मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

मृत्यू असावा तर असा!!

आयुष्यात ब-याच व्यक्ती पाहिल्या..काहींची चरित्रं वाचली.. वर्णनं ऐकली..काहींवर बनलेले सिनेमे पाहिले, सिरीयल्स बघितल्या.. सगळ्यांमधून एकाच संदेश मिळाला. 'जीवन असावं तर असं!' पण परवा पहिल्यांदा असं  वाटलं कि 'मृत्यू असावा तर असा!!'
वीस हजारांचं पोलीस दल, तीन स्पेशल आर सी एफ च्या तुकड्या , वीस एक लाखांचा जनसमुदाय..आणि सार्वजनिक जीवनाला स्वयंघोषित पॉज! इतक्या लोकांना दुखावून एखाद्याला घेऊन जाताना यमानेही दोन क्षण विचार केला असेल.

राजकारण या शब्दाची उकल व्हायला लागण्याच माझं वय होतं तेव्हा या माणसाच्या नावाचा दबदबा होता. नव्हे.. चुकलो! दरारा होता... सेना म्हणजे हाणामारी, कापाकापी, सेना म्हणजे तोडफोड,हातापाई आणि हो मुख्य म्हणजे सेना म्हणजे शिव-सेना असाच सरळ हिशोब होता. त्यामुळे शिवसैनिक (आणि कोकणात सिवसैनिक !!) म्हटला कि कुतूहलापेक्षा भीती जास्त वाटत असे..

मग जशी अक्कल यायला लागली , पेपर पहिल्या पानापासून वाचता येऊ लागले तेव्हा कळलं कि सैनिक करतात ते 'रिमोट कंट्रोल' ने दिलेल्या आदेशावरून.. आणि हेही कळलं कि एका माणसाच्या हाकेवर तमाम महाराष्ट्र उभा राहतो तो असाच नव्हे काही. काहीतरी जादू आहे .. हृदयाला हात घालणारे शब्द आहेत.. मनाला साद घालणारी शैली आहे. विरोधकही नावापुढे 'साहेब' हा शब्द जोडतात म्हणजे काहीतरी आहे..

अशाच एका काळात सच्च्या 'सिव'सैनिकाच्या घरावर हल्ला झाला होता.. एका खुनाला चिथावणी दिल्याच्या संशयावरून. हल्लेकरी विरोधी पक्षातले होते..हल्ल्यानंतर प्रत्यक्ष दर्शींनी सांगितलं कि संपूर्ण घरात तोडफोड करण्यात आली होती.. घरात दोनच गोष्टी सुखरूप राहिल्या होत्या . एक शिवाजी राजांची तसबीर आणि दुसरी साहेबांची!

काळ  पुढे सरकला तसं कळलं कि शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणा-याच्या मनातही या माणसाबद्दल अढी नाही. असला तर तो फक्त आदर! किंबहुना प्रत्येकाचे शिवसेना सोडण्याचे कारणही कधीच शिवसेनाप्रमुख हे नव्हतं. देवस्वरूप मानलं सगळ्यांनी त्यांना.

टीव्ही मधल्या चर्चासत्रातली एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे अंत्ययात्रेसाठी आलेल्या लाखोच्या जनसागराला ना त्यांनी नगरसेवक बनवलं होतं , ना आमदार, ना खासदार..  हे लोक होते ज्यांना त्यांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. प्रत्यक्ष ओळख नसताना त्यांच्यासाठी ढसाढसा रडणारे लोक पहिले तेव्हा त्यांना ' हिंदूहृदयसम्राट' कशासाठी म्हणत त्याच उत्तरही मिळालं!

मराठीपणाचा धोशा लावताना हिंदी आणि इंग्रजीवरची त्यांची पकड तोंडात बोटं घालायला लावणारी होती. अस्खलित  इंग्रजी मध्ये दिलेल्या त्यांच्या मुलाखती ऐकल्या कि 'मराठी माणूस... मराठी माणूस...' चा जाप करणारी व्यक्ती ती हीच का असा प्रश्न पडत असे..मी त्यांचं तरुणपण पाहिलं नाही पण उतरत्या वयात देखील ऐन तारुण्यातल्या घटना ज्या डिटेल्स सहित ते सांगत ते पाहून त्यांच्या तल्लख स्मृतीचं आश्चर्यही वाटत असे.

भारतासारख्या देशातही जातीपलीकडे जाऊन राजकारण करता येतं हे तमाम राजकारण्यांना आणि जनतेला या व्यक्तीने पहिल्यांदा शिकवलं. अमुक एक समाजाचा नेता हे समीकरण त्यांच्या कारकिर्दीत कधीच दिसलं नाही. जो जिथे काम करतो त्याला तिथे संधी मिळणार तिकीट मिळणार असा सरळसोट आणि रास्त हिशोब दिसत असे.. त्यांची बरीचशी विधानं हि जनसामान्यांच्या मनातली होती आणि त्यामुळे आपलेपणाची वाटणारीही होती. असो..त्यांचा राजकारण,समाजकारण आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरंच काही छापून  येत आहे, येत राहील,आणि माझी समजही नसेल त्याबद्दल लिहिण्याची कदाचित....

तरीपण..

यापुढे जेव्हा जेव्हा  कोणी "माझ्या बंधुंनो , भगिनींनो आणि मातांनो " अशी साद देईल....
जेव्हा जेव्हा कोणाचा रुद्राक्षांच्या माळेत गुरफटलेला हात हवेत जाईल...
कमरेवर हात ठेवलेला आणि भगवी शाल पांघरून घेतलेला कोणताही पाठमोरा माणूस जेव्हा जेव्हा दिसेल... किंवा जेव्हा जेव्हा रिमोट-कंट्रोल ,शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट यापैकी एखादा शब्द कानावर पडेल तेव्हा तेव्हा मेंदूमध्ये ज्याची प्रतिमा तयार होईल ती व्यक्ती एकच असेल.. आणि ती ओळखायला कोणत्याही 'विशेषनामा'ची गरज पडणार नाही!!

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

द गोल्डन आईड लायन!!

'आम्ही' (आदरार्थी मी या अर्थी) 'वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर' या नावाने दाखवल्या जाणा-या चित्रपटांपैकी एक अतिप्रचंड टुकार रिमेक बघितला.. आणि हे लिहायचे सुचले. सदर टुकार हे विशेषण सिनेमा साठी नसून रिमेक साठी आहे हे लक्षात घ्यावे! नाव 'रावडी राठोर..' मूळ 'व्हर्जिनल' चित्रपट ज्यांनी पहिला असेल त्यांना हे पटेल.. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी लेखाचा पहिला प्याराग्राफ वगळून लेख वाचायला सुरुवात केली तरी हरकत नाही. अर्थात इथपर्यंत पोचायला तो वाचवा लागणारच पण असो..

लेखाचा मूळ मुद्दा मुव्ही नसून मुव्हीचा हिरो आहे .. पहिला नव्हे दुसरा नव्हे तर तिसरा हिरो. यापूर्वी दबंग स्टाईल मध्ये पदार्पण केलेला आणि उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळवलेला हिरो. यावर बरेच दिवस लिहावं लिहावं म्हणत होतो पण जमलं नाही.. हा सिनेमा पाहिल्यावर मात्र म्हटलं आता 'आळस सगळा झाडोनी' हे काम हातावेगळं केलंच पाहिजे नाहीतर प्रकरण हाताबाहेर जायचं. तर त्या हीरोचं नाव आहे....
सोनाक्षीबाई सिन्हा!! द गोल्डन आईड लायन!!
म्याडमची तथाकथित 'मादक' अदा !

हो हो.. बरोबरच लिहिलं आहे मी! सोनाक्षी सिन्हा या व्यक्तिमत्वाला 'हिरोईन' या क्याटेगरीत क्लासिफाय करायचं आमचं धाडस नाही बुवा! तिला एकतर हिरोतरी समजा नाहीतर बाईतरी!मुळात सोनाक्षी सिन्हा कोणत्याही चित्रपटात जो कोणता 'किरदार' करते त्यावेळी हिरोचं तिच्याबरोबर अफेअर आहे असं न वाटता एक्स्ट्राम्यारीटल अफेअर आहे असं आम्हाला वाटतं.

बाप इंडष्ट्री  मध्ये मोठा माणूस असेल तर कोण, कसं आणि काय होऊ शकतं याची जी मोजकी उदाहरणं आहेत त्यापैकी सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा हि मजबूत नावं! सोनाक्षी हे तर अंगापिंडाने
सुद्धा मजबूत असणारं उदाहरण!!

चेह-यावरची रेघ अथवा माशीसुद्धा (ज्यावेळी हलायला पाहिजे त्यावेळी) हलू  न देता ज्या मख्खपणे ही अभिनेत्री वावरते तिला जर उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळू शकतो तर आमचा तमाम सिनेसृष्टीला सवाल आहे कि याच न्यायाने आतापर्यंत एकदापण अजय देवगणला उत्कृष्ट नृत्याचा पुरस्कार का बरे मिळाला नाही? आणि डायलॉग काय तर म्हणे "थप्पड से डर नही लगता साब..प्यार से लगता है!" आम्ही तर पुढे जाऊन असे म्हणतो कि हिला डरायची काहीच जरुरी नाही, 'डर' त्याला वाटायला पाहिजे ज्याच्या प्रेमात ही पडेल..

एखाद्या अभिनेत्रीला आवश्यक असणारं, जरा बरं दिसण्याचं, सौजन्य तरी दाखवावं कि नाही या बयेनं (कि या बाईनं)? तर ते पण नाही. हां...आता रुंद भाल प्रदेश हे सौन्दर्याच लक्षण असतं असं म्हणतात. पण हे (अव)लक्षण तिच्याबाबतीत जरा जास्तच ठळकपणे उठून दिसतं. भुवयांच्या वरून तिची कपाळपट्टी सुरु तर होते पण अर्धं डोकं संपलं तरी पट्टी काही संपायचं नाव घेत नाही. फेसवॉश च्या किती ट्युब्ज ती महिन्याकाठी संपवत असेल याचा हिशेबच न ठेवलेला बरा..

तिचे बलदंड बाहू पाहिल्यानंतर तिचं रक्षण करायला कोण्या सलमान खान ची गरज का पडावी हा बाळबोध प्रश्न आम्हाला 'दबंग' हा सिनेमा पाहताना पडला होता.त्या चित्रपटात तर तिच्या पडद्यावरच्या एन्ट्रीलाच तिने विस्तीर्ण पाठ दाखवल्यानंतर या दृश्याला 'सेन्सॉर'वाल्यांना 'किळस' या क्याटेगरी अंतर्गत कात्री कशी लावावीशी वाटली नाही कोण जाणे!

'ओ माय गॉड' या सिनेमातला न पाहण्यासारखा कोणता भाग असेल तर ते 'गो गो गोविंदा' वालं गाणं. बिचा-या प्रभुदेवाला तिला नाच शिकवताना काय यातायात करावी लागली असेल ते (प्रभू) देवालाच ठाऊक. त्या बिचा-याने केलेले वेडेवाकडे अंगविक्षेप हिरो लोकांना सुद्धा नाकी नउ आणत असतात मग एखाद्या बाईला शिकवताना तर विचारूच नका! ज्या पद्धतीने गरीब पद्धतीचे कपडे (फाटलेली प्यांट आणि बटनं तुटलेला आणि गाठ मारून अंगावर घातलेला शर्ट ) घालून तिने प्रभू देवासारखं नाचल्याचा आव आणत जो उच्छाद मांडला आहे त्यावरून तर आम्हाला हा पिक्चर बघायची सुद्धा छाती होत नव्हती परंतु काही पेपरवाल्यांनी या सिनेमात ती फक्त एवढ्याच गाण्यापुरती आहे आणि सिनेमाशी तिचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा केल्यामुळे आम्ही हा सिनेमा पहायचं धाडस केलं.

"कमर या कमरा?" संभ्रमावस्थेतील राठोडसाहेब
रावडी राठोर (कि राठोड ) मध्ये "चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया" हे गाणं आम्ही सुरुवातीला 'पतली कमर पे' असं ऐकलं होतं. जेव्हा आम्ही ते पुन्हा ऐकलं तेव्हा गाण्यात उल्लेखिलेली ती 'कमर' नेहमीसारखी 'पतली' नसून  'चिकनी ' आहे हे आम्हाला कळलं. ज्यावेळी आम्ही ते गाणं आमच्या या या चक्षुंनी पाहिलं तेव्हा गीतकाराने मूळ (आणि सर्वत्र वापरली जाणारी ) 'पतली कमर' ही टर्म बदलून 'चिकनी कमर' का केलं असावं हे आम्हाला उमगलं आणि पटलं सुद्धा! कारण त्या कमरेचा साईड  व्ह्यू हा सामान्य कमरांच्या  फ्रंट व्ह्यू इतका होता! काय बिशाद होती कोणाची तिला पतली कमर म्हणून हिणवायची? तिला जर गीतकाराने 'पतली' असं संबोधलं असतं तर त्याला बिचा-याला 'पतली गली' पकडून इंडस्ट्री सोडावी लागली असती. असो! पण ज्या पद्धतीने ती या गाण्यात नाचली आहे ते पाहिल्यावर 'बृहन्नडेने भर दरबारात जे नृत्य केलं होतं ते कसं दिसलं असावं' हे
आमचं ब-याच दिवसांपासून असणारं कुतूहल शमलं,तो भाग वेगळा. यासाठी आम्ही तिचे आयुष्यभर ऋणी राहू!

सोनाक्षी बाईंचे जोकर सारखे चित्रपट (सुरुवातीला आमचं मत होतं कि चित्रपटाचं नाव या बाईवरून ठेवण्यात आलं आहे कि काय? परंतु आधीच्या अनेक मतांप्रमाणे हे मत देखील चुकीचे निघाले! ) बघायचं धैर्य काही आम्हाला अखेरपर्यंत एकवटता आले नाही. अगदी केबल वरून तो फुकट प्रसारित झाला तरीही! आता तर 'सन ऑफ सरदार' नावाच्या सिनेमात ती दिसणार आहे. एकंदरीत (संजय दत्तशी [कि तो तिचा भाऊ आहे ?] तिचे लग्न होताना दिसते आणि अजय देवगण दुःखी कष्टी होतो तो ) प्रोमो बघताना सिनेमाचा विषय जरठ विवाह , विधवा पुनर्विवाह किंवा तत्सम काहीतरी सामाजिक बांधिलकी जपणारा असावा असा आमचा कयास आहे. अर्थात, आधीच्या चुकलेल्या कयासांप्रमाणे हा अंदाजदेखील चुकणार हे सांगणे न लगे!

चांगल्या ब्यानरच्या सिनेमांमुळे किंवा सिनेमाच्या हिरोंमुळे सोनाक्षी बाईंच करियर त्यांना सध्या हिरोईन म्हणून प्रमोट करून पाहत असलं तरी तिचं भवितव्य तीच जाणे. परंतु आम्हास मनापासून विश्वास आहे कि सोनाक्षीबाईंनी बॉलीवूडला हिरोईन दिली नाही तरी 'रेडीमेड आई' मात्र नक्कीच दिली आहे!

तिच्या भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देऊन (आणि तिची फ्यान मंडळी आम्हाला फटकावायच्या आत) आम्ही आवरतं घेतो !