बुधवार, १५ जुलै, २००९

आपली शिक्षणपद्धती!

आपली शिक्षणपद्धती! आहे एकदम सुरेख. म्हणजे जो शैक्षणिक अभ्यासक्रम आहे तो योग्य आहे पण मुल्यमापनाची पद्धत मात्र एकदम चुकीची आहे.
एक एक मार्कासाठी मुलं लढताहेत.. ’बालपणीचा काळ सुखाचा’ हे केवळ कागदावरच राहिलंय.!

नववीचा इतिहास वाचल्यानंतर कधीही असं मनापासून वाटत नाही की भारतानं स्वातंत्र्य मिळवलंय. वाटतं की ते तर असंच मिळालंय.. जणू इंग्रजांनी भीक म्हणून दिलंय.ज्या पद्धतीचं वर्णन अभ्यासक्रमात आहे त्यात काहितरी कमी आहे हे नक्की!
[यावरून ही गोष्ट आठवते.. ]
भारताचा स्वातंत्र्यलढा पुस्तकातून दिसतच नाही.. शालेय अभ्यासक्रमातला इतिहास अडलाय तो स्वातंत्र्यापर्यंतच! जास्तीत जास्त पुढे येतो तो गोव मु्क्तिसंग्रामापर्यंत.. त्यापुढे नाही. (अरे... पूर्वीच्या नेत्यांची आश्वासनं त्यांचे वायदे.. यांची पूर्तता होऊन ते इतिहास जमा होणारेत कि नाही? ) तेच तेच तेच.. पण कितीवेळा? अन त्यावरचे प्रश्न म्हणजे तर मूर्खपणाची हद्द! घटना कालानुक्रमे लिहा, एखाद्या तहाची कलमं लिहा- ४ मार्क्स असतील तर ८ च ६ मार्क्ससाठी मात्र १२! काय हे? या प्रश्नांमुळे इतिहासातली रंजकताच जाते.. पण लक्षात कोण घेतो?

तसाच भूगोल.. सुदान गवताळ प्रदेश कि काय ते.. तैगा , टुंड्रा प्रदेश, निरनिराळे देश यांच्या स्थानांचा ढोबळ अंदाज असावा हे मी समजू शकतो.. पण म्हणून प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रदेशाचा अक्षवृत्तीय - रेखावृत्तीय विस्तार अगदी अंश आणि मिनिटांसहित विचारायचा का? तोदेखील ’रिकाम्या जागा भरा ’ असल्या प्रश्नांमध्ये?

त्यामुळे हल्ली मुलं एक्झाम ओरिएंटेड विचार करतात.. नॉलेज बेस्ड नाही.. यामध्ये ज्याचं पाठांतर जास्त तोच जिंकतो.’पुलं’नी त्यांच्या एका लेखात म्हटलंय की ’ आमच्या काळात जास्तीत जास्त निरुपयोगी माहिती असणा-याला ’हुशार’ म्हटले जाई..’ दुर्दैवाने हे विधान आजही तसंच्या तसं लागू होतं!

त्यापेक्षा क्षमताधिष्ठीत चाचण्या ब-या.. व्यक्तिमत्व विकासाच्याही दृष्टीने.शिक्षण असं हवं की ज्याचा सार्वजनिक जीवनात - ज्याला आपण डे-टू-डे लाईफ म्हणतो - उपयोग व्हावा. सर्वांगिण शिक्षण देण्याच्या अट्टाहासापायी निरर्थक शिक्षण देण्याचा फायदा काय? आपल्याकडे किमान दहावी व्हावं अशी समजूत आहे. कित्येक जण दहावीनंतर शिकू शकत नाहीत. पण मुळात अशा लोकांना त्या ज्ञानाचा कितपत फायदा होतो? बेरीज-वजाबाकी तर चौथी शिकलेलाही करू शकतो..पण प्राण्यांचे , वनस्पतींचे वर्गीकरण, कीपचे उपकरण यांचा त्यांना उपयोग काय? गावागावातल्या शाळांमध्ये प्रयोगही फळ्यावरच शिकवले जातात! प्रात्यक्षिक हे जर प्रत्यक्ष नसेल तर त्याला अर्थच काय? तसंच व्यवहारातले उपयोग माहिती नसतील तर कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्सनी सामान्य विद्यार्थ्याचं डोकं का शिणवायचं? त्यामुळे ही मुलं गणितात नापास होतात आणि दरवर्षी हे प्रमाण वाढतच आहे! केवळ हेच विषय नव्हे तर भाषेबद्दलही तेच!

कादंब-यामधले उतारे आउट ऑफ द कन्टेक्स्ट छापून त्यातल्या एखाद्या वाक्याचं संदर्भासहीत स्पष्टीकरण मागायचं, याला काय म्हणावं? उदाहरणार्थ..
’कोसला’ कादंबरीमधून घेतलेला काही भाग आम्हाला ’आणि बुद्ध हसला’ या नावाने धडा म्हणून होता.. तो वाचून मला ही कादंबरी नेमाड्यांचे प्रवासवर्णन असावं असं वाटत असे!अगदी हल्ली हल्ली ही कादंबरी वाचेपर्यंत!त्या भागातून ना नेमाड्यांचा परिचय झाला होता, ना त्यांच्या कादंबरीचा, ना त्यांच्या लेखनशैलीचा!! असो!

मला तरी असं वाटतं की ज्यांना पुढे शिकायच आहे त्यांना आठवीपासून गणित आणि विज्ञान इंग्लिशमधूनच शिकवावं. कारण या विषयांमधली बरिचशी पुस्तक त्या भाषेतूनच आहेत..मात्र इतर विषय मातृभाषेतच शिकले पाहिजेत तरच ते समजतील. कारण तानाजीची ’आधी लगीन कोंडाण्याचं नि मग माज्या रायबाचं’ ही घोषणा ’फर्स्ट मॅरेज इज ऑफ कोंडाणा ऍण्ड आफ्टर्वर्डज माय रायबाज!’ अशी ऐकायला कशी वाटते? तसाच सुर्याजीचा आवेश ’भ्याडांनो.. तुमचा बाप इथे मरुन पडलाय आणि तुम्ही पळताय काय? मागे फिरा.. परतीचे दोर मी केव्हाच कापून टाकलेत..’ इंग्लिश मध्ये कसा व्यक्त होईल?

हल्ली मात्र मुलांना इंग्लिश शाळात पाठवण्याचं फॅडच आलंय. अगदी गावोगावी सुद्धा.. असो.. कालाय तस्मै नमः!