सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

निरुत्तर

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून हनुमान टेकडीकडे म्हणजे मी राहायचो तिकडे जायचं म्हणजे चालत अवघं वीस-पंचवीस मिनिटांचं अंतर.. पण संध्याकाळी मला तेही नको वाटायचं. म्हणून मी ३०१ क्रमांकाच्या बसची वाट बघत थांबायचो..रांगेतून बस मध्ये चढायचं सुख मुंबईत अनुभवता येतं... ती मजा पुण्यात नाही! मुंबईत कितीही गर्दी असली तरी लोक रांगेतूनच चढणार. बस भरली कि गुपचूप पुढच्या बसची वाट बघत उभे राहणार.. पुढची बससुद्धा आज्ञाधारक असल्याप्रमाणे कोणताही दगाफटका न करता १० मिनिटात येणार आणि पुन्हा हे चक्र चालत राहणार. मला कोण कौतुक वाटायचं या सगळ्याचं! अर्ध्या रस्त्यावर येवून थांबणारे लोक नाहीत... बस थांब्याच्या पुढे फर्लांगभर अंतरावर बस थांबवणारे उन्मत्त ड्रायव्हर्स नाहीत..गुळाच्या ढेपेला झोंबणा-या मुंगळ्यान्सारखी दरवाजाशी झटापट करणारी बेशिस्त गर्दी नाही कि कोलमडलेल वेळापत्रक नाही. सगळं कसं शिस्तबद्ध आणि सुरळीत!

मी विचारात असतानाच बस आली आणि माझा नंबरही आला..मी बसमध्ये चढणार तोच एक युवती अचानक प्रकट झाली आणि मला बाजूला ढकलत बसमध्ये चढू लागली.. आता तरुण पोरीने धक्का दिला म्हटल्यावर माझ्यासारख्याचा तोल ढळणं स्वाभाविकच  आहे नाही का? मी आधारासाठी काहीतरी धरलं.. ते काहीतरी म्हणजे तिची ओढणी होती हे माझ्या लक्षात येईपर्यंत ती वळून वस्सकन माझ्या अंगावर ओरडू लागली..
"कुछ तमीज है के नही आपको.."
सगळा प्रकार सेकंदाच्या कितव्याश्यातरी भागात घडला असेल पण मी भांबावून गेलो..तरी सावरून मी म्हटलं..
"सॉरी,पण मी मुद्दाम नाही केलं.. तुम्ही मध्ये घुसलात.. त्यामुळे माझा balance गेला.."
"ए गपे.. मी ओळखते तुमच्यासारख्या लोकांना.. हात लावायला चान्स शोधत असता. हो की नाही?" तिने रणरागिणीचा अवतार धारण केला. नसत्या बालंटमुळे मी सर्दच झालो..
तेवढ्यात माणुसकी मदतीला धावून आली. रांगेत मागे उभे असणारे लोक मोठ्याने तिला सांगू लागले..
"ए मुली.. एकतर तू लाईन तोडून घुसलीस आणि वरून त्यांना बोलतेस? गुपचूप आत हो नाहीतर खाली येवून उभी राहा.. "
याचा मला अपेक्षित होता तो परिणाम झाला.ती आत गेली..मीही बसमध्ये चढलो तर दुर्दैवाने हे बया शेजारीच उभी! मी जरा अंग चोरून उभा राहिलो..बसायला जागा मिळाल्यानंतर मी चोरून तिच्याकडे कटाक्ष टाकला तर मला जाणवलं की ती रोखून (कि खजील होऊन?) माझ्याकडे बघत होती. मी नजर वळवली आणि खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. माझा शेवटचा stop होता. मी उतरताना बसमध्ये नजर टाकली तर ती नव्हती..सुटलो! म्हणत मी माझ्या मुक्कामावर पोचलो.

दुस-या दिवशीच्या संध्याकाळी मी stop वर उभा राहिलो तर ती मुलगी मला पुन्हा दिसली. यावेळी मात्र रांगेत होती.खरतर ती रोजच असायची त्या दरम्यान तिथे, पण आम्ही कधी एकमेकांना नोटीस नव्हतं केलं.. रांगेत असताना प्रत्येकजण बसचीच वाट पाहत असतो;फार क्वचित रांगेत कोण आहे ते पाहतो आणि दहा मिनटांनी बस अशी फ्रिक्वेन्सी असेल तर कधी ती आधी निघून जाणं किंवा मी आधी निघून जाणं असं होत असावं.. तिनेही मला पाहिलं. मी उभा राहताच ती आपला नंबर सोडून माझ्या मागे येवून उभी राहिली. कालच्या प्रसंगाची आठवण झाल्यामुळे मी उगाचच कॉशस झालो..
"हलो मिस्टर..  " ती माझ्याशीच बोलत होती..
"अं? "
"एम सॉरी..कालच्या इन्सीडन्सबद्दल.."
"इट्स ओके..." पोरगी स्वतःहून माफी मागतेय म्हटल्यावर माफ करायची संधी कशाला सोडा? नाहीतरी माझ्या बाबतीत असले प्रसंग वारंवार येत नाहीत..
"मी काल जरा घाईत होते.."
'म्हणून चारचौघात माझी इज्जत काढायची..?' ओठांवर आलेले शब्द मी महत्प्रयासाने रोखून धरले.. "हरकत नाही.. होतं असं कधी कधी.. पण नसतीच आफत आणली होती तुम्ही काल.." मी प्रकटपणे बोललो..
"सॉरी वन्स अगेन.. पण तुम्ही मला माफ केलंय ना?"
"हो.." वास्तविक 'चल..केलं तुला माफ' असं स्टाईलमध्ये मला म्हणायचं होतं पण ते अगदीच पुस्तकी वाटलं असतं...तिच्या प्रश्नासारखच!

तिच्याशी बोलताना मला अवघडायला झालं होतं. भूकही लागल्यासारखी वाटत होती.
"मी जरा काहीतरी खाऊन येतो.. भूक लागली आहे"  मी निमित्त काढून रांग सोडून शेजारच्याच हॉटेलात गेलो. डोश्याची ऑर्डर देऊन  सरकणा-या रांगेकडे पाहत स्वस्थ बसून राहिलो. भिरभिरत्या नजरेने तिने इकडे तिकडे पाहिलं. हॉटेल तिथून दिसत होतं आणि तिथे बसलेला मीही! परत एकदा नजरानजर होताच मी ओळखीचं हसू चेह-यावर आणलं. तिने स्माईल देत नजर वळवली आणि काहीतरी विचार करून माझ्याच दिशेने चालत यायला लागली!! माझे धाबे दणाणले.. काल काहीच केलं नव्हतं तर पब्लिकमध्ये तिने माझी बेइज्जती केली होती आज तर तिच्याशी बोललो होतो आणि आता तिला पाहून मी चक्क हसलो होतो! काय च्यायला ब्याद आहे...
'उठून पळून जावं का?' असा विचार करत मी बुड खुर्चीवरून उचललं तर वेटर डोसा आणून ठेवू लागला.. अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीला जर जीव असता तर तिच्या चेह-यावर जे भाव आले असते सेम टू सेम भाव माझ्या चेह-यावर तेव्हा आले असावेत.. कारण माझी ती केविलवाणी अवस्था बघून "सर,वॉशरूम जाना है क्या?" असं वेटर आगाऊपणे विचारू लागला!
जवळ आल्यावर मोहक हास्य चेह-यावर आणत ती म्हणाली.. "मलाही अक्चुअलि कॉफी प्यावीशी वाटली होती मगाशी.. आय वॉज सर्चीन फॉर अ कंपनी.. इफ यु डोन्ट माईंड देन कॅन आय..?"खुर्ची सरकवत तिने विचारलं..
"येस..शुअर..प्लीज"  मी तिला बसण्यासाठी खाणाखुणा केल्या..
"भैया,एक कॉफी लाना..फिल्टर्ड "
मला प्रचंड भूक लागली होती.. ऑफिसमधलं जेवण खास नव्हतं त्यामुळे जास्त जेवलोही नव्हतो. पण डोश्याला हात लावायचा कसा? एकतर ती समोर बसल्यामुळे मला प्रचंड ऑकवर्ड वाटत होतं. आणि काट्याचमच्यांशी खेळत डोसा खायचा माझा खरच मूड नव्हता. पण जाऊ दे.. उगीच इम्प्रेशन डाऊन नको करायला.. मी डाव्या हातात फोर्क घेऊन चमच्याने डोश्याचे ताटलीबाहेर पसरलेले पंख आत मुडपत तिला ऑफर दिली..
"यू कॅन have धिस..इफ यू विश.."
"या.. आयल have ओन्ली वन बाईट.."  कमालय! कालचीच ओळख असूनही जुन्या मित्राशी बोलावं तशी ती बोलत होती..
"मला नाही बुवा हे काट्याचमच्याने खाणं जमत!"म्हणत तिने हातानेच घास मोडला..
"मलाही!!" फोर्क बाजूला ठेवता ठेवता सुटकेचा निःश्वास सोडत मी बोललो.. जरा कम्फर्टेबलही झालो.
मग औपचारिक ओळख झाली. कुठे काम करतो,कुठे राहतो वगैरे जुजबी माहिती विचारून झाली.. माझ्या वाटेवरच कुठेतरी ती राहत होती.
"इफ यु डोन्ट माईंड तर आपण चालतचालत जायचं का?" बाहेर पडताना तिनेच विचारलं.
"हरकत नाही.. सोबत कोणीतरी असेल तर काहीच वाटत नाही..एकट्यानं चालायचं म्हणजे जीवावर येतं बुवा"

त्यानंतर मग दर संध्याकाळी तिला अंधेरी सीप्झ वरून national पार्कपर्यंत यायला तिच्या कंपनीची बस असायची आणि त्या stop पासून तिच्या सोसायटीच्या लेनपर्यंत माझी कंपनी!

ती मूळ मुंबईची नव्हती तरी तिला इथे बरीच वर्ष झाली होती. शिक्षणासाठी म्हणून दहावीनंतर ती या मायानगरीत आली होती. आधी कोणा नातेवाईकांकडे राहायची मग रूममेट्स बरोबर राहायला लागली. जॉब करायला लागूनही काही वर्ष झाली होती. त्यामुळे तिचे 'लुक्स'ही एखाद्या अस्सल मुंबईकर मुलीइतकेच मॉड होते. बोलायला खूप आवडायचं बहुधा तिला. काय काय आवडतं, काय काय करता येतं, छंद, मित्र मैत्रिणी, नातेवाईक माती धोंडे एक ना दोन ! एकदा सुरु झाली कि सांगतच राहायची! एकवरून दुसरा दुस-यावरून तिसरा असे विषय निघायचे..पण निव्वळ गॉसिप्स नव्हे तात्विक,वैचारिक चर्चाही झडायच्या.. पण कसंही करून आर्ग्युमेंट जिंकणं तिला आवडायचं. खरं म्हणजे समोरच्याला निरुत्तर करणं तिला आवडायचं!

स्त्री-पुरुष यांच्यातली नाती हा तिचा खास जिव्हाळ्याचा विषय. विश्वातल्या सर्व महत्वाच्या गोष्टी याच्याशीच रिलेटेड असतात हा तिचा सिद्धांत होता.. रामायण सीतेमुळे, महाभारत द्रौपदीमुळे अगदी पहिलं महायुद्ध फ्रांझ फर्डिनांड च्या गर्लफ्रेंड मुळे कसं घडलं हे सांगून ती तिच्या सिद्धांताची सिद्धता मांडत असे आणि माझ्यासमोर निरुत्तर होण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय राहत नसे!

कधीतरी बोलता बोलताच आमच्या पहिल्या भेटीबद्दल उल्लेख झाला..
"तुला आठवतं ना.. तू बसमध्ये चढत असताना मी घुसले... " झालं.. मी झालेला अपमान विसरण्याचा प्रयत्न करतोय तर ही पुन्हा पुन्हा जखमेवर मीठ चोळतेय..
"मला त्या रांग तोडून मध्ये घुसण्याबद्दल काहीच नाही बोलायचं अगं.. पण 'चान्स शोधत असतोस'  असं काहीतरी बोललीस वाटतं. हे असले आरोप म्हणजे जरा.."
"सॉरी ना अरे.. पण आत्तापर्यंतचे अनुभव इतके आलेत ना मला लोकांच्या नजरांचे..लोकल, बस, हॉटेल कुठेही जा; बायका, मुली सगळ्यांकडे असे वखवखलेल्या नजरेने बघत असतात पुरुष.."
"काहीजण असतीलही पण म्हणून अख्ख्या 'पुरुष' या जमातीला एकाच तागडीत तोलायचं का?"
"का नाही.? ओल्याबरोबर सुकंही जळणारच ना?"
"२५ टक्के तरी चांगले असतीलच ना? त्यांच्यावर का अन्याय?" मी विचारलं
"२५? जास्तच बोलतोयस तू अरे! फारफारतर १० टक्के असतील.."
"एवढे कमी तर मुळीच नसतील.. माझ्या मते वाईट पुरुष वीसेक टक्के असतील.. नाहीतर छेडछाड, विनयभंग, बलात्कार यांच्या 'बातम्या' होणं बंद झालं असतं..." मी म्हटलं.
"म्हणजे?"
"आय मीन, बातम्या अश्याच गोष्टींच्या होतात ना ज्या सरसकटपणे सगळीकडेच होत नाहीत? सामान्य माणूस जगतोय ती बातमी नाही होत किंवा तो वृद्धापकाळाने मेला तरी ती बातमी नाही होत पण एखादा तेविसाव्या वर्षी हार्टफेल ने गेला, किंवा कधीतरी अपघातात गेला तर त्याची बातमी होते कारण ही घटना नेहमी नेहमी घडणारी नाही.. तसंच त्या गोष्टींचही आहे." मी स्पष्टीकरण दिलं.
"मी सांगतेय ती कॅटेगरी वेगळी आहे.. शंभरातले २० पुरुष असतील वाईट असं गृहीत धरू तुझ्या अनुमानाप्रमाणे. मी म्हणतेय ते चांगले १० टक्केही सोडू पण म्हणून बाकीचे ७० टक्के सभ्य असतातच असं नाही..कदाचित त्यांच्यात गट्स नसतात! ते संधीच्या शोधत असतात. तूच बघ ना..मगाशी म्हणालास त्याच 'बातम्या' चवीने वाचता ना तुम्ही लोक? हेडलाईन वाचल्यानंतर पूर्ण बातमी कशासाठी वाचतो आपण? त्याचे डीटेल्स मिळावे म्हणून.. इथे काय डीटेल्स अपेक्षित असतात तुम्हाला?"
मी निरुत्तर झालो.. खरं होतं तिचं म्हणणं. काय डीटेल्स हवे असतात? वर्णनच ना? शी..मला स्वतःचीच घृणा आली.पण माघार घ्याची नाही असं मी ठरवलं होतं. आता मी नुसता 'मी'च नव्हतो तर अख्ख्या पुरुषवर्गाचा प्रतिनिधी होतो!
"हं.. हेही खरंच म्हणा..मी कधी हा विचारच नव्हता केला. आपल्या इथे स्त्री-पुरुष,मुलगा-मुलगी या संबंधांना समाजाने इतकं टोकाचं निषिद्ध बनवून ठेवलंय की केवळ कुतूहल शमवायाच्या इच्छेपोटीच हे प्रकार होत असावेत अजूनही.. पण मुलीही यात मागे नसतात. त्यांनीसुद्धा कपड्यांचं, राहणीमानाचं, तारतम्य बाळगलं पाहिजे कि नको?"
"म्हणजे ? मुलींनी काय आपली आवड मारायची? हिरोईन्स घालतात तेव्हा चालतं तुम्हाला.पण तीच fashion आम्ही केली कि बोचणा-या नजरांचा सामना करावा लागतो"
"हिरोईन्सना तरी कोण चांगल्या नजरेने बघतं? फक्त पडद्यावर असतात म्हणून त्यांना त्या नजरा नाही टोचत! पण मला सांग.. पुरुषांचे कपडे कधी पाहिलेस का तू? सेमी ट्रान्सपरन्ट, गळा, पाठ दाखवणारे कपडे का नसतात त्यांचे? त्यांच्या शरीराची वळणं का दिसत नाहीत शर्ट मधून ? पिक्चरमध्ये हिरो देखील उघडे फिरतात म्हणून वास्तवात सगळे तसं करत नाहीत..मुलींना सुद्धा लक्ष वेधून घ्यायची खुमखुमी असेलच ना? आता हेच बघ,मुलींचा सलवार कुडत्यासारखा सुसभ्य पंजाबी पोशाख पण त्यातला सलवार, आता घोळ असणारा चुडीदार किंवा पटियाला  न राहता पायाचा पूर्ण आकार दाखवतो..ओढणी राहायला पाहिजे तिथे न राहता गळ्याबरोबर जाते. कमीजचे साईडला असणारे कट्स कमरेपर्यंत पोहोचलेत, या तुझ्या  top वरच बघ, या असल्या लक्षवेधक कोट्स असतात.  मग पुरुष चळले तर पूर्ण दोष त्यांनाच नाही ना देता येणार?"
"हे बघ.. आकर्षक दिसणं आम्हा मुलींना आवडतं कारण तो त्यांचा अंगभूत गुण आहे आणि मुलांना तसं वाटत नाही त्याला कोण काय करणार?"
तिच्या या विधानासरशी मी शरणागती पत्करली आणि तिच्याबरोबरच्या आधीच्या इतर असंख्य आर्ग्युमेंट्सप्रमाणे हाही वादविवाद मी हरलो! पण पुरुषवर्गाबद्दल असणारा तिचा हेटाळणीचा सूर कशाने आला असावा याचं मात्र मी उत्तर शोधत राहिलो..

तिच्याशी बोलणं म्हणजे नॉलेज शेअरिंगचं सेशन असायचं. वेगवेगळ्या संवेदनशील गोष्टी,भावभावनांचे बंध,नात्यांचे कंगोरे हळुवारपणे उलगडत जायचे. पण कधीतरी फारच कठीण काहीतरी बोलायची, जड जड शब्द वापरायची! एवढे की समजून घेताना माझ्या नाकी नाऊ येत. त्यात पुन्हा मधूनच "तुला काय वाटतं?' 'बरोबर की नाही?' 'तू तिथे असतास तर काय केलं असतंस' असले प्रश्न विचारून ती माझं मत आजमावत असे, त्यामुळे तिचं बोलणं पहिल्यापासून काळजीपूर्वक ऐकावं लागे! रूममेट्स,मालकीणबाई ज्यांना ती 'मावशी' म्हणायची आणि तिचे आई-बाबा हे तिच्यासाठी विश्व होतं.वीकडेजमधल्या २० मिनिटांच्या वॉकमध्ये होणा-या बोलण्यात त्यांच्या गमतीजमती,त्यांच्यातली भांडणं, रुसवेफुगवे,  काढलेल्या समजूती याचा उल्लेख नसेल तर मलाच चुकल्याचुकल्यासारखं  वाटायचं! आणि वीकेंडला? मुळीच काही वाटायचं नाही कारण डेली सोप मधला एखादा भाग चुकला तर आपल्याला कुठे फारसा फरक पडतो? नाही का?

एकदा चालता चालता nansy कॉलनी आली तरी ती काहीच बोलत नव्हती. माझ्या बोलण्यालाही react होत नव्हती.
"काय गं, आज अचानक एवढी अबोल का झालीस?"
"अं.. काय?" तंद्री भंग पावल्यासारखी ती बोलली..
"..बरं वाटत नाहीये का?" मी विचारलं.
"आई-बाबा लग्न करायचं म्हणताहेत.."
"परत? आणि या वयात?" मी पीजे टाकला. तेवढाच तिचा मूड ठीक होईल असं मला वाटलं.
"गप रे.. माझं लग्न म्हणतेय.."
"मग मूड ऑफ करून घेण्यासारख काय आहे त्याच्यात? चांगला जीवनसाथी मिळेल ना तुला..कि तू ऑलरेडी कोणी शोधला आहेस?" मी विचारलं.
"..."
"काय गं.. काय झालं?"
"आय had बीन इन्टू द रिलेशनशिप फॉर समटाईम.." ती म्हणाली.माझ्यासाठी नवीन गोष्ट होती ती. एवढं काय काय सांगत असायची पण कधी बोललीही नव्हती ती या विषयाबद्दल..
"मग?"
"वी ब्रोक अप टू इअर्स अगो.."
"हम्म.." मी सुस्कारा सोडून तिला सहानुभूती द्यायचा प्रयत्न केला. "प्रेमात कधी कधी होतं असं..आणि दोन वर्षांपूर्वी ना? मग आता अचानक एवढं काय वाईट वाटून घेतेयस त्याचं? " मी विचारलं.
"काय असतं रे प्रेम म्हणजे? खरंतर तसं काही असतं का याच विचारात आहे मी.. शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम वाटण्याच्या वयात आमचं नातं सुरु झालं." ती सांगायला लागली.
"त्रास होणार नसेल तर दुरावलात कशामुळे ते सांगशील?" मी विचारलं..
"तुला माहितीये का? मुली मुलांपेक्षा दोन वर्षांनी जास्त मच्युअर असतात.." ती तंद्रीत असल्यासारखं बोलायला लागली..
"काय?" नवीनच माहिती कळत होती मला.
"म्हणजे सपोज मुलगा आणि मुलगी१८ वर्षाचे आहेत तर मुलगा २० वर्षाचा असल्यावर जो विचार करू शकतो तोच विचार मुलगी १८व्या वर्षीच करत असते. तिला तेव्हाच समाजाचं,जनरीतींच भान असतं.."
"त्याचा इथे काय संबंध?" ती घालत असलेलं कोडं सोडवायचं की तिचं बोलणं ऐकायचं या दुविधेत मी अडकलो.
"अरे त्याच्यामुळेच तर नैतिकता टिकून राहते स्त्री-पुरुषांच्या नात्यांमधली.." ती सांगत होती.
"म्हणजे?" मी आणखीनच गोंधळात पडलो!
"म्हणजे कुठल्या नात्यात कुठपर्यंत जायचं त्याचं लिमिट मुलींना कळतं..निदान मला तरी कळलं होतं. म्हणूनच मी लांब जायचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी तेव्हा प्रेम म्हणजे भावना नव्हत्या त्याला वाटायचं प्रेम म्हणजे नुसतं..." ती दुसरीकडे बघत चालत राहिली. बहुतेक तिच्या डोळ्यात पाणी आलं असावं. त्याक्षणी मन मागे गेलं आणि मला आमची पहिली अपघाती भेट पुन्हा आठवली. त्या सगळ्या गोष्टींचा, तिच्या reactions चा, आमच्या डिस्कशन्सचा उलगडा झाला..तिने समस्त पुरुषवर्गाबद्दलचा तिरस्कार का बाळगला होता याचं उत्तर मला अचानक गवसलं!
"शारीरिक गरजा कोणाला नसतात? अरे..मुलींनासुद्धा त्याच फीलींग्ज असतात किंबहुना मुलांपेक्षा जास्तच.. पण त्यांना सेल्फ कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने माहित असतो.." ती सावरून म्हणाली
"असेलही कदाचित. मी एक मुलगा आहे. त्यामुळे तुझ्या भावना समजून घेणं कठीण जातंय मला.
 काही क्षण शांततेत गेले..
"असो.. आता त्याच्याशी आता काही contact?" मी विचारलं.
"त्याचा फोन येतो. मी म्हणतेय त्या चुका उमगल्यात म्हणतो. सगळ्याची जाणीव झालीय त्याला असं वाटतंय एकंदरीत."
"अगं मग बरंच आहे ना? तुला लग्न पण करायचं आहे आणि यू have युअर man ऑल्सो.."
"हम्म.. पण अरे घरच्यांनीसुद्धा मुलगा बघितला आहे."
"हे बघ.. अ नोन डेव्हिल इज थाउजंड टाईम्स बेटर than द अननोन रास्कल! असा मेसेज आला होता मला.." मी म्हटलं.. ती खळखळून हसली.
"तेही खरंच.. शेवटी लग्न म्हणजे कॉम्प्रोमाईज.. एक तडजोड. नाही का?"तिने विचारलं.
"पण ते अरेंज्ड असेल तर! राईट?? " मी हसत युक्तिवाद केला. ती पहिल्यांदाच निरुत्तर झाली.

मी मुंबई सोडली त्याला काही महिने लोटले. कालांतराने तिचं लग्नही झालं.त्याच्याशीच! दहिसरला त्यांनी संसार थाटला.कामानिमित्त असाच मुंबईला गेलो तेव्हा मित्राबरोबर दहिसरच्या ठाकूर मॉल मध्ये जायचा योग आला. आणि काय योगायोग पहा. या बाईसाहेब आणि त्यांचा नवरा शॉपिंग साठी तिथे आले होते. शॉपिंग आटपली होती आणि ते बहुधा निघायच्या बेतात होते. आमचे मित्रवर्य खरेदीत गुंग होते. मी तिला हाक मारली. तिला आश्चर्याचा धक्का बसला. प्राथमिक चौकशी झाली. तिच्या नव-याला माझी आणि मला आपल्या नव-याशी ओळख करून दिल्यानंतर आम्ही जरावेळ गप्पाटप्पा केल्या. निरोप घेतल्यानंतर तिचा नवरा गाडी काढायला गेला. गेटजवळ आम्ही बोलत थांबलो.
"घरी येऊन जा ना.. आमचा संसार बघ.." ती म्हणाली.
"येईन. वेळ काढून नक्की येईन. बरं... रमलीस ना संसारात?" मी विचारलं. ती हसली आणि म्हणाली.."तू म्हणाला होतास ना की लग्न अरेंज्ड असेल तरच ते कॉम्प्रोमाईज असतं? तर ऐक... कुठलंही लग्न म्हणजे तडजोडच असते.. अरेंज्ड असेल तर ती तडजोड आपण लग्नानंतर स्वीकारतो आणि प्रेमविवाह असेल तर ती आपण आधीच स्वीकारलेली असते! राईट??"
मला पुन्हा एकदा निरुत्तर करून जाणा-या तिच्या पाठमो-या आकृतीकडे मी पाहतच राहिलो.

सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

कोकणवेडा

माझा फोन खणखणला..आणि मी खडबडून जागा झालो. घड्याळात पाहिलं. रात्रीचे २ वाजले होते. 'कोण आहे इतक्या रात्री' डोळे चोळतच मी फोन उचलला..
'कोवे' होता.. "एक बातमी आहे रे" त्याने त्याची नेहमीची सुरुवात केली..
एवढ्या रात्रीचा फोन म्हटला कि मी आधीच धास्तावतो.. त्यात पुन्हा याचा फोन म्हटल्यावर माझा जीव कानात गोळा झाला.हृदयाचे ठोके जोरात पडू लागले. हातापायाला आधीच कंप सुटू लागला.
"उद्या सकाळी तुला तुझ्या होणा-या वहिनीशी बोलायचंय.. तयार राहा!'
मी सावरलो. माझा जीव पुन्हा हृदयात सुखरूप परतला!
"काय म्हणतोस? 'हो' म्हणाली का ती?" -मी
"हो.. म्हणाली फायनली! अरे..झोपच येत नव्हती.. आय एम सो एक्सायटेड.. यू नो! म्हणून तुला फोन केला.."
त्यानंतर जवळपास दीड तास अव्याहत बडबड करून कोव्याने फोन ठेवला.
मी नॉर्मल झालो.. पण झोप येत नव्हती. तसाही वीकेंड सुरू झाला होता.मी उठून galleryत येऊन खुर्चीत बसलो. मला त्याने याआधी असा अपरात्री केलेला फोन आठवला.

असाच माझा फोन वाजला होता. "एक बातमी आहे रे" कोवे तिकडून बोलत होता.
"बोल ना"
" एवढं करूनही आपल्या जिल्ह्यात ४९ मायनिंग प्रोजेक्ट्सना परमिशन दिली रे गवर्नमेंटने.." कोव्या हुंदके देत रडू लागला..
मी ऐकत राहिलो..अगदीच धक्कादायक बातमी नव्हती ती माझ्यासाठी. पण त्याच्यासाठी नक्कीच होती. त्याच्या भावना मी समजू शकत होतो.. त्याचं सांत्वन करताना माझ्या नाकी नऊ आले होते.

..कोकणवेडयाची आणि माझी दोस्ती अगदी लहानपणापासूनची. 'कोकणवेडा' हे त्याच मीच ठेवलेलं नाव. पण मी त्या नावाने कधीच हाक मारली नाही. मी त्याला कोव्या म्हणायचो. आमच्या घराच्या शेजारची जमीन त्यांची. तिथे घर बांधायचा त्यांचा प्लान होता. त्या जमिनीचा व्यवहार झाला तेव्हा आजूबाजूची चौकशी करायला म्हणून कोकणवेडयाचे आईबाबा आमच्याकडे आले. घर बांधत असताना जवळपास कुठे भाड्याने राहायची सोय होईल का? या प्रश्नाला 'आमच्याकडेच होईल की' असं उत्तर आमच्या मातोश्रींनी दिलं आणि त्यांच्या कुटुंबाचे आणि आमचे बंध जुळले असं म्हणतात.. म्हणजे आम्ही तेव्हा भूतलावर अवतरलो असलो तरी काही समजायच्या वयात नव्हतो म्हणून 'म्हणतात'.. मीही आणि तोही!

त्याची आई आमच्या परड्या (कंपाउंड ) मध्ये इतकं काय काय करत असायची कि मला लहानपणी ते आमचे भाडेकरू आहेत असं वाटतच नसे. झाडांची निगा राखणे, आळी (झाडांच्या मुळाभोवती पाणी साठून राहावं म्हणून मातीची तयार केलेली गोल रिंग ) करणे, फुलझाडं लावणे, वाफे तयार करून कसल्याकसल्या भाज्या लावणे, वेलींसाठी काठ्यांचा मांडव उभारणे असलं काही ना काहीतरी ती करत असायची. आमच्या आईला ऑफिसला सुट्टी असली की दोघीजणी मिळून बागकाम करायच्या. साफ-सफाईला मात्र पुरुषमाणसं जुंपली जायची. "अहो.." अशी कोणाचीही हाक रविवारी ऐकू आली तर दोघींचेही 'अहो' गुपचूप बाहेर यायचे. नाहीतर बोलणी पडायची भीती!!

कोकणवेडयाच्या बाबांकडे बक्कळ पैसा होता. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे ते माझ्या बघण्यातले पहिले गृहस्थ! 'लहानपणापासून इन्व्हेस्ट केला ना की पैसा वाढतोच' हे त्याचं तत्वज्ञान. आमच्या बाबांना ते असलं काहीतरी सांगत असायचे. बाबासुद्धा त्यांच्याकडे पैसे वगैरे द्यायचे इन्व्हेस्ट करायला पण तोलूनमापून! नोकरदार माणसाला असलेली भीती त्याला पैश्याला खेळवण्यापासून थांबवते त्यामुळे आयुष्यभर पैसा त्याला खेळवतो. (अर्थात हे पण काकांचंच वाक्य म्हणा!) त्यांनी काही जमिनी,बागा अशा गोष्टी खरेदी केल्या होत्या वरून बँकेतली नोकरीही होती. तरीपण आमच्याकडे भाडयाने राहात. अरे हो.. सांगायचंच राहिलं. घर बांधायला म्हणून ते ज्या वर्षी आले त्यानंतर तब्बल १० वर्षांनी त्यांनी तिथे घर बांधलं. कारण आमच्या कुटुंबांची जुळलेली नाळ!

कोकणवेडा लहानपणापासून आमच्या परड्यात रमायचा. ते गुण त्याच्या आईकडून त्याच्यात आले असावेत. झाडांशी जणू गप्पागोष्टी करायचा. फुलझाडे त्याच्या विशेष आवडीची. अगदी लहान असताना त्याची आई त्याला कडेवर घेऊन कंपाउन्डभर फिरत जेवण भरवत असे. मोठा झाल्यानंतरही रविवारची सकाळ तो त्या झाडातच घालवायचा! त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळीच क्रिकेट खेळावं लागायचं. बरं त्याला वगळून खेळायचं म्हटलं तर स्टंप त्याचे-अगदी बेल्ससकट. मला किंवा आमच्या इतर मित्रमंडळीच्या घरच्याना बॉल आणि bat सोडून इतर चोचले पुरवण शक्य नव्हतं. त्यामुळे या गाढवाचे पाय धरावे लागत असत! आणि तसा तो 'गाढव'ही नव्हता. तो फास्ट बॉलर होता. सुसाट करायचा बॉलिंग. टीममध्ये खेळतानापण आधी फलंदाजाला 'शेकवणे' आणि मग त्रिफळाचीत करणे हे सूत्र त्याने नेहमी वापरलं. इंग्लंडच्या लारवूड नंतर बॉडीलाईनचं अस्त्र वापरणारा हाच. एखादा batsman जर जास्तच फॉर्मात आला तर 'वडा काढू काय रे?' असं विचारून कोव्या बॉल घ्यायचा हातात आणि मग फलंदाज जायबंदी,त्याची रडारड,खेळ थांबणे वगैरे नेहमीचा इतिहास घडत असे! तरी बरं आम्ही कधी सिझन बॉलने खेळलो नाही!

तसाच अभ्यासात.. पहिल्या पाच-दहात तरी असायचाच. झाडं वगैरे जर नसती तर त्याला पहिला नंबर काढण्यापासून रोखायची आलम दुनियेत कोणाचीच टाप नव्हती! परीक्षेच्या दिवशी सुद्धा पुस्तक घेवून मी रिविजन करत असताना हा सकाळी झाडांना पाणी घालत असायचा. "पांढरी जास्वंद फुलली रे!" "गुलाब कसला सोकावलाय बघ..!" किंवा "आपलं सदाफुलीच कलम सक्सेसफुल झालं बरं का.." असलं काहीतरी तिसरंच निरीक्षण तो नोंदवत असायचा. त्याच्या आईला मात्र हे बिलकुल खपत नसे..
'अरे पेपर आहे ना तुझा? हे लिहिणारेस का पेपरात?" असले टिपिकल आयांचे ठरलेले संवाद फेकून ती कर्तव्य बजावत असे.

जसा जसा मोठा होत गेला तसं तसं त्याचं कोकणाबद्दलचं आकर्षण वाढत गेलं आणि जाणीवही. पदोपदी तो ती मलाही करून देत असे. 'जगामध्ये भारतात, भारतात महाराष्ट्रात आणि राज्यातही अश्या नितांत सुंदर प्रदेशात जन्म घ्यायला आपण मागच्या जन्मी फार काहीतरी पुण्य केलं असलं पाहिजे' हे किंवा अशा अर्थाचं वाक्य तो अशा आवेशात म्हणा,लकबीत म्हणा बोलत असे की प्रत्येक कोकणवासियाच्या मनात आदरयुक्त अभिमान निर्माण झालाच पाहिजे. तेव्हाच कधीतरी मी त्याला 'कोकणवेडा' म्हणायला लागलो.

पण 'आम्ही कोकणात राहतो' हे सांगायला मी शिकलो ते त्याच्यामुळेच. अकरावीपासून बाहेर शिकायला जायचा माझा प्रस्ताव त्याने धुडकावून लावला.

"अरे असलं निसर्गरम्य वातावरण सोडून त्या सिमेंटच्या जंगलात जायचं? अभ्यासात मन तरी लागेल का?"असं म्हणत कोव्या तिथेच राहिला. मी गाव सोडलं.

बाहेर आल्यानंतरच्या एक-दोन महिन्यातच कधीतरी त्याच्या घरी मी फोन केला होता.
"काकी, कोकणवेडा आहे का गं?"
"काय रे कसा आहेस? जेवणाचे हाल असतील ना? आपल्यासारखं वाटप लावत नाहीत तिकडे. कधी येणार आहेस? आलास की मस्त सुरमईची आमटी घालते करून " कोव्याच्या आईची गाडी सुसाट सुटत असे.
"ए काकी,बिल पडतंय अग. आल्यावर सांगेन तुला. पोरगा कुठाय तुझा?"
"कुठे असणार? बागेत. हा बघ आलाच..आणि तुला माहितीय का? मोसंबी धरली आपली.. आणि पायरीच्या कलमाची एक फांदी मोडली रे.. बरं बरं.. हा बघ हा बोलतोय"म्हणत तिने त्याच्याकडे फोन दिला.
"हलो,काय पत्ता काय तुझा? फोन करायचा ठरवलं तरी कुठे करायचा? गेल्यापासून आत्ता करतोय फोन, काकी म्हणत होती, आम्हालापण आठवड्याभरानेच करतो म्हणून. ही काय पद्धत आहे वागायची? आताच ही गत तर पुढे काय होणार देवाला माहित.." कोव्या त्याच्या आईचा मुलगा जास्त शोभायचा यात वादच नव्हता!
"आता गप.. ऐक पुढच्या महिन्यात मी येतोय. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचा प्लान कर. आयला... इथं पोरांनी वेडयात काढलं मला. म्हणतात इतकी वर्ष राहिलास आणि किल्ल्यावर नाही गेलास म्हणजे धन्य आहे!" मी म्हटलं.
"मग? मी एका पायावर तयार आहे. सकाळी किल्ला फिरू नंतर मालवणात मस्त जेवू नंतर संध्याकाळी तारकर्लीला जावू आणि रात्री घरी येवू" कोकणवेडयाने प्लान फायनलपण करून टाकला!
घरी गेल्यावर तो प्लान तसाच एग्झीक्यूट केला हे विशेष!

त्याच वाचनही तुफान होतं. इतिहासाचे दाखले देताना किल्ल्यात शिसं का,कोणी,कधी आणि कसं ओतलं ते सांगताना खाली वाकून तिथला दगड उचलून आणि निरखून 'हम्म.. बसाल्ट! हे बघ.. हे बेट बसाल्टचं बनलंय...' म्हणत त्याने तो दगड माझ्या हातात ठेवला की मी "हो का? बरं!" असं म्हणत तो समुद्राच्या पाण्यावर भिरकावून देत असे.. पाण्याच्या पृष्ठभागावर टप्पे खात जाणारा दगड त्याक्षणी जितका सुंदर दिसतो त्यापेक्षा जास्त सुंदर कधीच दिसत नाही. भले मग तो बसाल्ट का असेना! खरं की नाही?

तारकर्ली बीचच्या वाळूवरून त्याची बुलेट हाकताना जाम मजा यायची. हो बुलेटच! हा घरचा एकुलता एक.. मग बाबांच्या पैश्याचं काय लोणचं घालायचंय?
"हे असलं सुख विकत नाही रे मिळत! पिक्चर मध्ये लोक बघतात तेव्हा त्यांना काय हेवा वाटतो त्या हिरोचा. त्या हेव्याचा वाटेकरी त्या हिरोईनबरोबरच इथल वातावरणपण आहे. बाईकवर हिरोईन नसली तरी चालेल पण आजूबाजूला हा निसर्ग हवाच.." वाळूत बसल्या बसल्या अथांग समुद्राच्या फेसाळत्या लाटांच्या आणि मावळत्या सुर्यबिंबाच्या साक्षीने कोव्या तत्त्वज्ञान ऐकवायचा आणि मी ऐकायचो.."आपण अनुभवतोय ती वर्णनं लिहून कित्येक लेखकांनी पैसे कमावले असतील!"तो म्हणायचा!
त्याच्याबरोबर असताना सतत जाणवायचं की नशीब चांगलं म्हणून कोकणात जन्माला आलो.. नाहीतर घाटमाथ्यावर असतो तर पैसा खर्च करून हे सुख अनुभवायला यावं लागलं असतं. गाडया घेवून-बिवून!
हाफप्यांट झाडता झाडता उठत तो म्हणायचा "चल जाऊ.. गाडी धुवायला हवी रात्रीच नाहीतर गंज चढायचा! खा-या हवेतल्या क्षारांमुळे आणि किना-यावरच्या वाळूमुळे मेटल करोजन होतं माहितीय ना?" "हं.." म्हणत मी गाडी चालू करायचो..

मी इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित इत्यादी विषय शाळा-कॉलेजात शिकलो असेन पण अप्लाईड इतिहास,अप्लाईड भूगोल,अप्लाईड विज्ञान शिकवलं कोव्यानेच! अप्लाईड गणित मात्र इंजिनियरिंगने शिकवण्याचा प्रयत्न केला! पण त्यात कोव्याइतकी रंजकता नसल्यामुळे ते तेवढसं पचनी पडलं नसावं!

यथावकाश कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पार पडलं. बारावीला पठ्ठ्याने जोरदार मार्क पाडले. त्याच्या आईच्या आग्रहाखातर मेडिकलसाठीची प्रवेश परीक्षाही दिली.तिथेही चांगला नंबर मिळवला. पण 'शिकेन तर कोकणातच' या त्याच्या स्वतःच्याच शब्दांना जागून त्याने इंजिनियरिंगलाच admission घेतली. घराजवळचं कॉलेज सोडून रायगडमधल्या कॉलेजमध्ये! का तर कोकणातला तो जिल्हा म्हणे बघायचा राहिला होता! घराबाहेर पडल्यानंतर तो जणू मोकाट सुटला. निसर्ग-भ्रमंतीमुळे त्याच्या मनातली कोकणाबद्दलची आपुलकी जास्तच वाढत गेली. कधी कधी तो माझ्याकडे यायचा. दोन दिवस राहायचा आणि त्याने गेल्या काही दिवसात काय धमाल केली ते सांगायचा.. 'त्या दिवशी दापोलीच्या कृषी विद्यापीठात गेलो, ग्रीन हाउसला पाच लाख रुपये खर्च येतो, जरबेराचं एक फुल ५० पैशात सप्लायरना जातं आणि ते ५ रुपयांना लोकल मार्केट मध्ये विकतात आणि १५ रुपयांना एक्स्पोर्ट करतात.... मागे एकदा हर्णै बंदरात गेलो. लिलावात मासे घेतले विकत. आठशे रुपयांना अख्खी टोपली! मजा आली. हल्लीच एकदा रत्नागिरीला गेलो... थिबा प्यालेस बघितला परत. तिथून सायकलवर गणपतीपुळ्याला गेलो.. ऑसम एक्सपिरीअंस डूड!' असलं काहीतरी रोमांचक अनुभवकथन तो करायचा.

बरं बाकीचा महाराष्ट्र किंवा भारत तो फिरला नव्हता असं नव्हतं.. त्याच्या बाबांना बँकेतून जाहीर होणा-या योजनांमधून ज्या सवलती मिळत असत त्यात ते कुटुंब सुट्ट्यांमध्ये फिरत असे. भारतभ्रमंती केली त्याने, पण त्याला आवडलं असं कोणतंच ठिकाण नाही.

"शिमला शिमला करतात ते काय आहे शिमल्यात? जाऊन आलो. काही विशेष दिसलं नाही बुवा. थंडी आपल्या कोकणासारखीच हवी.. सुसह्य आणि हवीहवीशी.. ही च्यायला रक्त गोठवणारी थंडी हवीये कोणाला? "
किंवा..
" केरळ? अरे आपल्यासारखीच माडांची झाडं आहेत. हां पण तो नदीबिदीतून फिरायचा आयटम एक भारी आहे तो सोडला तर बाकी सगळं कोकणासारखंच! आपल्याकडेपण नदीतून फिरतात कि लोक. पण आपल्याकडे असलं कौतुक करून घ्यायची आणि मिरवायची प्रथा नाही त्यांच्यासारखी!"
सगळ्या गोष्टी कोकणशी कशा रीलेट कराव्या ते कोकणवेड्याकडून शिकावं! कारण त्याच्या घरच्यांना मात्र तीच ठिकाणं जाम आवडलेली असत आणि त्याची आई तिथले प्रेक्षणीय फोटो वगैरेही दाखवत असे!

इंजिनियरिंगच्या एका वर्षी माझा कॉलेजचा एक ग्रुप कोकणदर्शन करायचं या हेतूने टूरवर आला. अर्थात मीच लीडर होतो. राहण्याची व्यवस्था आमच्या घरी केली होती. आमच्या इकडची ठिकाणं फिरायची आणि कोवे नाही अस शक्यच नव्हतं त्यामुळे कोकणवेड्याच्या सुट्ट्या अड्जेस्ट करूनच प्लान केला होता. त्यानेही कुणकेश्वर, रेडीचा गणपती, सिंधुदुर्ग किल्ला,देवगडच्या पवनचक्क्या, वेतोबा देऊळ, आंबोलीचा धबधबा, सावंतवाडी, किल्ले विजयदुर्ग, रत्नागिरीचा जयगड, सुंदरबन,पावस, मंडणगड, डेरवण, मार्लेश्वर असा जोरदार प्लान आखला.. चार दिवस आणि चार रात्रींचं package! तो चांगला टूर को-ऑर्डीनेटरसुद्धा होऊ शकला असता.
पहिल्या दिवशी मी सगळ्यांना सगळ्यांची ओळख करून दिली. कोव्याला कॉलेजच्या मित्रमैत्रिणीची ओळख करून दिल्यानंतर मी त्याच्याकडे निर्देश करून म्हटलं..
"आणि लोकहो.. हा कोकणवेडा"
त्याचं नाव ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले "शी बाई! असलं कसलं नाव ?" " पेट नेम असेल रे.."असल्या कमेंट्स ऐकल्यावर माझी चूक माझ्या लक्षात आली.
मी लगेच म्हणालो.."अरे.. हे त्याचं मी ठेवलेलं नाव आहे.. त्याचं खरं नाव आहे...." इतक्यात माझ्या तोंडावर हात ठेवत तो म्हणाला.. "..कोकणवेडा हे नावच मला आवडतं.."
इतक्या वर्षानंतर मला पावती दिली होती त्याने! त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव तरळून गेल्यासारखं वाटलं मला.. उगीचच!
गाडीतून फिरताना बिस्कीट खाल्ल्यानंतर एकीने विचारलं..
"raper चा कागद कुठे टाकू रे.."
"टाक की खिडकीतून बाहेर.. कोकण आपलंच आहे!"
"हो..कोकण आपलंच आहे... पण म्हणूनच ते खराब करू नका! आपल्याच घरात आपणच कचरा करायचा?" कोकणवेड्याच्या सवालाने आम्ही निरुत्तर झालो आणि एकमेकांकडे टकामका पाहायला लागलो.
कोकणवेड्याने एक कागदी पिशवी बाहेर काढत त्यात तो कागद ठेवला.
विचारांमधली ही प्रगल्भता त्याच्यात कुठून आली कोण जाणे? कोकण प्रदेशाबद्दलची नितांत श्रद्धा आणि असीम भक्ती त्याच्या नसानसातून वाहत होती!
ट्रीप अगदी मस्त झाली.. त्यात कोव्याच्या अगाध "अप्लाईड" नॉलेज ने जास्तच रंगत आणली. त्याच्या भ्रमंतीमध्ये त्याने करून ठेवलेल्या ओळखी आम्हाला ब-याच उपयोगी पडल्या! राहायचे म्हणा; खायचे म्हणा अजिबात वांधे झाले नाहीत. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं.
"नाव बरिक शोभतं हो तुला!" आमच्या एका पुणेरी मैत्रिणीने त्याला कॉम्प्लीमेंटही दिली. कोकणवासीयांच्या आतिथ्यशिलतेचा अनुभव घेऊन त्यांच्या आदरातिथ्याच कौतुक करत आणि छान छान आठवणी साठवून घेत माझे मित्र मैत्रिणी पुण्याला परत गेले.

अप्लाईड असल्यामुळे इंजिनियरिंग कोव्यासाठी 'कीस झाड की पत्ती' होतं! कॉलेज मध्ये असताना त्याला एका नामांकित कंपनीची ऑफरही आली. पण त्याच्या आईला आता त्याचं महत्व पटलं होतं.
"काही नको करू नोकरी बिकरी.. इथेच राहा तू. एवढं सगळं केलं तुझ्यासाठी आणि तू आता मुंबईत जाऊन राहणार का? असं विचारतेय आई" तो म्हणाला.
"तिला पटवून दे ना मग.. एवढं शिकलो ते कशासाठी म्हणावं... "
"कशाला? मला पण इथेच रहायचंय!" डोळे मिचकावत तो म्हणाला. मग मी काय बोलणार?
त्याने गावाकडेच राहून बाबांनी करून ठेवलेल्या बागा बघायला सुरुवात केली आणि बघता बघता एक-दोन वर्षात धंदा कुठच्या कुठे नेला.कोव्या बघता बघता मोठा माणूस झाला.. त्याचे बाबाच चकित झाले! तरीपण त्याचे पाय जमिनीवरच राहिले.
हल्लीच कुठल्यातरी कृषी संस्थेचा माननीय सभासद म्हणून कसल्याश्या अभ्यास दौ-यासाठी जेव्हा तो कॅलिफोर्नियाला जाऊन आला तेव्हा मात्र 'ते भारी आहे' असं म्हणाला!
मी म्हटलं "नशीब! पहिल्यांदा तुला कोकण सोडून इतर कुठलातरी प्रदेश आवडला! भारतात नाही तर निदान परदेशात तरी!"
"ते भारी आहे ते तिथे.. इथे मात्र हेच!!' तो हसत म्हणाला.

पर्यावरणाच नुकसान हे त्याला स्वतःचं नुकसान वाटायचं. तो ब-याच आंदोलनातही सहभागी होता. अगदी सक्रीय! त्याचमुळे सिंधुदुर्गात खाण प्रकल्पांना मान्यता मिळताच तो दुःखी झाला होता. पर्यावरण संरक्षण म्हणून त्याने त्याच्या कारलासुद्धा gas कीट लावून घेतला होता.
"आपली लोकं ऐकतात ते बोलतात! ह्याला 'ग्यास्केट' म्हणतात!" वेड्यासारखा हसत तो सांगत होता.."पण एक सांगतो.. इतका फिरलो मी तरी इतकी चांगली माणसं कुठेच दिसली नाहीत." तो सांगायचा
" पाचवीला पुजलेलं दारिद्र्य आहे आपल्या शेतक-यांच्या नशिबी; पण कधी कोणी आत्महत्येचा भ्याड मार्ग अवलंबल्याच ऐकलं आहेस? मी एक सर्वे वाचला होता..तिकडे मराठवाडा-विदर्भात म्हणे लग्नासाठी,घरासाठी शेतीच्या नावावर कर्ज घेतात सावकाराकडून आणि त्याचं कर्ज फेडता येत नाही. अरे पेरलं नाही तर उगवणार कसं? हत्तींमुळे, अतिवृष्टीमुळे फियान (कोकणात येणारं चक्रीवादळ ) मुळे आपल्याकडेही कराव्या लागतात दुबार पेरण्या. तरीपण आपली लोकं रडत बसत नाहीत. अनुदानं आणि packages वर पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच खर्चात त्यांना इकडे पाठवा म्हणावं गवर्नमेंटला.. स्वाभिमानाने जगायचं कसं ते तरी शिकवतो! "
"अरे हो.. पण तिकडे मुलीच्या लग्नासाठी खर्च होतोच. हुंडा वगैरे.." मी म्हटलं.
"तेच ना.. शिकले तिथले लोक, पण अकला नाही आल्या! आपल्या इथे मुलगी आणि नारळ देतात माहितीये ना? लग्नाचा खर्च सुद्धा दोन्ही पार्ट्या निम्मा निम्मा उचलतात. म्हणून आपल्याकडे मुलगी झाली तरी तेवढंच सेलिब्रेट करतात जेवढा मुलगा झाल्यावर! अरे आई बापांनी वाढवलेली सुशिक्षित मुलगी तुम्ही आपल्या घरी घेऊन जाताय तरी वरून निर्लज्जासारखे हुंडा मागता? उलट तेवढी रक्कम मुलीकडच्यांना दिली पाहिजे. तुमचा पोरगा काय नामर्द आहे काय पोरीचे पैसे वापरायला? "
यावर मी काय बोलणार? त्याच्या ब-याचश्या विधानांना क्रॉस करता येणंच मुश्कील होतं. मलाच काय कुणालाही!

गणेश चतुर्थी आली की कोव्याच्या आनंदाला उधाण यायचं. आरत्या, भजनं अगदी तल्लीन होऊन करायचा.. कुठल्यातरी 'अमुक तमुक भजनी प्रासादिक मंडळात' जाऊन टाळ कुट कुट कुटायचा! शिकला सावरलेला आणि हातात पैसे खुळखुळवणारा तरुण पोरगा आपल्यात सहजी मिक्स होतो हे पाहून जुन्या जाणत्या लोकांच्या भुवया उंचावायच्या.रात्र रात्र भजनं करत हिंडायचा. बरं हा अजातशत्रू आणि वरून बरीच माणसं जोडलेली त्यामुळे कसली भीतीपण नव्हती.

असा हा भला मनुष्य सरतेशेवटी कोकणाव्यतिरिक्त इतर कोणाच्यातरी प्रेमात पडला.ती गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये मूळ गावी आलेली एक नवयौवना होती.
'मला ती आवडते' असं हा सांगायचा. पण पोरगी भाव देईल तर शप्पथ!
"विचारून टाक ना.. तुझ्याकडे पैसा आहे,सेटल्ड आहेस तर कुठली पोरगी नाही कशाला म्हणेल?"
"ते बघून येणारी पोरगी नकोय मला.. माझे विचार पटणारी हवी. mature हवी. माझं इथल्या मातीवरचं प्रेम, त्यामागच्या भावना जाणून घेणारी हवी.. ही तशी आहे. मुंबईची आहे. बॉर्न and ब्रॉट अप at परळ! बापाचा टू बीएचके आहे तिकडे आणि ही एकुलती एक. तरीपण जेव्हा मूळ गावाबद्दल कळलं तेव्हा आईला घेऊन आली इकडे."
"तिची स्टोरी मला कशाला सांगतोस? तू तुझं बघ." मी बोललो पण एकंदरीत बरीच माहिती काढली होती त्याने!
"तेच रे.. म्हणजे तिलापण इंटरेस्ट आहे गावात वगैरे! पण मला अजिबातच विचारत नाही."
"बरं.. नाव काय तिचं ?"
"सांगेन वेळ आल्यावर! उगीच काही सरकलं नाही पुढे तर कशाला बदनामी हवी दोघांची पण? सध्यातरी एकतर्फीच आहे म्हणायला हवं" सुस्कारा टाकत तो म्हणाला होता.

मी भानावर आलो.. तांबडं फुटत होतं. सहा महिने झाले असावेत या गोष्टीला. मध्यंतरीच्या काळात आम्ही खूप वेळा बोललो पण त्याने हा विषय टाळला होता. मीही मुद्दामहून काही बोललो नव्हतो. नावच माहित नाही मुलीचं तर कसा आणि काय म्हणून उल्लेख करणार रोजच्या बोलण्यात? असो.. उद्या निदान नाव तरी विचारून घेऊ! विचार थांबल्याबरोबर माझे डोळे पेंगायला लागले.

.... उन्हाचा चटका लागताच माझी झोप उघडली. खुर्चीतच मला डुलकी लागली होती. सकाळचे दहा वाजले होते. मी तोंड धुऊन फ्रेश होतो ना होतो तोपर्यंत त्याचा फोन आलाच.

"हे.. गुड मॉर्निंन.."
"मॉर्निंग.. बोला.. भेटलास का तिला?" मी विचारलं.
"हे काय.. तिच्याबरोबरच आहे..बोल तिच्याशी"--- "हाय" एक मंजुळ आवाज आला
"हे हाय..! सो यू फायनली अग्रीड! अभिनंदन!!" मी अभिनंदनाचा ठराव मांडला.
"thanks a ton.. हा सारखा तुझ्याबद्दल बोलत असतो. त्यामुळे डायरेक्ट अरे तुरे करत्येय. प्लीज डोंट माईंड हं!" ती म्हणाली.
"..डोंट बी सो फॉर्मल याss .. तुला एक सांगू का? आय शुडन्ट से धिस पण माझ्याबद्दल त्याने तुला एवढं सांगितलं तरी मला तुझं नाव सांगितलं नाहीये अजून त्याने." मी लगेच तक्रार नोंदवली.
"सांगते ना.. पण तू मात्र मला, मी सांगेन त्याच नावाने हाक मारायची.. ठीकाय? "
"हे काय आता नवीन? बरं.. मग नाव राहू दे बाजूला; मी काय नावाने हाक मारायची तेच सांग!"
मी उत्सुकतेपोटी विचारलं आणि प्रत्युत्तरादाखल ती म्हणाली..

"...कोकणवेडी!!!"

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०

मुन्नी बदनाम हुई: एका खंडकाव्याचे रसग्रहण

भारतीय सांगीतिक इतिहासात उलथापालथ घडवून आणण्याची ताकद असणा-या "मुन्नी बदनाम हुई" या खंडकाव्यावर भारतातील आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख येणं तर सोडाच पण या काव्याची साहित्यविश्वाने साधी दखलही घेऊ नये याचं आम्हांस फार वैषम्य वाटलं म्हणूनच या काव्याला (ज्याला सामान्य लोकांनी 'गाणं गाणं' म्हणून हिणवलं) सदर मीमांसा अर्पण!
या कवितेतील वाक्य-वाक्यात दडलेल्या परिपूर्ण प्रतिभेचा रसास्वाद घ्यायचा आम्ही एक क्षीण प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीपासून स्टार्ट  करू!

मुन्नी बदनाम हुई, डार लिंग तेरे लिये..

मुन्नी म्हणतेय कि हे प्रियतम, फक्त तुझ्यासाठी ही मुलगी जिला सगळे लाडाने मुन्नी म्हणत असावेत,तिची बदनामी झाली.. ती कशी झाली याचं उत्तर गाण्यात सापडतं का ते आपण पाहूया. येथे डार लिंग हा शब्द डार्लिंग या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश असावा. त्यावरून मी 'प्रियतम' हा सर्वांना समजेल असा सुटसुटीत शब्द योजला आहे. या पहिल्या वाक्याचं समर्थन करताना ती पुढे म्हणते,

मुन्नीके गाल गुलाबी,नैन शराबी,चाल नवाबी रे....
..मुन्नीने नेहमीप्रमाणे मेकअप केला आहे त्यामुळे तिच्या गालावर त्याची गुलाबी छटा पसरली आहे, तसेच ती बहुधा जरा जास्तच व्होडका पिऊन आली असावी,ज्या पद्धतीने मलायका अरोरा या गाण्यात नाचली आहे त्यावरून कोणी आमच्या विधानाला हरकत घेईल असे वाटत नाही. आणि पुढे पहा.. अल्कोहोल चा ओव्हरडोस झाल्यावर पावलं राजेशाही थाटात पडणं साहजिकच आहे नाही का? तो थाट वर्णन करताना तिनं म्हटलंय कि माझं चालणं असं आहे कि जणू नवाब लोकांचा थाटच ! ती पुढे म्हणते..

ले झंडू बाम हुई, डार लिंग तेरे लिये..
म्हणून हे प्रियतम, तुझ्यासाठी मी 'झंडू बाम' झाले. म्हणजे अर्थातच तुझ्या सगळ्या दुखण्यावरचा उपाय झाले. फक्त एवढाच मर्यादित अर्थ नाहीये या ओळीचा;तर मतितार्थ लक्षात घ्या. बाम ही वस्तू डोकेदुखी दूर करण्यासाठी वापरली जाते, तसेच 'कमर मे मोच,पीठदर्द,घुटनों में दर्द' साठी प्रभावी उपचार म्हणून याचा प्राथमिक वापर होतो. माझं गाणं ऐकून होणारी डोकेदुखी, किंवा माझ्यासारखं नाचताना लचक आली तर त्यापासून सुटका कशी करायची? तर या ओळीतून मुन्नीने सर्वांसाठी इलाज सुचवला आहे.
पुढच्या नवरात्रात किंवा गणपतीत हे गाणं जेव्हा जोरजोरानं वाजेल तेव्हा म्हाता-या लोकांना डोकेदुखी हमखास सुरु होणारच. या वर्गाला होणारा स्मृतीभ्रन्शाचा विकार विचारात घेता सुनेला जेव्हा ते हाक मारतील तेव्हा त्यांना सोयीस्कर जावं यासाठी मुन्नी त्यांना ब्रांड देखील सुचवते. गाणं ऐकताच ते म्हणू शकतील "सुनबाई, जरा झंडू बामची बाटली आण गं!"
हेच या गाण्याचं धृवपद आहे. केवढी मोठी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून हे गाणं लिहिलं गेलं आहे याची कल्पना ऐरागैरा करूच शकणार नाही!

शिल्पासा फिगर बेबो सी अदा , बेबो सी अदा...
ती म्हणते माझा बांधा शिल्पा (ही शेट्टयांची असावी, कारण शिरोडकरांचा बांधा जाहीर उल्लेख करण्यासारखा राहिला नाहीये!) सारखा कमनीय आहे. वा! वा ! शब्दा-शब्दातून सौंदर्याचे नवीन मापदंड कसे उभे केले आहेत ते पहा.. माझ्या अदा म्हणजे नटणं मुरडणं हे कपूरांच्या करीनासारखं आहे. बहुधा सध्याच्या काळात तिची दखल घेण्याजोगी ही एकच गोष्ट असावी. तिची फिगर मुन्नीच्या नजरेतून कशी सुटली हा मात्र संशोधनाचा विषय होऊ शकतो.असो! तर मुन्नी म्हणते..

है मेरे झटके में फ़िल्मी मज़ा रे फ़िल्मी मज़ा...
मुळात 'फ़िल्मी मज़ा' हा काय प्रकार असतो हे माहित नसल्यास या वाक्यातून काही अर्थबोध होणार नाही. आम्ही संशोधनाअंती असा निष्कर्ष काढला कि भारतीय भाषेत फिल्मी म्हणजे 'आभासी'! त्यामुळे प्रत्येकाच्या कल्पनेमध्ये 'मजा' या शब्दाचा जो 'अर्थ' ऐकणा-याला अभिप्रेत आहे, तो त्याने घेतला कि या वाक्यातली मजा कळेल! (आधी हे वाक्य कळलं का बघा!) मुन्नीने अंगाला दिलेल्या प्रत्येक झटक्याबरोबर तुम्हाला 'ती मजा' घ्यायची असेल तर कल्पनाशक्तीला जेव्हढा वाव देता येईल तेवढा चांगलं! पण हे समजणारे फार थोडे लोक असतात आणि याची मुन्नीलादेखील जाणीव आहे बरं का? म्हणूनच ती पुढे म्हणते..

हाय तू न जाने मेरे नखरे पे..... हाय तू न जाने मेरे नखरे पे लाखों रुपैया उड़ा..
ज्याना ही उपरोल्लेखित 'मजेची जाण' आहे त्या सुजाण लोकांनी लक्षावधी रुपये या मुलीवर उधळले आहेत अशी कबुली ती स्वतःच देते. यावरून तिच्या व्यवसायाची साधारण कल्पना येते.

वे मैं टकसाल हुई , डार लिंग तेरे लिये..

म्हणजे पहा.. नुसत्या नख-यावर खो-याने पैसा ओढणारी ही (बार)बाला स्वतःला टांकसाळीची समर्पक उपमा देते. यावरून प्रियकर म्हणून तिचा रोख साधारण बारमालकाकडे अथवा तो फारच वयस्कर असल्यास त्याच्या मुलाकडे असावा असे वाटते. इथे मुन्नीच्या प्रतिभेला दाद द्यावी तितकी थोडी! पुढे मुन्नी म्हणते..

सिने माहॉल हुई , डार लिंग तेरे लिये..
म्हणजे संधीविग्रह केल्यानंतर हे वाक्य "सिनेमा हॉल हुई" असं असावं. मल्टीप्लेक्स मध्ये एंटरटेनमेंट ट्याक्सच्या नावाखाली ओढला जाणारा प्रचंड पैसा लक्षात घेता ते पैसा छापण्याच मशीन बनलं आहे यात शंका नाही. नेमका हाच मुद्दा उचलून मुन्नीने स्वतःच स्वतःला ती उपमा दिली आहे. 'मी नाचगाण्यातून  किती पैसा मिळवते आहे ते पहा, आणि ही गोष्ट विचारात घेता तू इकडे आकर्षित व्हायला काहीच हरकत नसावी' असे मुन्नीला येथे म्हणायचे असावे!

पुढील कडव्याला स्पर्श करण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते!
वास्तवात मुलींशी साधे बोलायचे देखील गट्स नसणारा एखादा नवखा खेळाडू, सोशल नेट्वर्किंग साईटवर मुलींचे प्रोफ़ाईल्स चाळून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी फोटोजवर "u look cool " "nic snap dear ! " "beutiful dear.. " "gorgius " अश्या (अशुद्ध लेखन असणा-या) कमेंट्स देऊन नंतर "माझ्यशी मैत्री कर्नर क ?" किंवा "wana b my frend?" वगैरे विचारतो. इथे खुल्ली ऑफर देणा-या मुन्नीने तिच्याबद्दल एवढ सांगितल्यानंतर तिथे असणा-या एखाद्याला तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली नाही तरच नवल! असाच एक जण लगेच आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो..
ओ मुन्नी रे, ओ मुन्नी रे..
तेरा गली गली में चर्चा रे...

कॉलेजात एखादी नवीन मुलगी आली तर ती गेटमधून बिल्डींगमध्ये पोहोचेपर्यंत तिची चर्चा वर्गावर्गात सुरु झालेली असते तर इथे स्वतः मुन्नीने घसा फोडून सांगितल्यानंतर तिची चर्चा कुठे होणार नाही हे शक्य आहे का? तेच इथे सांगितलं जातंय.. मुन्नीला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली जातेय कि गल्ली गल्ली मध्ये तुझ्या नावाची चर्चा चालू आहे. याच भावना पूर्वी शम्मी कपूरने "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे" या गाण्यातून व्यक्त केल्या होत्या.पुढे हा आशिक म्हणतो..

है जमा इश्क दा इश्क दा परचा रे जमा इश्क दा इश्क दा परचा रे ...
ओ मुन्नी रे !!

या ओळींवर (खालची मुन्नीला दिलेली हाळी वगळता ) आमचे अजूनही संशोधन चालू आहे.. काव्य प्रकाशित झाल्यानंतरदेखील हा लेख प्रकाशित करायला एवढा वेळ झाला या मागचं मुख्य कारण ह्या दोन ओळीच आहेत. भान हरपल्यानंतर मनुष्य काहीबाही बरळत सुटतो त्यापैकी हा प्रकार असावा असे आमचे प्रथमदर्शनी मत आहे. यातून खरेच काही अर्थबोध होत असल्यास त्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा अशी आमची विनंती आहे!

असे कितीतरीजण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात म्हणून मुन्नीने काय सगळ्यांनाच फ्रेंड लिस्ट मध्ये add करायचं की काय? छे छे.. अश्या लोकांशी कस वागायचं हे मुन्नीला चांगलंच ठाऊक आहे! म्हणून ती लगेच म्हणते..
कैसे अनाडी से पाला पड़ा जी पाला पड़ा.......हो कैसे अनाडी से पाला पड़ा जी पाला पड़ा...
या कडव्यात मुन्नीला एक गहन प्रश्न पडला आहे कि या कसल्या निर्बुद्ध माणसाशी आपली गाठ पडली आहे? तिला तो बेअक्कल का वाटावा? तर त्याचं उत्तर तिनं लगोलग देऊन टाकलं आहे.
बिना रुपैये के आके खड़ा मेरे पीछे पड़ा...
एखाद्या बारबालेच्या मागे लागणं तेदेखील हातात/खिशात एकही छदाम नसताना? हे निर्बुद्धपणाचेच लक्षण नव्हे काय? मुन्नीने ते बरोबर जोखले आहे म्हणून त्या मूर्खाचा पोपट असा उल्लेख करून ती म्हणते..
पोपट न जाने मेरे पीछे वो सैफू...
एखाद्याला हातोहात मूर्ख बनवला, किंवा त्याला वेड्यात काढला कि त्याचा 'पोपट' केला असं म्हणतात. तोच अर्थ मुन्नीला घ्यायचा असावा. आंबटशौकीन श्रोत्यांच्या डोक्यात जर चटकन कोणताही दुसरा अर्थ आला असेल तर त्यांनी तो लगेच काढून टाकावा ही विनंती आहे. ती म्हणते माझ्यापाठी सैफु लागलाय... सैफु म्हणजे सैफ अली खान, बरं का? तो तिच्या मागे आहे; तर या सगळ्या बिन पैसेवाल्या भिकारी लोकांनी त्यांच्या हद्दीत राहावं असा तिचा स्पष्ट सल्ला आहे! आता पहिल्या कडव्यात करीनाचा उल्लेख केल्यावर सैफ अली खानला अनुल्लेखाने टाळणे म्हणजे त्याचा घोर अपमान! याचं पातक डोक्यावर घ्यायचं मुन्नीनं खुबीनं टाळलंय. तिची ही शिताफी लक्षात येताच कोणालातरी दाद दिल्याशिवाय राहवत नाही..दबक्या आवाजात तो ओरडतो
हाय हाय मारही डालोगी क्या..
पण त्याला न जुमानता मुन्नी त्यालाही त्याची औकात (मराठीत..लायकी) दाखवून देते..
पोपट न जाने मेरे पीछे सैफू से लेके लम्बू खड़ा...
म्हणजे नुसता सैफच नव्हे तर लंबूही तिच्या मागे आहे. लंबू म्हणजे अमिताभ बच्चनच असावा यात डाउट नाही. बॉलीवूडच्या शहेनशाहचा 'लंबू' असा अपमानास्पद उल्लेख करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे. इतिहासाची पाने चाळल्यास गोविंदानेदेखील आपल्या नायिकेला भुलवण्यासाठी 'जो तू होती जया भादुरी.. हम भी तो लंबू होते... गोरी तेरे नैनो में हम बस जाते!' असं म्हणून अमिताभला लंबू म्हटले आहे. आता अमिताभची उंची आहे जरा जास्त म्हणून काय त्याचा सारखा सारखा असा उल्लेख करून त्याला पदोपदी हिणवायचं? आपल्याला नाही बुवा आवडलं! पण हे आमचं वैयक्तिक मत आहे. जाऊ दे.. विषय भरकटला.. तर मुन्नी म्हणते कि सैफ अमिताभ सारख्या थोरामोठ्यांची नजर तिच्यावर असताना देखील..

आयटम यह आम हुई , डार लिंग तेरे लिये..
आयटम यह आम हुई , डार लिंग तेरे लिये..

आयटम म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेत 'अनेकात एखादी'. 'आयटम' या शब्दाच्या प्रत्येकाच्या संज्ञा वेगवेगळ्या असू शकतात! जश्या कि 'लाखात एखादी' 'हजारात एखादी' इत्यादी इत्यादी.
तर ढोबळमानाने असणारा 'चारचौघात लक्ष वेधून घेणारी' हा अर्थ आपण घेऊ तर तो मुन्नीवर अन्याय होईल. 'सैफ' वगैरे म्हणजे जरा जास्तच पातळी आहे त्यामुळे इथे 'त्या' लेव्हलची बाला 'आम' झाली.. आता बघा.. इथे भाषेतला शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेलाय त्याला महत्व आहे. हा 'आम' खायचा नाही.. आय मीन..हा 'आम' खायचा 'आम' नाही. आम म्हणजे अतिसामान्य.. 'आम जनता' मध्ये असलेला अर्थ. या भाषेची हीच तर खासियत आहे! ही देखणी, लावण्यवती (असताना ती ) अतिसामान्य झाली.. आता आधीच्या वाक्याचा संदर्भ घेतला तर मुन्नी म्हणते कि सैफ अमिताभ सारख्या थोरामोठ्यांची नजर तिच्यावर असताना देखील.. ही खास आयटम जनसामान्यांसाठी उपलब्ध झाली (श्रोत्यांनी आणि वाचकांनी इथे आपल्या कल्पनाशक्तीला थोडासा लगाम घालावा..) कारण, हे प्रियतम फक्त तू आणि तुझ्यासाठी! बघा बघा.. अपूर्व त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण घालून दिलेलं आहे मुन्नीने! याला म्हणत असावेत खरखुर आकर्षण! आणि त्यामुळेच ती पुन्हा आठवण करून देते कि बाबा खरंच...
मुन्नी बदनाम हुई, डार लिंग तेरे लिये..

एवढं सगळं म्हटल्यानंतर (तेदेखील एका सुस्वरूप मुलीने !) कोणाच हृदय द्रवलं नाही तरच नवल!
है तुझमें पूरी बोतल का नशा,बोतल का नशा ..है तुझमें पूरी बोतल का नशा,बोतल का नशा...
इथे मुन्न्याची एन्ट्री झालेली आहे.. आम्ही पहिल्यांदा केलेल्या 'मुन्नी बहुधा जरा जास्तच व्होडका पिऊन आली असावी' या विधानाला पुष्टी देणारी वाक्य तो स्वतः इथे फेकत आहे पहा.. 'तुझ्यामध्ये पूर्ण बाटली पिल्यानंतर जेवढी नशा चढते तेवढीच नशा आहे' असा या वाक्याचा जरी वरवरचा अर्थ असला तरी छुप्या अर्थाकडे कोणाचं लक्ष जाणार नाही म्हणून स्पष्ट करत आहे.. 'एका बाटलीमुळे जेवढी नशा चढते तेवढी नशा तुला चढली आहे..झेपत नाही तर कशाला प्यायची एवढी' अशी मुन्नाला तिच्याबद्दल वाटणारी काळजी त्यातून व्यक्त होते.

कर दे बुढापे को कर दे जवाँ रे कर दे जवाँ...
आता तरणीताठी पोरगी बेधुंद होऊन जर बेफाम नाचायला लागली तर त्यापासून स्फूर्ती घेऊन म्हाता-याकोता-यांनादेखील नाचावेसे वाटेल यात शंका नाही. याच अर्थाने मुन्नाने, मुन्नीच्या नशेची महती वर्णन करण्यासाठी एक दाखला म्हणून हे वाक्य उच्चारले असावे! तुझी नशा एवढी आहे कि म्हातारपणालासुद्धा तरुणाईत बदलायची असीम ताकद आहे त्यात! केवढ हे कौतुक.. केवढी ही स्तुती आणि उतू जाणारं प्रेम! यापुढे मुन्ना आणि मुन्नीची प्रेमकहाणी फक्त या एका काव्यामुळे लैला-मजनू, हीर-रांझा, सोनी-महिवाल अगदी आताच्या काळातले राधे-निर्झरा, वीर-झारा यांच्या बरोबरीने अजरामर होणार ही काळ्या दगडावरची (खडूने मारलेली पांढरी) रेघ आहे!!
पुढे मुन्ना फॉर्मात येऊन म्हणतो..
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली, हाये..
वा वा! ओठांवर शिव्या तुझ्या डोळ्यात दोन रंग.. बहुधा दारूमुळे लालपिवळे झालेले तिचे डोळे मुन्नाने अचूक हेरले असावेत.. आणि शिव्या हा अल्कोहोलचा काऊन्टर इफेक्ट आहे हे जाणकार श्रोत्यांना कळले असेलच! म्हणजे हे गाणं ऐकताना नुसते कान नव्हेत तर भानही हवे. तो पुढे म्हणतो कसा..
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली रे दे है जिया...
तू आयटम बॉम्ब हुई, डार लिंग मेरे लिए...
इथे आयटम हा शब्द atom या अर्थी योजला आहे.. एकाच शब्दाचा उपयोग दोन वेगवेगळ्या अर्थांनी करायची किमया इंग्रजी भाषेनंतर बॉलीवूडच्या गीतकारांनी साधली आहे यावर कोणाचेच दुमत नसेल! तू माझ्यासाठी जणू अणुबॉम्ब झालीस! प्रतिभा पहा.. 'बॉम्ब' हा शब्द तरुण मुलं कोणत्या अर्थाने वापरतात हे त्यांना तर सांगायला नको पण लेडीज वाचकांवर अन्याय नको म्हणून मी जरा सोज्वळ शब्दात हे संकल्पना सांगतो.. एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर जर पाहणा-याच्या मनामध्ये संमिश्र भावनांचा (म्हणजे सर्व भावना एकाचवेळी एकत्र! ) कल्लोळ माजला (जसा बॉम्ब फुटल्यावर माजतो) तर ती व्यक्ती 'बॉम्ब' आहे असं म्हणायला हरकत नाही!सहसा या विशेषणाचा वापर मुलींकरिताच केला जातो असा समज आहे. नुसता बॉम्ब म्हटलं तर एवढा कल्लोळ तर 'आयटम बॉम्ब' म्हणजे काय असेल याची तर कल्पनाच न केलेली बरी! मुन्नाने हे विशेषण मुन्नीला देऊन तिच्या नटण्या मुरडण्याचा, मेकपचा, नाचाचा, दारू पिऊन घातलेल्या धिन्गाण्याचा, थोडक्यात तिच्या ओव्हरऑल कार्याचा यथायोग्य सन्मान केलेला आहे असे आम्हास प्रामाणिकपणे वाटते.

मुन्नी बदनाम हुई,
मुन्ना आणि मुन्नी यांचा एक दुर्मिळ फोटो!
डार लिंग मेरे लिये..
मुन्नीके गाल गुलाबी,
नैन शराबी,चाल नवाबी रे....
ले झंडू बाम हुई,
डार लिंग तेरे  लिये..
मुन्नी बदनाम हुई,
डार लिंग तेरे लिये..

या ओळींचा अर्थ आधी दिलेलाच आहे.. तसेच यातील धृवपद आधीच स्पष्ट करून सांगितले आहे.. सामाजिक जाणिवेच भान वगैरे वगैरे!

बात ये आम हुई, डार लिंग तेरे लिये..
इतकावेळ "मुन्नी बदनाम हुई, मुन्नी बदनाम हुई" ओरडून सांगितल्यानंतर 'रोज मरे त्याला कोण रडे' या उक्तीप्रमाणे तिच्याभोवती फुकटात नाचणा-या पब्लिक ला त्याचं कौतुक वाटेनासं होतं त्यामुळे ते तशी स्पष्ट कबुली देऊन टाकतात. यासाठी सुद्धा धैर्य लागतं बरं!! ते म्हणतात 'मुन्नी बदनाम हुई' हि आता सामान्य गोष्ट झालीये आम्हाला काहीतरी नवीन हवंय.. चलाख मुन्नीला याचा सुगावा लागताच प्रसंगावधान राखून ती म्हणते..
बे-हिंदुस्तान हुई, डार लिंग तेरे लिये..
दुर्दैवाने या वाक्याचासुद्धा आम्हास अर्थ लागला नाही! येथे 'बे' हा शब्द दोन या अर्थी आहे कि बे-घर होणे या अर्थी आहे हे कळायला पुरेसा वाव नाही. दुसरा अर्थ जरी थोडासा अर्थपूर्ण वाटतो पण तो अर्थ घेतल्यास असंबद्धपणा जरा जास्तच वाढतो त्यामुळे हे वाक्यसुद्धा सध्यातरी ऑप्शन ला टाकल्याचे आम्ही जाहीर करत आहोत. जरी ते चुकीचे वाटत असले तरीपण इथे मुन्नीने प्रसंगावधान राखून तोच तोच पणा टाळल्याबद्दल तिचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे

अमिया से आम हुई,डार लिंग मेरे लिये..
इथे 'आम' हा शब्द आधी सर्व ठिकाणी उपयोजल्याप्रमाणे 'सामान्य' या अर्थी नसून आंबा या अर्थी असावा.. कारण कैरीपासून जसा आंबा होतो तसा अमिया पासून आम होत असावा. मुन्नीला अभिप्रेत असणा-या विचारापर्यंत आम्हाला पोचता आले नाही याबद्दल आम्ही खेद व्यक्त करीत आहोत.
ले झंडू बाम हुई, डार लिंग मेरे लिये..
सिने माहॉल हुई , तेरे तेरे तेरे लिए..

ओळींचा अर्थ आधी दिलेला आहे.. (म्हणजे परत परत सांगितला जाणार नाही!) धृवपदही स्पष्ट करून सांगितले आहे.. सामाजिक जाणिवेच भान, पैश्याची खाण वगैरे वगैरे!

आ ले बदनाम हुई हांजी हाँ तेरे लिए..
ले सरेआम हुई, डार लिंग तेरे लिये..डार लिंग तेरे लिये..

शेवटची ओळ पुन्हा एकदा ऑप्शनला! (इंजिनियरिंगची सवय! सुंभ जळला तरी पीळ जात नाही! काय करणार?)


तर आम्ही आमच्या परीने या अफलातून गाण्या(जनसामान्यांचा शब्द)चे रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदीचा अपुरा व्यासंग आणि भाषेची व्याप्ती या दोन गोष्टींमुळे काही ठिकाणी बंधने आली आहेत. तरीदेखील इतरांनी दुर्लक्षिलेल्या गोष्टीचा अभ्यास करणं (आणि करायचा त्यांचा न करणं) याची सुरुवातीपासूनच आवड असल्याने आम्ही हे संशोधन केले आहे. या संबंधात काढलेली टाचणं, टिपणं, संदर्भग्रंथ आमच्या अभ्यासिकेत उपलब्ध आहेत. अभ्यासूंनी वैयक्तिकरित्या संपर्क केल्यास ती त्यांच्यासाठी उपलब्धही करून दिली जातील.


सरतेशेवटी सांगायचे झालेच तर..आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात या गाण्याने एका नवा मैलाचा दगड उभा केला आहे यात तिळमात्र शंका नाही आणि याबाबत कोणताही वाद असण्याचा प्रश्नच नाही!

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

जिम पोरी जिम.. कपाळाची जिम!

 इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला आमच्या रूमवर व्यायाम करण्याचं फॅड आलं.. अरर्र.. प्रस्तावना राहिली!

मुलं वयात यायला लागली कि त्यांच्यात काय काय बदल होतात हे बायोलॉजीच्या पुस्तकांमधून आणि पेपरांमधून (बायोलॉजीच्या नव्हे,, नेहमी वाचायच्या!) आपल्याला माहितीच आहे.. जसे कि 'तारुण्यसुलभ' सारखे अतिनाजूक किंवा 'पौगंडावस्था' वगैरेसारखे भारी भारी शब्द असणारे लेख..त्या मुलामुलींनी काय करायचं, त्यांच्यासाठी पालकांनी कसं वागायचं याचे सल्ले इत्यादी इत्यादी.. मला 'पौगंड' म्हणजे कित्येक दिवस कमीपणाचा शब्द वाटायचा.. त्याच्या 'न्यूनगंड' या शब्दाशी असणा-या साधर्म्यामुळे! तर माझ्या चष्म्यातून (ख-या नव्हे.. जीवनाकडे पहायच्या) पाहिले असता वयात आल्यानंतर मुलं ही स्वतःच्या दिसण्याला,बाह्य सौंदर्याला जास्त महत्व देतात.. याचाच कॉन्सिक्वेंस म्हणून मुली वळतात आरसा, मेकअप बॉक्स आणि इतर सौंदर्य प्रसाधनांकडे आणि मुलगे वळतात.... अर्थात मुलींकडे! आता ही बिचारी मुलं (मुलगे या अर्थी!!) मेकप तर करू शकत नाहीत मग आणखी काय करणार? बोलबच्चन लोकांना तोंड उघडलं कि मुली वश होतात पण जनसामान्यांचं काय? त्यासाठी मग खूळ निघतं बॉडी बिल्ड करायचं! वय वर्ष १८ गाठलं कि बरीचशी मुलं या वेडाने पछाडली जातात.. सलमान खान, संजय दत्त किंवा अगदीच आताच्या काळात सोनू सूद,शाहीद कपूर वगैरे त्यांचे हिरो बनतात. पण ही 'बरीचशी' मुलं वगळता इतर त्यांच्याहून 'बरीचशी' मुलं मात्र स्थितप्रज्ञ असतात. त्यांना 'आमीर खान अभिनय चांगला करतो' किंवा 'हृतिक रोशन हॉलीवूड स्टार सारखा दिसतो' इत्यादी साध्या आणि फालतू कारणासाठी आवडत असतात. त्यांना शाहरुखने पोटाला सहा बिस्कीटं आणली तरी फरक नाही पडत आणि आमीरने आठ आणली तरीही नाही! सिक्स नाही,एट नाही यांचा आपला वन प्याक आणि असलाच तर जास्तीत जास्त बनपाव! मी अर्थातच दुस-या क्याटेगरितला!

तर सांगत काय होतो.. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला आमच्या रूमवर हे फॅड आलं.. रूमही मस्त होती. मोठीच्या मोठी आणि प्रशस्त खोली,त्यात पुन्हा दोन खिडक्या, एक बाल्कनी आणि खोलीएवढाच मोठा ओपन टेरेस! मालकाने ज्या भाड्यात आम्हाला ती खोली राहायला दिली होती ते पाहता तो लॉसमध्ये जात असला पाहिजे यात शंका नाही. कारण आधीच्या वर्षाला त्या ओपन टेरेसच्या भागाचा वापर कपडे वाळत घालण्याव्यतिरिक्त अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठीही आम्ही करत असू,एवढा तो मोठा होता! वरून तेवढ्या मोठ्या खोलीत फक्त ३ जण. ते सुद्धा आम्ही दोघंच जण राहणार होतो पण तिसरा आमचा मित्रच.. साला 'मी पण येतो,मी पण येतो' करत जबरदस्तीने घुसला! असो.. मित्र म्हटल्यावर व्हायचंच असं.. तिघांच्या कॉट्स तीन भिंतीना चिकटून ठेवल्या कि खोलीत बरीच मोकळी जागा उरायची.

शिवाय सर्वांना अभ्यासाची आवड इतकी प्रचंड होती कि एकच टेबल तिघांना पुरत असे. तिघे तीन वेगवेगळ्या शाखांचे असून सगळ्यांची पुस्तकं त्या टेबलावरच असायची. (तरीही टेबलवरही मोकळी जागा उरायची! आता बोला!!) तर या मधल्या मोकळ्या जागेत (अर्थात जमिनीवरच्या!) धूळ फार साठते असा एकदा रिकाम्यावेळी चाललेल्या चर्चासत्रातून अहवाल निघाला. राहायला आल्यानंतर तब्बल एक ते दीड वर्षांनी या सत्याची आम्हाला जाणीव झाली! रोजचा कचरा काढणं तर होत नाही तर हि जागा वापरात आल्याशिवाय धूळ साठणं कमी होणार नाही या तात्पर्यापर्यंत आम्ही तिघेही पोहोचलो. एवढ्याश्या जागेत कबड्डी तर खेळता येणार नाही मग काय करणार बुवा? 'अभ्यासाला तिथे बसू' हा पर्याय एकमताने ठोकरला गेल्यानंतर (कारण अभ्यासाला बसण्याची फ्रिक्वेन्सी विचारात घेतली तर धूळ साठण कमी न होता वाढलंच असतं) तिथे पत्ते खेळू, इस्त्री करू, पेपर वाचायला तिथे बसू यापलीकडे कोणाला काही सुचेना.. तेवढ्यात आमच्यापैकी एकाच्या सुपीक डोक्यात एक विचार आला तो असा.. " जर इथे सूर्यनमस्कार घातले तर अंग जमिनीला चिकटत जाईल (धूळ अंगाला चिकटेल हा गर्भितार्थ!). रोजचे कपडे तर आपण धुतोच; त्यामुळे जागाही स्वच्छ राहील आणि आपला व्यायामही होईल. हा ठराव मात्र २ विरुद्ध १ या फरकाने आणि चढ्या आवाजी मतदानाने संमत झाला. अर्थात एकमेव विरोधी मत माझं होतं हे वेगळं सांगायला नकोच!

दुस-या दिवशीपासून जी रणधुमाळी उडाली ती काय विचारता? दोघेजण वॉर्म अप वगैरे करून जोर मारणे, बैठका काढणे वगैरे प्रकार त्या मोकळ्या जागेत करू लागले. दोन-चार दिवसांमध्येच मला फरक दिसू लागला! त्या जागेवर धूळ वगैरेचं नामोनिशाण राहिलं नाही!! दोघांनी सकाळी उठून जोरजोरात श्वास बाहेर सोडत व्यायामाला सुरुवात केली कि मी पांघरुणातून डोळे किलकिले करून पहात असे आणि अंगावरची चादर डोक्यावर घेऊन पुन्हा झोपी जात असे.. एखादा जर जास्तच जोश मध्ये आला तर उगीच मला येऊन पार्श्वभागावर लाथ घालून,किंवा कॉट गदागदा हलवून शक्तीप्रदर्शन करत असे, जणू काही याची बॉडी आर्नोल्ड श्वाझनेगरला लाजवेल अशीच झालीये! पण माझ्यावर शष्प फरक पडला नाही. एक मात्र झालं, दोन-तीन आठवड्यातच टेबलावरच्या मोकळ्या जागेत श्रीयुत हनुमंतरावांचा फोटो आला (त्यामुळे टेबलही स्वच्छ झालं) आणि रूमवर दुधाचा रतीबही सुरु झाला. मग मला जराशी भुरळ पडली. दुधातला थोडा वाटा मला मिळावा यासाठी मी त्यांच्या मिन्नतवा-या सुरु केल्या पण दोघांनीही 'व्यायाम न करणा-याला थेंबभरही दूध मिळणार नाही' असे एकमताने जाहीर केले. माझ्यासारखा मुलुखाचा आळशी माणूस काही स्वतः जाऊन दुध आणणार नाही याची त्या दोन्ही तथाकथित पैलवानांना पूर्ण शाश्वती होती त्यामुळे हा क्रूरपणा! मग नाईलाज म्हणून मीही व्यायामाला सुरुवात केली.

माझ्या एन्ट्री नंतर दोघांचा उत्साह दुणावला. माझा पहिलाच प्रयत्न असल्याने जो तो मला कशा पद्धतीने एक्सरसाईज करायची ते समजवू लागला. मीही 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' या उक्तीप्रमाणे आचरण सुरु ठेवले! त्यात एक रेग्युलरली जिमला जाणारा आमचा एक चौथा मित्र रूमवर आला आणि आमच्या व्यायामाचा सुगावा लागताच 'मशीन नाही तर काही फरक पडणार नाही, डम्बेल-बिम्बेल तरी मारा' असा अनाहूत सल्ला देऊन गेला.. झालं! "तिघेही करतोच आहोत तर अमक्याकडे डम्बेल्स नुसत्या पडून आहेत.. तमक्याकडे ५ पौंडाच्या प्लेट्स आणि बार गंजत पडलाय.." अशा कुठून कुठून बातम्या आणून त्या वस्तूंची रवानगी आमच्या जागेत करण्यात ते दोघेही यशस्वी ठरले. त्या वस्तूंच्या मालकांनी 'किती दिवस करताय पाहू' असं म्हणून त्यांच्या उत्साहाला आवर घालायचा प्रयत्न केला पण हे पठ्ठे बधले नाहीत.मग सुरु झाली मशीन एक्सरसाईज! उपकरणं : प्रत्येकी साडेसात पौंडाच्या दोन डंब-बेल्स, एक बार, दोन -५ पौंडाच्या आणि दोन -अडीच पौंडाच्या प्लेट्स, आंब्याच्या रिकाम्या पेट्या (अर्थात मीच नेलेले आंबे!) रद्दी पेपर्स वगैरे.. आंब्याच्या रिकाम्या पेट्या रुंदींच्या बाजूने एकमेकांना जोडून त्यावर रद्दी पेपर्स ठेवून बेंच तयार केला गेला आणि त्यावर उताणं झोपून बार खालीवर करायचा असा तो प्रकार होता. याला बेंच प्रेस असे नाव असते हे माझ्या गावीही नव्हते! हा सरंजाम मात्र कॉलेज संपेपर्यंत टिकला.. म्हणजे त्या दोघांनी टिकवला पण माझा उत्साह ३-४ महिन्यात--सॉरी आठवड्यातच ओसरला! 'ह्या दुधात पाणी जास्त असतं' असलं तद्दन भिकार कारण देऊन मी झोपून राहायला लागलो..

जॉब सुरु झाला तेव्हा खोली सोडून मी ब्लॉक संस्कृती स्वीकारली.. आणि माझ्या दुर्दैवाने माझ्या रूममेट्सनी सुद्धा! दुर्दैवाचा आणखी मोठा घाला म्हणजे आमच्या जिमवाल्या मित्राने आम्हाला जॉईन व्हायचं ठरवलं.. आमच्या कॉलेजने आम्हा चौघांनाही 'ब-या' म्हणता येतील अशा नोक-या मिळवून दिल्याने काहीजणांच्या नशिबात पहिली नोकरी मिळेपर्यंतचा जो मुबलक वेळ असतो तो आमच्या पदरात पडला नाही! पहिल्या जॉबच्या उत्साहात आणि आपल्याला इतरांपेक्षा जास्त काम कसं असतं हे पटवून देण्याच्या भानगडीत नवखं पब्लिक जास्त वेळ ऑफिस मध्ये घालवतं. आमच्याही बाबतीत काहीसं तसंच झालं होतं. एकमेकांशी ऑफिस (आणि तिथल्या सुंदर मुली) सोडून इतर गोष्टींवर बोलायला सुद्धा वेळ मिळत नव्हता! यथावकाश सगळं स्थिरस्थावर होवू लागलं आणि काही काळानंतर आम्ही चौघेहीजण पुन्हा ‘माणसात’ आलो. त्याला कारणही तसंच होतं! आमच्या समोरच्या सदनिकेत काही मुली राहायला आल्या. सुंदर असाव्यात. असाव्यात यासाठी म्हटलं की आमच्यापैकी सगळेच इंजिनियर! त्यामुळे जनरली मुलगी दिसली की ती सुंदर असणे-नसणे अशा दुय्यम गोष्टीना आमच्या जीवनात स्थान नव्हते! ज्या दिवशी त्या मुली चौकशी करून गेल्या त्या दिवशीपासून कोणी न कोणी ऑफिस मधून लवकर येऊन कानोसा घेऊन लागला आणि एका रविवारच्या प्रसन्न सकाळी ४ मुलींचा ग्रुप त्या घरात डेरेदाखल झाला!

आम्ही चौघे, त्याही बरोब्बर चौघी! वास्तविक एखाद्या सिनेमात अशी सिच्युएशन आली की सिनेमाच्या नायकाला सर्वात सुंदर आणि त्याच्या मित्रांना मग उरलेल्यांपैकी (अर्थात त्याही सुंदरच असतात) एक एक अशी विभागणी होते. पण वास्तवात तसलं काही होत नाही याची जाणीव त्या रविवारी प्रकर्षाने झाली! आम्हा चौघांनाही त्यांच्यापैकी एकच मुलगी आवडली! बाकीच्याही चांगल्या होत्या पण ती सुहास्यवदना इतरांपेक्षा सरस आहे यावर कधी नव्हे ते सगळ्यांचं एकमत झालं.सगळेचजण स्वतःला सिनेमाचा नायक समजत असल्यामुळे असेल कदाचित! त्या सोमवारपासून सगळ्यांचे पाय सहाच्या ठोक्याला घरात पडू लागले. जणू काही ती आमच्यासाठी चहाच बनवून ठेवत होती!

तिला इम्प्रेस कसं करावं यावर खल सुरु झाले..पण काही मार्ग सुचेना.सरळ जावून बोलायची तर कोणाचीच छाती होईना.. आणि हाय रे कर्मा! त्या तिघांपैकी कोणाच्या तरी डोक्यातून कल्पना आली कि 'जिम लावूया'.. 'आपण जिमला जाताना किंवा तिकडून येताना ती बघेल आणि आपल्या फिजीकवर इम्प्रेस होईल' अस सरळ साधं गणित त्यांनी मांडलं.. बरं..वेळही सत्कारणी लागेल हे आणिक वरून! पुन्हा बहुमताने निर्णय! त्यामुळे मी एकटा पडलो.
बॉडी बिल्डींगचे लोकांचे हेतू काय काय आणि किती सकारात्मक असतात.. चांगली पर्सन्यालीटी,निरोगी जीवन, वाढलेला आत्मविश्वास वगैरे वगैरे.. आणि आमचे हेतू काय? तर जमीन साफ करणे, मुलीवर (त्यापण एकाच!) इम्प्रेशन मारणे, वेळ घालवणे इत्यादी! असं असल्यावर कोण तयार होईल? मी नकार कळवला. (जिमला जाण्यासाठी). पण मी एकटा राहून तिला पटवेन कि काय या भीतीने माझा नकार ग्राह्य धरला गेला नाही आणि जिमला येण्याची बळजबरी केली गेली. जर नकार कायम राहिला तर असहकार चळवळ पुकारली जाईल अशी जाहीर धमकीही देण्यात आली. दुस-या दिवशीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली.सायलेंट ट्रीटमेंट मिळण्याच्या भीतीने मी या धमकीला बळी पडलो आणि पुन्हा एकदा नाइलाजाने माझ्या व्यायामाचा दुसरा स्पेल सुरु झाला!

पहिल्या स्पेलपेक्षा हा जरा मोठा आणि नाही म्हणायला प्रॉडक्टीव होता.. ग्लोव्हज, स्पोर्ट्स गियर वगैरेची खरेदी झाली. आठवडाभरातच वॉर्म-अप एक्सरसाईजेस वरून मेनस्ट्रीम एक्सरसाईजेसवर गाडी सरकली! त्या तिघांचा इंस्ट्रक्टर वेगळा. कारण त्यांची जराशी बिल्ड आधीच होती. राहुल हा माझा ट्रेनर..
"जिम केलीय का आधी?" मेनस्ट्रीमच्या पहिल्याच दिवशी त्याने प्रश्न केला.
"अं.. नाही.. म्हणजे हो... म्हणजे.." मी चाचरत म्हणालो.मला वाटलं कि आयुष्यात कधी जिम केली नाही असं सांगितलं कि हा माझ्यावर हसणार!
"हो-नाही काय? इथल्या इंस्ट्रूमेंट्स ची नावं माहित आहेत का? उद्या 'पेक डेक' मार जा म्हटलं तर जाशील का?" राहुलने विचारलं
"नाही.." मी ओशाळून म्हटलं,
“ठीकाय.. थ्री-बॉडी करू उद्यापासून..” मी प्रश्नार्थक चेहरा करत मान हलवली.
माझा व्यायाम आटपल्यावर मी आमच्या त्रिकुटापैकी कोणी दिसतंय का पाहायला लागलो तर हे लोक सापडेनात. थोडावेळ इकडे तिकडे बघतो तर हे लोक ट्रेडमिल च्या मागे नंबर लावून उभे!
"साल्यांनो.. तीन तीन ट्रेडमिल्स असताना एकाच ठिकाणी का नंबर लावला आहात?"
"शू sss " तिघांनी एकदम आवाज केला!जरा निरखून बघतो तर हे तिघेही जण तिथल्या खिडकीतून बाहेर बघताहेत! आणि बाहेर..? ..बाहेर एक अतिशय सुंदर ललना मानेला हलकेच झटके देत वॉर्म-अप करत होती!

आता आमची जिम जोरदार सुरु झाली.. जिमला जाण्यासाठी जीमबाहेरही कारण होतं आणि जिममध्येही! अर्थात त्यापैकी वैध एकही नव्हतं हा भाग अलाहिदा!
डम्बेल्स आणि बारबेल्स च्या बरोबरीने बेंचप्रेस, पेकडेक, लेगप्रेस इत्यादी शब्द तोंडात रुळले..
‘जोर’ च्या ऐवजी डिप्स म्हटलं जाऊ लागलं.. ‘बैठका मारणं’ डाऊन मार्केट वाटायला लागलं त्याऐवजी मी ‘सीटअप्स’ मारू लागलो.
स्कॉट्स,ल्याटरल/ व्हर्टिकल पूल डाऊन, कार्डीओ,क्रन्चेस असले भयंकर उच्चार करताना जीभ अजिबात अडखळेनाशी झाली.
बायसेप्स,ट्रायसेप्सच्या जोडीला रिस्ट्स, back ,शोल्डर, चेस्ट,थाईज वगैरे अवयवांनाही पुरेसा मान द्यायला शिकलो. 'ह्यामस्ट्रिंग' का काहीतरी आपल्या (आणि इतरांच्याही) अंगात असतं हे मला तिकडे जायला लागल्यावर कळलं! (तोपर्यंत अंगात फक्त 'माज' असतो यावरच माझा विश्वास होता!)
"सपोर्ट दे रे,ट्वेंटी-फ़ाईव्ह च्या प्लेट्स आहेत" किंवा "विंग्सवर जाम प्रेशर आलं रे आज" वगैरे वाक्य आम्ही जरा जोशात फेकायला लागलो.. विशेषतः ती ललना जवळ असल्यावर..!
शनिवारी शक्तीची देवता हनुमंताची प्रार्थना करताना तिच्या बाजूला (म्हणजे ललनेच्या; देवतेच्या नव्हे !) जागा मिळावी यासाठी धक्काबुक्की व्हायची आणि व्यायामानंतरच्या स्ट्रेचच्या सेशनसाठी तर जास्तच! कुशन म्याटवर आडव पडून क्रंचेस आणि abs झाल्यानंतर हात पसरून वेस्ट आणि लेग स्ट्रेचेस असत. ललना नेहमी सावध असायची पण तरीही चुकून तिच्या बोटांचा ओझरता स्पर्श शेजारच्या व्यक्तीच्या बोटांना होतच असे. आता शेजारच्या व्यक्तीने स्वतःचे हात जर्रा जास्तच ताणले तर हे होणं साहजिकच आहे नाही का? असो! अर्थात शेजारच्या व्यक्ती या ब-याचदा आम्हा चौघांपैकी दोघे असत हे वेगळे सांगणे न लगे!

इकडे आम्ही घरी परतताना आमची सुहास्यवदना आणि कधी कधी तिच्या मैत्रिणी खिडकीत बसलेल्या असत. जिन्यावरून पहिलं तिच्यासमोर कोण येणार यावरून कॉम्पीटीशन लागत असे. तीदेखील चेहरा हसरा ठेवून कोणाशी न कोणाशीतरी फोनवर बोलत बसलेली असायची. 'ती आज कोणाकडे बघून हसली' यावर आमच्यात डिस्कशन रंगायच. तिच्या ते खिजगणतीत तरी होतं कि नाही कोण जाणे!
"आपले बायसेप्स बघितलेस का? बघत अश्णारच ती! " एकाच कॉन्फीडन्सयुक्त बोलणं.
"बायसेप्स आधी दिसतात कि चेस्ट?" दुस-याचा युक्तिवाद..
"बॉडी फिटिंग टी-शर्टस घालत चला माझ्यासारखे मग फक्त चेस्ट किंवा फक्त बायसेप्स दाखवावे लागणार नाहीत!!" तिसरा या दोघांना क्रॉस करत असे..
मी मात्र सुरुवातीला शांतपणे हा वाद ऐकत बसायचो. माझे ना बायसेप्स तयार झाले होते, ना चेस्ट .आतासं माझ्या शरीराला कुठे वळण लागत होतं!साधारण दोन-अडीच महिने होताच मीपण असल्या वादांमध्ये उडी घ्यायला लागलो!

"च्यायला, आमचं अंग म्हणजे आधी पोतं होतं, आता कुठे शेप यायला लागलाय आणि ती इथे आली तेव्हापासून तिचे सगळे कर्व्ज एकदम कोरल्यासारखे, असं कसं काय?" मी एकदा वैतागून त्या मुलीकडे निर्देश करून राहुलला विचारलं होतं..
"अरे ती तुझ्यासारखी म्हातारपणी जागी नाही झाली! आधी ती एन्ड्यूरन्सची मेंबर होती,मेंबरशिप संपली म्हणून ही जिम ट्राय करायला म्हणून लावलीये. पण तीन महिने कम्प्लीट झाल्यावर फक्त एका महिन्याचीच रिन्युअल घेतलीये तिने ."
"म्हणजे? हा महिना संपला कि ती जाणार?"
"बहुतेक.. पण तुला काय करायचंय? तिच्यासाठी आलास कि स्वतःसाठी?"
राहुलला खर सांगण्यात काही अर्थ नव्हता नाहीतर माझं सभासदत्व धोक्यात आलं असतं!
एके दिवशी मला जिमला जायला जमलं नाही.. ऑफिस मधून अर्धा-पाउण तास उशिरा घरी आलो तर सगळे निघून गेले होते. जायचा प्रचंड कंटाळा आला. साडेतीन महिन्यांच्या व्रतामधला पहिला खंड.. काय कन्सिस्टन्सी होती! वा! पण जाऊ दे.. तसाच सोफ्यावर रेलून बसलो. पेपर उघडता उघडता खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या घरात काहीतरी हालचाल दिसली. एक शर्ट दिसत होता.. असेल.. मी नजर पेपरमध्ये वळवली.. आणि चमकलो! शर्ट? तो सुद्धा समोरच्या घरात? म्हणजे कोणी पुरुष आलाय का? मी पडद्याआड उभा राहून हेरगिरी सुरु केली. कोणी दोघेजण बोलत होते.. घरात बहुधा इतर कोणी नसावं. त्यांची खिडकी, आमच्या घरातून वगळता इतर कुठूनही दिसत नसे. पेठेतल्या घरांची संरचनाच अशी असते. आमच्याही घरात यावेळी जनरली कुणी नसतं त्यामुळे बहुधा खिडकी पूर्णपणे बंद करायची तसदी त्या मुलींनी घेतली नव्हती. किंवा एक कवाड कदाचित वा- यामुळे उघडलंही असेल. पण आतमध्ये ती सुहास्यवदना आणि एक मुलगा! आईशप्पथ... मुलगा? मी सतर्क झालो..

भाऊ असेल.. मी मनाची समजूत घातली. पण असला तरी असा खेटून बसणार नाही.. कोणीतरी असेल ओळखीचा.. नुसता मित्र. पण म्हणून काय झालं. दरवाजा बंद करून बसायचं? काही जनरीतीचं भान वगैरे? आणि चक्क हातात तिचा हात? भविष्य वगैरे सांगत असेल पण मग दुसरा हात कुठेय त्याचा? तिच्या कमरेभोवती बोटं आहेत ती कोणाची? आयला.. प्रकरण वेगळंच होतं.. वेगळं कसलं नेहमीचंच होतं पण आमच्यासाठी वेगळं! मी पडद्या आडून त्यांच्या हालचाली निरखून बघू लागलो.. कुठे हातातच हात घे;कुठे तिच्या कपाळावरची बटच नीट कर असे प्रेमी युगुलांचे चाळे करत बराच वेळ गुलुगुलू गप्पागोष्टी केल्यावर तो जायला उठला. तीही उभी राहिली आणि खाली वाकून त्याने तिच्या गालावर...

...मी मटकन खालीच बसलो! आम्ही प्रत्येकाने स्वप्नात उभारलेले इमले कोसळले होते. दोनच मिनिटात तो बाहेर पडला. किडकिडीत बांधा. अंगावर जणू शर्ट वाळत घातलाय कि काय असं वाटत होतं. रूपही जेमतेम. तो गेल्यावर ती खिडकीत येऊन बसली आणि तिने त्याला फोन केला. त्यालाच! कारण त्याच्या फोनची रिंग मला ऐकू येत होती. ती नेहमीसारखीच त्याच्याशी बोलत खिडकीत बसली...!

मी सोफ्यावर अंग झोकून दिलं होतं.दरवाजा उघडल्याच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. जिमवरून पार्टनर्स परतले होते.
'माझ्याचकडे बघत होती रे ती.." आमच्या घरातले एक भागीदार..
"हाड.. तू काय शाहीद कपूर समजतोस कि काय? आपल्याकडे सोडून ती बाकी कोणाकडे नजर पण टाकत नाही" दुसरे मित्रवर्य
"तुम्ही नुसत्या गोष्टीच बोलत बसा.. ती माझ्या बाईकच्या मागे बसेल ना तेव्हा कळेल तुम्हाला" तिसरे सहकारी..
"कोणाबद्दल बोलताय?" मी विचारलं.
"तुझ्या वहिनीबद्दल" तिघेही एकदम म्हणाले..
"वहिनी? कुठली?" माझा सवाल.
"अरे क्या येडा बनके पेडा खाता है यार... ही समोरची.. तेरी भाभी! मला फुल न्याहाळत होती; माहितीये?" एकजण म्हणाला..
"आता ती एकच होप आहे यार" दुसरे साहेब उद्गारले!
"का? काय झालं? आपली जिमवाली ललना?" मी गडबडून विचारलं.
"आपली? आपली कधीपासून झाली ती? आमची होती ती.."
"तीच.. ती आहे ना? मग एकच होप काय?" मी सावरून म्हटलं.
"नाय ना.. तिला बॉय फ्रेंड आहे.."
"क्काय?" मी पुन्हा चमकलो " तुम्हाला कसं कळलं?"
"आला होता ना साला आज.. तिला सोडायला. कार घेऊन. काडीपैलवान आहे नुसता! त्याच्यात तिने काय बघितलन कोण जाणे! "
"अरे सोडायला आला म्हणून काय बॉयफ्रेंड होतो? भाऊ असेल..नायतर कोणीतरी असेल ओळखीचा.. नुसता मित्र बित्र" मी माझं मघासचंच लॉजिक अप्लाय करायचा प्रयत्न केला.
"तसा असला तर सोडून जाईल ना लगेच.. ती गाडीमध्ये झुकून त्याच्या ओठांवर... श्या.. मला बोलवत नाही. .तू सांग रे.."
माझ्या अंगातून त्राण गेल्यासारखं वाटलं!
"काही सांगू नका कोणी" मी ओरडलो.
"काय रे? एवढं अपसेट व्हायला काय झालं? अजून एक ऑप्शन आहे ना आपल्याला. उलट बरंच झालं. आता फक्त एकीवरच जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल"
"काही उपयोग नाही! या ऑप्शनवरही कुणीतरी आधीच काट मारलीये!" मी सांगितलं.
मी सगळा प्रकार सांगताच पहिल्यांदा सर्रकन तिघांचेही चेहरे उतरले आणि पाठोपाठ मानेवरून जिमचं भूतही!!

त्यादिवशीनंतर ऑफिसमधला वर्कलोड कसा कोण जाणे पण अचानकच वाढला.. तोही सगळ्यांचा एकदम!! बहुतेक रात्री लगोलग जागतिक बाजारपेठेतून रीसेशन हटलं असावं! कारण 'आज काम आहे रे ऑफिसमध्ये' या कारणाखाली सगळ्यांना घरी यायला रात्र होऊ लागली. त्यामुळे जिम तर बंदच झाली! जिन्यावरून येताना सुद्धा आजकाल सगळे माना खाली घालून येतात. सुहास्यवदना मात्र तशीच बसलेली असते.. सुंदर हास्य चेह-यावर विलसत ठेवून. पण ती कोणाकडे बघून हसली यावर हल्ली डिस्कशन्स मात्र रंगत नाहीत. रविवारची कामवाली बाई येवून साफ सफाई करून जाते त्यामुळे तसा कचराही होत नाही.

अरे हो.. कालच राहुलचा फोन आला होता. कुणी एका नव्या सौंदर्यवतीने जॉईन केलीये म्हणे जिम. 'सहा महिन्याची मेंबरशिप घेतली आहे' अशी अतिरिक्त माहिती सुद्धा पुरवलीये त्याने.. पार्टनर्सना सांगायलाच विसरलो. मी म्हणतो, तिसरा स्पेल चालू करायला काय हरकत आहे?

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

अनावस्था प्रसंग!

गोरेगावच्या रेल्वेस्थानका वरून पश्चिमेला बाहेर पडून रिक्षाने साधारण सरळ त्याच दिशेला गेलं की अंदाजे १०-१२ मिनीटांनंतर बांगूरनगर नावाचं "उप-उपनगर" लागतं. गजबजलेल्या मुंबापुरीत अशा शांत निवासी भागात गेलं की फार बरं वाटतं. उन्ह उतरायला लागली की त्या भागातले बरेचसे लोक फेरफटका मारायला बाहेर पडतात. तिथून मालाडच्या बाजूला चालत दहा मिनिटांच्या अंतरावर एकेकाळचा "सर्वात मोठा" अशी बिरुदं मिरवलेला 'इन-ऑर्बिट" मॉल आहे.मालाड आणि गोरेगावच्या सीमेवर. दस-याला इथले लोक हटकून या मॉलमध्ये जात असावेत जेणेकरून खरेदी आणि सीमोल्लंघन अशी दोन्ही पुण्यकर्मे पार पाडता येतील असं मला उगीचच वाटायचं!

मुंबईला गेलं की गोरेगावच्या काकांकडे मुक्काम आणि मुंबईतल्या मित्रमंडळींना जमवून थोडा टाईमपास असं माझं गणित असायचं. अशाच एका शनिवारच्या संध्याकाळी आम्ही सर्वांनी भेटायचं ठरवलं. बोरीवली कांदिवली ठाणे वगैरे भागातून तीन मित्र आणि त्यातल्या दोघांच्या 'मैत्रिणी' असे सगळे येणार होते. ‘इनॉर्बीट’ टाईमपाससाठी सुद्धा सुयोग्य ठिकाण आहे त्यामुळे सगळ्यांनी तिथेच यायचं असा प्लान झाला. मला तर बरंच झालं. तिघांपैकी एक-दोघे जण पोचले की घरातून बाहेर पडायचं असा विचार करून मी काकांकडे टीव्ही पाहत राहिलो.

स्टेशन वर पोचल्यावर एकाने फोन केला त्याबरोबर मी तयारी केली आणि बाहेर पडलो. इतरांना फोन करून त्यांचं स्टेटस अपडेट घेत मी चालू लागलो. ३-४ मिनिटात मी बांगूरनगरच्या अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्याला टच झालो आणि फोन वर बोलत बोलतच मी इनॉर्बीट च्या दिशेला वळलो.
"मॉल दिसतोय रे बाबा मला. पोर्चमधून जरा डोळे ताणून बघितलंस तर तुलापण मी दिसेन .." मी तिथे पोचलेल्या माझ्या एका मित्राला मी किती जवळ आहे ते पटवून देत होतो..
तेवढ्यात माझ्या खांद्यावर एक हात पडला..

"भाय..एक मिनिट रुक.."
एक मवाली दिसणारा तरुण मला थांबवत होता. "मी ठेवतो रे फोन" म्हणत मी फोन ठेवला आणि त्या व्यक्तीकडे वळलो.
"बोला..काय झालं?"
"तूने वो पीछे के कॉर्नर पे जो लडकी खडी है उसको कुछ बोला क्या?"
मी लांबवर नजर टाकली. मुंबईच ती ! नजरेच्या पट्ट्यात साहजिकच खूप सारी माणसं आली. जिथून मी वळलो होतो त्या कॉर्नरवर एक बाई हातात पिशवी घेऊन उभी होती. पण कोणी मुलगी दिसेना.
"कौन लडकी?, मुझे तो कोई दिख नही रहा है"

तेवढ्यात आणखी एक; आधीच्यापेक्षा जरा बरासा दिसणारा इसम आमच्या रोखाने येऊ लागला.
"काय बोलतोय रे तो? बोलला काय तिला हा?" तो इसम म्हणाला.
"नाय म्हन्तो तो.." मवाली तरुण.
'आयला.. म्हणजे मराठीच आहेत तर.. मी उगीच हिंदीत बोलत होतो..' मी मनातच म्हणालो.
"नाय म्हणतो? पण वर्नन तर हेच केल होत..पांढरा टी शर्ट,निळी जीन् प्यांट ,डाव्या कानात बाली.. बॉस तुने बोला क्या किसीको?"
"नाही बुवा.. मी नाही कोणाला काही बोललो.."
"मराठीच आहेस का? मी पन.. आपन इम्रान कोकनी..." त्या माणसाने आपली ओळख दिली. "काय हाय म्हायताय का? इथे आपला सलीम भाई आहे ना त्याच्या भैनीला रोज कोणतरी छेडतं.. आमी फुल प्लानिंग केला होता आज त्याला पकडायचा.. ही सगळी आपली पोरं हायेत पेरून ठेवलेली.. तुझं वर्नन दिलं म्हणून तुला हटकला. तू नव्हता ना नक्की?"
"छे छे.. मी तर आपला गुपचूप मोबाईल वर बोलत चाललो होतो. छेड काढणं तर सोडाच चुकून कोणाला धक्का लागल्याचंसुद्धा आठवत नाहीये."
"ठीक है.. जरा साईडला ये. उसको जरा थोबडा दिखाकार आयेंगे.. कन्फम होईल ना तू तो नाय्ये म्हणून.."
"मी कशाला? जाऊन सांगू शकता ना तुम्ही लोक?" मी त्रासिक चेहरा करत म्हणालो. आधीच उशीर झाला होता. ठाण्याचा मित्र तिकडून इकडे पोचला होता आणि १० मिनिटांच्या अंतरावरून यायचं असून मी मात्र अजून रस्त्यातच होतो..
"सून मेरे भाय.. सलीम भाय को जाके ऐसा बोला ना तो हमारा थोबडा आउट कर देगा वो.. तु आके जा ना दो मिनट मे. तेरेको किधर जाना है क्या?"
हे तर भारीच! जाणा-या माणसाला थांबवून "तेरेको किधर जाना है क्या?"
'च्यायला मी जणू काही इथेच बसायला आलो होतो. २-४ पोरींनापण छेडीन म्हणतो जाता जाता..' मी बोललो पण सगळं मनातल्या मनात!!
"जाना तो है.. मित्र वाट बघतायत इनऑर्बिटला " मी त्यांना म्हणालो.
"किती?" मला मागून यायचा इशारा करत तो रस्ता क्रॉस करायला लागला.
'तुला काय करायच्यात रे चांभारचौकश्या?' हे अर्थात स्वगत.. "आहेत ८-१० जण" मी ठोकून दिलं! होते ३ जणच पण म्हटलं आपली अर्जन्सी कळेल यांना. एका माणसासाठी इतके लोक खोळंबलेत म्हटल्यावर लवकर आटपतील.
मी गपगुमान त्यांच्या मागे जायला लागलो.पण माझी वाट बघणारे एक मित्रवर्य काही दम धरेनात.. पुन्हा फोन वाजला.
"येतोय रे बाबा.. जरा एक missunderstanding झालंय काहीतरी. आलो निस्तरून."
तिकडून लगेच "आम्ही येऊ का?" ची विचारणा झाली."सध्यातरी नको" म्हणून मी फोन ठेवला..
"फोन उचलू नको हा आता.. बंद करून ठेव तो" इति इम्रान कोकनी!
"काय?" मी आश्चर्यचकित! तो परत काही बोलला नाही.

रस्ता क्रॉस करून एका अरुंद बोळात ते शिरायला लागल्यावर मी गोंधळलो.
"बॉस , कुठे चाललोय आपण? मला जायचं आहे. जास्त वेळ नाहीये माझ्याकडे"
दोघेही थांबून माझ्याकडे वळले. मुख्य रस्त्यापासून हे ठिकाण पन्नास एक मीटरच्या अंतरावर होतं.दोन बाजूला दुकानाच्या बिल्डिंग्ज. पैकी एक दुकान दुपारची वेळ असल्याने बंद! नक्की मराठी दुकानदार असावा!! कारण आजूबाजूची दुकानं चालू होती असं येता येता माझ्या नजरेला पडलं होतं. मी बंद दुकानाची पाटी वाचली.. 'लकी फर्निचर मार्ट-प्रोप्रा. अशोक पवार' वाटलंच! तर थोडक्यात त्यावेळी तरी ती सुनसान जागा होती. उगाच थांबवलं यांना अस मला वाटून गेलं.
'जरा वस्तीच्या ठिकाणी गेलो असतो तर बर झालं असतं.' माझं मन मला सूचना देत होतं..
"सुन.. तेरेको जल्दी है तो तू इधरीच रुक. तेरा फोन दिखाके आता मै.."
'साल्या ह्या लोकांच्या भाषेत क्रियापदं नसतात कि काय?' मी गुपचूप उभा राहिलो.
"उसका कोनसा फोन बोला रे?" कोकण्याचा त्याच्या सहका-याला प्रश्न..
"एन सेवंटी" तत्पर सहकारी उत्तरला.
'सुटलो तिच्यामायला...' मी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला..
"माझा नाहीये तो.." मी माझा फोन काढून त्याच्यासमोर नाचवत म्हटलं.
"दे इकडे.. मै दिखाके आता.."
"असा कसा देऊ? तुम लोग लेके गये और वापीस नही आये तो?"
माझ्या या प्रश्नाने कोकणी जरासा गांगरला पण सावरून त्याने आपला फोन बाहेर काढला. नोकियाने कच-यासारखी मॉडेल्स लॉंन्च केल्यामुळे तो नेमका कोणता फोन होता याचा मला अंदाज आला नाही.
"ठीक हे? ए खालिद तू पन दे रे तुजा फोन"
'खालिद नाव काय या प्राण्याचं ?' इम्रान भायची ऑर्डर आल्यावर त्याने आपला पण फोन दिला.
दोन्ही फोन्स माझ्या हातात टेकवून त्यानं विचारलं..
"इस्से तो मेहंगा नही ना तेरा फोन?"
खरं तर असावा पण या प्रश्नामागच्या भावना 'आमचे फोन तुझ्या हातात असताना आम्ही तुला ठकवून कुठे जाणार नाही' अश्या असाव्या म्हणून मी नकारार्थी मान हलवली.
"ये खालिद रुकेगा इधरीच. मै जाके आता.. यूँ गया और यूँ आया.."

इम्रान कोकणी शेजारच्याच बिल्डिंगच्या मागे गेला.. काही क्षण शांततेत गेले. आता या खालीदमियांशी काय बोलणार?
"किधर गये वो भाईसाब?" मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.
"सलीमभाई के घरपे. उन्को दिखाके आयेंगे तुमारा मोबाईल. उनकी भेन घरपेही रहेगी. वो पेचान लेगी"
'आयचा घो याच्या!! नुसता बोलला तरी शिव्या घालतोय कि काय असं वाटतं!'
"पर वो एन सेवंटी था ना. माझा तो नाहीये. कितना दूर है उनका घर?"
"पासहीच है. तेरा फोन नही भी रहेगा तो भी वो ना बोलना मंगती!!"
आता काय करायचं? शांतता भंग करणं कठीण जाऊ लागलं.. टिपिकल रापलेला चेहरा, रंगवलेले केस, गळ्यात कसल्या कसल्या साखळ्या स्टील,अल्युमिनियम वगैरेच्या असाव्यात.. रस्त्यावर विकत मिळतात
तसल्याच.. झोपडपट्टीला साजेशी पर्सन्यालिटी!

'यांचा काही प्लान तर नसावा? फोन घेऊन पळून जायचा? नाहीतरी हे हातात दिलेले फोन त्यांचेच आहेत कशावरून? हे कलटी देतील नि आपण लटकायचो . मागे एकदा मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा मला आठवू लागला. तो रस्त्याने चालत असताना दोन हेल्मेटधारी बाईकर्स त्याच्या शेजारी आले आणि त्याला म्हणाले कि त्यांना एक अर्जंट फोन करायचा आहे पण त्यांच्या फोन ची battery संपली आहे. त्याने औदार्य दाखवून नंबर विचारला डायल करण्यासाठी तर ते लोक म्हणाले कि 'माझ्या कॉल साठी तुम्ही तुमचे पैसे वाया घालवू नका. माझ सीम कार्ड तुमच्या फोन मध्ये घालून मी कॉल करतो..' माझा मित्र बिचारा भोळा.. मदत करण्यासाठी त्याने आपलं सीमकार्ड काढून फोन त्यांच्या हातात दिला..आणि त्या दोघांनी त्याच्या डोळ्यासमोर त्याचा फोन घेऊन पोबारा केला!! असलं काहीतरी आत्ता झालं तर? नाही. यांच्याशी सबुरीने वागून फायदा नाही'

मी काही बोलणार एवढ्यात 'इम्रानभाय' परतला.. माझ्या फोनसकट! मी सुस्कारा सोडला.
"ये फोन नही है बोलती वो"
'सुटलो बुवा' त्यांचे फोन देऊन मी माझा फोन परत घेत आणि चेक करत मी विचारलं "मग मी जाऊ का?" सुदैवाने फोन वनपीस आणि ऑपरेशनल होता.
"रुक.. वो फोन ये नही बोला उसने. आदमी नही.. फोन काय कोनपन बदलू शकतं"
"....."
"उसके हात मे अंगुठी है बोला और गले मे गनपतीका पेंडल है ऐसा बोला उसने.."
एव्हाना मला काहीतरी गडबड असल्याचा वास येऊ लागला होता.. सगळ्या खुणा माझ्या "दागिन्यांच्या" रिलेटेडच कशा काय?
"मेरा तो थंब रिंग है. अंगुठी नही."
त्याने सरळ माझ्या गळयाजवळ हात नेऊन चेन चाचपायला सुरुवात केली. मी मागे सरकलो.
"क्या कर रहे हो? उसमे कोई पेंडन्ट नही है.."
चैनमधला गणपती बोटात धरून दाखवत तो म्हणाला "नही है?तो ये क्या है? XXX समझा क्या मेरे को?"
"वो लॉकेट है. पेंडन्ट नही! " मी सांगितलं
" वो मेरेको पता नहीं. जो भी है ..ये उनको दिखाना पडेगा .."
"मैं आके उनको दिखता हूँ.."
"मस्जिद है उधर. समझा ना? मस्जिद! मस्जिद में सोने के जेवर अलाउड नहीं रहते.. और उधर अपने बच्चे भी है. खालीपीली झगडा हो जायेगा. निकालके दे दे.. में दिखाके लाता हूँ"
"निकालके कैसे दे दूँ? जिनको दिखाना है उनको यहाँ लेके आओ.." काहीतरी मोठा लोचा होता खरा..
"क्या रे..? तेरे से सीधा बात किया तो तुम हमको आडा ही लेने लगा.. बोला ना तेरेको? निकालके दे दे.. चल अंगूठी निकाल.. ”
मी टरकलो.. तरी पण अवसान राखून मी बोललो.. "ये बात नाही है.. लेकिन ऐसे कैसे दे दूँ? वैसे भी वो निकलती नहीं.."
"अरे? उंगली में डाल सकता है तो निकाल नहीं सकता?"
"ना.. निकाल के देखो चाहिए तो..बचपन में पहेनी थी.." विशिष्ट पद्धतीने काढल्याशिवाय ती थम्ब रिंग निघत नाही हे मला माहित होतं.त्यामुळे मी माझा अंगठा त्याच्यासमोर केला ..त्याने जराशी झटापट करून पाहिली पण माझ्या थम्ब रिंगने जाम दाद लागू दिली नाही!

खालिद कडे बघत त्याने माघार घेतली.
'हुश्श.. वाचवली बुवा' आमचे मनाचे श्लोक! "मैने बोला था.. वो नही निकलती"
"हां.. ठीके ठीके.. ज्यादा बात मत कर..चेन निकाल फिर.."
"क्काय?" साला आगीतून सुटून फोफाट्यात पडलो होतो मी!
"सिधेसे निकाल के देता या मै निकालू?" त्याने डायरेक्ट गळ्याच्या चेनलाच हात घातला!!
मी मनात म्हटलं गंडलो आता.. मी चटकन त्याचा हात धरला आणि चेन त्याच्या हातातून सोडवून घेतली. त्याला हा प्रतिकार अनपेक्षित असावा.
"समझता नही क्या तेरेको? क्या रे खालिद? समझाने का क्या अपने तरीकेसे?"
"सुनता नही तो समझाना हि पडेगा!" खालिदने री ओढली..
कोणाला धमकावायचं असेल तर बम्बय्या हिंदीसारखी भाषा नसावी. काय लहेजा आहे...वा! पण ही भाषेचं कौतुक करायची वेळ नव्हती.
त्या दोघांनी येऊन माझ्या गळ्याशी झटापट सुरु केल्यावर मला चेन काढून द्यावीच लागली नाहीतर त्यांनी ती तोडून काढली असती..

'सर सलामत तो पगड़ी पचास' असंच म्हणतात ना आपल्या जिवावर बेतत असेल तर? आणि काय प्रसंग गुदरला होता! माझी सोन्याची चेन त्यांच्या हातात आणि ती सुद्धा मीच काढून दिलेली! तेवढ्यात माझा फोन खणखणला. मला कुणाच्यातरी आधाराची गरज होती. मी उचलणार इतक्यात…
"तेरेको बंद करनेको बोला था ना? दिमाग में घुसती नही क्या तेरे बात..?" इम्रान गरजला..
मी घाबरून फोन कट केला..
"रहेता किधर है तू ?"
मी क्षणभर विचार केला आणि बोललो "इधर ही..बांगुरनगर मे. 'सरगम' बिल्डींग मे"
मी बिनदिक्कत खोटं बोलायला सुरुवात केली! काकांच्या बिल्डिंगचं नाव मी सांगून टाकलं. इथलाच माणूस आहे म्हटल्यावर कदाचित यांचा विचार बदलेल असा माझा होरा होता.
"क्या? इधर का ही है क्या तू? तो दिखता कैसे नही? तुम्हे घुमते हुये तो कभी नही देखा हम लोगोने" साल्यांनी माझ्यावर वॉच ठेवून सापळा रचला होता तर!!
"हालही मे आया हूँ इधर" माझी पण कमाल आहे! खोटं तेपण एकदम सुसंगत!!!
"तो पहले किधर रहता था?"
"वेस्ट में.. आरे कॉलोनी में.." ए.. दे धमाल.. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी स्वतः वरच खुश झालो.
"तो इधर कब आया..?" प्रश्नावली काही संपायचं नाव घेत नव्हती.
"पिछले सन्डे को ही शिफ्ट हुए हम लोग..हफ्तेभर ऑफिस में रहूँगा तो बाहर कैसे दिखूंगा?" वा! काय लॉजिक सुचलं!!

त्यांनी आपापसात काहीतरी डिस्कशन सुरु केलं.. एकदम खालच्या आवाजात..आणि त्यानंतर इम्रान बोलता झाला.
"चल.. तू इधर ही रुक.. चेन भाई को दिखाके वापिस दे देता.."
"मैं आता हूँ आपके साथ..इतनी मेहेंगी चीज आपके हात में देके मै इधर रुक नाही सकता" मी कासावीस झालो होतो..
"साला.. XXXX तेरेको सौ बार समझाया फिर भी वही बात..बोला ना मस्जिद में जेवर अलाउड नहीं है..." खालिदकडे वळत तो म्हणाला.."ये ऐसे नहीं मानेगा.क्या बोलता खालिद ?"
खालिद ने ज्या पद्धतीने मान हलवली ती सहमतीची खूण असावी कारण इम्रान पुढे सरसावला..मी दोन पावलं मागे हटलो.. अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. परिस्थिती चिघळत चालली होती.
"तेरेको इतना मारेंगे ना.. हात पाँव तोडके रख देंगे. घरपे चलके जानेके काबील नहीं रहेगा.."
माझ्या शरीराला घाम फुटू लागला होता.भीतीनं हातपाय थरथरू लागले. मी काही बॉलीवूड किंवा दाक्षिणात्य सिनेमातला हिरो नव्हतो.. जर असतो तर नक्कीच बाह्या सरसावून,नुसते दोन गुद्दे लगावून दोघांना हवेत उंच उडवून दिलं असतं आणि तेदेखील आज्ञाधारक मुलासारखे हवेत गोल गोल फिरत किंवा उडत छतावर जाऊन कळवळत पडले असते!!
मला तर काय बोलावं सुधरेना.. घशाला कोरड पडली.. मी आवंढा गिळला..

तोपर्यंत मागं वळून ते दोघंही त्या बिल्डींगच्या मागे जाऊ लागले होते. मघाशी इम्रान कोकणी गेला त्याच. मी त्यांच्या मागे मागे जाऊ लागलो आणि पाहतो तर काय.. मागे मोकळी जागा. जराशी पुढे बैठी चाळ. बहुतेक तिथल्या लोकांना कुठल्यातरी बिल्डरनं रीलोकेट केलं असावं, कारण सर्व दारं बंद होती! थोड्या वेळापूर्वी इम्रान कोकण्या फोन दाखवून जेवढ्या वेळात मागे परतला होता त्यावेळात तो त्या मोकळ्या मैदानातून धावत जाऊन त्या बैठ्या घरापर्यंत पोचणंदेखील मुश्कील होतं. सलीम भाईला भेटणं तर लांबच! म्हणजे फसवणूक...निव्वळ फसवणूक चालू होती तर!! मघाशी याचा अंदाज होता; आता तर कन्फर्म झालं! धमक्या आणि दादागिरी माझी चेन लांबवण्यासाठी होती. माझ्या मनावर फसवणूकीच दुःख दाटत चाललं. अंगातला क्षत्रिय-मराठा जागा झाला!

मला कोणीतरी लुटलं आणि ते सुद्धा ते निशःस्त्र असताना? नुसत्या धमक्यांच्या जोरावर? आणि तू साधा विरोध नाही करू शकलास? 'सर सलामत तो पगड़ी पचास' असं म्हणतात ते आपल्या जिवावर बेतत असताना नव्हे तर स्वतःचा पराभव लपवत असताना!
मला अचानक साक्षात्कार झाला. 
मारलं तर मारलं...गुपचूप स्वतःची वस्तू देऊन टाकण्यापेक्षा खाऊ थोडा मार! हातपाय मोडतील म्हणतात ना? माझे पण हात काय केळी खायला नाही गेलेले! दोघांपैकी एकाला तर लोळवेनच.. जरी नाही लोळवला तर त्यांच्या लक्षात तर येईल कि इतक्या सहजासहजी मिळत नाहीत गोष्टी! हातपाय मोडले तर सरळ करायला येणारा खर्च हा चेनच्या किमतीच्या निम्मा सुद्धा नसेल! लढलो तर साला पश्चाताप तरी होणार नाही. प्रतिकार केल्याचं समाधान तरी लाभेल.. कोणीतरी येऊन तुला लुटतो आणि तू मुकाटपणे लुटू देतो.. माफ करशील का स्वतःला?' माझ्यातला स्वाभिमान जागृत झाला... 'हरहर महादेव.. जय भवानी जय शिवाजी ..' माझ्या मनातल्या श्लोकात या ओवीचीसुद्धा भर पडली!

"रुक" मी मागून पळत जाऊन हात इम्रानच्या खांद्यावर टाकला.
"क्या बे अभीतक पीछे पीछे आ रहा है? और सीधा कंधे पे हाथ? औकात भूल गया क्या?" रस्त्यावरचा छपरी मनुष्य माझी लायकी काढत होता!
"देखो भाई..आप मेरा चेन वापस दे दो.."
"तेरेको बताया ना.. सलीमभाई..."
"जो भी भाई हो मै खुद जा के दिखा दुंगा.. मुझे रास्ता दिखा दो.. "
इम्रान कोकणी खालिदकडे बघत हसला.. "साले वो उधर फेंक दुंगा तेरा चेन फिर ढूंढते बैठेगा.." लांबवर बोट करत तो बोलला..
"मेरा चेन वापिस कर दो" मी पुन्हा अवसान आणत बोललो.
"हिम्मत है तो लेके जा" हात पसरवत कोकण्याने challenge केलं.
मी सरळ जाऊन चेन उचलली आणि मुठीत घेतली. त्याने माझा हात धरला मी जोराचा हिसडा मारून तो सोडवून घेतला. मघासपासूनच्या युद्धातला पहिला विजय! मी मनोमन खुश झालो!
"अपने लड्कोंको बुला रे.. साल्याला राडा व्ह्यायला पायजे वाटतं इथे.."  इम्रानने खालिदला म्हटलं
लगेच फोन बाहेर काढून मी एका मित्राचा नंबर डायल करत म्हटलं "बोलावच!! राडा तर राडा.. वन टू वन होऊन जाऊ देत काय ते.. पण अशी तशी चेन द्यायचो नाही मी..समजलं?"
'ऑल द रुट्स टू धिस लाईन आर बिझी' फोनवरची बाई मंजुळ आवाजात मला सांगू लागली... मी चेह-यावरचे भाव अजिबात बदलू न देता बोललो "अरे..मी इकडे अडकलोय.. कोण आहेत माहित नाहीये.. अशोक पवारच्या फर्निचर च्या दुकानाच्या शेजारच्या गल्लीतून आत ये.. लकी फर्निचर मार्ट आणि हो जमलेल्या सगळ्या पोरांना घेऊन ये. कितीजण आहेत? मग आठजणच या! बाकीच्यांना थांबू देत तिकडेच."
माझा उभा जन्म मारामाऱ्या करण्यात गेला असल्याच्या आविर्भावात मी तावातावाने बोलत होतो.. आणि फोनवरची प्रीरेकोर्डेड मंजुळाबाई हिंदीतली सूचना पूर्ण करून मराठीत बोलत होती .."या मार्गावरील सर्व लाईन्स व्यस्त आहेत.. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.."वगैरे वगैरे..! मी फोन ठेवला.. "बुलाया क्या तुम्हारे बंदोको?' गुर्मीत मी विचारलं..

मी दिलेलं ओपन challenge आणि माझा बदललेला आवेश बघताच त्यांचा नूर पालटला.. खालिद तर गुपचूप सटकायच्याच मार्गावर होता.. इम्रान कोकणीने मात्र दम द्यायचा सोडलं नाही..
"ए चल! निकल इधरसे!! सिधा वो पतली गली पकड़के इधरसे वटनेका अभी..और दुबारा इधर नजर आया ना तो याद रखना..समझा ना?"
हातात अलगद पडलेलं सावज निसटून चालल्याचं दुःख मात्र त्याला चेह-यावरून लपवता येत नव्हतं.. मी तोच आवेश ठेवून त्यांच्याकडे वळून बघत बघत, सावकाश चालत त्या गल्ली पर्यंत आलो. ते दिसेनासे होताच उसनं जमवलेलं अवसान आता क्षणार्धात गळून पडलं. चेन आणि फोन खिशात कोंबून मी सगळ्या शक्तीनिशी पळत सुटलो. न थांबता... अगदी इनॉर्बीट मॉल येईपर्यंत!!

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

फॉर्म १६ आणि अनामिका

फॉर्म १६ नुसार "सरल" भरून रिटर्न्स फाईल करणं हे नोकरदार वर्गाला नव्याने सांगायला नको. जुलै आला कि लोकांची धावपळ सुरु होते..
"आपल्या ओळखीचा आहे एक.. त्याने भरून दिला फुकट.."
"काय नाय रे.. सोप्पं असतं.. फॉर्म १६ बघायचा आणि कॉलम भरत जायचे..."
"तुझा इकडे नाय सबमिट होणार.. प्रभात रोड च्या ऑफिस ला जावं लागेल.. आपला झाला. माझा मित्र आहे त्याची वट आहे.त्याने परस्पर पाठवला.."
"ऑफिस मध्ये येतो ना तो अकौंटंट.. सोडायचे २०० रुपये.. डोक्याला ताप नाही.."
इत्यादी संवाद हमखास कानावर पडतातच..
नोकरीचं पहिलं वर्ष सरेपर्यंत आपला ह्या भानगडींशी काही संबंध नसतो.  अचानक आलेल्या या गोष्टी दुर्बोध वाटायला लागतात आणि त्यामुळेच ‘ती’ माझ्या आयुष्यात आली.
तसं बघायला गेलं तर अपघातानेच आणि खरंतर "इन्कमट्याक्स" वाल्यांच्या कृपेने!

"रिटर्न्स फाईल करने थे ना.. त्याच्यामुळे उशीर झाला" तिची ही मिश्र भाषा ऐकून पहिल्यांदा मी तिच्याकडे पाहिलं. कॉन्फीडन्ट चेहरा, सावळी त्वचा,लक्षवेधक बांधा, ओव्हरऑल आकर्षक बाह्यरूप आणि कंपोज्ड व्यक्तिमत्व असं तिचं थोडक्यात वर्णन! 'तिलक' (अर्थात सदाशिवेतल प्रसिद्ध नाश्ता सेंटर, उच्चारी टिळक!) वर ती फोनवर कोणाशीतरी बोलत होती. 'रिटर्न्स', 'फाईल' वगैरे शब्द कानावर पडल्यावर मी वड़ापाव खाता खाता जरा सावध झालो.
"हाय! तू रिटर्न फाईल करतेस का? माझेपण करायचेत" मी तिरमिरित जाऊन बोललो.. माणूस परिस्थितीने गांजलेला असला कि इतर कसला उदाहरणार्थ लाज,लज्जा,भावना यांचा विचार करत नाही. मीपण त्यातलाच!!
माझ्या कडे विचित्र नजरेने पाहत ती जरा बाजूला झाली..
"सॉरी..पहचान न होने पर भी बात कर रहां हूँ  पर मुझेभी आय टी रिटर्न्स भरने थे.. आप कि फीस बता दिजीयेगा..लेकीन मुझे करवाने ही है.." मी भानावर येत आजुबाजुला पाहत विचारलं. न जाणो हिच्या आजुबाजुला एखादा सांड चहा आणायला गेलेला असायचा आणि त्याचा गैरसमज व्हायचा!
"कर दुंगी ना..बट आय चार्ज १०० रुपीज पर फॉर्म!" ती म्हणाली.
"अम्म्म... मेरे औरभी कलीग्ज है .उनके भी करने थे.." ती एकटीच आहे याचा एव्हाना मला अंदाज आला होता त्यामुळे मघाशी एकवटलेलं धैर्य वापरून मी पुन्हा तोंड उघडलं.
"ठीकाय, करते मी. पाचसहा असतील तर आय वोन्ट चार्ज फॉर यू ..आय मीन योर्स विल बी फ्री ऑफ कॉस्ट " डायरेक्ट बिझनेस ऑफर? तीपण मराठीत? मीपण चाट पडलो!
"तुला मराठी येतं?"
"मराठीच आहे अरे मी.. कामानिमित्त हिंदी इंग्लिश बोलावं लागतं.."
"कुठे काम करतेस?"
"राठी and असोसीएट्स"
"आणि तुझं नाव ?"
"अरे,किती प्रश्न विचारशील? सांस भी लेने दोगे या नही?"
आमची पहिली ओळख ही अशी.. नाव विचारलं ते मोबाईल नंबर एक्स्चेंज करतानाच.

त्यानंतर या ना त्या निमित्ताने तिचा contact होतच राहिला आणि मग तो तसा होणं हा दिवसाचा अविभाज्य भाग बनला.
"फक्त काम असतानाच फोन नाही करत मी.." अस मला म्हणून बोलायला सुरुवात करायची ही तिची सवय! पण "तुझ्याकडे कुठला नवीन पिक्चर आहे का?" अश्या विचारणेपासून "मला तुझा पेन ड्राईव्ह हवा आहे रे... दोन चार दिन के लिये" अशा अधिकारवाणीच्या बोलण्यापर्यंतचा तिचा प्रवास अगदी एखाद्या महिन्यातच झाला.. एखादी मैत्रीण आपल्या मैत्रिणीसाठी जे काही करू शकते ते सर्व आपल्या मित्रासाठी करू शकते का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी देण्याइतकी जाणीव तिने करून दिली.

"अरे बच्चा.. तुझी टोटल इन्व्हेस्टमेंट आणि बाकीचं कॅल्क्युलेशन बघता तुझे फक्त ६००५ रुपये ईअर्ली taxable आहेत, उतना ही कर इन्व्हेस्ट" म्हणून तिने माझा एलआयसी चा कमीत कमी प्रीमिअम किती असावा हा मला बरेच दिवसांपासून पडलेला प्रश्न चुटकीसरशी सोडवून दिला होता. (आणि जेव्हा नंतर tax कॅल्क्युलेशन ची शीट आली तेव्हा तो आकडा अचूक होता यावर शिक्कामोर्तब ही झाल!) ती बी कॉम करत होती आणि जॉबही. पण सांभाळायची दोन्ही! अर्थात कॉलेज ला दांडी मारणं जास्त फ्रीक्वेंट असायचं.
"मला आवडतं हे tax वगैरेचं काम करायला. यू गेट टू अप्लाय योर नॉलेज इन लाईफ एन यू अर्न मनी अल्सो!" ती जस्टीफीकेशन द्यायची. मला खरतर कशावरही ऑब्जेक्शन नव्हतं आणि का असावं? माझा देखील फायदाच होत होता त्यात. तिने माझा विनाकारण कट झालेला tax मिळवून दिला होता, माझं जराजीर्ण झालेलं pancard रिन्यू करून दिलं होतं आणि बरंच काही!

"हलो"
"हाय बच्चा!"  कायपण नाव ठेवलं होतं माझं! बच्चा!
"काय करतेयस गं?"
"कुछ नही..लंच के बाद सोयी थी..अभी नींद खुल गयी थोडी देर पहले.. तू बता.."
"रिसेप्शन ला चाललो होतो कात्रज च्या जैन मंदिरात.... एका मित्राचं लग्न झालंय. तुमच्यातलाच आहे...मारवाडी. येणारेस?" मी आपलं विचारायचं म्हणून विचारलं..
"ए मी मारवाडी नाहीये हां.. जैन आहे. आणि तो पण जैनच असणार.. आणि तू मला न्यायला येशील?"
मी अवाक! "म्हणजे तू येणारेस?"
"येते ना.. आय लाईक सच फंक्शंस .."
मी गुपचूप तिला आणायला गेलो.. ही बया सजून धजून तयार!!
"अग ए.. लग्न माझ्या मित्राचं झालंय!! तुझं नाही.."
" जैन आहे म्हणालास ना? तिथे असचं जाव लागतं. and व्हॉट इज धिस?.. जीन्स? यू गॉन mad ऑs व्हॉट? चेंज कर पहिलं.."
" ए तू नको येऊ हव तर पण मी असाच जाणार आहे"
"गपचूप बाईक ने तुझ्या flat कडे आणि चेंज करून ये. मी खाली वाट बघते."
इलाज नव्हता! स्वतःच्या पायावर मी कु-हाड मारून घेतली होती!!
...रिसेप्शन नंतर मित्राने स्वतः फोन करून मी नक्की लग्न वगैरे केलं नाहीये ना त्याची खातरजमा करून घेतली!!

ती माझी tax कन्सलटन्ट झाली,इन्व्हेस्टमेंट advisor झाली,माझी fashion डिझायनर झाली, मी गाडीमुळे प्रॉब्लेममध्ये असताना माझी ड्रायव्हर सुद्धा झाली.. "मैत्री" हा शब्द अपुरा वाटायचा आमच्या नात्याला. तिला बॉयफ्रेंडही होता. अगदी प्रेमळ -म्हणजे तिच्यासाठी! माझ्याशी पण बोलायचा तिच्या फोनवरून. मी त्याला निरुपद्रवी वाटत असेन कदाचित! आम्ही कित्येकदा भेटायचं ठरवलंही होतं पण तो योग जुळून आला नाही. आमचा संपर्क असायचा तो तिच्याच थ्रू. त्याला अगदी बित्तंबातमी असायची; कुठे काय खरेदी केली इथून कोणता पिक्चर पाहिला आणि तो कसा आहे  इथपर्यंत. "सगळं सांगते मी त्याला.. आयेम गोन्ना बी हिज बेट्ट हाफ" हे वरून!! पण नंतर मला त्याची सवय झाली होती. मीही तिच्या जीवनात काही भूमिका निभावल्या पण त्या तेवढ्याश्या कृशुअल नव्हत्या. तिचं सगळं व्याख्यान ऐकून घ्यायचं. सल्ले द्यायचे, तिची गुपितं ऐकून ती विसरून जायची," मिटवलंच पाहिजे नाहीतर ही ब्याद माझ्या गळ्यात पडायची" असं जाहीर करून बॉयफ्रेंडशी भांडण झालं की मिटवायचं.अमका कसा हिच्याशी फ्लर्ट करतो, तमकी कशी हिच्याबद्दल जेलस फील करते वगैरे तिच्या न पाहिलेल्या इतर मित्र-मैत्रिणीविषयीच्या कागाळ्या ऐकायच्या इत्यादी इत्यादी.

कमला नेहरू पार्क हे तिचं आवडतं ठिकाण. कॉलेज, ऑफिस आणि हॉस्टेल यापैकी कुठे ती नसेल तर मोस्ट ऑफ द टाईम्स ती तिथे असायची.
"के एन पी पे हूँ.. आ रहा है क्या चाय पिलाने??" तिचा फोन यायचा.
मुलीने दिलेलं आमंत्रण कोणी टाळतं का? "आलोच.." हे माझं उत्तर असायचं आणि कृतीही! उभ्या उभ्या तिथला बासुंदीयुक्त मसाला चहा पीत मी तिच्या गोष्टी ऐकत राहायचो आणि तिला उगीच सल्ले देणं, तिच्या बोलण्याला उगीचच response देणं वगैरे गोष्टी करायचो. कमला नेहरू पार्क ला गेल्यावर आपल्या बरोबर असणा-याच मुलीकडे सोडून इतरत्र नजर न वळवणा-या मुलाने फार फार कठोर तपश्चर्या वगैरे केलेली असली पाहिजे असं माझं (वैयक्तिक असलं तरी) ठाम मत आहे!! तिच्या हे लक्षात यायला फार वेळ लागायचा नाही.हातावर चापटी बसली की ग्लास हिंदकळायचा.
"थांब गं!चहा सांडेल ना!!"
"लक्ष कुठेय तुझं ?"
"तुझ्याकडेच आहे.. काय म्हणालीस ते सांगू का ?"
"कान असतात माझ्या बोलण्याकडे.. डोळे कुठे भिरभिरतायत ते विचारत्येय.."
मी लाचार हास्य चेह - यावर आणायचो.. दुसरं काय करणार??
"आटप पटकन,या दत्त मंदिरात जाऊन येऊ.. चांगले विचार तरी येतील तुझ्या मनात!" तिचं हे भाबडं मत होतं आणि "सब लडके एक जैसे होते है" हे पालुपद! मी तिच्यामते कोणतही "गैरकृत्य" केलं उदाहरणार्थ मुलींकडे पाहणे,त्यांच्या सौंदर्याची तारीफ करणे, एखादी कमेंट (अर्थात त्या मुलीला ऐकू जाणार नाही अशा बेताने! कारण तेवढ आमच धैर्य कुठल?!) करणे वगैरे वगैरे कि हे पालुपद ती आळवायची. "चूप कर.. हे भगवान.. सब लडके एक जैसे होते है!" इत्यादी इत्यादी. आता जिथे इंद्र,मदन हे देव आमच्या "भगवान" लोकांमध्ये येतात तिथे 'भगवान'कडे तक्रार करून भागणार नाही हे या जैन मुलीला कोण समजावणार ? मी आपला तिच्या समाधानासाठी शेजारच्या दत्त मंदिरात जायचो..

माझ्या मित्रांच्या ग्रुपशी मी तिची कधी ओळख करून दिली नाही,ना तिने कधी आपल्या मैत्रिणींची इंट्रो करून दिली. तशी गरजही पडली नाही. त्यामुळे फ्रेन्डशिप डे ला वगैरे आमचे नेहमीच्या मित्रांसोबतचे कार्यक्रम आटपले की रात्री ९.३०/१० वाजता आम्ही भेटायचो. के एन पी च्या शेजारी किंवा करिष्मा गार्डन च्या इथे कॅड बी खाता खाता दिवसभरात काय केलं याचा हालहवाल एकमेकांना दिला घेतला जायचा.

ओळख जुनी होत गेली की 'अतिपरिचयात अवज्ञा' होते. 'टेकन as ग्रांटेड' अर्थात गृहीत धरलं जाणं होत जातं. यथावकाश आमचंही नातं जुनं होत गेलं. बारीकसारीक गोष्टींवरून खटके उडणे..वाद विवाद होणे या गोष्टी नवरा-बायकोत,बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड मध्येही होतच असतात.. आमच्या नात्याला तर नावच नव्हतं. तिथे तर हे होणं आलंच! शॉपिंग ला जायचं म्हटल्यावर एका पायावर तयार असणारी ती "कंटाळा आला" चं कारण पुढे करू लागली. "पिक करायला ये" म्हटल्यावर मीही "आज रिक्षा ने ये ना.. मी आताच चेंज केलंय"वगैरे सांगू लागलो. सदाशिव पेठ ते के एन पी हे अंतर मला अचानक लांब वाटू लागायचं तर रात्री ९.४५ म्हणजे तिला फार्र फार्र उशीर वाटू लागायचा. काही भांडण झालंच तर कोणा एखाद्याने माघार घेऊन समजावणीचा सूर आळवणे हे सुरुवातीसुरुवातीला व्हायचं पण त्यातली inconsistency वाढत गेली.. "मी का करू..?तुझी चूक आहे" वगैरे वगैरे

मग फायनली एका वर्षी पुन्हा फॉर्म १६ भरायची वेळ आली.तिला फोन करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी आणि माझ्या कलीग्ज चे फॉर्म्स तिला नेऊन दिले.
"पुढच्या आठवड्यात देते करून. पैसे तुझ्याचकडे ठेव. रिसीट्स दुंगी तब दे देना"
"ठीकाय, पण झाले की कळव हां नक्की! यावेळेला २० फॉर्म्स आहेत."
"हो रे.. कित्ती घाई?"
"नाही अगं. मला नाहीये.ज्यांनी दिलेत त्यांना आहे!"
"देते मग.."

आठवडा गेला.. २ आठवडे झाले.. तिचा काही रिप्लाय नाही.
"ए मुली.. कधी देणारेस?" माझा तिला कॉल!
"देते रे.. झालंच आहे.. फक्त आय टी ऑफिस ला सबमिट करायचे आहेत.दो मिनट का काम है.. करेगा क्या? "
"नको बुवा.. कर तूच..!"

होता होता महिना लोटला.. फॉर्म दिलेल्यांनी तगादा लावला..
"काय? करणार आहे ना काम नक्की तुझी ती 'मैत्रीण'? ख्या ख्या ख्या"
"आमचे व्हिसा रिजेक्ट होतील हां तिच्या नादात"
"अरे हे काम आधी कर, बाकीची नंतर"
" माझा फॉर्म परत दे.. मी दुसरीकडून घेतो करून.."
"तुझ कमिशन किती यात? ही ही ही..." अश्या कमेंट्स ऐकल्यावर माझंही डोकं गरम व्हायला लागलं.

"नाही नाही ते ऐकून घ्यावं लागतं तुझ्यामुळे. कधी देणार आहेस ?" माझा पुन्हा कॉल..
"अरे फक्त सबमिटच करायचे आहेत आय टी ऑफिस ला. मला पण वेळ नाहीये. आणून देते. कर तू.."
"म्हणजे काय? पैसे घेतेस ना वाजवून प्रत्येक फॉर्म मागे की उपकार खात्यात करून घेतोय.... फुकट मध्ये? महिना झाला तरी 'सबमिटच करायचेत..सबमिटच करायचेत..' " मी तिला वेडावत म्हणालो..
"हे बघ मला वेळ नाही.." तिचा आवाज हळू हळू चढायला लागला होता.
"महिनाभर वाया घालवून आता सांगत्येस तुला वेळ नाही? याचा अर्थ हाच ना की तुला गरज नाहीये आता आणि तुला... " मी पट्टी तिच्यापेक्षा वर नेली.
"तुला काढायचा तो अर्थ काढ.. आएम नॉट योर मेड टू लिसन योर ऑर्डर्स .. वन मोर थिंग..."
मी फोन कट केला .. मला त्या वन मोर थिंग मध्ये अजिबात स्वारस्य नव्हत.. माझी कामं आता ऑर्डर्स वाटायला लागली काय हिला? गेली उडत!

आठवड्याभरात माझ्या नावाचं कुरियर ऑफिसच्या पत्त्यावर आलं. सगळ्यांचे 'सरळ' भरलेले 'सरळ' फॉर्म होते त्यात.. माझ्याव्यतिरिक्त!! माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. चेह-यावर पाण्याचा हबकारा मारून मी शांत झालो. इतरांचा पाहून मी माझाही फॉर्म भरला. आय टी ऑफिस ला सबमिट करायला त्यांच्यातलाच एक 'गरजू' गेला. त्याचा व्हिसा इंटरव्यू होता २ दिवसांनी! काय करतो बिचारा! तो पावत्या घेऊन आल्यावर मी त्याला काय काय केलं ते विचारलं. "काहीच नाही' हे त्याच उत्तर ऐकून मी मनातल्या मनात पुन्हा तिला आणि मग स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहिली.

त्यानंतर तिचा संग सुटला तो कायमचाच. नंतर तिची खबरबातही राहिली/मिळाली नाही, मीही पेठेतून दुसरीकडे राहायला गेलो. एकही कॉमन फ्रेंड नसल्यामुळे संपर्क पूर्णपणे तुटला.

फॉर्म १६ मुळे सुरु झालेलं नातं फॉर्म १६ मुळेच संपलं!! पण आजही जेव्हा आय टी रिटर्न्स फाईल करायची वेळ येते तेव्हा तिची राहून राहून आठवण येते आणि वाटतं एखाद्या संध्याकाळी तिचा मेसेज येईल .." गुड इविनिंग बच्चा... मै के एन पी पे हूँ.. कॅन वी मीट? व्हॉट इज योर डीनर का प्लान?"