गुरुवार, २ एप्रिल, २००९

माहित असणारी गोष्ट

ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण या भाषेत नाही..!


एक सुस्थापित राजा होता.खूप श्रीमंत. त्याचं एकच दुःख असतं.त्याच्या प्रचंड श्रीमंत कुटुंबियांमध्ये बेबनाव होता.कारण तेच..परंपरागत! जमिनीची वाटणी. वर्षानुवर्षे हा वाद चालूच होता.एक भांडण मिटलं की दुसरा वाद उफाळून येत असे.राजा हताशपणे पाहण्यापलिकडे काहीच करू शकत नव्हता. त्याचेच कुटुंबीय ते.. कोणाकोणाला आणि काय काय समजावणार?


...अशातच राज्यात एक फेरीवाला आला.विक्रेता.इतरत्र वस्तू खरेदी करुन त्या विविध राज्यांत विकणे हे त्याचे काम.राजाने त्याला राजवाड्याच्या अंगणात जागा दिली. त्याचा व्यापार सुरु झाला. राज्यातलं तमाम पब्लिक त्या फेरीवाल्याकडून वस्तुंची खरेदी-विक्री करत असे. राजानं पण जनतेची अशी काळजी घेतली होती की ती खाउन पिउन सुखी होती.


पण ’फ्यामिली म्याटर’चा तिढा मात्र काही सुटत नव्हता. जो तो आपापला हेका धरुन बसलेला! ही गोष्ट त्या विक्रॆता-जो आता व्यापारी म्हणण्याइतका मोठा झाला होता-त्याच्या नजरेतून काही सुटली नव्हती. राज्यभर आपल्या फ्रॅंचायझी ओपन करुन झाल्यावर तो वाड्याच्या अंगणातून पायरीवर आला. आत डोकावून पाहू लागला. दिसत तर काही नव्हते. पण अंतर्गत कलह जाणवत होत.. हळूहळू पठ्ठ्याने वैयक्तिक व वाड्याची अशा दोन्ही पाय-या ओलांडल्या आणि ओसरीवर प्रवेश केला. तेव्हा त्याला दिसलं की बाहेरून सुस्थापित दिसणा-या या वाड्यात काय चाललंय ते! एकमेकांच्या उरावर बसलेले कुटंब घटक एकमेकांची डोकीपण फोडायला तयार झाले होते! ’तापलेल्या तव्यावर पोळी भाजून नाय घेतली तर कसलं आलंय बिज्नेस माईंड?’ म्हणत या माज आलेल्या व्यापा-याने माजघरात प्रवेश केला.. ’मे आय हेल्प यू?’ चा सूर आळवत त्याने प्रत्येक मेंबरची/ला सहानुभुती मिळवायचा/द्यायचा सपाटा लावला. शेवटी बिझिनेसमनच तो! गोड बोलून काम साधणं हा तर त्याचा हातखंडा!


झालं!कित्येक वर्षांत गोड गोड ऐकायची सवय नसणारे मेंबर्स भुलले.त्याची आश्वासनं ती काय? तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देण्यात, इतरांविरुद्ध लढण्यास मदत करतो पण तुमच्या प्रांतात व्यापार करायला हरकत नसावी आणि कर कमी करावा. किती क्षुल्लक मागणी! सदस्यांनी त्याची मदत घ्यायची ठरवली...

घरात तर शिरकाव झाला होता..तोदेखील कुटुंबियांच्या संमतीनं. म्हणजे कोणी विरोध करायचा प्रश्नच उरला नाही.पुढचं काम तर अगदीच सोपं होतं.व्यापा-यानं आपलं खरं रूप दाखवायला प्रारंभ केला. गोडी-गुलाबीनं वागून त्यानं राजावरच ताबा मिळवला. घरच्यांच्या इच्छॆपुढॆ त्याचं तरी किती चालणार? तो बिचारा खचत गेला.. हतबल झाला.. गलितगात्र नेत्रांनी राज्याचा -हास पाहात राहिला.. व्यापा-यानं राजाचं धन, सोनं नाणं, संपत्ती आणि जे जे शक्य आहे ते ते पद्धतशीरपणे लुटायला सुरुवात केली.. राजाच्या हे लक्षात आलं आणि तो दुबळा विरोध करु लागला तेव्हा व्यापा-यानं सरळ त्याच्याच मुसक्या बांधून त्याला गुलाम बनवलं! मग काय.. राजरोसपणे लुटमार करून त्यानं स्वतःचं धन केलं... राजाची सगळी मालमत्ता स्वतःच्या खाती जमा केल्यावर त्यानं राजाकडे.. अंह.. गुलामाकडे पाहिलं.. तो शक्तिहीन विरोध करत असला तर त्याला भाकरतुकडा देउन वश करायला बघायचं..नाहीच बधला तर जोर जबरदस्ती करुन त्याचा विरोध दडपून टाकायचा.. हे साधं सरळ धोरण त्यानं अवलंबलं..


... कित्येक वर्ष हेच चालू राहिलं.. एव्हाना दिड-दोनशे वर्ष उलटून गेली होती. राजाच्या घरच्या मंडळींचेही तीन- तेरा वाजले होते.. गोड्बोल्या व्यापा-याने त्यांना हातोहात कफल्लक बनवलं होतं. त्यांच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जन्माला आल्या अन तशाच उलथल्या...

तेवढ्यात राजाला जाणवलं की व्यापारी आता अंगावरच्या वस्त्रांनाही हात घालू लागलाय.. तेव्हा राजानं असहायपणे टाहो फोडायला सुरुवात केली.. त्यानं नविन पिढी जागी झाली.तिनंही आक्रोश करायला सुरुवात केली. आता सगळ्यांनीच रडारड सुरु करुन हातपाय झाडायला सुरुवात केल्याबरोबर व्यापा-यालाही कीव आली.. त्यानं राजाला ’स्वतंत्र’ केलं आणि तो मायदेशी परत गेला..


आता राजा कृश झालाय.. सवय नसल्यानं राज्यकारभार कसा चालवायचा तेच विसरुन गेलाय..त्याच्याकडे त्याचं घर आहे पण मालकी नाहिये..त्या घराच्या भिंतींना कसलाही ठोस आधार नाहिये.. तो जेव्हा अभिमानाने स्वतःच्या घराकडे पाहतो तेव्हा त्याला दिसतं की स्वयंपाकघर आणि धान्याचं कोठार त्या व्यापा-याने परस्पर कुणा दुस-यालाच देउन टाकलंय तेही राजाचंच धन खर्ची घालून.. नव्या बि-हाडाला थोडी आर्थिक मदत नको का द्यायला? राजा ’उदार’ दिसला पाहिजे ना? त्याला अजून दिसतं की हॉलची कॉमन भिंत कोणाची यावर निर्णय होत नाहिये.. तो स्वतःकडे पाहतो तेव्हा त्याला दिसतं ते स्वतःचं अर्धनग्न शरीर, घरत दिसतात उघडी-नागडी फिरणारी मुलं - ’हे घर आता आपलं आहे’ या आनंदात इकडे तिकडे खिदळणारी..कोप-यात दिसते त्याची प्रिय पत्नी, जिच्यावर त्याने जिवापाड प्रेम केलं, जिच्या मदतीने त्याने ही संपत्ती कमावली होती.. अन जिच्या डोळ्यादेखत त्यानं सर्वस्व गमावलं होतं.. ती अब्रूहीन, लाचार, मूक साक्षीदार त्याच्या स्थित्यंतराची; बसलीये दीनवाण्या पण आशाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहात..! तो काहितरी करेल या एकाच अपेक्षेने!
राजानं ठरवलं- आपण प्रयत्न करायचे. ती भिंत -काही कामाची का नसेना- आपल्या मालकीची करण्यासाठी नाही; पण शेजा-यालाही मिळता नये म्हणून भांडायचं.. या राज्याला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी झगडायचं, मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची.. आणि राजानं निर्धारानं कंबर कसली..

तर अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण...