विनोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

मी आणि रस्त्यांची कामं!


माझं आणि रस्त्याच्या कामांचं काहीतरी पटत नाही हे नक्की!  लहानपणी जिथं राहत होतो तिथं सगळं चांगलं होतं. पण नंतर कुंडलीतला ग्रह कुठे सरकला आणि तिथेच अडकून बसला काही कळायला मार्ग नाही. आम्ही मग स्वतःचं घर बांधायचं ठरवलं. जिथे जागा घेतली तिथे पक्क्या रस्त्याचं काम व्हायचं होतं.. म्हणजे खरंतर तिथून एसटी जायची त्यामुळे ‘रस्ता तिथे एसटी’ हे गृहीतक खरं धरलं तर ज्यावरून एसटी जायची त्याला रस्ता म्हणायला हरकत नसावी. थोडक्यात हायवेपासून आमच्या घरापर्यन्त जाणारा रस्ता हा  अर्धवट तयार झालेला होता. तो पूर्ण रस्ता पक्का नव्हता. तिथून तांबडी माती उडवत ट्रक किंवा एसटी जायची आणि त्यामुळे लांबून इंजिनाचा आवाज आला कि आम्ही इकडे तिकडे तोंडं फिरवून शक्य तेवढी धूळ टाळायचा प्रयत्न करायचो. शाळेत जाता येताना स्कुल बस होती तेव्हा नुसत्या खिडक्या बंद केल्या कि तात्पुरती सुटका व्हायची पण स्कुलबस च्या स्टॉप पर्यंत जाताना किंवा तिथून घरापर्यंत येताना जो जाच होत असे त्याला इलाज नव्हता. दरवर्षी 'या वर्षी हा रस्ता पक्का होणार आहे' अशी आवई उठायची , उगाच काही कंत्राटी कामगार रस्त्याच्या इकडे तिकडे मातीचा ढीग जमवून बसायचे आणि नंतर पावसाळा यायचा आणि कोकणातल्या मुसळधार पावसाच्या आवाजात ते मातीचे ढीग वाहून जायचे आणि पाठोपाठ ती आवईही विरून जायची. अशी काही वर्ष लोटली.

नंतर कशात सुख आहे हे न कळण्याचं आणि स्वतःचं खरं करण्याचं वय आलं तेव्हा शाळेची बस सेवा झुगारून स्वतःची सायकल घ्यायची अवदसा आठवली. शाळेत जायचं साधन बदललं पण जायचा यायचा रस्ता तोच. जेव्हा त्या रस्त्याचा वापर करायची प्रत्यक्ष वेळ होती नेमकं तेव्हाच  त्याचं काम सुरु झालं आणि जेवढी वर्ष मला तो रस्ता रोज वापरायचा होता तेव्हढीच वर्षं ते चाललं.  ग्रामपंचायतीला  खडीकरणासाठीचा शुभमुहूर्त मिळाल्यावर तासनतास रस्त्यावर डंपर्स आडवे लावून, आमच्या कडेकडेने जायच्या सायकलच्या वाटेवर त्यांनी खडीचे ढिगारेच्या ढिगारे उभारून ठेवले. त्या ढिगाऱ्यानी काही पावसाळे पाहून बरंचसं 'वेट लूज' केल्यानंतर कोणाला तरी जाग आली आणि मला पुरेशी गैरसोय होत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं असावं कारण लगोलग काम चालू झालं.. आधी काही वर्ष खडीकरण, मग कित्येक वर्ष डांबरीकरण , मातीधोंडेकरण या प्रकारात माझी शाळेची वर्षंपण संपली! रोज सायकल घेऊन मध्ये उतरत, मध्ये खडीतून ढकलत असा मी घरून शाळेत आणि शाळेतून घरी पोचायचो.  मी पुण्यात जायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कधीतरी आमच्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम पूर्ण झालं!

गावाकडून पुण्याचा प्रवास साधारण दहा तासाचा होता. रात्री जेवून बिवून उशिरा बसमध्ये बसलं कि पहाटे पहाटे पुण्यात, एवढं सोपं गणित  होतं ते! पण कुंडलीतल्या ग्रहाला याचा सुगावा लागला आणि सुवर्णचतुष्कोणाचा पुणे ते बंगलोर रस्ता बनवायचा घाट घातला गेला. दिवसरात्र डंपर , जेसीबी अर्थमुव्हर्सची खाटखूट, आधीच जेमतेम असणाऱ्या रस्त्यावर, गाड्यांसाठी कधी शेतातून,  तर कुठे गावकुसातून केलेली डायव्हर्जन्स वगैरेनी बसमधल्या झोपेची वाट लावली. बस मध्ये खिडकीकडे बसलो तर माझ्याच डोक्याला टेंगळं यायचे चान्सेस 100 टक्के असत, मधल्या सीटवर किंवा एका बाजूला बसलो तर शेजारच्यांनी आपापल्या टाळक्यानं माझे खांदे शेकवायचे चान्सेस तर शंभर टक्के ओलांडून गेले.  आता दहा तासाचा वेळ १४ तासावर गेला. संध्याकाळचा चहा घेऊन बस मध्ये बसलं तरच सकाळच्या चहाला पेठेत पोहोचता यायला लागलं आणि मार खाऊन आल्यासारखं दुखरं अंग दोन दिवस  वागवावं लागायचं , यात पाच सहा वर्षं गेली.

बरं, रस्ते दुरुस्तीचा त्रास पुण्यात येईपर्यंतच किंवा पुण्यातून घरी जाईपर्यंत असता तर तसंही नव्हे कारण तो प्रवास आठवड्यातून एकदा होत असे असं नाही. आठवड्यातून एकदा रविवारी पुण्याच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या मामाकडे जायचो.  मुठा नदीवर औंधात एक पूल होता. तो इतका खाली होता, कि एरवी नाल्यासारख्या दिसणाऱ्या मुठा नदीला, पावसाळ्यात 'नदी' वगैरे म्हणण्यासारखं पाणी आलं कि हा पूल पाण्याखाली जायचा. त्या काळी असणारी 'जनता बस'  त्या पुलावरून जात असे , अपवाद पावसाळ्यातले ते काही 'अतिप्रवाही' दिवस. त्या दिवशी मात्र बस डी पी रोडवरच्या 'नवीन पूल ' या जेनेरिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या उंच पुलावरून जात असे. खरंतर कॉलेजच्या हॉस्टेल वरून मामाच्या घरी जायचा  बसप्रवास हा जेमतेम ३०- ३५ मिनिटांचा होता पण 'नवीन' पुलावरून गाडी गेली कि हाच प्रवास तासाभराचा होत असे कारण पुलावर पाणी असलं तरी पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे प्रवासी थांबा होता , त्यामुळे बसने जरी कशीही, अगदी होडीतून, नदी क्रॉस केली असती तरी त्या त्या स्टॉपवरचे प्रवासी घेणं अथवा सोडणं भागच होतं. पण ही वेळ अपवादात्मक वेळा, तेही फक्त पावसाळ्यात ओढवत असल्याने त्याही परिस्थितीला माझी ना नव्हती. 

पण दुर्दैवाचा फेरा एवढ्यात सुरूही झाला नव्हता. कदाचित मी आता पुण्यात येतोय याची चाहूल लागल्यामुळे असेल पण पुण्यातला माझा  पहिला पावसाळा संपतो ना संपतो तोवर तो जुना पूल पाडून तिथे एक ' द ऑल न्यू नवीन पूल' बांधायचा प्रकल्प आखला गेला आणि एकदम तत्परतेने त्यावर कामसुद्धा सुरु झालं आणि हा आधीच्या जुन्या 'नवीन पूला' चा -तास भर लागणारा मार्ग आता नेहमीचा झाला. म्हणजे बस अशी पुलापर्यंत यायची, आपल्याला बसमधून पुलाच्या पलीकडचा स्टॉप खिडकीतून  दिसायचा आणि ही तोंड फिरवून मागे जायची! त्यानंतर मग कुठून कुठून वळसे घेत नवीन पुलावरून नदीच्या पलीकडे पोचायची. तिकडून मागे वळून बघितलं तर अर्ध्या तासापूर्वी पोचलेला मघाशी घेतलेला स्टॉप दिसायचा.. थोडक्यात दरवेळी तेच ते औंध गावठाण एक्सप्लोर करण्यात अर्ध्या तासाचा विनाकारण चुराडा झालेला असायचा!

पुढे मग दोन वर्षांनी इंजिनीअरिंग साठी पिंपरी-चिंचवड भागात जायची वेळ आली. आता इथे मी किमान चार वर्ष काढणार याची कुणकुण त्या अनामिक ग्रहाला लागली नसती तरच नवल. जुन्या मुंबई-पुणे हायवेचं नूतनीकरण करण्यासाठी याहून योग्य मुहूर्त असणार नाही अशी सरकारदरबारी खात्री पटली होती. आणि मग माझं कॉलेजला जायचं वेळापत्रक पक्कं झाल्यावर कधीतरी त्या कामासाठी पहिली कुदळ पडली. फोर  लेन काय,  ग्रेड सेपरेटर काय, निगडी ते पुणे २५ मिनिटं काय, नुसती स्वप्नं ! ऍडमिशन साठी राहत्या ठिकाणावरून तीस  एक मिनिटात पोचलेलो मी.. त्यानंतरची चार वर्ष दीड-दोन तासापेक्षा कमी वेळाचा एका बाजूचा प्रवास केलेला आठवत नाही. ग्रेड सेपरेटर च्या निमित्ताने पिंपरी चौक आणि चिंचवड चौक भागात तर आता अगदी हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती शोधून काढतात कि काय असं वाटावं इतकं उत्खनन चालू होतं. होता होता ते काम पूर्णत्वाला जातंय असं  दिसायला लागलं, ग्रेड सेपरेटर म्हणजे काय ते मूर्त रूपात दिसायला लागलं तर त्या रस्त्यावरून प्रवास करायच्या आधीच पहिल्या नोकरीनिमित्त मुंबईत - म्हणजे नव्या मुंबईत जायची वेळ आली.

सुदैवाने मुंबई ते पुणे हा एक्सप्रेसवे झालेला होता आणि त्यावर काही काम चालू नव्हतं पण तो माझा नेहमीच मार्गही नव्हता. एकदा मुंबईत पोचलो कि रोजचा प्रवास कल्याण ते वाशी. मुंबई बाहेरच्या कुणाला मी मुंबईला असतो हे सांगायला लाज वाटावी असा तो प्रवास. धूळ आणि माती एवढी उडायची कि एकतर खिडकी उघडी ठेवता यायची नाहीतर डोळे. खिडकीची सीट  मिळाली नाही आणि शेजारच्याने खिडकी उघडी ठेवली तर नंतर चेहरा धुताना एवढी  धूळ निघायची कि निष्कारण शंका काढणाऱ्या एखाद्याला , पार्वतीने अंगावरच्या मळापासून गणपती कसा बनवला होता याचंदेखील उत्तर सापडावं!  शिळफाट्यावर तर एवढे मोठे मोठे खड्डे होते  कि पावसाळ्यात बसने जाण्यापेक्षा बोटीने गेलो तर लवकर आणि सुरक्षित पोचू असं वाटायचं. 'या रस्त्याचं काम चालू आहे'  असं नुसतं ऐकलं होतं , मी सकाळी लवकर आणि रात्री उशिरा - बघण्यासारखं काही नसल्याने डोळे मिटून, आणि खडखडाट ऐकण्यापेक्षा इअरफोनवर गाणी ऐकत - प्रवास करत असल्याने दिसलं तर नाहीच. पण मी स्वतः त्या रस्त्याने जात येत होतो त्यामुळे ते असणारच असा गाढ विश्वास होता. लवकरच पुण्यात परत आल्याने त्या सिंदबादच्या गलबताची  'सफर' सुटली.. 

मात्र आता इकडे पुणे-बंगलोर हायवेचं काम पूर्ण होत आलेलं होतं हा दिलासा होताच. आता घरी जायचा वेळ १४ वरून ८ तासांवर आला होता. पण पुण्यात सुटका व्हायची नव्हतीच. कारण त्यानंतर मग पुण्यात राहायचं ठिकाण आणि ऑफिस यावरच्या रस्त्यावर काम सुरु असायचं , नसलं तर सुरु व्हायचं! मी कोथरूड ला राहायला गेलो तर नळस्टॉपच्या फ्लायओव्हरचं बांधकाम सुरु झालं , विमाननगर ला राहायला गेलो तर पालिकेच्या बांधकाम खात्याने  पाटील इस्टेट वरून फ्लाय ओव्हर बांधायला घेतला. मग ऑफिस चिंचवड ला गेलं आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. ज्या रस्त्याचं काम बघत बघत पूर्ण शिक्षण संपलं होते त्या रस्त्याचा वापर करायची वेळ शेवटी दैवाने दिली होती.  पण बघतो तर काय, तेवढ्यातच कोणत्यातरी नतद्रष्टाला-निगडी-पुणे २५ मिनिट-वाल्या मार्गावर बीआरटी करायची आयडिया सुचलेली! झालं, एवढा चांगला चार लेनचा रस्ता खोदून बी आर टी चे स्टॉप, बीआरटीसाठी लेन सेपरेटर वगैरे थाट मांडला जात होता.जितकी वर्ष चिंचवड ऑफिसला होतो तितकी वर्ष बी आर टी प्रोजेक्ट रडतखडत चालू होता. मी आपला नेहमी धुळीने माखलेलाच. 

त्यानंतर कधीतरी नाशिकला जावं लागलं. तो प्रवास जेमतेम काही महिनेच असेल  पण तेवढयातल्या तेवढ्यात नाशिक -पुणे मार्गावर काम खोदून काढलं गेलं. भोसरी,  भूगाव अशा निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे फ्लायओव्हर बांधायचे प्रकार एवढे सुरु झाले कि प्रवासात गचके बसत असताना  तोंडातून निघणारी  'भ'ची बाराखडी थांबूच नये ! चार तासाचा वेळ सहा  तासावर गेला.. नशीब! अजून काय? मग परत कामानिमित्त परत मुंबई ला बाडबिस्तरा हलवला आणि इकडे हे फ्लायओव्हर कम्प्लिट झाल्याची बातमी काही नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्या सहकार्यांनी  कळवली! 

त्यानंतर जेव्हा काही महिन्यात परत पुण्यात आलो तर नव्या कंपनीचं ऑफिस हिंजवडी मध्ये होतं. त्यामुळे माझा जाण्यायेण्याचा रस्ता वाहतूकयोग्य असून चालेलच कसा? ताबडतोबीने औंध रावेत रस्त्याचं काम करायला घेतलं गेलं. मी आपला जातोय धूळ खात. कित्येक वर्षांनी ते पूर्ण होतंय असं वाटलं, आता त्या रस्त्याचा आनंद घ्यावा म्हटला तर तिथेही बीआरटी प्रकरण करायचं ठरलं.. परत खोदाखोद,  डिव्हायडर वगैरेंनी उच्छाद मांडला. काही वर्षांनी ते काम पूर्ण झाल्यानंतर थोडे दिवस सुसाट त्या रस्त्यावरून गाडी दामटल्यावर थोडा  चुकचुकलोच!  

यापेक्षा काही रस्त्याची वाट लावता येणार नाही असं मला मनातून वाटत होतं  पण तेवढ्यातच ज्या देवतेनं पुणे पी डब्लू डी खात्याला, जिथे चौक होते तिथे फ्लायओव्हर बांधायचा दृष्टांत दिला होता तीच, पिंपरी चिंचवड पी डब्लू डी खात्याच्या स्वप्नात गेली आणि तिने एक्झॅक्ट तोच दृष्टांत त्यांनादेखील दिला! मग काय ? रुंद , गुळगुळीत औंध रावेत रोडवर चौकाचौकात पत्रे रचून रुंद रस्ते छोटे केले गेले, बी आर टी स्टॉप उध्वस्त करून बसेस परत बीआरटी मार्गातून पुन्हा त्या अरुंद रस्त्यांवर येऊन आपल्याला पुरेशी गैरसोय होईल ना याची व्यवस्था केली गेली तेव्हा कुठे मला माझं नेहमीचं रुटीन चालू झाल्यासारखं वाटलं.

मग हिंजवडीच्या  मार्गावर अंडरपास करायचा  ठरला, दोन लेन चं ट्राफिक एकाच लेनला वळवून बरोबर सोमवार ते शुक्रवार 9 ते 5 या वेळात ते काम चालू झालं, आता मेट्रो प्रकल्प मग अजून काय तर अजून काय..  बरं पुणे बंगलोर हायवे वरून 8 तासात जायचं सुख या सगळ्या दुःखावर फुंकर घालेल अशी अपेक्षा करावी तर तोही सिक्स लेन करायचा प्रोजेक्ट चालू झाला.. परत तीच डायव्हर्जन्स,  खाचखळगे , अर्थमूव्हर्स चे शब्दात न पकडता येणारे आवाज! 

हल्लीच घरी जाऊन आलो , घराचा रस्ता ठीकठाकच आहे पण मुख्य गावातून जाणारा कित्येक वर्ष सिंगल लेन असणारा मुंबई-गोवा हायवे आता चार लेन्स चा करायचा कार्यक्रम चालू आहे, गावाच्या वरून फ्लायओव्हर होतोय, त्यामुळे मुख्य चौकात पिलर्स आले आहेत, मूळ रस्ता ओळखूही येऊ नये असा दिसेनासा झालाय . कधी उजवीकडून जा तर कधी डावीकडून जा अशा सूचना ठिकठिकाणी लिहिलेल्या आहेत. मात्र इतक्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर आता मी अजिबात वैतागत नाही, मी कुंडलीतल्या त्या अनोळखी ग्रहाकडे तिरपा कटाक्ष टाकतो आणि धुळीत माखायला सज्ज होतो ! 

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

परवाना करी दिवाना :उत्तरार्ध

पूर्वार्ध: 

सेक्रेटरीएट ऑफ स्टेटच्या ऑफिस मध्ये एका भल्यामोठ्या रांगेत पब्लिकची कागदपत्र चेक करण्यात येत होती. हि रांग ऑफिस मधूनही बाहेर आली होती. नशिबाने मी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली असल्याने मला त्या रांगेतून माझा नंबर येईपर्यंत वाट बघत राहावी लागली नाही. लाइनमधल्या कित्येकांना हे ऑनलाईन अपॉईंटमेन्ट वगैरेचं प्रकरण माहितीही नव्हतं त्यामुळे अमेरिकन जनता सुद्धा आधुनिकतेपासून दूर असू शकते हा साक्षात्कार झाला. सरकारी ऑफिसात धक्काबुक्की, घुसाघुसी आणि वादावादी न करता रांगेत उभं राहिलेलं पब्लिक आणि आपल्याला समजेल इतक्या वेगाने पुढे सरकणाऱ्या रांगा हा मात्र निर्विवादपणे अमेरिकन फॅक्टर!! या खिडकीतून त्या खिडकीत पळवण्याचे सरकारी उद्योग इथंही चालतात त्याला अनुसरून नवीन लायसन्स साठी दोन काउंटर फिरल्यावर तिसऱ्या ठिकाणी मी उभा राहिलो.

दहा-एक मिनिटं तिसऱ्या काउंटर समोर उभा राहिल्यावर मी कशासाठी उभा राहिलोय ते मला विचारण्यात आलं. मी सांगितल्यावर 'तू सांगितलं नाहीस तर मला कळणार कसं?' असा उलट प्रश्न आला. आता काय बोलणार? बरं पुढे काय तर परीक्षा द्यायची.. त्या बाईने मला पेपर आणि पेन्सिल दिली आणि एका 'एक्झाम सेक्शन' असा बोर्ड असणाऱ्या ओपन एरिया मध्ये बसून पेपर लिहायला सांगितलं. मी अवाक झालो!  आपल्याकडच्या परीक्षा पद्धतीची सवय असणाऱ्या मला थोडावेळ काही झेपलंच नाही. आपल्या इथं लर्निंग लायसन्ससाठी पद्धतशीर एका खोलीत बसवून प्रश्न दाखवतात आणि तुमच्या बेंचवर असणाऱ्या A B C बटणांपैकी योग्य बटण दाबायला सांगतात. थोडक्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरून परीक्षा देण्याचा हा अनुभव गाठीशी असताना अत्याधुनिक अमेरिकेत कम्प्युटर, टॅब किंवा असंच काहीतरी देऊन टेस्ट द्यावी लागेल असं उगाच वाटत होतं आणि हातात मिळाली पेपर आणि पेन्सिल!

चटकन येणारी उत्तरं सुरुवातीला,थोडी कठीण वाटणारी नंतर आणि 'ड' गटातली शेवटी-असला फॉर्म्युला वापरायची वेळदेखील येऊ नये असला तो पेपर होता! नाही म्हणायला कनफ्यूज होण्यासाठी 2 प्रश्न होते.. ज्यांनी पहिला प्रयत्न देवाला सोडायला सांगून विनाकारण टेन्शन दिलं होतं त्यांच्या मातोश्रींचा मनातल्या मनात उद्धार करून साधारण अर्ध्या तासात मी सोडवलेला पेपर परत दिला. सुपरवायझर नाही कि घंटा नाही.. अगदीच सिरियसनेस जाऊ नये म्हणून माझ्या पाठीमागच्या बाजूला 'कृपया मोबाईल वापरू नये' अशी विनंतीवजा सूचना (अर्थात इंग्रजीतून) चिकटवून ठेवली होती! मघाच्याच बाईने माझ्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका छापून आणली आणि माझ्या समोरच पेपर तपासला. तपासला म्हणजे प्रत्येक उत्तरावर तांबड्या मार्करने ती तिरकी काट मारत सुटली. प्रत्येक काट छातीत धडकी भरवत होती. घाबरून मी विचारलं कि "डिड आय आन्सर एव्हरीथिंग रॉंग?" तर ती बया म्हणे कि "मी बरोबर असणाऱ्या उत्तरांवर अशी खूण करतेय!" अगदी ओठांवर आलेला "शाळा कुठली गं  तुझी?" हा प्रश्न मी महामुश्किलीने गिळून टाकला. 2 प्रश्न वगळता सगळं बरोबर होतं.. आता ते 2 प्रश्न चुकल्यामुळे मी त्यांना कनफ्यूज करणारे म्हटलं ते वेगळं सांगायला नको! झालं.. दृष्टी - कागदपत्र तपासणीचे उरलेले सोहळे आटपल्यावर आणि रोख फी भरल्यानंतर लर्निंग लायसन्स ताब्यात आलं. सुदैवाने भारतीय परवान्यामुळे मला ताबडतोब प्रात्यक्षिक परीक्षा द्यायला परवानगी देण्यात आली होती.

आता लायसन्स घ्यायचं तर प्रात्यक्षिक द्यायलाच हवं--प्रात्यक्षिक द्यायचं तर गाडी हवी--गाडी विकत किंवा लीज वर घ्यायची तर लायसन्स हवं--इतर कोणाची मागावी तर इन्शुरन्स वर चालकाचं नाव हवं--बरं इन्शुरन्स वर नाव ऍड करायचं म्हटलं तर ज्याचं नाव ऍड करायचं त्याचं लायसन्स हवं-- आणि लायसन्स घ्यायचं तर प्रात्यक्षिक द्यायलाच हवं! म्हणजे नोकरी नाही म्हणून अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणून नोकरी नाही च्या धर्तीवर लायसन्स आणि गाडी चा खेळ चालू झाला! लोकांशी बोलताना नव्याने इमिग्रेट झालेल्या लोकांना भाड्याने गाड्या देणाऱ्या एका गॅरेज मालकाबद्दल माहिती कळली, त्याच्याकडे गेलो तर त्याच्या सगळ्या गाड्या बाहेर गेलेल्या होत्या, होती ती एक अतिप्रचंड जुनाट गाडी. तो माणूस ती सुद्धा कशी  'मख्खन' आहे वगैरे गोष्टी समजवायला लागला! आता हे लोढणं महिनाभर गळयात अडकवून घेण्यापेक्षा लोकांचे उपकार घेणं परवडलं असतं. "एखादी-चालवताना स्वतःचीच स्वतःला लाज वाटणार नाही -इतपत बरी गाडी असेल तर सांग" असं त्याला सांगून मी बाहेर पडलो. अनेक ठिकाणी चौकश्या करून दमल्यावर सरतेशेवटी आमचं हपिस मदतीला आलं. इन्शुरन्स बद्दल चौकशी करायला गेलं असताना 'गरजू' लोकांना ऑफिस आठ्वड्याभरासाठी गाडी + विमा कागदपत्रं देतं असं कळलं. नेहमी भांडल्यासारखा वाटणारा आवाजाचा सूर कटाक्षाने खालच्या पातळीत ठेऊन मी स्वतःला 'गरजू' ठरवण्यात यशस्वी झालो आणि ऑफिस ने मला आहे तेवढं पेट्रोल भरून द्यायच्या बोलीवर सात दिवस वापरायला गाडी दिली..

आता सुरु झालं प्रात्यक्षिक! अमेरिकन जमिनीवर पाऊल ठेवल्यानंतर मी पहिल्यांदाच गाडीत ड्रायव्हर सीट वर बसत होतो. डावीकडे!!  ड्रायव्हिंग गाईडलाईन्स चं  पुस्तक कोळून प्यायलं आणि कितीही नाही म्हटलं तरी सुरुवातीला आपला मेंदू गाडी डावीकडूनच चालवायला आणि गाडी रस्त्याच्या (लेनच्या) उजवीकडे ठेवायला सांगतोच सांगतो! त्यात भारतात स्वतःची गाडी असताना आणि ती इतकी वर्ष चालवत असताना इथे ड्रायव्हिंग स्कुल मध्ये परत शिकणे हा कसा अपमान समजला पाहिजे यावर इतरांनी माझी बौद्धिकं घेतली. त्यात क्लासचं  टायमिंग ऑफिसच्या वेळात आणि वरून दर ताशी काही डॉलर्स अशी दणकावून फी! त्यामुळे तो मार्गही माझा मीच बंद करून टाकला. सात दिवसात गाडी परत करायची बोली असल्यामुळे वेळ दवडून उपयोग नव्हता. शेवटी नवख्या ड्रायव्हर सारखं अगदी स्लो सुरुवात करून रात्रीच्या वेळी कम्युनिटीच्या आतल्या रस्त्यांवर निशाचरासारखी मी गाडी फिरवायला लागलो. दोन दिवसांनी शेजारी एकाला नियम पाळतोय का ते बघण्यासाठी बसवून मुख्य रस्त्यावर बाहेर पडलो. पण सगळं स्मूथ होईल तर शप्पथ! थोडं अंतर जातो न जातो तोच 'टॉंय टॉंय टॉंय' असा सायरनचा आवाज आला! मी टरकलो.. निळा गणवेश, रंगांची उधळण, पिस्तुलधारी पोलीस सगळे डोळ्यासमोरून तरळून गेले.. च्यायला, गाडी चालवायला बाहेर पडलो नाही आणि मी कुठलातरी नियम तोडला कि काय ?  पण नाही, नशिबाने अँब्युलन्स होती. इतरांचं  बघून मीही  गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. कमाल  म्हणजे रस्त्याच्या अलीकडे पलीकडे असणाऱ्या सगळ्या गाड्या थांबल्या होत्या! अँब्युलन्स गेल्यावर परत सगळे रस्त्यावर आले (शब्दशः अर्थ घेणे!). नाही म्हटलं तर चकित व्हायला झालंच.


असो, अशा रीतीने कधी अँब्युलन्स तर कधी स्कुलबस तर कधी रस्ते दुरुस्त करणाऱ्यांची गाडी , असे (पोलिसांची गाडी वगळता) इतर वाहनांचे अनुभव घेत घेत ६ दिवस उलटून गेले.  होता होता, बाकीच्या गाड्यांचा अंदाज आला, रस्त्यावरच्या सूचनांकडे आपसूकच लक्ष दिलं  जाऊ लागलं. अंडर कन्स्ट्रक्शन रोड्स वरचे 'रस्ता  कामगाराला जखमी केलंत तर ७५०० डॉलर्स दंड आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास' अशा अर्थाचे बोर्ड भीती दाखवायचे कमी झाले. थोडा तरी कॉन्फिडन्स आला. मी आधीच अधिकृत प्रात्यक्षिक घेणाऱ्या आणि सर्टिफिकेट देणाऱ्या प्रायव्हेट ड्रायव्हिंग स्कुल ची अपॉईंटमेन्ट घेतली होती. म्हटलं होईल ते होईल! त्यादिवशी थोडा जास्त वेळ देवासमोर घालवू आणि जाऊ. समजा नापास झालोच तर चारचौघात बदनामी नको या हेतूने 'वैयक्तिक कामासाठी' म्हणून ऑफिसमधून अर्धा दिवस सुट्टी घेऊन गुपचूप जायचा माझा प्लॅन होता. अर्धा दिवस सुट्टी तर मंजूर झाली पण गुपचूप सटकायच्या धोरणाला सुरुंग लागला. ज्या माणसाने ऑफिसची गाडी माझ्या ताब्यात सोपवली होती तो सकाळी सकाळीच 'मी गाडी ठरल्याप्रमाणे आणि पेट्रोल वगैरे भरून वेळेत परत करणार आहे ना'  याची खातरजमा करायला माझ्या जागेवर आला. मी त्या दिवशी टेस्टला जाणार आहे हे कळल्यावर त्याने बोटाने लांब दिसणारी एक जागा दाखवून तिथे बसणारी अमुक एक मुलगी महिन्याभरापूर्वी कशी लागोपाठ दोनदा फेल झाली होती आणि रडत होती याचं अगदी रसभरीत आणि यथायोग्य हावभाव करीत वर्णन केलं आणि वरून 'ऑल द बेस्ट' देऊन गेला. आधीच उद्यापासून गाडी नसणार हे टेन्शन आणि त्यात त्याचं ते अगोचर वागणं! हे कमी म्हणून कि काय त्याच्या (अमेरिकन रिवाजाप्रमाणे) मोठमोठ्याने बोलण्यामुळे आणि विनाकारण केलेल्या गडगडाटी हास्यामुळे आजूबाजूच्या चार जणांना  मी कुठे जाणार आहे ते कळलं आणि त्यांनी मोलाचे सल्ले देऊन कमी अधिक प्रमाणात 'माझं टेन्शन कमी तर होणार नाही ना' याची काळजी घेतली.

ठरलेल्या वेळेप्रमाणे मी निघालो तर अर्ध्या रस्त्यात ड्रायव्हिंग सेंटर वाल्या बाईंचा फोन! त्या स्वतःच  माझ्या परीक्षक असणार होत्या. मी त्यांना 'पाच मिनिटात पोचतो' असं सांगितलं परंतु बहुतेक तिला माझ्यासारख्या लोकांच्या 'पाच मिनिटांचा' अर्थ ठाऊक असावा. तिने 'आतापासून १० मिनिटात पोहोचला नाहीस तर मी तुझ्यसाठी थांबू शकत नाही' अशी प्रेमळ सूचनावजा धमकी दिली. सुदैवाने मी पाचव्या मिनिटाच्या आतच तिथे पोहचलो आणि 'एक बार जो मैने कमिटमेंट दे दी' च्या धर्तीवर 'मी कसा पक्का वेळ पाळणारा आहे' या अर्थाचं एक वाक्य फेकलं. परीक्षक आणि पर्यवेक्षक अशी दुहेरी भूमिका निभवायला तयार असणाऱ्या त्या वयस्कर स्त्रीने माझं वाक्य ऐकून उगाच कायच्याकाय तोंड केलं आणि माझे कागद तपासायला घेतले. \ त्यानंतर गाडीचे लाईट, इंडिकेटर्स, हॉर्न सगळं एक एक करून तपासलं. जणू काही मी तिला सेकण्डहॅन्ड गाडी विकायला आलोय!

सुरुवातीला बाहेर उभं राहून तिने थांबणं, रिव्हर्स घेणं, पार्किंग करणं यासारख्या प्राथमिक गोष्टी मला करायला लावून त्याला मला जमताहेत आणि मी गाडीत बसवून नेल्यानंतर गाडीसकट तिला 'आपटवणार' आणि 'आटपवणार' नाही  याची खातरजमा करून घेतली.  त्यानंतर सुरु झाली परीक्षा. एक्स्टर्नल व्हायव्हा च्या वेळेला  जे फिलींग येते ते घेऊन मी तिच्या सूचनांनुसार गाडी चालवायला लागलो.. पण इथे प्रॅक्टिकल करत व्हायव्हा द्यायची होती! ती अगदी काटेकोर पणे  मी स्पीड लिमिट्स, सिग्नल्स, नियम पाळतोय का ते पाहत आपल्या नोंदवहीत टिपणं काढत होती. मध्ये मध्ये मला वाहतुकीच्या नियमासंदर्भातले प्रश्न विचारत होती. त्यामध्ये "समोरून कोणीतरी गाडी चालवत तुझ्या दिशेने आला आणि तुला ठोकणारच आहे तर तू गाडी कुठे आपटवशील?" अशा सारख्या अघोरी प्रश्नांचाही समावेश होता. "शुभ बोल गं नारी" असं मनात म्हणून दिलेली माझी उत्तरं ती नोंदवून घेत होती. रेडिओ बंद कर, ए सी चालू कर असा बावळटपणा करायला सांगत होती. मध्येच 'वॉच युर स्पीड' वगैरे सांगून सावध करीत होती. गाडीतल्या बटणांची कार्यपद्धती आणि त्या एरियातले साधारण सगळे गल्लीबोळ तिच्या मनासारखे बघून झाल्यानंतर तिने मला गाडी हायवे ला घ्यायला लावली. माझ्या डोळ्यांसमोर आपल्याकडच्या ड्रायविंग टेस्ट चे सुखद अनुभव तरळून गेले..

"साहेब, हे काय? ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुमचीच गाडी आणलीय का? " -इति परीक्षा घेणारा खाकी वर्दीधारी इसम.
"होय साहेब.. हि हि " -इति मी
"वा! आता या रस्त्याने पुढे जावा आणि वळवून आणा." - खा. व. इ. 
"माझ्याबरोबर कोणी बसणार नाही? तुम्ही?" -मी
"मी या ड्रायव्हिंग स्कुल वाल्यांच्या गाडीत बसणाराय, जावा तुम्ही" - खा. व. इ.
मी गेलो आणि साधारण दोनशे फुटावरच्या अंतरावरून गाडी वळवून परत आलो. वर्दीधारी इसम रस्त्याच्या पलीकडे राहिला आणि "ड्रायव्हिंग स्कुलवाल्यांच्या गाडीत" बसायच्या तयारीत होता
"ओ ss  साहेब... मी काय करू?" - मी
"जावा तुम्ही, येईल तुमचं  लायसन्स" - खा. व. इ.
 "बरं..!" -इति मी आणि इत्यस्तु ! हाय काय नि नाय काय!!

"टेक दि नेक्स्ट एक्सिट अँड रिमेम्बर यू नीड टू स्टाप दि इंनिकेटा (प्रमाण भाषेत इं-डि-के-ट-र) वन्स यू मुव्ह्ट टु डिजायर्ड लेन" तिच्या सूचनेने मी त्या रम्य आठवणींच्या तंद्रीतून वास्तवात आलो. साधारण चाळीस पंचेचाळीस मिनिटं गाडीचं पेट्रोल जाळल्यानंतर आम्ही परत होतो त्या ठिकाणी पोहोचलो. तिच्या हातावरच्या अर्जावर तिने केलेल्या असंख्य खुणा बघून काळीज धडधडलं. निर्विकार चेहऱ्याने ती अजून काहीबाही लिहीतच होती. घाबरतच मी तिला विचारलं की "हौ वॉज इट? डिड आय ड्रॅईव्ह वेल ऑर इट वॉज अ  स्केअरी ड्रॅईव्ह?" मी गाडी चालवताना केलेल्या चुकांचा पाढा वाचून दाखवून काही क्षण जाणीवपूर्वक शांतता ठेऊन ती म्हणाली "तरीसुद्धा तू टेस्ट पास झाला आहेस.. हे घे तुझं सर्टिफिकेट!" मी सुस्कारा सोडला.

ते सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा एस ओ एस च्या ऑफिस मध्ये गेलो. प्रथेनुसार एक बावरलेल्या चेहऱ्याचा आधार कार्ड टाईपचा फोटो काढला आणि सगळ्या कागदपत्रांसहित पक्क्या लायसन्सच्या औपचारिकता पूर्ण केल्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसची गाडी परत केली(अर्थात पूर्ण पेट्रोल भरूनच.. नसत्या शंका घेऊ नयेत!) त्यानंतर पुन्हा इतरांच्या उपकारावर काही दिवस काढल्यावर माझे लायसन्स घरपोच आले आणि अशा तऱ्हेने अमेरिकेतल्या गाड्यांच्या गर्दीमध्ये अजून एका गाडीची भर घालण्याचा माझा मार्ग मोकळा झाला!!

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

परवाना करी दिवाना : पूर्वार्ध


अमेरिकेला जाणे राहणे परतणे याबद्दल मध्यमवर्गीय भारतीय जनमानसात पूर्वीइतकं कुतूहल नसावं.. तरीही तिथल्या काही गोष्टी अजूनही अनाकलनीय आहेत हे पण तेवढंच खरं.  या देशातल्या  मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्रानंतरची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडी! हो... बरोबरच बोललो मी.. गाडीच! कदाचित वस्त्रापेक्षा जास्त महत्त्व  गाडीला असावं! निवारा बिवारा सगळं नंतर.. कारण इथल्या टीव्ही वर मी एक होमलेस लोकांसाठीच्या एनजीओ ची जाहिरात पाहिली.. त्यात ती होमलेस बाई आपल्या गाडीच्या दरवाजांवर कपडे वाळत घालते आहे, लहान बाळाला मागच्या सीट वर झोपवते आहे असे हृदयद्रावक वगैरे चित्रण होते!! त्यामुळे (बाई)माणूस होमलेस असू शकतो पण कार-लेस नाही अशी माझी धारणा बनली तर त्यात काय नवल? साफसफाई करणारे लोक, रस्ता दुरुस्ती करणारे कंत्राटदार, पोस्टमन, गवत कापणारी माणसं (जीन्स-टी शर्ट- गॉगल-हेडफोन सहीत  हि कामं  करणाऱ्यांना आणि फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्याना डायरेक्ट कचरेवाला,कामगार किंवा माळी म्हणायला अजून जीभ सरावत नाही!) ज्या पद्धतीच्या गाड्या घुमवतात त्यावरून निवाऱ्यापेक्षा चारचाकी महत्वाची असावी यावर मी शिक्कामोर्तब करून टाकलं. अर्थात मनातल्या मनात! (नायतर आमच्या शिक्कयाला विचारतो कोण?)

10 मिनिटांवर असणाऱ्या ऑफिसमध्ये घेऊन जायला आणायला काही दिवस तरी गाडी असताना आपल्याला ताबडतोब कशाला लागतेय गाडी? असा तत्कालीन धोरणी विचार मी करत होतो पण ऐनवेळी संपलेलं दूध, किराणा माल वगैरे किरकोळ गोष्टींसाठी पहिल्याच आठवड्यात मैलोनमैल पायपीट करायची वेळ आल्यानंतर "कसं जमायचं गाडीशिवाय?" असा प्रश्न पडायला लागला! 10 मिनिटं लागणारं ऑफिस 4 मैलावर (अमेरिकेतल्या 'प्रयोगातून विज्ञान' विषयात एम के एस मोजमापन पद्धती शिकवत नसावेत) आहे हे गुगलमॅप मधून कळलं! ऑफिसच्या सहकाऱ्यांकडून "बँकेत जायचंय ? जवळच आहे.. 5 मैल.. मेडिकल स्टोर इथेच तर आहे हार्डली साडेतीन मैल! भाजी मंडई 15 मिनिटाच्या अंतरावर आहे 10 मैल फक्त.. एटीम एकदम पलीकडे दीड मैल, 2 मिनिटात पोचशील. 'ड्राईव्ह इन' आहे गाडीतून उतरायची पण गरज नाही.. " वगैरे मार्गदर्शन मिळायला लागल्यावर मला जाणीव झाली कि हे काही खरं नाही. स्वतःच्या मताने चालायचं तर दोन पायांचा फारवेळ टिकाव लागणार नाही; त्यात मनाला वाटेल तसं  मूड बदलणारं वातावरण.. त्यामुळे चार चाकं हवीतच. खरंतर गाडी हि हौस म्हणून घ्यायची गोष्ट पण अमेरिकनांनी आणि इथल्या वातावरणाने ती गरज करून टाकलीये. एवढे मोठे रस्ते असताना मधून मस्त बी आर टी  वगैरे काढायची सोडून गाडी घ्यायला मजबूर करतात हे लोक! बर  दोन चाकी गाडी घ्यावी तर ती चारचाकीपेक्षा महाग.  नीच पणाचं  याहून मोठ्ठ उदाहरण कुठलं असेल? (म्हणजे असतील बरीच,पण हे वाक्य उगीच वजन टाकायला... )

जेव्हा स्वतःची गाडी घ्यायची मनाची तयारी झाली तेव्हा कळलं कि काही अमेरिकन राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य लायसन्स वर (म्हणजे भारतीय!) मी काही महिने गाडी चालवू शकतो. पण चालवता तर आली पाहिजे!  राज्य वाहतूक परवाना मिळवण्यासाठी लेखी परीक्षा आणि खरीखुरी ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते आणि त्यांच्या निकषांनुसार पास ही व्हावं लागतं हे म्हणजे अतीच झालं. भारतात बाईक जेमतेम चालवता येत असताना चारचाकीचं लायसन्स घरपोच मिळवलेल्या आमच्या काही मित्र मंडळींना हा तर सरसकट अन्याय वाटला आहे आणि त्यानी दोन पेग पोटात गेल्यावर तसं  स्पष्ट नसेना का पण अडखळत अडखळत बोलून दाखवलं आहे.  

जोपर्यंत गाडी चालवायचीच नसते तोपर्यंत ती कशी चालवावी, कशाला शिकायची वगैरे प्रश्न पडत नाहीत पण एकदा चालवायची म्हटली तर मग असंख्य प्रश्न एकामागोमाग एक पडायला लागतात. मग तुम्ही ती जगात कुठेही शिकत असा. कारण तिथले नियम!! 'भारतात चारचाकी चालवल्यानंतर अमेरिकेतच काय, अख्ख्या जगात कुठेही गाडी चालवू शकाल'  हे तद्दन भंपक विधान - खोटा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी - भारतात कधीही गाडी न चालवलेल्या व्यक्तीने निर्माण केलं आहे आणि अमेरिकेत येऊन पहिल्यांदा गाडी घेतलेल्या/शिकलेल्या काही अनिवासी भारतीयांनी ते उचलून धरलेलं आहे हे मी ष्ट्याम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे!! तसंही भारतातून अमेरिकेला येणाऱ्या पहिलटकरांना बऱ्यापैकी मिसगाईड करण्यात त्यांच्याआधी बराच काळ स्थायिक झालेले भारतीय कारणीभूत असावेत असं मी अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो.

युरोपीयनांनी कधी ना कधी बस्तान मांडलेल्या सगळ्याच देशांमध्ये गाडी चालवणारा उजवीकडे बसतो.   आपल्या गाडीत शक्यतो आपणच ड्रायवर असतो आणि अख्ख्या गाडीत कितीही माणसं आणि सामान कोंबून बसवलं तरी ड्रायवर ला कधीही अडचण होता नये असा आपल्याइथे एक (ड्रायव्हर प्रजातीने जाणीवपूर्वक पसरवलेला गैर)समजही असतो. त्यामुळे घरात मांजर असणारी मंडळी सिंहाच्या दिमाखात गाडी चालवताना (आणि नंतर गाढव बनून गाडीतलं सामान उचलताना) मी याची डोळा पहिले आहे. अमेरिकेत गाडी चालवत नसताना उजवीकडेच बसावं लागत असल्याने प्रथमदर्शनी गाडी मध्ये फारसा फरक वाटला नाही.. परंतु चालक मागे न बघता बिनधास्त आणि झपकन उजवीकडे वळतो, जवळपास सगळ्या छोट्या रस्त्यांवर ७०km/hr च्या वेगाने गाडी दामटतो, छोट्या रस्त्यावरून हळू येऊन स्पीड वाढवत वाढवत फ्रीवे वर तर १२० ने सुसाट जाणाऱ्या गाड्यांमध्ये घुसतो तेव्हा काळजाचा ठोका चुकतोच. त्यामुळे मग मी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला मग तो ऑफिस मधला ड्रायव्हर असो, कलीग असो, मित्र असो वा बॉस असो वाट्टेल ते (पण गाडी चालवण्यासंबंधीच) प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग तो नवखा असो वा मुरलेला. त्यांनीही आपलेपणाने म्हणा, मदतीच्या भावनेनं म्हणा किंवा फुशारून जाऊन म्हणा मला ज्ञानामृत पाजायला सुरुवात केली!

सुरुवातीला बाजूला बसूनही एवढा बावरून जायचो कि विचारायची सोय नाही! तसंही मीच इतरांना विचारत असे म्हणा. 'कोणी येत नसेल तर आपण रेड सिग्नलवरही राईट टर्न घेऊ शकतो' असं सांगणारा पुढे एका ठिकाणी उजवीकडे वळायचं असताना देखील रेड सिग्नलला ठोंब्यासारखा उभा राहिल्यावर मी त्याने नुकताच शिकवलेला नियम त्यालाच सांगायला गेलो तर तो उलट विचारत असे "तिथं 'नो टर्न ऑन  रेड' लिहिलंय पाहिलं नाही का?" "कुठे?"
तर  "मगाशी एक बोर्ड लावलेला त्यावर लिहिलं होतं. आता मागे गेला तो."असं तो सांगत असे.
एखाद्या रस्त्यावर अचानक गाडी एकदमच हळू केली म्हणून विचारलं तर कळलं  'इथे २५ मैल प्रति तास असं लिमिट आहे. रेसिडेन्शियल एरिया असणार '
"कुठे लिहिलंय असं?"
तर "मगाशी एक बोर्ड गेला त्यावर लिहिलं होतं.आता मागे गेला तो."हे उत्तर!
अर्थात, हळू हळू कळत गेलं की मला पडणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त प्रश्नाची उत्तरं 'मगाशी एक बोर्ड लावलेला होता' त्यावर लिहिलेली होती,जो मला प्रश्न पडता क्षणी मागे गेलेला असे!

यातून एक गोष्टीची जाणीव झाली की आपल्याकडचे बहुसंख्य चालक (सन्माननीय अपवाद वगळता, उगाच भावना दुखावून घेऊ नयेत!) गाडी चालवताना ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यात फक्त वाहतुकीचे नियम, सिग्नल आणि सर्व सजीव यांचाच समावेश नसून असल्या निर्जीव साइनबोर्ड्सचा पण समावेश असतो! अर्थात 'संभाजी पुलावर दुचाकी वाहनांना बंदी-सकाळी ९ ते ५' अशासारखे दुर्गम भागातले साईनबोर्ड असल्यावर कशी काय सवय लागणार म्हणा? पण असो. कळत-नकळत आपण नियमांची पायमल्ली करतो याची जाणीव होणे हे ही नसे थोडके..

एकदा आमचा एक सहकारी त्याच्या गाडीने कुठेतरी जात होता. फ्रीवे वरून मस्त सुसाट. तर अचानक भोंss भॉss क असा आवाज आला. तो टरकला. काय झालं असावं हा विचार करेपर्यन्त त्याला आरशात वेगवेगळ्या रंगांची उधळण सुरू झालेली जाणवली. हायवे पोलीस त्याच्या मागे लागला होता.  त्यामुळे पठ्ठ्याने गुपचूप गाडी बाजूला घेतली. (भारतात कोणाच्याच बापाला न जुमानता गाड्या पळवणारं आमच्या मित्रासारखं  पब्लिक इतर देशांमध्ये गपगुमान लाईन वर येतं ,हेही एक उघड गुपित आहे म्हणा!) पोलिसाच्या म्हणण्यानुसार त्याने म्हणे स्पीड लिमिट एक्सीड केलं  होतं. थोडंथोडकं नव्हे तर 70 मैल प्रति तास(120 km/h) ऐवजी हा बैल 90 मैल प्रति तास (145 km/h) ने गाडी पळवत होता.

"एss  अरे घे बाजूला, पन्नास देतोस की शंभरची पावती फाडू?' असले प्रश्न ठाऊक असणाऱ्या आमच्या परममित्राला  "जेंटलमन, व्हेर आर यु गोईंग विथ नाईन्टी  माईल्स अन आवर ऑन धिस ब्युटीफुल मॉर्निंग?" असले शालजोडीतले प्रश्न ऐकायची सवय नाही. आणि 'चुकलो,असं परत नाही करणार' या वाक्याना उत्तर मानायची त्या पोलिसाला सवय नाही. त्यामुळे दंड लागलाच! बरं पोलिसाचा एक हात पूर्णवेळ कमरेला लावलेल्या पिस्तुलावर! त्यामुळं 'जाऊ दे की मामा' म्हणून वाद घालायची सोय नाही. पण त्याच्या या अनुभवावरून मला कळलं की स्पीड लिमिट हे खरंच पाळायला असतं आणि हायवे पॅट्रोलिंग वाले ते पाळत ठेवून बघत देखील असतात. ८० km /h च्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर त्या आणि त्यापेक्षा खालच्या स्पीड ने फक्त लाल पिवळी एसटी जाते. कार नव्वद च्या खाली असेल तर तो बहुधा फाऊल धरला जातो आणि मागून दणादण  हॉर्न वाजवून तुम्हाला रेस मधून बाजूला व्हायला भाग पाडलं जातं.  या आणि अशा गृहीतकांवर आतापावेतो जगणाऱ्या आमच्या मित्राला पोलिसाचं ते वागणं त्याक्षणी फार अपमानास्पद वाटलं पण 'तुम्हाला बाजू मांडायची असेल तर इथल्या कोर्टात अपॉइंटमेंट घ्या, त्यादिवशी हजर राहून मी हवंतर स्पीडगन चा पुरावा सादर करू शकतो' असं पोलिसाने नम्रपणे सांगितल्यावर  काय करणार? त्यामुळे शहर हद्दीनुसार 135 डॉलर्स ची खमंग फोडणी बसल्यावर त्याने कानाला खडा आणि स्पीडोमीटरवर नजर दोन्ही एकदम लावले!

या खऱ्याखुऱ्या आणि असल्याच काही ऐकीव किशश्यातून शहाणं होत होत मी ड्रायविंग लायसन्स च्या परीक्षेचा अभ्यास करायला सुरवात केली.  हो अभ्यासच! शंभर पानी पुस्तकावर लेखी परीक्षा देऊन त्याच्यात ऐंशी टक्के मिळवल्यावर जर लर्निंग लायसन्स मिळणार असेल तर अभ्यास करायलाच हवा. पहिली काही पानं बाळबोध होती. या वेगाने दोन दिवसात सगळं वाचून संपेल असं वाटायला आणि खरं ज्ञान बाहेर पडायला एकच गाठ पडली! बरं नियम राहिले बाजूला नियम तयार करणाऱ्यांचं इंग्लिश इतकं भारी! 'राइट ऑफ वे' चा अर्थ 'वाटेच्या उजवीकडे' नसून 'वाट वापरण्याचा अधिकार' आहे हे कळलं असं स्वतःच्या समाधानासाठी गृहीत धरलं तरी शोल्डर ऑफ रोड, कर्ब ऑफ पेव्हमेंट, पासिंग ऑन रोड असल्या नवनवीन संज्ञा वाचून डॊक्याचं दही झालं.. 2 दिवसात संपेल असं वाटणारं पुस्तक 5 दिवस झाले तरी संपेना शेवटी एका दिवशी (म्हणजे खरंतर रात्री) इंजिनियरिंग च्या जुन्या दिवसांना स्मरून 'नाईट मारली' आणि पुस्तक वाचून संपवलं! साधारण 400 पानी पुस्तकासाठी असलेल्या 'नाईट मारणे' या संज्ञेचा अनादर टाळण्यासाठी मी अजून दोनदा ते पुस्तक वाचलं  आणि सगळं विसरण्याआधी मी लर्निंग लायसन्स च्या परीक्षेची अपॉइंटमेंट घ्यायची ठरवली. लागणारी कागदपत्र गोळा करुन मी (अमेरिकेत गाडी चालवण्यात) सिनियर पब्लिकला त्यांचे अनुभव विचारायला सुरुवात केली. इथेही इंजिनियरिंग च्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. सिनियर्स चे चेहरे वेगळे, परीक्षा वेगळी, देश वेगळा पण उत्तरं तीच! ' काय नाय रे एकदम सिम्पल असतं, माझा पहिल्या अटेम्प्ट मध्ये निघाला म्हणजे बघ किती सोप्पा असतो पेपर' पासून ' दोनदा द्यावीच लागते.. पहिला चान्स देवाचा म्हणून सोडून द्यायचा.. अनुभव येतो. पुढच्या अटेम्प्ट ला नक्की पास करतात!' अशी दोन्ही टोकाची उत्तरं मिळाली!! शेवटी नाय-होय करता करता मी एकदाची अपॉइंटमेंट घेतली आणि आर टी ओ (वाचा सेक्रेटरिएट ऑफ स्टेट) ऑफिस मधे गेलो.

अमेरिका म्हटल्यावर सगळं हाय-फंडू असा जो माझा समज करून देण्यात आला होता त्याला या लर्निंग लायसन्स टेस्ट ने सुरुंग लावला...

उत्तरार्ध

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

ताळेबंद-उरलेला

आंतरजालावरून साभार
ताळेबंद: जमेल तेवढा

आमच्या ऑफिसमध्ये घरभाड्याची पावती आणि प्रवासभत्ता (म्हणजे एल्टीये ) यावर करसवलत मिळते. त्यामुळे सरसकट सगळेच कुठूनतरी पावतीपुस्तक आणून पावत्या तयार करून सबमिट करतात. मीपण तसली एक पावती तयार करून त्यावर स्ट्याम्प तिकीट चिकटवत होतो. एक खोटी सही मारली कि पावती तयार!तेवढ्यात आमच्याच हापिसातला एक नुकताच नोकरीला लागलेला पोरगा येउन विचारतो कसा, "हा करता तो भ्रष्टाचार नाही का?" वरून "राजकारणी त्यांच्या लेवल वर भ्रष्टाचार करतात... तुम्ही तुमच्या!" असंही म्हणून गेला! नेमकं त्याचवेळेला माझ्या जिभेवर तिकीट होतं म्हणून वेळ निभावून नेता आली; नाहीतर त्याला काय प्रत्युत्तर द्यायचं हेच मला कळलं नसतं! एक ज्युनिअर येउन अपमान करून जातो म्हणजे काय? तर असो.

बाकी मला अशा ज्युनिअर्सचा, सुनेला सासुरवास करणाऱ्या सासवांचा, बायकोला मारझोड करणाऱ्या नवऱ्यांचा, शिक्षकांना उलट उत्तरं देणाऱ्या पोरांचा, रस्त्यात हुज्जत घालणाऱ्यांचा, बस मध्ये एका दाराने चढून कंडक्टर पोचायच्या आत  त्याच दाराने  उतरणाऱ्यांचा, तिकीट न काढताच लोकल प्रवास करणाऱ्यांचा, बायका-पोरींशी बिंधास  बोलणाऱ्यांचा, ऑफिसमध्ये बसून ऑफिसच्या वेळातच ऑफिसमधल्या लोकांकडे  ऑफिसमधल्या लोकांच्याच कागाळ्या करणाऱ्यांचा अशा अनेक लोकांचा वेळोवेळी प्रचंड आदर वाटत आला आहे. मानतो बुवा आपण त्यांच्या डेरिंग ला!! तसा मी मधून मधून इतर लोकांमागे जाऊन  (चौकात मामा नाहीये याची परत परत खात्री करून) सिग्नल वगैरे तोडतो परंतु यापेक्षा जास्त बंडखोरी या जन्मात जमेल असं  वाटत नाही. पोलिस कशाला अगदी होमगार्ड लोकांची पण मला दहशत वाटते. लहानपणी तर मी खाकी कपड्यामुळे पोष्टमन लोकांना पण घाबरत असे पण पुढे मोठा झाल्यावर टोपी आणि पोट यावरून मी पोलिस आणि पोष्टमन वेगवेगळे ओळखायला लागलो.

छंद म्हणायला गेलात तर तसा काहीच नाही. लहानपणी नाणी जमवायचा प्रयत्न केलेला आठवतोय पण भारतीय नाणी सोडून इतर देशांची नाणी जमवायची म्हणजे खायचं काम नाही हे लक्षात आल्यावर तो नाद सोडून दिला. मग सोपं पडेल म्हणून काड्यापेट्या जमवायला लागलो. त्या मात्र थोड्याफार जमवल्या. पण मी कोणाला माझ्या छंदाबद्दल सांगितले नव्हते. एकदा आमच्या मातोश्रींनी कचरा समजून सगळ्या काड्यापेट्या एकत्र करून त्याला काडी लावली. मी नसताना! मला ते कळल्यानंतर मी रडून धिंगाणा घातला होता. पुढे मोठा झाल्यावर बायोडाटा मध्ये कोणाचं तरी बघून मी 'लिसनिंग म्युझिक' असा छंद लिहायचो. पहिल्याच मुलाखतीत कुठल्या पद्धतीचं संगीत आवडतं ? आणि आवडते संगीतकार कोण वगैरे अवघड असे प्रश्न त्या छंदामुळे पडल्यामुळे माझी विकेट  पडली होती. ताबडतोबीने छंद बदलून मी "रिडिंग" करून टाकला! त्यापुढच्या इंटरव्यूत विचारल्या गेलेल्या "काय वाचायला आवडतं ?"  या  प्रश्नाचं माझं "पेपर" हे उत्तर ऐकून प्रश्नकर्ता गडबडल्याचं  आठवतंय!

व्यसन म्हणायला गेलात तर वडील पैसे देत होते तेव्हा बरीच केली.. 'जे मला पाहिजे ते मी मिळवतोच' ह्या जाहिरातीतल्या खोट्या आवेशापाई मी बरेच दिवस ब्रिस्टल ओढ़त असे.. नंतर मी पैसे कमवायला लागल्यावर फोर स्केअर वर आलो.. लग्न झाल्यावर मात्र व्यसन न करण्याचं व्यसन लागलं.. जेमतेम घरखर्च चालवू शकेन इतपत नोकरी मिळाल्यावर काही महिन्यातच स्थळ सांगून आलं. हे मुला मुलींनी बाहेर भेटायचं फ्याड मला तितकसं पसंत नव्हतं परंतु दोन्ही पार्ट्यां कडून आपण कसे एडवान्स आहोत हे दाखवायची स्पर्धा असल्याने ही नौबत आली होती.. शिवम हॉटेल ही इडली डोसा चापायची आणि सांबर ओरपायची जागा. भविष्याचे आराखडे हे रूपाली-वैशालीत बांधायचे या माझ्या मताला कोणी कसपटाची किंमत दिली नव्हती! "उलट त्या पोरीनेच सुचवलं आहे-थोडं स्वस्त.. थोड़े पैसे वाचवायला शिक.." असं सुनवण्यात आलं. 

मी थोडा भाव खायचा म्हणून उशिराच पोचलो तरी तिचा पत्ता नव्हता. मग काहीतरी चाळा पाहिजे म्हणून एक गुडनगरम मारली तेवढ्यात ती आली..  तिने मला ऑर्कुटवर पाहिलेलं  होतं त्यामुळे ओळखलं,  मी पण तिचा फोटो आधी बघितल्यामुळे(च) तिला ओळखलं. (हिच्या ऑर्कुटवर करीना कपूरचा फोटो लावला होता!) ती माझ्या दिशेने आली आणि हाय हॅलो च्या आधी तिने
"शी बाई हा वास कसला? तुम्ही सिग्रेट पिता की काय?" असा  प्रश्न केला!
कोणतीही मुलगी हे असं डायरेक् विचारू शकते हे मला माहीत नव्हतं..आणि "मुलगा सुस्थापित - निर्व्यसनी" अशी माझी धड़धड़ित खोटी जाहिरात केली गेली होती हे मला मुलीकडून कळलं! 
"आं.. नाही मी ते आपलं हॉल्स आणायला गेलो होतो.. तेव्हा एक मित्र भेटला तो सुट्टा मारत-म्हणजे ते फुकत-आपलं ते हे-सिगरेट ओढ़त होता आणि ते म्हणतात ना.. धूर…  धुर माझ्यावर सोडत होता.." उजव्या हाताची दोन बोटं ओठांसमोर हलवून मी तिला एक्सप्लेनेशन देत होतो आणि डाव्या हातातल्या दोन हॉल्स तिला देत होतो. 
" तेच म्हटलं, मला तर सांगितलं होतं की सुपारीच्या खांडाचंपण व्यसन नाही मुलाला.. मला हा सिग्रेटच्या धुराचा वास अजिबात सहन होत नाही.. लग्नानंतर तुम्ही असल्या मित्रांची संगत सोडाल तरच बोलू आपण पुढे!" आयुष्यात एक गोष्ट मी  स्वत:च्या मताने करत होतो ती पण आता सोडली पाहिजे! 'नाय' म्हटलं तर "मी फुकतो" याची जाहिरात होणार आणि पोरगी स्वतःहुन पटेल असं दाखवण्यासारखं माझ्याकडे काहीही नव्हतं आणि नाही! शाळा कॉलेजात " आपल्याला काय इंट्रेस्ट नाय रे पोरींबिरित! " असं सांगून पोरगी न पटण्याचं शल्य दोघाचौघात जाहिरपणे लपवता येत असे पण आयुष्याच्या शाळेत,आपल्याला फोटो बघून पसंत केलेलं असताना, निव्वळ सिगरेटीच्या मोहापायी आपण ते नाकारावे याची मला हिंमत होईना. पुढचा तास भर तिने माझा इण्टरव्यू घेतला आणि मी आयुष्यभर तिच्या ताटा खालचं मांजर बनून राहू शकतो याची तिने खात्री केल्यावर मी आमचं दोघांचं बिल भरलं.

असो. यथावकाश (वशिल्याने का होईना) नोकरी मिळाली, छोकरी मिळाली आणि छोकरी झाली सुद्धा! तशी ती होईपर्यंत लहान पोरं मला कधीच आवडली नाहीत. मी स्वतः लहान असेपर्यंत "मुले हि देवाघरची फुले" हे वाक्य मला आवडत असे पण मोठा झाल्यावर आणि नातेवाईकांची वगैरे खरोखरीची मुले बघितल्यानंतर वरचे वाक्य साफ खोटे आहे यावर माझा पक्का विश्वास बसला. कोणाच्याही घरी लहान मुल असले आणि मी काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर साधारण ९० टक्के वेळ हा त्या लहान पोराचं/पोरीचं कौतुक ऐकण्यात जातो! त्यात त्या लहानग्याने दाराची कडी कशी लावून घेतली इथपासून टीव्हीचा रिमोट कसा लपवून ठेवला इथपर्यंत सगळ्याचा समावेश असतो.
लहान मुलांनी चष्मा तोडला-कौतुक  ; मोठी चप्पल घातली आणि धडपडली-कौतुक ; घाणेरड्या पायाने गादीवर/सोफ्यावर चढून उडी मारली -कौतुक; पिठाचा डबा सांडला-कौतुक; झोपलेल्या माणसाची मिशी/शेंडी ओढली- कौतुक आणि वरून कित्ती लब्बाड माझं पिल्लू चं पालुपद! वास्तविक पाहता याच गोष्टी जर कुणा मोठ्याने केल्या तर त्याला अद्वातद्वा बोलणाऱ्यांना लहानाने केल्यावर त्याचं काहीच वाटत नाही हे विशेष! !

लग्नानंतर एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. म्हणजे त्याने बोलावलेलं मुलाच्या महिन्याभरानंतर केलेल्या बारशाला, पण स्पष्ट सांगायचं तर मी जेवणाच्या वेळेच्या जरा आधीच जातो. लग्न , मुंजी, वाढदिवस बारशी या सगळ्यात जेवण हाच मुख्य कार्यक्रम असतो.. तर फ्लेक्स वर आधीच छापून आणलेले आणि भिंती आणि पाळण्यावर लटकवलेले नाव बाळाला ठेवण्याचा औपचारिक कार्यक्रम आटपल्यावर आमच्या बायकोने त्याच्या गळ्याच्या शिरा ताणून रडणाऱ्या लहान म्हंजे अगदीच इतकुश्या मुलाला खेळवायला सुरुवात केली. तेवढ्यात मित्राच्या बायकोने तिला हाक मारली तर तिने ते लटांबर (दुपट्या बीपट्या  सकट) माझ्याकडे सोपवलं आणि आत गेली. त्या गोळ्याने रडणं थांबवून जरावेळ माझं निरीक्षण केलं. तोंडातून थुंकी काढून दाखवणे, फुर्रर्र करणे वगैरे शक्य तितके किळसवाणे प्रकार केले आणि एकदम हातपाय हलवायचे थांबला! मला माझं पोट गरम होत जातंय असं  जाणवलं आणि झटक्यात शर्ट ओलेते झाले! मी गडबडून बायकोला हाक मारली. तर तिने येउन "अग्गोबाई, थांब्ला कि रडायचा" वगैरे म्हणून त्या मूढ मंद गोळ्याचंच कौतुक करायला सुरवात केली! वरून मित्राच्या बायकोला बोलावून तिच्या पोराने माझ्या पोटावर फार मोठ्ठा पराक्रम गाजवला आहे अशा पद्धतीने तिला काहीबाही सांगू लागली. माझी अवस्था काय झाली म्हणून सांगू तुम्हाला! एकदा का पाणी कपड्यांच्या आतून पोटाच्या खाली उतरलं कि मग तुम्ही कोणाचे राहत नाही हे काय मी सांगायला हवं? असो! मित्र फिदीफिदी हसत इतरांना त्याचं पोर नेमकं ऑफिसला जायच्या वेळी त्याचे कपडे कसं भिजवतं जे कौतुकाने सांगत बसला.. वहिनींनी मित्राचे शर्ट प्यांट ऑफर केले खरे पण "प्रॉब्लेम बाहेरच्या कपड्यात नाहीये" हे चारचौघात सांगण्याचं अवसान मी काही जमवू शकलो नव्हतो! माझ्या भिडस्तपणामुळे हापिसात मला इतरांना माझंच  काम समजावून सांगत येत नाही, अहो साधं सलून वाल्याला केस कसे कापून हवे आहेत ते सांगता येत नाही. तर इतर कोणाच्या बायकोला एवढ्या अवघड गोष्टी कशा काय सांगणार? दुर्दैव म्हणजे या लहान कार्ट्याना कसा कोण जाणे पण मी आवडतो नाहीतर आईशिवाय कोणाकडेही गेल्यास कर्कश्श आवाजात भोकाड पसरणारी कार्टी माझ्याकडे शांत कशी काय राहिली असती? आमच्या मुलीच्या बाबतीत मी मात्र असं  काही करत नाही. माफक लाड करतो म्हणा.. पण ते वेगळं! आमची पोरगी या बाकीच्या कार्ट्यांसारखी नाहीये मुळी!!

बाकी तसा माझा हा भिडस्तपणा 'झाकली मुठ' सुद्धा ठरला आहे म्हणा! सासुरवाडीला गप्प बसून राहण्यामुळे काही अनपेक्षित गोष्टी पदरात पडल्या आहेत. हापिसात नेमाने दिवाळीला सलग सुट्ट्या मिळत आहेत. सासुरवाडीला पहिल्या दिवाळसणाला अंगठी दिल्यावर मी गप्प बसून राह्यलो तर सासर्च्यांनी 'मी नाराज आहे' असा अर्थ लावून चेन दिली. तरी मी गप्पच बसलो. बायकोने 'ते तस्सेच  आहेत' असं  सांगितलं नसतं तर अजून काहीतरी मिळालं असतं.  पण असो.. थोडक्यात सुख महत्वाचे! माझ्या मागे दागिने करून द्यायला तगादा लावणारी ही मला काही मिळतंय म्हटल्यावर नको म्हणते याचीच मला कमाल वाटली होती!

तर दागिन्यांनंतर आमच्या बायकोला (आणि त्यामुळे मला) कसलं कौतुक असेल तर सिनेमाचं. प्रत्यक्षात तर हिरो वाट्याला आला नाही तर निदान पडद्यावर बघून खुश होऊ हा हेतू असावा तिचा; पण माझी जाम गोची होते. मी एवढा इन्व्हॉल्व्ह होऊन जातो की विचारू नका.. पडद्यावर अमिताबच्चन (हे असंच म्हणतात ना?) ने रडण्यासाठी डोळे लाल केले कि माझ्या डोळ्यातून टीपं गळायला लागतात, कुठल्या सस्पेन्स सिनेमात दरवाजा करकरला कि माझी हवा टाईट होते, कोणी मारामारी करायला लागलं की उसना जोश चढतो! घरात टीव्ही वर पण बातम्या वगळता काही चालू असलं की माझं असं होतं. कितीही कंट्रोल करायचं म्हटलं तरी त्या हिरो च्या जागी स्वतःला बसवल्याशिवाय माझं सिनेमा बघणं पूर्ण होत नाही.  नवीन लग्न झाल्या झाल्या आमची ही 'चला न, पिच्चर्ला जावया' म्हणायची आणि आम्ही जायचो सुद्धा!! पण नंतर एकदा 'धूम थ्री' सिनेमा बघून आम्ही आमच्या हिरो होंडा सी-डी हंड्रेडवरून घरी आलो आणि त्यानंतर तिने परत कधी सिनेमाला जाण्याचा लकडा लावला नाही. का कोण जाणे! मग आम्ही सुद्धा कधी सिनेमा बघायला थेट थेटरात गेलो नाही! हल्ली त्या मैत्रिणी मैत्रिणी मिळूनच जातात. आपला त्याला सुद्धा आक्षेप नाही.. 

तर असं आपला अगदी आत्ताआत्तापर्यंत चा जीवनप्रवास.. जाम म्हणजे जाम बोर. पण लहानपणापासून  लाईफमध्ये तसं पब्लिकला खुलवून खुलवून सांगण्यासारखं काही घडलंच नाही. म्हटलं तर आताच्या तुलनेत गरिबी होती पण माझ्या बरोबरीचे सगळेच तसे होते तर माझ्याच गरिबीचं काय म्हणून मार्केटिंग करणार? 'चालत 4 किलोमीटर शाळेत जात असे' म्हणावं तर माझ्या शाळेतली सगळीच तशी येत असत! आणि शाळा जितकी आवडली नाही तितका जास्त मला तो जाण्यायेण्याचा प्रवास आवडत असे..लहानपणी 'मिणमिणत्या बल्बच्या उजेडात अभ्यास करत असे' म्हणावं तर झगझगीत ट्यूबच्या उजेडात अभ्यास करून मी जीवनात काय असा उजेड पाडणार होतो? माझ्या आयुष्यात घडलेले प्रसंग कित्येकांच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने घडलेच असतील पण म्हणून काय मी आत्मचरित्रच लिहायचं नाही काय?

तसं तिशीत गेल्यावर असलं काहीतरी लिहिणं हे अतीच होतं पण मला आताच लहानपणीचे किस्से अंधुक आठवतात तर आत्मचरित्र लिहीणाऱ्या  महान लोकांना सत्तर-ऐंशीव्या वर्षी त्यांच्या बालपणातले प्रसंग जशेच्या तशे कशे काय आठवतात कोण जाणे. आता तसाही महान बिहान होण्याचा माझा चान्स एव्हाना संपल्यातच जमा आहे.. पदरात (बायको आणि बायकोच्या पदरात ) मुलगी आहे. त्यामुळे अगदी काही असामान्य करायचा विचार जरी आला तरी परिस्थितीची जाणीव  कर्तृत्वाला लगाम घालते.. (वा वा! क्या बात है! असली वाक्य ऐकायला बरी वाटतात आणि मला कधी कधी सुचतात याचपण माझं मलाच कौतुक वाटतं.) म्हणून म्हटलं, आठवतंय तेवढं लिहून काढावं. अगदीच चरित्र लिहायचं झालं तर मूळ साचा तयार असावा! त्यातल्याच काही गोष्टी मीठमसाला लावून अजून रंजक करून टाकता येतील. मला उपयोगाला नाही आलं तरी इतरांना-त्यांच्या आत्मचरित्रात!

थोडक्यात एखाद्या सामान्य माणसाचा या वयापर्यन्तचा ताळेबंद थोडाबहुत असाच असेल. आतापर्यंत आयुष्यात जे जे घडलं आहे त्यातलं एवढंच लक्षात आहे त्यामुळे डायरेक 'संपलं' असं म्हणण्यापेक्षा एखाद्या साहित्यिकासारखं 'आटोपतं घेतो'! धन्यवाद...

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

ताळेबंद-जमेल तेवढा

आंतरजालावरून साभार
मी अमुक अमुक..अं हं हं.. लगेच फेसबुकवर शोधू नका.. तुम्हाला वाटतोय तो मी नव्हे. अहो खूपच कॉमन नाव आहे माझं. असो.. आज काय प्रयोजन.. तर तसं काहीच नाही. बोलावसं वाटलं म्हणून बोलतो. जेव्हापासून मला समज आली तेव्हापासून खूपदा हे असं फिलिंग येतं मला, पण घडाघडा बोलून टाकता येत नाही. शाळा कॉलेजात- वर्गात असताना ब-याचदा मला शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर येत असत..पण मी कधी बोललो नाही. गुरुजी बाई म्याडम किंवा सरांनी प्रश्न विचारला आणि 'मला उत्तर येतंय' असं वाटत असलं कि प्रत्येकवेळी 'ह्या..एवढं सोप्प असतं तर थोडीच विचारलं असतं?' किंवा 'त्या हुशार मुलाने/मुलीने हात वर नाय केला मग आपण कसा करायचा?'  किंवा ' सांगितलं आणि चुकलं तर? आणि मग सगळे हसले तर?' हा अधिकचा प्रश्न मला पडायचा आणि मी उत्तर देणं टाळायचो. नंतर कोणीतरी उत्तर दिलं आणि ते माझ्या उत्तराशी जुळत असलं कि हळहळ वाटायची.. तेव्हा आज ठरवलं कि वाटतंय न मग बोलून टाकूया..ऐकायचं ते ऐकतील.नाय ते सोडून देतील. इथे मार्क थोडी ना आहेत..

आता मी काही लेखक वगैरे नव्हे त्यामुळे साधं शुद्ध लिहायलाही जमत नाही. पण निदान नेहमी ऐकतो तसच्या तसं लिहायचा प्रयत्न करतो. सिंह शब्द 'सिंव्ह' असा म्हणायचा आणि 'सिंह' असा लिहायचा यामुळे काय साधतं ते मला पण कळलं नाही! (होय ला पद्धतशीर 'होय' लिहायचं पण नाय ला 'नाही' असं का? ते कळत नाय-आपलं-नाही) हल्ली शेजा-याचा तिसरीतला मुलगा किंवा पहिलीतली मुलगी असले प्रश्न विचारतात..उत्तर नाही आलं तरी त्यांचं कौतुक वाटतं. कबूलच करायचं झालं तर मला हा प्रश्न तिने विचारेपर्यंत पडला नव्हता! हल्लीची पिढी खूपच हुशार. जनरेशन ग्याप ला ग्याप म्हणायला लाज वाटावी एवढी मोठी झाली आहे ती..ग्याप कसली दरी आहे मोठ्ठीच्या मोठी.

मी शाळेत असताना, कधीतरी खर्चाला मिळणा-या ५ रुपयाच्या नोटेवर 'मैं धारक को अमुक अमुक रुपये अदा करने का वचन देता हुं' असं का लिहिलेलं असतं हा मला पडलेला आणि कोणाला उत्तर माहित नसलेला कठीण प्रश्न! मला असं प्रश्न पडला आणि पडू शकतो याचा मला कोण अभिमान वाटला होता. त्यानंतर मग कठीण म्हणावा असा प्रश्न पडला नाही. कधी पडलाच तर त्याच उत्तर 'येवढा मोठ्ठा झालास तरी साधं येवढं कळत नाही?' किंवा 'नुसता वाढला रेड्यासारखा पण अक्कल काडीची नाही' किंवा 'गप्प बस' यापैकी एक होतं. तसंही मी प्रश्न विचारतोय आणि समोरच्याने उत्तर देणं अपेक्षित आहे हे प्रसंग सुद्धा माझ्या आयुष्यात मोजकेच आले. अन्यथा बायको, शिक्षक, प्रोफेसर्स, नातेवाईक ,साहेब हा प्रवर्ग अनुक्रमे घर, शाळा,युनवर्सिटी,  हॉपीस या ठिकाणी खिंडीत गाठून मलाच प्रश्न विचारण्यासाठी जन्माला आला होता याबद्दल माझ्या मनात अजूनतागायत शंका नाही.

शाळेत शिकलो मराठी मिडीयम मधून पण फक्त म्हणायला आणि इलाज नव्हता म्हणून. अभ्यास वगैरे जेमतेमच केला. आता 'जेमतेम केला' म्हणजे तेवढाच यायचा. जास्त करायचा ठरवला असता तरी मला करता आला नसता.  आमची आई तर सुरुवातीला "आमच्या वेळी आम्हाला परिस्थिती मुळे  जमलं नाही, तुम्ही शिकून मोट्ठे व्हा' वगैरे डायलॉक्स मारायची. मी खूप इमोश्नल  होऊन जायचो आणि तावातावाने पुस्तकाचं पहिलं पान वाचून काढायचो.  इंग्रजीचं असेल तर डिक्शनरी वगैरे उघडून बसायचो.पण कितीही इमोशनल झालो तरी माझा उत्साह दीड पानात गळून पडायचा. कांबळी नि तेंडल्याचं करियर जास्त आकर्षक वाटायचं! अशी कित्येक पुस्तकांची पहिली पानं मी कित्येकदा नव्याने वाचली आहेत पण परीक्षेत कधीच पहिल्या पानात उत्तर असणारा प्रश्न कधीच विचारत नाहीत हे इतक्या परीक्षांच्या अनुभवांवरून मी छातीठोकपणे सांगू शकतो! अपवाद आमच्या दहावीत असणारा 'नरिंद्रबासा भेटी अनुसरण' नावाचा टुकार एक पानी धडा! तो अक्खा धडा पाठ असूनही त्यावरच्या एकाही प्रश्नाचं उत्तर धड जमलं नाय बुवा. त्या धड्यावर थोडक्यात उत्तरं असूदेत किंवा संदर्भासहित स्पष्टीकरण असुदेत मी जवळपास सगळा धडाच लिहीत असे आणि जमतील तितके मार्क गोळा करीत असे!

तर एवढा(स्सा) अभ्यास करूनपण आईचं  तेच पालुपद!  "आमच्या वेळी आम्हाला परिस्थितीमुळे जमलं नाही आणि हे कार्टं  बघा!" एवढाच काय तो वाक्यात बदल. त्यामुळे मी माझं बरचसं लहानपण मी खूप मोठ्ठ्या भावनिक दबावाखाली काढलं. पण इतरांना आणि त्यावेळी मलादेखील ते कळलं नाही. जरा मोठं झाल्यावर एकदा मला बाहेरून परीक्षा देता येतात ते कळलं. मला वाटलं आईसाठी हि चांगली संधी आहे. पुढे एकदा तिने तो पठडीतला डायलॉक मारल्यावर मी म्हटलं कि "आई, आता तू अभ्यास करून बाहेरून परीक्षा देऊ शकतेस!" तर जी भडकली म्हणता! पाठीचं धीरड  होईपर्यंत धोपटलं  मला. जाम रडलो होतो तेव्हा. त्यानंतर समजलं कि   मला निव्वळ इमोशनल ब्ल्याकमेल करण्यासाठीच तिला ते वाक्य आवडायचं कारण त्यानंतर तिने कधीच हे वाक्य माझ्यावर फेकलं नाही!

बाबांनी तर मला जाम धुतला आहे. माझ्याच वस्तू मोडणे, हरवणे, वापरण्याच्या लायकीच्या न ठेवणे, नवीन वस्तूंसाठी हट्ट करणे, बेहिशेबी मालमत्ता जमवण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या लक्षात येईल इतका जास्त वेळ खेळणे अथवा घराबाहेर घालवणे, अभ्यास न करणे इत्यादी (माझ्या दृष्टीने) किरकोळ गुन्ह्यांकरता त्यांनी आपला हात साफ करून घेतला आहे. कधी कधी तर त्यांना फक्त खुमखुमी आली म्हणूनही फालतू कारण उकरून काढून धोपटला असावा असा माझा कयास आहे! मी मोठा झालो आणि सरकार-मध्यमवर्ग, पोलीस-मोर्चेकरी, सरकारी अधिकारी- गरजू व्यक्ती याची नाती बघतो तेव्हा कळतंय कि उलट मारू न शकणाऱ्याला असंच धोपटण्यात कोणालाही मजाच येत असावी! आमचं  कुठलं एवढं सुदैव?

आता जेमतेम तिशीचा आहे मी.. थोड इकडे तिकडे..(खरंतर बराचसा तिकडेच) पण आताच 'आमच्या काळात हे असं होतं' म्हणण्यासारखी परिस्थिती बदलली आहे.  काय महाग झाल्याहेत वस्तू. सोनं 30000 रुपये तोळा झालंय म्हणे.. जेमतेम 3000 रुपये तोळा असतानाचे दिवस माहित आहेत आहेत मला.. पेट्रोल तर 10 रुपयाने होतं. आमची आजी लहानपणी 'आमच्या काळात 300 रुपयाने होतं सोनं' वगैरे गोष्टी सांगायची पण त्या हिशेबाने मी सत्तरीत पोचल्यावर आताचे रेट असणं अपेक्षित होतं पण काहीतरी गंडलंय खरं. महागाई वाढली असं म्हणायला गेलो तर परवा टीव्ही  घेतला, आमच्या बाबांनी दहा-पंधरा वर्षापूर्वी घेतला होता त्याच किंमतीत आणि  त्याच्यापेक्षा कैकपट भारी. काय पिक्चर क्वालीटी आहे म्हणून सांगू..

लहानपणी या टीव्ही वरची 'मम्मी' बघून मला शिवाजी महाराजांसारखं  'अशीच अमुची आई असती वगैरे वाटायचं'  पण आमच्या आईकडून तर बहुतेकदा मार आणि रोजच्या दोन वेळच्या जेवण्याव्यतिरिक्त इतर काही खायलाही मिळालंही नाही..  मॅगी वगैरे तर लांबची गोष्ट! तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराज आणि त्यांच्यासारख्या मोठ्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींना ते मोठे झाल्यावर महत्व आलं असावं. कारण एकदा एका १ ऑगष्टला टिळकांवरती बाकीच्यांनी केलेल्या भाषणं प्रेरित होऊन, मी वर्गात 'मी कागद फाडला नाही मी कपटे उचलणार नाही असं सांगितलं होतं' पण त्याला कोणीच 'बाणेदारपणा' वगैरे म्हटलं नाही. बाईंनी २५ उठाबशा काढायला लावल्या आणि झाडू घेऊन सगळा व्हरांडा झाडायला लावला होता. तेव्हापासून माझी हि समजूत दृढ होत गेली आहे.

'उच्च' शिक्षणासाठी (म्हणजे बी ए) मुंबईत गेल्यानंतर कॉलेजामधली एकंदर परिस्थिती बघता मला मराठी मिडीयम मधून शिकल्याची तशी लाजच वाटायची. बाहेरच्या राज्यातून आलेली मुलं हिंदी इंग्रजी बोलून एकमेकांवर ,शिक्षकांवर आणि विशेषकरून मुलींवर छाप पडत असत. आलेल्या मुलांवर मी उगीच हिंदीतून बोलून इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करायचो. ती पोरं हिंदीतून बोलायची तेव्हा मला कधी मराठी बोलावसं वाटलं नाही. मला वाटायचं कि असं केलं तर पोरं मलाच हसतील.आणि फ़क्त मीच असा नव्हतो..बरेच होते.. 'इंग्रजी बोलता न येण्याचा न्यूनगंड फ़क्त हिंदी बोलून दूर सारता येतो' या मताचे.. त्यामुळे माझं इंग्रजी तसंच राहिलं आणि मराठी असल्याचा सुगावा इतरांना लागू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहिलो..आईवडिलांनी इंग्लिश मिडीयम च्या शाळेत न घातल्याबद्दल त्यांना दूषणं  देत बसलो!बरेचसे तसंच करायचे.

एक मात्र होतं, कॉलेजात गुजराती पोरं एकमेकांशी गुजरातीतून बोलत, आंध्रची तेलुगुतून, केरळची मल्याळीतून परंतु हीच मुलं शिक्षकांशी, जमत असेल तर अस्खलित, नसेल तर तोडक्या मोडक्या इंग्रजीतून बोलत.. आम्ही मराठी मात्र एकमेकांशीही हिंदीतून बोलत असू आणि शिक्षकांशीही.. मराठी वापरली ती फ़क्त शिव्यांपुरती! मराठी शिकू पाहणाऱ्या परप्रांतियांना शिकवल्या त्या मराठी शिव्या! त्या मुलांना कधी मराठीमुळे अडेल अशी वेळच येऊ दिली नाही.. कायम त्यांचा भाषान्तरकार म्हणून वावरलो.पण मी मिक्स नाही होउ शकलो.. खरतर त्यानाच मी कितपत हवा होतो काय माहीत! त्यांच्या ग्रुप मध्ये मी असताना ते एकमेकांशी त्यांच्या भाषेत बोलत असत; मला समजत नाही याचा विचार न करता.. परंतु मी मात्र, ग्रुपमध्ये एखादाही मराठी न समजणारा असा कोणी असेल तर त्याला कळावं  म्हणून न चुकता हिंदीतून बोलत असे. सहिष्णुता कि सगळा व्हरन्याक असल्याचा परिणाम! कोण जाणे? असो.. आता मुलीला इंग्रजी मीडियम शाळेत घालून पापक्षालन करीन म्हणतो..

शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी फार आटोकाट प्रयत्न केले..  पण स्वतःची पब्लिसिटी करणं मला जमलंच नाही. 'मी आहे तसाच मला घ्या आणि मला हव्या त्या पगारावर ते पण मुंबईतच!!' हा मित्रांच्या टोळक्या बरोबर जमवलेला उसना एट्टीट्यूड पहिल्या काही मुलाखतीत गळून पडला.. "तुम्ही म्हणाल ते आणि पडेल ते काम करायला तयार आहे..काही महीने फुकट करतो हवं तर! तेही कुठेपण" इथपर्यंत माझं ट्रांझिशन व्हायला काहीच दिवस पुरले. बाबांच्या वशिल्याने मी पुण्यात आता आहे तिथे नोकरीला लागलो. तिथपासून आजवर केवळ नोकरी टिकवणे हा माझा उद्देश राहिला आहे. नोकरीवरुन तड़काफड़की काढू नये आणि शक्यतो सुट्टीच्या दिवशी सुट्टी मिळावी या दोन माफक अपेक्षा घेऊन मी पाट्या टाकत आहे! 

घरी आलो की मात्र नेमाने दमल्याची ऍक्टिंग करतो.. ते पण मला सुरुवातीला माहित नव्हतं पण नवीन लग्न झाल्यानंतर  पहिले काही दिवस  ऑफिसातून आल्यावर बायको ' दमला असाल ना, चहा करते' असं म्हणत असे.. दिवसातला तो तासभर बसल्या बसल्या चहा मिळतो, कुठे जायचा धोशा मागे लागत नाही, हवं ते चॅनल बघता येतं, कसल्या घरगुती तक्रारी सांगितल्या जात नाही, डोळा लागला तरी खपून जातं या आणि अशा विविध फायद्यांची जाणीव झाल्यामुळे मी ती एक्टिंग करायला लागलो आणि नंतर ती अंगवळणीच पडली! नाहीतर दिवसभर खुर्चीत बसून कसला आलाय थकवा? माझ्या बघण्यातला बैठं काम करणारा कोणीही नोकरदार दिवसभर मान मोडून फक्त काम करतोय आणि खरोखर 'दमलाय-बिमलाय' असे पाहण्यात नाही.. पण वर्षानुवर्षे ऑफिसमधून येणाऱ्या नोकरदार पुरुषवर्गाला घरात हक्काने मिळणारा परंपरागत वेळ आपण का उपभोगू नये हे आपले माझे मत! अर्थात कच्चेच! 

नोकरीच्या ठिकाणी सुद्धा माझी फारशी पक्की मतं नसतात. त्याक्षणी त्यावेळी मला जे पटेल तेच माझं त्यावेळचं मत असतं.  आता बघा, सरकारी लोक, राजकारणी हे लोक करत असणाऱ्या करप्शन विरोधात मी कधीकधी तावातावाने बोलतो  (म्हणजे अजूनपर्यंत तीनदा बोललोय) आणि माझा राग व्यक्त करतो. सगळीकडेच. परवा तर म्हणजे गंमतच झाली....

ताळेबंद : उरलेला

मंगळवार, १२ मार्च, २०१३

टीव्ही आणि प्रत्यक्ष

जिलेट ची आई : बेटे, (शेविंग क्रीम ची) एक ट्यूब काफी है ?
जिलेट : हाँ माँ .. एक ट्यूब महीनों चलती है ।

खरा मुलगा : ए आई, तुला यातलं काय कळतं का?
_____________________________________________________________

पियर्स ची आई : हे काय आहे?
पियर्स : उन!!
पियर्स ची आई : उन ? (गायला लागते ) याय याय याय .. इथे तिथे...सांगा सांगा सांगा..लपवायचं कुठे ??

खरी आई : उन ? (हसायला लागते) कुठे शिकलीस हे वेडे चाळे ?
______________________________________________________________

फ़ेअर and लव्हली (विंटर) ची मैत्रीण : (कोल्ड क्रीम घेऊन फ़ेअर and लव्हली मागे धावत ) ए हे लाव ना..आधी तर थंडीमध्ये हेच लावायचीस.. आता का नको?
फ़ेअर and लव्हली (विंटर) : आता नाही.. आता माझ्याकडे आहे फ़ेअर and लव्हली विंटर क्रीम

खरी मुलगी : तुला काय करायचंय? नाय लावायचं म्हटलं ना एकदा? आणि आता हे मागे धावणं बंद कर,.. बरं नाही दिसत ते.. लोक उगीच आपल्यावर संशय घेतील!
_______________________________________________________________
क्लोज अप मुलगा : (तोंडातून उच्छवास सोडत ) हा SSS ... पास आओ... पास आओ..
क्लोज अपची मैत्रीण : (वासाने धुंद होउन डोळे वगैरे मिटून घेते.. आणि त्याच्याबरोबर नाचायला लागते..)

खरी मैत्रीण : ' ए तोंड धुऊन आला नाहीस का स्वच्छ ? अजून पण पेस्ट चा वास येतोय!! यक्क !!
________________________________________________________________
बोर्नव्हीटा : दुधात बोर्नव्हीटा घाला यामुळे (आईकडे बघतो)
बोर्नव्हीटा ची आई : .. (अगतिकपणे) दुधातलं कॅल्शियम वेस्ट नाही होत..

खरी आई : (रागावून) आता तू मला शिकवणार? गुपचूप पी दिलंय तसं दुध.. थंड झालं तर परत गरम नाही करणार..
________________________________________________________________

फ़ेअर and लव्हली (फेयरनेस ट्रीटमेंट ) : एक दोन तीन.. झाली फेयरनेस ट्रीटमेंट.. पुढची appointment कधी?
फ़ेअर and लव्हली (फेयरनेस ट्रीटमेंट ) ची मैत्रीण : (ट्यूब हातात नाचवत )आता पुढची appointment माझ्या घरी..
फ़ेअर and लव्हली (फेयरनेस ट्रीटमेंट ) : (लाडीकपणे) ए.. परत दे परत दे..

खरी मुलगी : ए भवाने.. एकदा वापरायला दिली म्हणून लंपास करतेस कि काय .. हवी असली तर विकत आण.. कित्ती महाग आहे माहितीये?
_________________________________________________________________
रेड लेबल चे आजोबा : तू 'आह आह' (डंबेल्स उचलतानाचा आवाज ) करून तब्येत बनवतोस आणि मी 'आह आह' (चहा पितानाचा आवाज ) करून..
रेड लेबल : कसं काय ?
रेड लेबल ची आई : या चहा मध्ये आहे तुळशी आणि अमुक तमुक..
रेड लेबल : (आश्चर्याने) हो का?

खरा मुलगा : ओ आजोबा.. कैपण कै ? सिक्स प्याक बनवायचे म्हणून जास्त चहा प्याल आणि डायबेटीस व्हायचा. आणि ए आई, ऐकून घेतो म्हणून कैपण सांगशील का? आणि नसत्या सवयी लावू नको तू सगळ्यांना!
__________________________________________________________________

सर्फ एक्सल : लिंबू ब्लू ब्लीच द्या..
सर्फ एक्सल विक्रेती : आता आईला सांग याची काही गरज नाही .. सर्फ एक्सल वापर..

खरी विक्रेती : तुझं वय किती... तू बोलतो किती.. आं ? एकाच दुकानात हे सगळं मिळतं का?
_________________________________________________________________
हार्पिक गृहिणी : अय्या! हुसेन SSS !!
हार्पिक विक्रेता : तुमची जीभ नाकाला लागते का ? तुमच्या टॉयलेट मध्ये अशा काही जागा असतात जिथे सामान्य टॉयलेट क्लिनर पोचू शकत नाहीत..
हार्पिक गृहिणी : (जीभ नाकाला लावण्याचा निष्फळ प्रयत्न करते)

खरी गृहिणी : बरं मग? पहिल्या प्रश्नाचा आणि नंतरच्या उत्तराचा अर्थार्थी काय संबंध ? मला तर बाई वाटलं तू आता जिभेने टॉयलेट साफ करायचं असं काही बोलतो कि काय ? आणि काय रे? नेमका जेवायच्या वेळेला तू का घेऊन येतो हे हार्पिक ?
____________________________________________________________________
मोठी बोर्नव्हीटा : पण कॅल्शियम साठी काय करतेस ?
मोठ्या बोर्नव्हीटा ची मैत्रीण : दुध देते..
मोठी बोर्नव्हीटा : पण कॅल्शियम साठी काय करतेस ?
मोठ्या बोर्नव्हीटा ची मैत्रीण : दुध देते ना ..
मोठी बोर्नव्हीटा : पण कॅल्शियम साठी काय करतेस ?
मोठ्या बोर्नव्हीटा ची मैत्रीण : आताच सांगितलं ना दुध देते म्हणून?

खरी मैत्रीण : ए तू जरा मंद आहेस का कि तुला ऐकू येत नाही? एकच प्रश्न शंभरदा काय विचारतेस? एकदा सांगितलेलं कळत नाय का? म्याड!!
______________________________________________________________________
कोलगेट : हाय बेटा !
कोलगेट ची मुलगी : हाय बाबा, (सफरचंदासदृश काहीतरी खाते. हिरड्यातून येणारं रक्त बापाला दाखवत) बाबा , हे बघा!
कोलगेट : हि नवीन कोलगेट-अमुक अमुक टूथपेस्ट वापर.. (तेच सफरचंदासदृश काहीतरी खाउन दाखवतो) हे बघ..
कोलगेट ची मुलगी : ओह। Thank you बाबा !! (निघून जाते)

खरी मुलगी : म्हणजे ? बाबा, तुम्ही घरात आमच्यापासून लपवून वेगळी टूथपेस्ट वापरता ? थांबा… आता आईलाच सांगते तुमचं नाव !
______________________________________________________________________
सर्फचे आजोबा : आम्ही लवकर परत येऊ… माझे बूट कुठे सापडत नाहीत.
सर्फ : (बूट शोधून काढून , त्यावर पॉलीश चोपडून आजोबाना देतो.) हे घ्या आजोबा.
सर्फचे आजोबा : अरे!! याच्या हातात तर जादू आहे.
सर्फची आजी : (सुनेकडे बघत ) पण याने तुझ्या हातांचं काम वाढवलं.
सर्फची आई : ठीक आहे आई. नवीन सर्फ मध्ये आहे दहा हातांची शक्ती.. जी देते अमुक तमुक अलाणं फलाणं !!

खरी आई : बघा ना! हात माझे मोडून येतात. अकलेच्या नावाने बोंब आहे या पोराची नुसती!! धपाक sss धपाकsss (धपाट्यांचा आवाज ) नव्या शर्टाची वाट लावली. पुढे जाऊन बूटपॉलिश चा धंदा करायची लक्षणं दिसताहेत कार्ट्याची.. धपाक sss धपाकsss( भ्यां ssss पोराच्या रडण्याचा आवाज--आजी आजोबांची गुपचूप कल्टी--वगैरे वगैरे !! )

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

द गोल्डन आईड लायन!!

'आम्ही' (आदरार्थी मी या अर्थी) 'वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर' या नावाने दाखवल्या जाणा-या चित्रपटांपैकी एक अतिप्रचंड टुकार रिमेक बघितला.. आणि हे लिहायचे सुचले. सदर टुकार हे विशेषण सिनेमा साठी नसून रिमेक साठी आहे हे लक्षात घ्यावे! नाव 'रावडी राठोर..' मूळ 'व्हर्जिनल' चित्रपट ज्यांनी पहिला असेल त्यांना हे पटेल.. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी लेखाचा पहिला प्याराग्राफ वगळून लेख वाचायला सुरुवात केली तरी हरकत नाही. अर्थात इथपर्यंत पोचायला तो वाचवा लागणारच पण असो..

लेखाचा मूळ मुद्दा मुव्ही नसून मुव्हीचा हिरो आहे .. पहिला नव्हे दुसरा नव्हे तर तिसरा हिरो. यापूर्वी दबंग स्टाईल मध्ये पदार्पण केलेला आणि उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळवलेला हिरो. यावर बरेच दिवस लिहावं लिहावं म्हणत होतो पण जमलं नाही.. हा सिनेमा पाहिल्यावर मात्र म्हटलं आता 'आळस सगळा झाडोनी' हे काम हातावेगळं केलंच पाहिजे नाहीतर प्रकरण हाताबाहेर जायचं. तर त्या हीरोचं नाव आहे....
सोनाक्षीबाई सिन्हा!! द गोल्डन आईड लायन!!
म्याडमची तथाकथित 'मादक' अदा !

हो हो.. बरोबरच लिहिलं आहे मी! सोनाक्षी सिन्हा या व्यक्तिमत्वाला 'हिरोईन' या क्याटेगरीत क्लासिफाय करायचं आमचं धाडस नाही बुवा! तिला एकतर हिरोतरी समजा नाहीतर बाईतरी!मुळात सोनाक्षी सिन्हा कोणत्याही चित्रपटात जो कोणता 'किरदार' करते त्यावेळी हिरोचं तिच्याबरोबर अफेअर आहे असं न वाटता एक्स्ट्राम्यारीटल अफेअर आहे असं आम्हाला वाटतं.

बाप इंडष्ट्री  मध्ये मोठा माणूस असेल तर कोण, कसं आणि काय होऊ शकतं याची जी मोजकी उदाहरणं आहेत त्यापैकी सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा हि मजबूत नावं! सोनाक्षी हे तर अंगापिंडाने
सुद्धा मजबूत असणारं उदाहरण!!

चेह-यावरची रेघ अथवा माशीसुद्धा (ज्यावेळी हलायला पाहिजे त्यावेळी) हलू  न देता ज्या मख्खपणे ही अभिनेत्री वावरते तिला जर उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळू शकतो तर आमचा तमाम सिनेसृष्टीला सवाल आहे कि याच न्यायाने आतापर्यंत एकदापण अजय देवगणला उत्कृष्ट नृत्याचा पुरस्कार का बरे मिळाला नाही? आणि डायलॉग काय तर म्हणे "थप्पड से डर नही लगता साब..प्यार से लगता है!" आम्ही तर पुढे जाऊन असे म्हणतो कि हिला डरायची काहीच जरुरी नाही, 'डर' त्याला वाटायला पाहिजे ज्याच्या प्रेमात ही पडेल..

एखाद्या अभिनेत्रीला आवश्यक असणारं, जरा बरं दिसण्याचं, सौजन्य तरी दाखवावं कि नाही या बयेनं (कि या बाईनं)? तर ते पण नाही. हां...आता रुंद भाल प्रदेश हे सौन्दर्याच लक्षण असतं असं म्हणतात. पण हे (अव)लक्षण तिच्याबाबतीत जरा जास्तच ठळकपणे उठून दिसतं. भुवयांच्या वरून तिची कपाळपट्टी सुरु तर होते पण अर्धं डोकं संपलं तरी पट्टी काही संपायचं नाव घेत नाही. फेसवॉश च्या किती ट्युब्ज ती महिन्याकाठी संपवत असेल याचा हिशेबच न ठेवलेला बरा..

तिचे बलदंड बाहू पाहिल्यानंतर तिचं रक्षण करायला कोण्या सलमान खान ची गरज का पडावी हा बाळबोध प्रश्न आम्हाला 'दबंग' हा सिनेमा पाहताना पडला होता.त्या चित्रपटात तर तिच्या पडद्यावरच्या एन्ट्रीलाच तिने विस्तीर्ण पाठ दाखवल्यानंतर या दृश्याला 'सेन्सॉर'वाल्यांना 'किळस' या क्याटेगरी अंतर्गत कात्री कशी लावावीशी वाटली नाही कोण जाणे!

'ओ माय गॉड' या सिनेमातला न पाहण्यासारखा कोणता भाग असेल तर ते 'गो गो गोविंदा' वालं गाणं. बिचा-या प्रभुदेवाला तिला नाच शिकवताना काय यातायात करावी लागली असेल ते (प्रभू) देवालाच ठाऊक. त्या बिचा-याने केलेले वेडेवाकडे अंगविक्षेप हिरो लोकांना सुद्धा नाकी नउ आणत असतात मग एखाद्या बाईला शिकवताना तर विचारूच नका! ज्या पद्धतीने गरीब पद्धतीचे कपडे (फाटलेली प्यांट आणि बटनं तुटलेला आणि गाठ मारून अंगावर घातलेला शर्ट ) घालून तिने प्रभू देवासारखं नाचल्याचा आव आणत जो उच्छाद मांडला आहे त्यावरून तर आम्हाला हा पिक्चर बघायची सुद्धा छाती होत नव्हती परंतु काही पेपरवाल्यांनी या सिनेमात ती फक्त एवढ्याच गाण्यापुरती आहे आणि सिनेमाशी तिचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा केल्यामुळे आम्ही हा सिनेमा पहायचं धाडस केलं.

"कमर या कमरा?" संभ्रमावस्थेतील राठोडसाहेब
रावडी राठोर (कि राठोड ) मध्ये "चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया" हे गाणं आम्ही सुरुवातीला 'पतली कमर पे' असं ऐकलं होतं. जेव्हा आम्ही ते पुन्हा ऐकलं तेव्हा गाण्यात उल्लेखिलेली ती 'कमर' नेहमीसारखी 'पतली' नसून  'चिकनी ' आहे हे आम्हाला कळलं. ज्यावेळी आम्ही ते गाणं आमच्या या या चक्षुंनी पाहिलं तेव्हा गीतकाराने मूळ (आणि सर्वत्र वापरली जाणारी ) 'पतली कमर' ही टर्म बदलून 'चिकनी कमर' का केलं असावं हे आम्हाला उमगलं आणि पटलं सुद्धा! कारण त्या कमरेचा साईड  व्ह्यू हा सामान्य कमरांच्या  फ्रंट व्ह्यू इतका होता! काय बिशाद होती कोणाची तिला पतली कमर म्हणून हिणवायची? तिला जर गीतकाराने 'पतली' असं संबोधलं असतं तर त्याला बिचा-याला 'पतली गली' पकडून इंडस्ट्री सोडावी लागली असती. असो! पण ज्या पद्धतीने ती या गाण्यात नाचली आहे ते पाहिल्यावर 'बृहन्नडेने भर दरबारात जे नृत्य केलं होतं ते कसं दिसलं असावं' हे
आमचं ब-याच दिवसांपासून असणारं कुतूहल शमलं,तो भाग वेगळा. यासाठी आम्ही तिचे आयुष्यभर ऋणी राहू!

सोनाक्षी बाईंचे जोकर सारखे चित्रपट (सुरुवातीला आमचं मत होतं कि चित्रपटाचं नाव या बाईवरून ठेवण्यात आलं आहे कि काय? परंतु आधीच्या अनेक मतांप्रमाणे हे मत देखील चुकीचे निघाले! ) बघायचं धैर्य काही आम्हाला अखेरपर्यंत एकवटता आले नाही. अगदी केबल वरून तो फुकट प्रसारित झाला तरीही! आता तर 'सन ऑफ सरदार' नावाच्या सिनेमात ती दिसणार आहे. एकंदरीत (संजय दत्तशी [कि तो तिचा भाऊ आहे ?] तिचे लग्न होताना दिसते आणि अजय देवगण दुःखी कष्टी होतो तो ) प्रोमो बघताना सिनेमाचा विषय जरठ विवाह , विधवा पुनर्विवाह किंवा तत्सम काहीतरी सामाजिक बांधिलकी जपणारा असावा असा आमचा कयास आहे. अर्थात, आधीच्या चुकलेल्या कयासांप्रमाणे हा अंदाजदेखील चुकणार हे सांगणे न लगे!

चांगल्या ब्यानरच्या सिनेमांमुळे किंवा सिनेमाच्या हिरोंमुळे सोनाक्षी बाईंच करियर त्यांना सध्या हिरोईन म्हणून प्रमोट करून पाहत असलं तरी तिचं भवितव्य तीच जाणे. परंतु आम्हास मनापासून विश्वास आहे कि सोनाक्षीबाईंनी बॉलीवूडला हिरोईन दिली नाही तरी 'रेडीमेड आई' मात्र नक्कीच दिली आहे!

तिच्या भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देऊन (आणि तिची फ्यान मंडळी आम्हाला फटकावायच्या आत) आम्ही आवरतं घेतो !

शुक्रवार, २७ जुलै, २०१२

अपुले मरण पाहिले म्या डोळा! : उत्तरार्ध

पूर्वार्ध :
आपली भडक लाल पिशवी नाचवत नाचवत रस्ता क्रॉस करत असताना भर रस्त्यातून शोधत येवून बैलोबाने यांनाच ढुशी दिली आणि साधी-सुधी नाही. शिंग डायरेक्ट पोटाच्या आतमध्ये आणि आतडं पोटाच्या बाहेर!!! शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यावर त्याला जे वाटलं असेल तेच फिलिंग गणपतरावांनी घेतलं असणार यात शंकेला वावच नाही. फक्त 'दगा दगा' ओरडत बसायची गणपतरावांची ताकद नव्हती. त्याऐवजी ते तत्क्षणी बेशुद्ध पडले.
हॉस्पिटलात डॉक्टर लोकांनी त्यांचं आतडं होतं तसं कोंबून पोटाला टाके घातले आणि त्यांच्या खिशाचे टाके मात्र उसवले! शुद्धीवर आल्यावर ते स्वतःच सांगायला लागले. लोक म्हणत होते, 'अहो एवढं रक्त गेलं वाहून.. आम्हाला वाटलं आता जगता कि नाही'
तर म्हणे " मी कसला मरतो? अजून पंधरा वर्ष आहेत माझी.. काही केलं नसतत ना तरी हातावर आतडं घेऊन जगलो असतो." कसंनुस हसत गणपतराव म्हणाले. (मला कल्पनेने शिसारी आली आणि )लोकांना पश्चाताप झाला. गणपतरावांना हॉस्पिटल मध्ये भरती केल्याचा आणि त्यापेक्षा त्यांचे पैसे वाया घालवल्याचा!

त्यात्क्षणी त्यांना साक्षात्कार झाला असावा कि 'मृत्यू माहित असताना कशाला मेंढरासारखं घाबरत घाबरत जगायचं?' मग तर काय विचारूच नका.. दरम्यानच्या काळात गणपराव उठसुठ ब-याच ठिकाणी धडपडले, अपघातातून वाचले, जिवावरच्या संकटातून बचावले.. विश्वास बसणार नाही पण मध्येच एकदा  श्वानदंशातूनही कोणतेही इंजेक्शन न देता विनाविषबाधा सुखरूप सुटले.
"हे अति झालं गणपतराव" मी म्हटलं..
"काही होत नाही हो मला"
"असं कसं, आता साधा कुत्रा होता म्हणून वाचला असाल.. उद्या पिसाळलेला कुत्रा चावला तर? बर आता इंजेक्शनही फ्री असतं सरकारी हॉस्पीटलात!"
"चौदाच्या चौदा? बेंबीत घ्यायची असतात ती ?"
"अहो हल्ली तीनच असतात.. आहात कुठे आणि हल्ली 'नेहमीच्या ठिकाणी' देतात.. कशाला उगीच रिस्क घेता?" मी म्हटलं. गणपतरावांनी मान हलवली पण त्यांनी काही ते फारसं मनावर घेतलं नाही असं वाटलं.
गणपतराव आता 'हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी' वगैरे सरंडर करत होते..
"बरोब्बर पंचाहत्तराव्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स घेणार आणि मोठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पण घेणार accident रायडर सोबत.. बसायचा तो बसूदेत प्रीमिअम. काय चिंता नाही!" गणपतराव म्हणायचे..
ते आता उजवीकडे-डावीकडे न बघता रस्ता ओलांडत होते..रियल इस्टेट मध्ये गुंतवणुका करत होते. बिनधास्त रिस्क घेत होते... ओ एन जी सी सारख्या १०-२० वर्षात ग्रोथ होणा-या ऑईल कंपन्यांचे शेअर्स घेत होते.. फार्मा कंपन्यांच्या स्टेक्समध्ये आर्थिक उलाढाल करत होते.. कशाची आणि कोणाची तमा बाळगत नव्हते.. कोणी काही म्हणालं तर सांगायचे "अजून बरीच वर्ष आहेत हो जायला मला, तो पर्यंत बायका मुलांची तजवीज करून घेतो!" तर थोडक्यात मृत्यू ची वेळ माहित असल्याचा ते पुरेपूर लाभ घेत होते.

या भानगडी करता करता त्यांचं घरातून लक्ष उडायला लागलं. मुलाच्या लग्नाचा विषय बाजूलाच पडला. फादरान्ची ही परिस्थिती बघता त्यांच्या कार्ट्याला आपल्या लग्नाचं काही खरं दिसेना. त्याने मग मारून मुटकून प्रेम बीम केलं आणि कुठूनतरी मुलगी पळवून आणली. (मुलीला बघताच 'प्रेम मारून मुटकून' केलेलं असाव यावर कोणाचापण विश्वास बसावा! असो..) मुलाने देवळात हार तुरे घालून लग्न उरकलं आणि दमदार हुंड्याची गणपतरावांची स्वप्न त्याने धुळीला मिळवली. मुलीने पण काही काळातच पोराची चॉईस कशी होती याबद्दलचं इतरांचं म्हणणं खरं ठरवत घरात भांडणं उकरून काढली.

बारीकसारीक कारणांवरून घरात आदळआपट व्हायला लागली. सासू सुनेचं वाजायला लागलं. गणपतराव आणि त्यांचा मुलगा मधल्या मध्ये भरडले जायला लागले.
काही झालं कि बायको त्यांच्याकडे यायची.. " बघा ना अहो.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... कसली भवानी घेऊन आलय कार्टं .. आम्हाला म्हातारपणी छळायला.. कोणास ठावूक? जरा इन्टरेष्ट घेऊन त्याचं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"
मग थोड्या वेळाने मुलगा यायचा.. "ओ पप्पा.. आईला समजावा ओ जरा.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... .. उच्छाद मांडलाय दोघींनी.. जरा इन्टरेष्ट घेऊन माझं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"
मग सूनबाई यायची.. " पप्पा.. कसली सासू मिळाली आहे मला.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... कसा संसार केलात या बाईबरोबर कोण जाणे.. झक मारली आणि लग्न करून इकडे यायची बुद्धी झाली.. तुम्ही तरी सांगायचं तुमची बायको असली आहे ते.. जरा इन्टरेष्ट घेऊन तुमच्या पोराचं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"

गणपतरावांच जगणं मुश्कील व्हायला लागलं.. त्यात पोरगी जावयाबरोबर बिनसलं म्हणून परत आली.. जावयाच्या नाकदु-या काढायला त्यांना मुंबईच्या खेपा वाढवायला लागल्या.. प्रचंड त्रास होत होता.. पण इतक्यात मरणार नाही या गृहितकावर गणपतराव सगळ्या गोष्टी आपापल्या परीनं सेट करायचा प्रयत्न करत होते.. तरीही आवाक्याबाहेर गेलेल्या गोष्टी सावरता येत नाहीत.. घरच्या कटकटीना वैतागून मुलानं वेगळा संसार थाटला.. गावातच भाड्याने राहायला लागला. आई वडिलांना एकटं टाकून! त्यांच्या बायकोने आकांत केला.. थयथयाट केला. कोणाला ती आवरता आवरेना.. सर्वांसमक्ष "तू 'आम्हाला' मेलास" म्हणून सांगितलं आणि गणपतरावांना न विचारताच आपल्या बाजूला करून घेतलं..
...जिवंतपणी मरण ते वेगळं काय असतं?

गणपतरावांच्या मागची साडेसाती काही सुटेना.. मुलाच्या उत्पन्नाच्या भरवशावर सगळे पैसे लाँग टर्म प्लान्स मध्ये इन्वेस्ट करून ठेवलेले आणि आता हातात काही नव्हत... बायकोच्या नकळत मुलाच्या दारात जावं लागलं. मुलानेही (त्याला न शोभणारा) समजूतदारपणा दाखवत महिन्याला पैसे द्यायला सुरुवात केली..
सगळं असून गणपतराव सगळं गमावून बसले होते. 'देवा यापेक्षा मरण बरं.. ' ते विनवणी करत होते पण हिशेबाप्रमाणे अजून दहा वर्ष तरी शिल्लक होती.

तब्बल पाच वर्षानंतर त्यांचा मुलगा घरी परतला. सून सुधारली होती.सासू सुधारायच्या पलीकडे होती पण तिला पण बरंच काही उमगलं होतं. तिच्यासाठी काय! आधी नवरा जिवंत झाला आणि आता मुलगा!

गणपतरावांना हर्षवायू व्हायचाच बाकी होता आणि आनंदाच्या भरात नको ते झालं.. सततच्या विचारांनी शारीरिक आणि मानसिक त्रास वाढला होताच.. आता अचानक हे अस झाल्याने वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी गणपतरावांना paralysis चा attack आला. डायरेक्ट अर्धी बाजूच निकामी. डॉक्टर लोकांनी सांगितलं, " तब्ब्येत खणखणीत आहे..फक्त हातपाय हलवता नाही येणार!"
"म्हणजे मग राहिलं काय?" गणपतरावांनी विचारलं.. पण डॉक्टरांकडे उत्तर नव्हतं ! सगळं सुरळीत होता होता दैवाने डाव टाकला..
"असल्या जगण्यापेक्षा मेलो असतो तर बरं.." गणपतराव उघडउघड म्हणत असत "पण कानात यमराज गुंजतोय ना.. म्हणतो 'अरे याला अठ्ठ्यात्तराव्या वर्षी आणायचा आहे' .. !!"

एकेकाळी मरण लांब आहे म्हणून हर्षोत्सव साजरा करणारा माणूस आता मरणाची आराधना करत होता ! आम्हाला त्यांचे हाल बघवत नव्हते

फ़िजिओथेरपिस्टच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना थोड फार उठता यायला लागलं.. पण स्वतःच्या पायांवर उभ राहता येईल कि नाही याबद्दल शंकाच होती.. दरम्यानच्या काळात बायको,मुलगा आणि सुनेने बरेच उपचार केले.. गणपतरावांच्या गुंतवणुकीचे थोडेफार रिटर्न्सही येवू लागले होते. 'बरोब्बर पंचाहत्तराव्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स' घ्यायचं त्यांचे मनसुबे 'नॉन एलीजीबिलीटी' मुळे उधळले गेले होते.
आयुष्याच्या पुढच्या अध्यायात अधाशासारखे कमावलेले पैसे शेवटच्या काळात संपले होते.. जेवढी गंगाजळी त्यांनी सुरुवातीला जमा करून ठेवली होती तेवढीच आता उरली होती.

हल्लीच गणपतरावांचा जावई आणि मुलगी तिच्या माहेरपणाला आलेली असताना एके दिवशी त्यांचा मुलगा त्यांची कुठल्या तरी गुंतवणुकीचे अनपेक्षितपणे आलेले रिटर्न्स पप्पांना दाखवायला घेऊन आला
"पप्पा किती पैसे मिळालेत बघा.. अमुक एक लाख"
"काय म्हणतोस? " म्हणत गणपतराव चक्क स्वतःहून स्वतःच्या पायावर ते उभे राहिले. अचानक.. "अरे हे बघ काय.." ते ओरडले!!
मुलगा दोन्ही आनंदाच्या बातम्या द्यायला स्वयंपाक खोलीकडे पळाला.. आणि इकडे गणपतराव छाती धरून कोसळले..
आम्ही त्यांच्या जावई आणि मुलाबरोबर जाऊन त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती करून आलो..

त्यांच्या घरी आल्यावर गणपतरावांच्या बायकोने सुनेला आमच्यासाठी चहा टाकायला सांगितला.. योगायोगाने वीस वर्षापूर्वी गणपतरावांच्या पहिल्या मृत्युच्या वेळी आम्हीच चार पाच जण असेच आणि इथेच बसलो होतो.. त्या आठवणी निघाल्या. त्यावेळी दणाणलेले धाबे आठवून आम्ही दबकत दबकत हसलो..
गणपतरावांच्या मुलीने चहा आणून दिला..

तेवढ्यात चार पाच जणांच एक टोळकं अंगणात येवून टपकलं.. वरच्या आळीतले होते ते सगळे. गणपत बारशिंगेच्या इथले. हा गणपत बारशिंगे सुद्धा साधा माणूस. कोणाच्या फारसा अध्यात मध्यात नसलेला. मुख्य म्हणजे आमच्या उठण्या बसण्यात नसलेला! असो.. तर तो स्वतः सुद्धा त्यांच्याबरोबर होता.

" काय गं  मुली.. पप्पा कुठे आहेत?' गणपतरावांच्या  मुलीला त्या ग्रुपमधल्या एका वयस्कर माणसाने विचारलं.
" पप्पांची तब्ब्येत बिघडलीय काका,  हस्पिटलात भरती केलंय..हे आणि दादा तिकडेच आहेत. हेपण गेले होते सगळे.. आताच आले."
आम्ही सगळेच अवाक होऊन एकमेकांची तोंडं बघायला लागलो! सेम टू सेम संवाद वीस वर्षापूर्वी घडला होता.. यावेळी जरी आम्ही दर्शक असलो तरी त्यावेळी आम्हीच त्या संवादाचे कर्ते होतो ! एखाद्या सिनेमाचा रिमेक बघावा अशी आमची अवस्था झाली होती. गणपत बारशिंगे आमच्याकडे बघून 'बघितलात? मी सांगत होतो ना?' या अर्थाने सूचक हसला आणि हळूच त्याच्या शेजारी उभ्या असणा-याच्या कानात पुटपुटला. तो काय बोलला असणार ते मी ताडलं!! तो नक्कीच बोलला असणार कि 'माझ्या मर्तिकाचं सामान परत नका करू, परस्पर इकडे आणायला सांगा..' कारण वीस वर्षापूर्वी हेच शब्द आमच्या गणपतरावांनी माझ्या कानात सांगितले होते! मी पुढचा प्रसंग आठवला आणि कानात जीव गोळा करून बसलो.. आता फोनची रिंग अपेक्षित होती. आणि तेच झालं.. कोणी काही बोलणार एवढ्यात फोन वाजला..सून लगबगीने आत गेली आणि थोड्या वेळाने तोंडावर पदर दाबून बाहेर आली.
"पप्पा गेले.. यांचा होता फोन.."

गणपतरावांच्या बायकोने आकांत करून गाव गोळा केला.. सून सैरभैर झाली. पोरगी पहिल्या वेळेसारखीच सुन्न  होऊन बसली..
तर अशा त-हेने अत्यंत नाटकी पद्धतीने गणपतराव ढू ss म झाले.. मी बारशिंगेच्या मंडळींकडे गेलो आणि शांतपणे म्हटलं.. " चिता रचलेली असेल तर विस्कटायला सांगू नका! आटपून टाकू तिथेच. जवळचे  इथेच आहेत आणि नातेवाईक पण पोचतील अर्ध्या एक तासात."
ते सगळे चकित होऊन माझ्याकडे बघत राहिले. 
काहीही असो पण मला राहून राहून एकच प्रश्न पडतोय कि सारखं सारखं कन्फ्यूज होणा-या त्या यमदूताला यमराजाने नोकरीवरून डिसमिस केलं असेल का?

(समाप्त )

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

अपुले मरण पाहिले म्या डोळा!: पूर्वार्ध

गणपतराव ढूssssम झाले. 'ढूssssम' म्हणजे गेले वर! हि खरं म्हणजे महत्व देण्यासारखी बातमी नाही. आता वय वर्ष अठ्ठ्याहत्तर म्हणजे आजकालच्या जमान्यात खूप झालं. हल्ली सत्तरीतच अर्ध्या गोव-या मसणात गेलेल्या असतात पब्लिकच्या.. त्यामानाने गणपतरावांनी बरेच पावसाळे पाहिले. मग मी का सांगतोय हे सगळं? तर सांगण्यामागच कारण हे कि, माणसं एकदाच मरतात परंतु आमचे गणपतराव दुस-यांदा मेले!!

पहिल्या मरणापूर्वी जगण्याव्यतिरिक्त त्यांनी आयुष्यात काही काही म्हणून केलं नाही. काहीतरी थातुरमातुर शिक्षण. मग कुणाच्यातरी वशिल्याने सरकारी नोकरीत चिकटले. इमानेइतबारे त्यांनी ती नोकरी केली. त्यांच्या बायकोने दोन मुलांना जन्म दिला. त्यासाठी केलेली मेहनत हेच काय ते त्यांचे तरुणपणातले कष्ट!! बाकी ती पोरं आपोआप वाढली. मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मोठा झाला. शिक्षणाच्या बाबतीत ठोंब्या. एकदम बापाच्याच वळणावर गेला होता. त्यामुळे गणपतरावांनी हातपाय हलवण ओघाने आलंच. बापाचं कर्तव्य समजून ते मात्र त्यांनी पार पाडलं. नोकरीची दोन वर्ष शिल्लक असताना तब्ब्येतीच्या कारणास्तव त्यांनी व्हॉलन्टरी रिटायरमेंट घेतली. अनुकंपा तत्वावर मुलगा त्यांच्या जागी जॉईन झाला. मुलीला त्यांनी व्यवस्थित मुलगा बघून दिला. मुंबईला माहीमजवळ चांगलं दोन खोल्यांचं 'घर' असणारा जावई होता त्यांचा. पण हे सगळं दुस-या जन्मात..! पहिल्यात कर्तव्याच्या मानाने भोपळा होता..

तसं अंगावर आलंच तर गणपतराव काम करायचे. अगदीच नाही असं नाही. पण स्वतःहून जावून काय करतील तर शपथ. 'सांगकाम्या आणि हो नाम्या' म्हणतात न तसला प्रकार.पहिल्यांदा त्यांची गणपत नावाने ओळख होती. 'ए गणपत या फाईल्स उरकून टाक,आज मला घरी लवकर जायचंय' म्हणून कोणी सांगितलं कि गणपत करायचा, चकार शब्द न काढता. पण कोण अती करायला लागलं तर 'हो हो' म्हणून करायचाच नाही. शेवटी ते त्याचं काम नसायचं त्यामुळे त्याला साहेब बोलू शकत नसे. त्याने कधीही साहेबाकडे जावून प्रमोशन मागितलं नाही कि वाढीव महागाई भत्ता. सरकारच्या कृपेने आणि देवाच्या दयेने ते त्याला मिळत गेलं.

तर हा गणपत सरळ मार्गी जगत होता. गेला दिवस आपला म्हणत होता. आयुष्यात काही अनपेक्षित घडत नव्हतं आणि घडावं अशी त्याची अपेक्षा सुद्धा नव्हती. त्याची लाख नसेल पण नियतीची हवी ना?

वय वर्ष अठ्ठावन्न असताना गणपतला हार्ट attack आला. अचानक. झोपेत असताना. आणि गणपत गेला. आम्हाला सकाळी सात वाजता कोणीतरी बोलवायला आलं. आम्ही धावत पळत गेलो. बायको धाय मोकलून रडत होती. दोन्ही पोरं- तरुणपणातली- सुन्न होऊन बसली होती. पोरगी रडून थकली होती आणि पोराच्या चेह-यावरचं भविष्याबद्दलचं प्रश्नचिन्ह ठळकपणे उठून दिसत होतं.

"सकाळी पाणी मागितलं हो साडेपाच वाजता.." गणपतच्या बायकोच्या रडव्या हेलांमधून मी शब्द टिपून काढत होतो.. "मी म्हटलं उठा आणि जाऊन घ्या स्वतःच्या हातांनी.." पुन्हा टिपेचा स्वर "गेले पिऊन आले आणि झोपले.. साडेसहाचा गजर बंद करायला त्यांना उठवलं तेव्हा उठेचनात....." स्वर टिपेचा... आर्ततेचा... वाईट वाटलं.
'भला माणूस..'
'कधी कोणाचं मागून खाल्लं नाही,पाच पैशाची उधारी नाही, कोणाला दुखावलं नाही मग इतक्यात कसं व्हावं असं?'
'....पोरांचं काय होणार?'
आणि विशेषतः
'...पोरीचं कसं होणार?'
वगैरे पठडीतल्या आणि 'असल्या'वेळी करायच्या गावगप्पा सुरु झाल्या. नेहमी 'असल्या' कामात पुढाकार घेणा-या लोकांनी तिरडी बांधली, मर्तिकाचं सामान मागवलं/आणलं गेलं. गणपतचे नातेवाईक मोजकेच आणि जवळच्या गावातलेच होते. गणपत गेल्याचा सांगावा पोचताच अर्ध्या पाऊण तासात सगळा गोतावळा त्याला पोचवायला जमला म्हणजे बघा.

कार्यवाल्या भटजींनी गणपतच्या मुलाला 'काय कसं' वगैरे सूचना दिल्या. तो आणि आम्ही तिघे असे आमच्या खांद्यावर गणपतला घेऊन स्मशानात गेलो. भलताच जड होता तो आणि ऐन गृह्स्थाश्रमाच्या वयात आउट झाल्यामुळे सुमसुमीत सुद्धा होता! पण गेलेल्या माणसाबद्दल असलं भलतं सलतं बोलू नये म्हणून मी जिभेला आवर घातला.

लाकडं रचलेली होती. गणपतला तिथे ठेवला, भटजी ने गरुड पुराणातले वेचे म्हटले.. गणपतच्या मुलाने भोक पडलेलं मडकं घेऊन फे-या मारल्या आणि चितेला आग लावणार इतक्यात चमत्कार झाला!

गणपत चितेवरच उठून बसला!!

भटजीच्या तोंडाला बुडबुडे आले.. गणपतची बायको झीट येवून पडली, पोरीची वाचा बसली आणि पोरगा हातातल्या पेटत्या लाकडासकट धूम पळाला. फटाका पेटवल्यावर लहान मुलं पळतात अगदी जसाच्या तसा.. त्याला बघून गर्दीसुद्धा 'होय्य..होय्य.. पळा पळा..भूत भूत' करत सैरावरा पळत सुटली.. साहजिकच त्यात मीसुद्धा होतो..

जरा लांब गेल्यावर काही लोकांच्या जीवात जीव आला.. परिस्थितीचं भान आलं. त्यातही मी होतो! आम्ही काहीजण थांबलो. एव्हाना गणपत स्वतःच्या पायांनी चितेवरून खाली उतरला आणि लोकांना ओरडून काही सांगण्याच्या भानगडीत न पडता (ओरडून बोलणं हा त्याचा पिंडच नव्हता म्हणा!) आडव्या पडलेल्या बायको आणि थरथरत बसलेल्या पोरीकडे गेला. "अगं मी जिवंत आहे" त्यांना तो सांगत होता. "मेलो होतो पण आता जिवंत आहे मी. भूत नाहीये मी. बघ हात लावून." पण हात लावायला कोणी धजावेना. मी पाहिलं. गणपतचे पाय आमच्यासारखेच होते! मग मीच पुढे झालो आणि हात लावला. तो त्याच्या शरीराला अडला.. अंगपण गरम होतं. गणपत खरंच जिवंत होता. थोड्यावेळाने त्याची बायको शुद्धीवर आली, पोरगी बोलायला लागली.. मुलगा पण न पेटलेल्या चितेकडे परतला. सगळ्यांना गोळा करून आम्ही त्याच्या घरी गेलो.

बहुतेक बंद पडलेलं हृदय कशामुळे तरी चालू झालं असावं. धक्क्यामुळे बंद पडलेलं घड्याळ चालू होतं तसं.पण गणपतकडे वेगळीच स्टोरी होती.

"मी वर गेलो. तर गेटवर हि मोठ्ठी लाईन. चित्रगुप्त स्वतः एन्ट-या घेत होता सगळ्यांच्या. यमराज शेजारी राहून बघत होते.. आणि सगळे यमदूत आपापले आत्मे रेडयांवर बसवून लायनीतून पुढे पुढे सरकत होते..एका रेड्यावर दोन आत्मे." गणपतराव सांगत होते.
हो.. याचवेळी गणपतचे गणपतराव झाले असावेत. कारण स्वर्गाचा दरवाजा ठोठावून आलेला माणूस होता तो आता.
"चित्रगुप्त बहुतेक लोकांच्या इथल्या जमिनीवरच्या कार्याचा आढावा घेऊन स्वर्ग कि नरक अशी विभागणी करत होते. मी यांच्या चिंतेत " बायकापोरांकडे बोट दाखवत गणपतराव म्हणाले.
"दोन वर्षांची सर्विस बाकी होती.. एलआयसीच्या पॉलीश्यांचे कागद कुठे ठेवलेत तेसुद्धा हिला सांगितलं नव्हतं.पोरगा नोकरीला नाही..पोरीचं लग्नाचं वय झालंय नुकतं. पस्तिशीनंतर लग्न करण्याचा हा तोटा असतो बघा..रिटायर्ड होईस्तोवर पोरं हातात पण आलेली नसतात.."
"यमदुताच्या रेड्यावर बसून तुम्ही पस्तिशीनंतर केलेल्या लग्नाच्या फायदा तोट्यांवर विचार करत होतात?" न राहवून मी विचारलं.
"नाही नाही.. ते आपलं आता सुचलं म्हणून तुम्हाला सांगितलं" गणपतराव वदले..
"माझा नंबर आल्यावर यमदुताने माझी कारकीर्द सांगायला सुरुवात केली. चित्रगुप्ताच्या चेह-यावरचे भाव बदलत गेले. मलापण कळेना हा कोणाचं कसलं काम सांगत आहे. काहीच माझ्या भूतकाळाशी जुळत नव्हतं"
"मग?" आमचं कुतूहल आत्ताशी चाळवायला लागलं होतं. तोपर्यंत मी 'गणपत येडा झाला' असं कन्क्लूजन काढण्यापर्यंत पोचलो होतो.
"मग काय..चित्रगुप्त भडकला.. म्हणे ' कोणाला उचलून आणलंस ? इतकी वर्ष झाली इथे आणि असली चूक कशी काय करतोस?' मला काहीच समजेना. यमदूत बावरून गेला. यमराज पुढे धावले. चित्रगुप्ताने त्यांना कसले तरी रेकॉर्ड्स दाखवले. ब्यालेंस शीट सारखा काहीतरी प्रकार होता. यमराजांनी आत लक्ष घातलं. आणि यमदुता ला समजावत म्हणाले 'अरे याला अठ्ठ्यात्तराव्या वर्षी आणायचा आहे,इतक्यात कसं काय आणलंस?तुला सांगितलेला तो गणपत वेगळा. यांच्या मागच्या घरातला. यमदूत मान खाली घालून होता. 'याच काय करायचं?' त्याने दबलेल्या आवाजात विचारलं. ' ते मी बघतो.. तू तुझं काम नीट कर' असं म्हणत यमराजाने माझ्या छातीवरच लाथ घातली!" गणपतराव सांगत होते..
"तिथून मी उलट मागच्या बाजूला खाली पडलो तोच जाग आली..! मला वाटलं स्वप्न आहे पण नव्हे खरंच मेलो होतो मी! तुम्ही तर मला जाळायला निघाला होतात' हर्षोल्ल्हासित होऊन गणपतराव सांगत होते..

आम्ही एकमेकांची तोंडं बघायला लागलो. हा माणूस सांगतो ते खरं कि खोटं? शहानिशा कोण आणि कशी करणार? कि खरंच वेड लागलंय? उत्तर लवकर शोधायला हवं होतं नाहीतर आम्हाला वेड लागायची पाळी आली असती! गणपतरावांनी ते ओळखलं.

"खोटं वाटतंय न तुम्हाला?" त्यांनी विचारलं. "मग एक काम करूया.. पाठीमागच्या घरातल्या गणपतला भेटून येवू. चित्रगुप्ताच्या म्हणण्यानुसार त्याची इनिंग संपली आहे" गणपतराव वर जाऊन आल्यापासून स्मार्ट कि काय म्हणतात ना तसे झाले होते!

'काय हरकत आहे. चेक तरी करून घेऊ. ' असा विचार करून आम्ही तिघे चौघे खानविलकरांच्या घरी गेलो.

" काय वहिनी.. आजोबा कुठे आहेत?' त्यांच्या सुनेला आम्ही विचारल.
" बाबांची तब्ब्येत बिघडलीय भावजी, हस्पिटलात भरती केलंय काल.हे तिकडेच आहेत. मी नुकतीच आले."
आम्ही एकमेकांची तोंडं बघायला लागलो! गणपतराव आमच्याकडे बघून सूचक हसले.
"माझ्या मर्तिकाचं सामान परत नका करू, परस्पर इकडे आणायला सांगा.." ते हळूच माझ्या कानात पुटपुटले. तेवढ्यात फोन वाजला..वहिनी लगबगीने आत गेल्या आणि थोड्या वेळाने तोंडावर पदर दाबून बाहेर आल्या.
"बाबा गेले.. यांचा होता फोन." आम्ही तिकडून गुपचूप हॉस्पिटल मध्ये गेलो.

गणपतरावांना जिवंत जाळण्याचा अघोरी प्रकार टळल्यापासूनच्या अर्ध्या तासात ही पुढची न्यूज होती. त्यामुळे एकाला सूचना देवून स्मशानातली रचलेली चिता कोणी विस्कटणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलं. मघाचेच सोपस्कार पुन्हा झाले. या गणपतरावांचे नातेवाईक एव्हाना झाल्या प्रकारातून स्थिरावले होते. त्यांना गणपतरावांनी सगळी कथा नव्याने सांगून अचंबित करून टाकलं. मग त्यांनीच 'गणपतराव-दुसरे' यांच्या कार्याला गर्दी केली. चितेजवळ मात्र सगळे दबकूनच राहिले. न जाणो हा पण उठला तर!! पण तस काही झालं नाही..

गणपतराव पहिले स्वर्ग बघून आले होते हे नक्की.. मग ताबडतोब त्यांनी हालचाली करायला सुरुवात केली. तब्ब्येतीच्या कारणावरून त्यांनी रिटायरमेंट मागितली. साहेबांना सुद्धा त्यांनी हि कहाणी सुनावली असणारच! साहेबांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला वरून मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यायचं कबूल केलं.

मुलगी तर अशीही ह्याच्या त्याच्या बरोबर उंडारत होतीच.. त्यामुळे तिला लग्नासाठी तयार करायला त्यांना फारसे कष्ट पडले नाहीत! एका पायावर तयार होती मुलगी.प्रश्न होता तो मुलाचा.. त्यासाठी त्यांना अतिप्रचंड कष्ट पडले.त्यांना हवा तसा जावई शोधायला त्यांनी ब-याच चपला झिजवल्या.. काही ठिकाणी पोरीची थेरं कानावर आली म्हणून पोरगी नाकारली, काही ठिकाणी पोराच्या अपेक्षा जास्त होत्या. सरतेशेवटी मुंबई चा जावई मिळाला. त्याला गावाबद्दल (आणि मुख्यत्वे मुलीबद्दल) जास्त माहिती नव्हती आणि इंटरेस्ट ही नव्हता. गणपतरावांचा दुसरा जन्म भरून पावला.

मुलीच्या लग्नाचा उपद्व्याप संपतो न संपतो तोपर्यंत मुलगा लग्नाला आला.. पण गणपतरावांची पुंजी कमी झाली होती त्यामुळे त्यांनी आणि मुलाने थोडी कळ काढायचं ठरवलं. तरीही मुलीच्या वेळी झाली तशी गडबड होवू नये म्हणून त्यांनी आधीच चाचपणी करायला सुरुवात केली. कोणाची मुलगी लग्नाची आहे असं कळलं कि गणपतराव स्वतःहून चौकशीला जात. इतरांच्या अध्यात मध्यात न पडणारा माणूस लोकांची लग्नं जुळवायला पुढे पुढे करू लागला. गेल्या साठ वर्षात केली नसेल इतकी धावपळ त्यांनी त्यापुढच्या चार पाच वर्षांमध्ये केली!! एकाच आशेपायी - न जाणो त्या लग्नाच्या बाजारात आपला मुलगा सुद्धा खपला तर! मुलीसाठी दाबून हुंडा दिल्यानंतर त्याची वसुली होईल असं एक पण स्थळ त्यांना सापडत नव्हतं. पण शोध जोरात चालू होता.

असंच एक स्थळ बघून येत असताना गणपतरावांना बैलाने उडवलं!!
उत्तरार्ध:

गुरुवार, २४ मे, २०१२

एका शोधयात्रेची कहाणी! उत्तरार्ध

पूर्वार्ध
पण प्रत्यक्षात झालं उलटच.
ग्यादरिंगच्या दुस-याच दिवशी एक कोणतरी पोरगा आला. सिनियर. वरच्या वर्गातला होता हे त्याच्या राठ दाढीमिशीवरून कळत होतं. त्याच्याबरोबर त्याची ग्यांग होती.
'काय रे ए. मस्ती आली का?' त्याने विचारलं
'नाही' मी म्हटलं..पण या प्रश्नाच हे उत्तर नसतं.
'ती बटीण.. तुझं माणूस कधीपास्न झालं रे?'
'अं... मं..आं..कोण म्हण्ट? ' मी गडबडलो..
'हां..अस्सं पायजे.. तिच्या फंदात नाय हां पडायचं..आपला आयटमाय तो'
मी गप्प बसलो. हवा गुल झाली होती. मी लगोलग झम्प्याला गाठला.
'तू तर बोल्ला होता ती त्यातली नाय्ये म्हणून'
'हं..ती त्यातली नायचाय. हा पोरगा तिच्या मागेयाय. ती सरळे रे पोरगी. आपण शुव्वरशॉट सांगतो. कोणालापण विचार पायजे तर'' झम्प्याने थोडा विचार केला..
'पोरगा तब्येतीने तगडा होता काय रे?'
'हो. एक नव्हता. तसले ४-५ होते'
झंप्या विचारात पडला.
'तुला दुसरी कोणी आवडते काय रे?' झम्प्याने विचारलं आणि माझी पहिली प्रेम कहाणी तिथल्या तिथे संपुष्टात आली. सुरु होण्याच्या आधीच.

जुनिअर कॉलेजात मुलीच्या बाबतीत माझी डाळ शिजली नाही पण बी कॉम ला एडमिशन घेतल्यानंतर सिनिअर कॉलेजात काहीतरी होईल असं चिन्ह दिसत होतं. कारण पोरं स्पष्टपणे मुलीबाबतच्या गोष्टी करत.. पब्लिक ला आता मैत्रीण नको होती डायरेक्ट 'गल्फ्रेंड'च हवी होती.
कॉलेजचा कट्टा असो किंवा कॅन्टीन ची टेबलं. मुलांचा घोळका जमलेला असला कि ९० टक्केवेळा हेच विषय चालू असत.
'च्याला.. ती आर्ट्सची भावे.. त्या ढेपल्याबरोबर हाय हां कायतरी शुवरशॉट..' इति झंप्या
'कशावरून रे..?' एकाने विचारलं
'अरे काय कशावरून..? डोळ्यांना दिसत नाय? कॉलेजात कितीवेळा बोल्ताना दिसतात. तो अनिरुत साला.. जळते रे' कोणीतरी म्हणालं
'ढेपल्याच नाव अनिरुद्ध आहे ? हे मला म्हायतीच नव्हत'  मी म्हटलं
'हो रे चायला! अनिरुत ढेपले. ठेपले म्हायती होते, ढेपले पयल्यांदाच कळले ' मग हास्याचे फवारे..
मुली ज्या मुलांबरोबर फिरतात त्या मुलांची आम्ही त्यांच्या मागे चेष्टा उडवायचो.. तेवढंच सुख!
'ए.. वयनी आली.. वयनी आली..' कोणीतरी म्हणायचं
'ए अम-या.. तुझी डाव आली बग' दुसरा
'ए अssमssर..' सगळे मोठ्याने ओरडत.
हास्याचे फवारे अजून जोरात उडत.

'काय कठीण नाय रे..पोरगी पटवायला काय लागतं?' झंप्या एकदा म्हणाला.
'मग तू का नाय पटवली?' माझा सरळ सवाल..
'आपल्याला तो नादच नाय. असली फालतुगिरी करायचीच नाय आपल्याला..'
'निदान मलातरी सांगशील?'
'तुला म्हून सांगतो. बॉडी बिल्डींग कर.'
'काय म्हणतोस ..मग पोरगी पटेल?'
'लिवून देतो.. आयशपत... अश्शी फिजीक बनव कि सलमान चाट पडला पायजे. पायजे तर मी पण येतो तुझ्याबरोबर.'  झंप्याशेठ म्हणाले.

आता असलं आपल्याला आयुष्यात जमणार नाही हे माहिती असूनपण मी त्याच्या नादाने व्यायाम करायला लागलो. पण बॉडीच एक लिमिट असतं. मुळातच हाडं असणा-या शरीरावर चढून चढून कितीसं मांस चढणार? आणि जिम मधलं निम्म पब्लिक 'आरशात आपण पूर्ण कसे दिसतो?' हे बघण्यासाठी येत होतं यावर माझा दृढ विश्वास बसला. त्यामुळे बॉडी बिल्डींग करण राहायचं बाजूला आणि भलत्याच गोष्टींवर चर्चा रंगायच्या.

'आयला, एफ वाय ला खूप नव्या पोरी आल्यात रे यंदा!' -झंप्या (बायसेप्स दिसताहेत का बघत)
'कोण आहे काय रे माल?' -मी (झंप्याचे बायसेप्स दिसताहेत का बघत)
'माल? अरे मालगाडी आहे मालगाडी..' -झंप्या (डम्बेल उचलल्याची फक्त एक्शन करत)
'काय सांगतोस काय?' -मी (झंप्याची एक्शन बघून माझे बायसेप्स नुसते बघत)
'मग काय खोटं बोलतो का काय?'  झंप्या म्हणायचा 'चार पाच मुली तरी खूप मस्त आहेत. च्यायला,२-४ म्हयने जाऊदेत मग आपली बॉडी बघ. नाय त्या पोरी वळून वळून बघत राहिल्या ना..'
असलं काहीतरी ऐकलं कि उगीच मला थोड स्फुरण यायचं.

३-४ महिन्यात 'हा आपला विषय नव्हे' हे मला कळून चुकलं. त्यातच 'ज्या संध्याकाळच्या वेळात पोरी बाहेर फिरतात त्यावेळी तू जातोस जिम मध्ये मग काय कप्पाळ पटणार मुली?' असल्या कमेंट्स मिळाल्यामुळे माझा जिमला जाण्याचा उरलासुरला उत्साह देखील मावळला.त्यानंतर मग माझं जिम ला जाणं होत राहिलं पण त्यात तो पूर्वीसारखा उत्साह,जोम, ती सळसळ राहिली नाही. (तो परत आणण्यासाठी काहीतरी गोळ्या असतात अस मला पेपर मधल्या जाहिराती वाचून वाटलं होतं पण तो 'जोश' 'जोम' वेगळा हे वेळीच कळलं म्हणून अनर्थ टळला! असो, विषयांतर झालं.) पण जिम प्रकरणातून एक चांगलं झालं कि अगदीच वाळलेल्या काठीयुक्त अंगावर मुठभर मांस चढलं. अक्षरशः !! प्रोटीन पावडर,सप्लीमेंट च्या मा-याने बॉडीला ब-यापैकी आकार आला. पण त्यामुळे सामाजिक जीवनात काही फरक पडला नाही. मुली वळून वळून मला पाहत आहेत अस जे काही स्वप्न माझ्यापुढे रंगवण्यात आलं होतं ते काही सत्यात उतरताना दिसेना!

मी चाचरत हि शंका जेव्हा जिमच्या ट्रेनर ला विचारली तेव्हा तो म्हणाला
''गाडी पाहिजे रे..'
'कशाला?' माझा बाळबोध प्रश्न.
'बुडाखाली घोडा असला न की पोरी लगेच पटतात.'
'काय म्हणतोस?' मी विचारलं.
"आता मी बघ. कशी आहे बिल्ट?" त्याने डोले शोले दाखवत विचारलं.. चेस्ट वरखाली हलवून दाखवली.
"चांगली आहे" मी त्याला अपेक्षित असणारं उत्तर दिलं पण एकंदरीत मला ते 'छाती हलवून दाखवण' कौशल्यापेक्षा हास्यास्पद वाटलं होतं
"पण सगळ्या पोरी..'" सुस्कारा सोडून तो म्हणाला " सकाळच्या ब्याच ला येतात. माझ्याकडून कार्डीओ म्हणा,वेट ट्रेनिंग म्हणा, एरोबिक्स म्हणा शिकतात आणि नंतर कुणाच्या तरी बाईकवर मागे बसून हिंडताना दिसतात. च्यायला..ती पोरं पण सुकडी बिकडी असतात रे" त्याने त्याचं दुःख मांडलं.
'म्हंजे बाईक घ्यायलाच हवी काय?'
'म्हंजे काय? बाईक असली की पोरगी फसली' तो म्हणाला.

मग आमच्या वडिलांच्या मागे मी टुमणं लावलं. घरापासून कॉलेज कसं लांब पडतं. क्लास ला जायचं झालं तर येण्याजाण्यातच कसा वेळ जातो वगैरे सांगून सांगून त्याचं मन मला वळवावं लागलं. त्यांनी झडती घेऊन का होईना, क्लास असेल तर त्यांची गाडी घेऊन जायला त्यांनी परमिशन दिली. बाबा आदम च्या जमान्यातली ती हिरो होंडा सी डी हंड्रेड कॉलेजात कायच्या कायच हिट झाली. मी गाडी घेऊन गेलो तर पोरं उगीच गोळा व्हायला लागली. मी म्हटलं, आता सगळं जमलंच.
पण महिना गेला ,२ महिने गेले ,३ महिने गेले मागची सीट रिकामीच होती. सुरुवाती सुरुवातीला मी पूर्ण गाडी पुसायचो मग मग काही जमत नाही दिसल्यावर फक्त बसायचा भाग मी साफ करायला लागलो. मागच्या सीटवरची धूळ तशीच राहायला लागली. मग एकदा एका मित्राने विचारलं.
'मित्रा, जरा मदत हवी होती'
'बोल ना दोस्ता'
'अरे जरा पमू ला घरी जायचं होतं.'
'कोण?'
'अरे प्रमिला.. माझी ती हि..'
'हां हां.. ओके. हां. मग ?'
'जरा बाईक देतोस का ? डोन्ट वरी.. आपण पेट्रोल भरणार. फुकट नाय मागत.'
साला आपल्या गल्फ्रेंडला सोडायला माझी गाडी मागत होता.. अशी जळत होती पण काय करणार? पॉकेटमनी तर पेट्रोल मध्ये खर्च होत होता. तेवढाच खर्च वाचेल असा विचार करून मी त्याला दिली शेवटी बाईक.
नंतर तर ती प्रथाच पडली. माझी गाडी लोकांच्या गल्फ्रेंड फिरवू लागली पण मी सुकाच राहिलो. गर्लफ्रेंडसुख म्हंजे काय ते मला मिळालंच नाही. गाडी आहे म्हटल्यावर पोरींशी थोड्या ओळखी झाल्या पण सगळ्या कोणाच्या ना कोणाच्या तरी गल्फ्रेंडस! पुढे पुढे तर असं झालं की मला माझ्या नकळत ड्रायवर च्या भूमिकेत ढकललं गेलं.. हि पोरं बिनधास्त आणि निर्लज्जपणे ' ए,तिला अमुक अमुक ठिकाणावरून तमुक तमुक ठिकाणी सोड ना ' म्हणून सांगू लागली. पेट्रोलचा सगळा खर्च दोस्तीखात्यात जमा होत होता. आता गल्फ्रेंड असणा-या या कुठल्या पोराकडे सल्ला मागितला तर ते -
"अरे बराय ना नाय्ये ते.. काय कमी लफडी असतात? फोन करा, त्यांचपण कार्ड रिचार्ज करा, कुठाय, काय करतोय त्याचे अपडेट देत -हा, आणायला नि पोचवायला जा, त्यांच्या खायचा प्यायचा खर्च करा आणि वरून नाटक सांभाळा. कोणी सांगितलाय तो ताप? सुखी आहेस!"  असं म्हणून मलाच या प्रकारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. साले स्वतः मजा करत होते आणि मला साधी मदत पण करायला तयार नव्हते! कृतघ्न कुठचे!
जिम मध्ये जाऊन ट्रेनर ला हा झोल सांगितला तर बेटा मला म्हणतो,
"ह्या.. सी डी हंड्रेड घेऊन कोणाला पोरी पटल्यात काय? वयस्कर लोकांची गाडी ती. पोरीसाठी कशी - पल्सर नायतर करिझ्मा पायजे"
मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पोरांना स्कूटी, स्पिरीट अगदी गेलाबाजार झिंग (Santro Xing नव्हे..कायनेटिक झिंग.. ती डबडा गाडी) वगैरे घेऊन आपापल्या गल्फ्रेंडना फिरवताना पाह्यलं होतं. माझ्याकडे तर गाडी नसणा-या  (बॉय)फ्रेंडस ची पण उदाहरणं होती. तेव्हा मला कळलं कि हा स्वतःचे फंडे जगन्मान्य असल्यासारखे सांगत होता. होता होता कॉलेज झालं पण त्या आनंदाला मी पारखाच राहिलो.

बी कॉम झाल्या झाल्या काकांच्या वशिल्याने मी रेवेन्यु डिपार्टमेंट मध्ये चिकटलो आणि तिथले एकंदर (स्त्री) चेहरे बघता माझी गर्लफ्रेंड बनवण्याची इच्छा आपोआपच दाबली गेली.वयस्कर लोकांमध्ये राहून,वावरून  मी माझ तारुण्य हरवून बसलो.तरीपण ऑफिसात इंटरनेट होतं. ऑर्कुट,फेसबुक वरनं 'दिसलं पोरीचं अकौंट कि पाठव फ्रेंड रिक्वेस्ट.. '; ' मुलीचा आय डी दिसला कि, कर याहू chat किंवा जी talk ला add ' असले प्रकार करून मी माझ्या काल्पनिक जगात शेकड्याने मैत्रिणी बनवल्या.आता त्या मैत्रिणींमध्ये ख-या मुली किती होत्या ते देवालाच माहित! कारण माझ्यासारख्या भाबड्या मुलाला उल्लू बनवणा-या पोरांची जनतेत कमी नाय्ये.. याहू आणि जी talk वर माझ्या भावनांशी काही मुलं (खोट्या खोट्या मुली बनून) खेळल्यानंतर मी ते थांबवलं. फेसबुक वर हजार- दीड हजार लोकांचा गोतावळा जमवला. काहीजणी करायच्या फ्रेंड रिक्वेस्ट, एक्सेप्ट तर काहीजणी (खरतर ब-याच जणी! ) रिजेक्ट करायच्या.शेकडो जणींनी मला ब्लॉक सुद्धा केलं. पण माझे प्रयत्न मी सोडले नाहीत!
"एवढ्या मैत्रिणी जमवल्या पण एकपण गल्फ्रेंड नाय रे झाली" मी झम्प्याला  म्हटलं."chat वर मी इतक्यांदा  'हाय' म्हटलं तर साधा एकदा 'हेल्लो' करायचं सौजन्य सुद्धा नाही दाखवत एकपण पोरगी. त्यांच्या फोटोला लाईक केलं,कमेंट टाकली तर thank you म्हणायचा उदारपणा दाखवत नाहीत कोणी..' माझ दुःख मी व्यक्त केलं.
"रिलेशनशिप स्टेटस 'इन अ रिलेशनशिप' ठेव. बघ कशा पोरी chat  करतात ते!" झंप्याने लगेच सुचवलं!
 या झंप्याला सगळ्या क्लृप्त्या कशा काय ठावूक असत कोण जाणे! त्याची कुठलीच युक्ती कमी यायची नाही पण निदान त्याच्याकडे माझ्या प्रश्नावर,तेवढ्यापुरतं तरी उत्तर तयार असायचं!!
'ते कसं काय?'
'अरे मग पोरींना वाटणार हा आधीच एंगेज आहे, काही धोका नाही.. मग त्या पुढे येतील'
'अरे पण मग मला कोण कशी काय पटेल?'
'ते पुढे बघता येईल ना! आता बोलायलातरी सुरुवात होऊंदे!'
झंप्याचा आर्टस ला 'लॉजिक' हा विषय असल्यामुळे (आणि त्याने तो दोनदा दिलेला असल्यामुळे) मी जास्त खोलात शिरलो नाही. पण त्याचं लॉजिक फेल गेलं हे वेगळं सांगायला नकोच.
फेसबुक वर सुद्धा मग 'प्रेम','ती', 'मुलगी', 'प्रेमभंग' इत्यादी विषयाशी संबंधित कविता, कथा, चित्र लाईक करण्याव्यतिरिक्त आणि काही वेळा 'एकतरी मैत्रीण असावी' वगैरे सारख्या कवितांवर सहानुभूतीच्या कमेंट्स देण्याशिवाय इतर काही मला जमू शकलं नाही..

असो!! भूतकाळ फारसा नव्हता आशादायक नव्हता. आता वर्तमानात येतो! (माझ्या वयाच्या तेवीसाव्या आणि) यंदाच्या वर्षीच घरच्यांनी लग्नाचं प्रकरण मांडलंय. मी म्हटलं 'एवढ्यात मला लग्न नाय करायचं' पण घरचे थोडीच ऐकताहेत? आता करणारच आहेत माझं लग्न म्हटल्यावर मला थोडी स्फूर्ती आली होती  पण  इथेही  घरच्यांच्या चाळणीतून मुली पास झाल्या तर त्या माझ्यापर्यंत येणार असा एकंदरीत प्रकार होता. याचा परिणाम म्हणून गेले सहा महिने एकपण मुलगी माझ्यापर्यंत पोचली नाही!

आणि आता सगळे अडथळे पार करून हे स्थळ पुढ्यात येवून पडलं आहे. फोटोही तोच, व्यक्तीही तीच, नाव आणि आडनाव पण तेच.. ही आमच्या शाळेतली बटीण!! आता अजून बरी दिसत्येय.  सालं काय करू कायच समजत नाय्ये..मी आधी 'मला एवढ्यात लग्न नाय करायचं' असं म्हटलेलं असल्यामुळे 'एंगेजमेंट आता करून ठेवू आणि लग्न सवडीने करू' म्हणताहेत. मला वाटतं होऊन जाऊदे असंच.. म्हणजे एंगेजमेंट आणि लग्नामधले सगळे दिवस गल्फ्रेंड म्हणून तिलाच फिरवायला मार्ग मोकळा! कसं?