांगितले आहे.. सामाजिक जाणिवेच भान वगैरे वगैरे!

बात ये आम हुई, डार लिंग तेरे लिये..
इतकावेळ "मुन्नी बदनाम हुई, मुन्नी बदनाम हुई" ओरडून सांगितल्यानंतर 'रोज मरे त्याला कोण रडे' या उक्तीप्रमाणे तिच्याभोवती फुकटात नाचणा-या पब्लिक ला त्याचं कौतुक वाटेनासं होतं त्यामुळे ते तशी स्पष्ट कबुली देऊन टाकतात. यासाठी सुद्धा धैर्य लागतं बरं!! ते म्हणतात 'मुन्नी बदनाम हुई' हि आता सामान्य गोष्ट झालीये आम्हाला काहीतरी नवीन हवंय.. चलाख मुन्नीला याचा सुगावा लागताच प्रसंगावधान राखून ती म्हणते..
बे-हिंदुस्तान हुई, डार लिंग तेरे लिये..
दुर्दैवाने या वाक्याचासुद्धा आम्हास अर्थ लागला नाही! येथे 'बे' हा शब्द दोन या अर्थी आहे कि बे-घर होणे या अर्थी आहे हे कळायला पुरेसा वाव नाही. दुसरा अर्थ जरी थोडासा अर्थपूर्ण वाटतो पण तो अर्थ घेतल्यास असंबद्धपणा जरा जास्तच वाढतो त्यामुळे हे वाक्यसुद्धा सध्यातरी ऑप्शन ला टाकल्याचे आम्ही जाहीर करत आहोत. जरी ते चुकीचे वाटत असले तरीपण इथे मुन्नीने प्रसंगावधान राखून तोच तोच पणा टाळल्याबद्दल तिचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे

अमिया से आम हुई,डार लिंग मेरे लिये..
इथे 'आम' हा शब्द आधी सर्व ठिकाणी उपयोजल्याप्रमाणे 'सामान्य' या अर्थी नसून आंबा या अर्थी असावा.. कारण कैरीपासून जसा आंबा होतो तसा अमिया पासून आम होत असावा. मुन्नीला अभिप्रेत असणा-या विचारापर्यंत आम्हाला पोचता आले नाही याबद्दल आम्ही खेद व्यक्त करीत आहोत.
ले झंडू बाम हुई, डार लिंग मेरे लिये..
सिने माहॉल हुई , तेरे तेरे तेरे लिए..

ओळींचा अर्थ आधी दिलेला आहे.. (म्हणजे परत परत सांगितला जाणार नाही!) धृवपदही स्पष्ट करून सांगितले आहे.. सामाजिक जाणिवेच भान, पैश्याची खाण वगैरे वगैरे!

आ ले बदनाम हुई हांजी हाँ तेरे लिए..
ले सरेआम हुई, डार लिंग तेरे लिये..डार लिंग तेरे लिये..

शेवटची ओळ पुन्हा एकदा ऑप्शनला! (इंजिनियरिंगची सवय! सुंभ जळला तरी पीळ जात नाही! काय करणार?)


तर आम्ही आमच्या परीने या अफलातून गाण्या(जनसामान्यांचा शब्द)चे रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदीचा अपुरा व्यासंग आणि भाषेची व्याप्ती या दोन गोष्टींमुळे काही ठिकाणी बंधने आली आहेत. तरीदेखील इतरांनी दुर्लक्षिलेल्या गोष्टीचा अभ्यास करणं (आणि करायचा त्यांचा न करणं) याची सुरुवातीपासूनच आवड असल्याने आम्ही हे संशोधन केले आहे. या संबंधात काढलेली टाचणं, टिपणं, संदर्भग्रंथ आमच्या अभ्यासिकेत उपलब्ध आहेत. अभ्यासूंनी वैयक्तिकरित्या संपर्क केल्यास ती त्यांच्यासाठी उपलब्धही करून दिली जातील.


सरतेशेवटी सांगायचे झालेच तर..आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात या गाण्याने एका नवा मैलाचा दगड उभा केला आहे यात तिळमात्र शंका नाही आणि याबाबत कोणताही वाद असण्याचा प्रश्नच नाही!

सोमवार, २६ जुलै, २०१०

मुंबई-पुणे-मुंबई... सिनेमास्कोप



मुंबई-पुणे-मुंबई पाहिला.. कालच! पण पहिल्यांदा नाही तर तिस-यांदा.. एकदा "इ-स्क्वेअर" मग "मंगला" आणि नंतर या दोन ठिकाणी पैसे उधळल्यामुळे आलेल्या गरिबीमुळे शेवटी "प्रभात".. आता हा लेख काही त्या पिक्चरचं परीक्षण वगैरे नाही.. पण निरीक्षण जरूर आहे.

मुंबईवरून "मुलगा बघण्या" च्या कार्यक्रमासाठी आलेली 'ती' आणि पुण्यात तिला भेटलेला 'तो'.. यांच्यातला संवाद म्हणजे हा अख्खा मुव्ही! पिक्चर मध्ये विशेष असं काही नाहीये. म्हणजे मारामारी, रोमान्स, सुंदर लोकेशन्स.... (अर्थात पुणे हे ब्याकग्राउंड निवडल्यावर "सुंदर लोकेशन" ला एक मर्यादा येणं स्वाभाविक आहे...) असं काही काही म्हणून नाहीये तरीपण काहीतरी 'खास' आहे खरं.. मनाला भावतो एकदम हा सिनेमा. मुळात भारतीय पिक्चरची गरज असणारी हिरो आणि हिरॉईन यांची सुंदर सुंदर नावं, छान छान आणि वेळोवेळी वाजणारी गाणी आणि कुटुंब कलह , वाद विवाद , व्हिलन, आदळआपट, दंगा आणि तत्सम इतर काही मसाला नसताना सुद्धा हा चित्रपट एक घट्ट पकड घेऊन ठेवतो. "ते कशामुळे?" हे शोधण्याचा मात्र हा प्रयत्न नाही.. कारण मला ते कोडं तसंच राहू देण्यात जास्त मजा वाटतेय.

मुंबईकर "ति"ला पुण्यात आल्यानंतर योगायोगाने "तो" भेटतो आणि नंतर काही "टीपीकल पुणेरी" अनुभव येतात.. ते ती त्याच्याशी शेअर करते.. त्यामुळे त्याचा पुणेरी स्वाभिमान डिवचला जातो आणि तोही तिला उलट उत्तर देतो.. एकमेकांचा पिच्छा सोडवता सोडवता परिस्थिती त्यांना एकत्र थांबायला भाग पाडते. त्याचा पुण्याविषयीचा अभिमान मोडून काढण्यासाठी ती प्रतिवाद करत जाते आणि तो तिच्यावर पर्यायाने मुंबईकरांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतो.. आयुष्यात ही व्यक्ती पुन्हा भेटण्याची सुतराम शक्यता वाटत नसल्यानेच कि काय ती त्याला आपली कथाही ऐकवते आणि मग तोही तिला आपल्या जुन्या प्रेमाबद्दल सांगून स्वतःचं मन मोकळं करून घेतो.

पुण्याचा अवास्तव अभिमान बाळगणारा तो आणि त्याला वठणीवर आणणारी ती;जुन्या पद्धतीच्या लग्नसंस्थेवर ताशेरे ओढणारी ती आणि तिला "नात्यांची मजा ती उलगडण्यात असते" असं सांगून समजावणारा तो; सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक रंगत कायम ठेवतात.. जाणूनबुजून एकात एक गुंफत नेलेले प्रसंग आणि अलगद सोडवत नेलेली ती गुंतागुंत कुठेच कृत्रिम वाटत नाही. विशिष्ट वयोगट डोळ्यासमोर ठेवून जरी हा चित्रपट बनवला नसला तरी लग्न न झालेल्या, नुकतंच बेडीत अडकलेल्या आणि लग्नाच्या बंधनात मुरून मुरून पार लोणचं झालेल्या प्रौढ वर्गाला देखील तो तितकाच आवडेल असं मला वाटतं. अर्थात चित्रपटात एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे "हे माझं मत आहे , निर्णय नाही.."

सारसबागेतल्या एका प्रसंगात त्याने तिला भेळ देऊन त्यावर "कशी वाटली आमची भेळ?" अशी प्रतिक्रिया विचारल्यावर "ठीक आहे" अशी शांत प्रतिक्रिया ती देते. त्यावर खवळून तो तिला ही भेळ त्रिभुवनात कशी आदर्श आहे वगैरे गोष्टी सांगू पाहतो, तेव्हा ती त्याला म्हणते की " भेळ, चणे हे समुद्रावर जाऊन खायचे पदार्थ आहेत !! पुण्यात अरसिकता आहे हे बरोबर आहे कारण तिथे समुद्र नाहीये ना.. “ आपली विकेट डाऊन झाल्याच त्याला कळतं पण हेका सोडेल तर तो पुणेकर कसला?? तो लगेच तिला विचारतो.. "तुमच्याकडे सगळं असेल पण तुळशीबाग आहे का?" या वाक्यावर पुण्यातल्या प्रेक्षागृहात दाद न मिळती तरच नवल!!

पुण्यातल्या मुलींचा "हिरवळ" वगैरे असा उल्लेख, तिने त्याला थेट "आर यू अ वर्जिन?" असं विचारल्यावर त्याचा गोरामोरा झालेला चेहरा अशा टाईपची थोडी वाक्यं असली तरी ती त्या त्या ठिकाणी चपखल आहेत.. कुठेही बघणा-याला ऑकवर्ड वाटत नाही. एकमेव असणार गाणं देखील त्याने केलेली कविता म्हणून ऐकवलं गेलंय.. त्यामुळे ते संपूच नये असं वाटत राहतं.. स्वप्नील जोशीने उभा केलेला नायक; नसणा-या "six pack abs" मुळे "खात्या-पित्या घरचा वाटतो.. आणि ब-याच जणांना तो आपल्यातला ही वाटतो! ( साहजिकच आहे ना! त्याच्या पोटाचा शर्टवरून दिसणारा आकार सेम आपल्यातल्या ब-याचजणांसारखा दिसतो हो! खरंच!! अगदी देवा शप्पथ!! )आणि मुक्ता बर्वे.. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय गोड आणि लाघवी, पुरोगामी पण मराठमोळी "ती" उभी करण्यात ती कुठेच अवघडली नाहीये..

दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गायक या गोष्टींकडे सहसा सामान्य प्रेक्षकाचं लक्ष जात नाही. पण या सिनेमा मध्ये ठिकठिकाणी हे लोक "वा! " म्हणायला भाग पाडतात. पुण्यातली कपल्ससाठी ('कु')प्रसिद्ध spots वापरल्यामुळे एकप्रकारची जवळीक वाटते.. पण प्रेक्षक "अरे हा जे एम रोड, हा एफ सी, हे तर वाडेश्वर.. पेठेत आली रे कुठच्यातरी.." असा खेळ खेळतात तेव्हा थोडा वैताग येतो.. अरे, काय ठिकाणं ओळखली म्हणून पिक्चरचे पैसे परत मिळणार आहेत का? मग? जाऊ दे.. विषयांतर झालं!

सिंहगडावर एकदा त्याने तिच्या जुन्या जखमेवरची खपली काढल्यामुळे (हा शब्दप्रयोग लाक्षणिक अर्थाने घ्यावा.) ती दुखावली जाते आणि रडायला लागते ते पाहून त्याची उडणारी त्रेधातिरपीट पाहण्यासारखी आहे.. त्याचवेळी तिथून जाणारा वाटसरू त्या दोघांकडे पाहत जातो आणि पुढे जाऊन मागे वळून पाहतो तेव्हा स्वप्नील जोशी आपण त्या गावचे नाहीतच असं दाखवण्याकरिता मुद्दाम दुस-या बाजूला चालत जातो.. या आणि अशा प्रसंगातून सहजता राखली गेलीय.. मुव्ही मधल्या ब-याचश्या गोष्टी या आपल्या जीवनात घडणा-या असल्यामुळे काही ठिकाणी आपण स्वतःच्या नकळत स्वतःला ठेवू पाहतो..

साहजिकच शुटींग एका दिवसात झालं नसणार.. पण पूर्ण दिवसभराचा वेळ इतक्या व्यवस्थित आणि अशा प्रकारे चित्रित केला आहे कि शंका घ्यायला वावच उरत नाही..वेगवेगळी ठिकाणं फिरून एकमेकांची मनोरंजक बौद्धिकं घेऊन झाल्यावर मुंबई-पुणे-मुंबई गाडी जेव्हा शेवटच्या वळणावर येते तेव्हा आपल्या मनात एक हुरहूर दाटून येते.. या जोडीचा सहवास आता संपणार... सुखद शेवट अपेक्षितच होता आणि तो तसाच झालाय यात वाद नाही पण तिथपर्यंत येण्यासाठीसुद्धा शेवटच्या ५ - १० मिनिटांमध्ये जी वळणावळणाची वाट निवडली आहे तीसुद्धा अप्रतिमच.. बाहेर पडताना आपण काही विशेष घेऊन निघत नाही पण एक मस्त मूड घेऊन निघतो एवढं मात्र खरं!

बुधवार, १५ जुलै, २००९

आपली शिक्षणपद्धती!

आपली शिक्षणपद्धती! आहे एकदम सुरेख. म्हणजे जो शैक्षणिक अभ्यासक्रम आहे तो योग्य आहे पण मुल्यमापनाची पद्धत मात्र एकदम चुकीची आहे.
एक एक मार्कासाठी मुलं लढताहेत.. ’बालपणीचा काळ सुखाचा’ हे केवळ कागदावरच राहिलंय.!

नववीचा इतिहास वाचल्यानंतर कधीही असं मनापासून वाटत नाही की भारतानं स्वातंत्र्य मिळवलंय. वाटतं की ते तर असंच मिळालंय.. जणू इंग्रजांनी भीक म्हणून दिलंय.ज्या पद्धतीचं वर्णन अभ्यासक्रमात आहे त्यात काहितरी कमी आहे हे नक्की!
[यावरून ही गोष्ट आठवते.. ]
भारताचा स्वातंत्र्यलढा पुस्तकातून दिसतच नाही.. शालेय अभ्यासक्रमातला इतिहास अडलाय तो स्वातंत्र्यापर्यंतच! जास्तीत जास्त पुढे येतो तो गोव मु्क्तिसंग्रामापर्यंत.. त्यापुढे नाही. (अरे... पूर्वीच्या नेत्यांची आश्वासनं त्यांचे वायदे.. यांची पूर्तता होऊन ते इतिहास जमा होणारेत कि नाही? ) तेच तेच तेच.. पण कितीवेळा? अन त्यावरचे प्रश्न म्हणजे तर मूर्खपणाची हद्द! घटना कालानुक्रमे लिहा, एखाद्या तहाची कलमं लिहा- ४ मार्क्स असतील तर ८ च ६ मार्क्ससाठी मात्र १२! काय हे? या प्रश्नांमुळे इतिहासातली रंजकताच जाते.. पण लक्षात कोण घेतो?

तसाच भूगोल.. सुदान गवताळ प्रदेश कि काय ते.. तैगा , टुंड्रा प्रदेश, निरनिराळे देश यांच्या स्थानांचा ढोबळ अंदाज असावा हे मी समजू शकतो.. पण म्हणून प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रदेशाचा अक्षवृत्तीय - रेखावृत्तीय विस्तार अगदी अंश आणि मिनिटांसहित विचारायचा का? तोदेखील ’रिकाम्या जागा भरा ’ असल्या प्रश्नांमध्ये?

त्यामुळे हल्ली मुलं एक्झाम ओरिएंटेड विचार करतात.. नॉलेज बेस्ड नाही.. यामध्ये ज्याचं पाठांतर जास्त तोच जिंकतो.’पुलं’नी त्यांच्या एका लेखात म्हटलंय की ’ आमच्या काळात जास्तीत जास्त निरुपयोगी माहिती असणा-याला ’हुशार’ म्हटले जाई..’ दुर्दैवाने हे विधान आजही तसंच्या तसं लागू होतं!

त्यापेक्षा क्षमताधिष्ठीत चाचण्या ब-या.. व्यक्तिमत्व विकासाच्याही दृष्टीने.शिक्षण असं हवं की ज्याचा सार्वजनिक जीवनात - ज्याला आपण डे-टू-डे लाईफ म्हणतो - उपयोग व्हावा. सर्वांगिण शिक्षण देण्याच्या अट्टाहासापायी निरर्थक शिक्षण देण्याचा फायदा काय? आपल्याकडे किमान दहावी व्हावं अशी समजूत आहे. कित्येक जण दहावीनंतर शिकू शकत नाहीत. पण मुळात अशा लोकांना त्या ज्ञानाचा कितपत फायदा होतो? बेरीज-वजाबाकी तर चौथी शिकलेलाही करू शकतो..पण प्राण्यांचे , वनस्पतींचे वर्गीकरण, कीपचे उपकरण यांचा त्यांना उपयोग काय? गावागावातल्या शाळांमध्ये प्रयोगही फळ्यावरच शिकवले जातात! प्रात्यक्षिक हे जर प्रत्यक्ष नसेल तर त्याला अर्थच काय? तसंच व्यवहारातले उपयोग माहिती नसतील तर कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्सनी सामान्य विद्यार्थ्याचं डोकं का शिणवायचं? त्यामुळे ही मुलं गणितात नापास होतात आणि दरवर्षी हे प्रमाण वाढतच आहे! केवळ हेच विषय नव्हे तर भाषेबद्दलही तेच!

कादंब-यामधले उतारे आउट ऑफ द कन्टेक्स्ट छापून त्यातल्या एखाद्या वाक्याचं संदर्भासहीत स्पष्टीकरण मागायचं, याला काय म्हणावं? उदाहरणार्थ..
’कोसला’ कादंबरीमधून घेतलेला काही भाग आम्हाला ’आणि बुद्ध हसला’ या नावाने धडा म्हणून होता.. तो वाचून मला ही कादंबरी नेमाड्यांचे प्रवासवर्णन असावं असं वाटत असे!अगदी हल्ली हल्ली ही कादंबरी वाचेपर्यंत!त्या भागातून ना नेमाड्यांचा परिचय झाला होता, ना त्यांच्या कादंबरीचा, ना त्यांच्या लेखनशैलीचा!! असो!

मला तरी असं वाटतं की ज्यांना पुढे शिकायच आहे त्यांना आठवीपासून गणित आणि विज्ञान इंग्लिशमधूनच शिकवावं. कारण या विषयांमधली बरिचशी पुस्तक त्या भाषेतूनच आहेत..मात्र इतर विषय मातृभाषेतच शिकले पाहिजेत तरच ते समजतील. कारण तानाजीची ’आधी लगीन कोंडाण्याचं नि मग माज्या रायबाचं’ ही घोषणा ’फर्स्ट मॅरेज इज ऑफ कोंडाणा ऍण्ड आफ्टर्वर्डज माय रायबाज!’ अशी ऐकायला कशी वाटते? तसाच सुर्याजीचा आवेश ’भ्याडांनो.. तुमचा बाप इथे मरुन पडलाय आणि तुम्ही पळताय काय? मागे फिरा.. परतीचे दोर मी केव्हाच कापून टाकलेत..’ इंग्लिश मध्ये कसा व्यक्त होईल?

हल्ली मात्र मुलांना इंग्लिश शाळात पाठवण्याचं फॅडच आलंय. अगदी गावोगावी सुद्धा.. असो.. कालाय तस्मै नमः!