शुक्रवार, १३ जुलै, २०१२

अपुले मरण पाहिले म्या डोळा!: पूर्वार्ध

गणपतराव ढूssssम झाले. 'ढूssssम' म्हणजे गेले वर! हि खरं म्हणजे महत्व देण्यासारखी बातमी नाही. आता वय वर्ष अठ्ठ्याहत्तर म्हणजे आजकालच्या जमान्यात खूप झालं. हल्ली सत्तरीतच अर्ध्या गोव-या मसणात गेलेल्या असतात पब्लिकच्या.. त्यामानाने गणपतरावांनी बरेच पावसाळे पाहिले. मग मी का सांगतोय हे सगळं? तर सांगण्यामागच कारण हे कि, माणसं एकदाच मरतात परंतु आमचे गणपतराव दुस-यांदा मेले!!

पहिल्या मरणापूर्वी जगण्याव्यतिरिक्त त्यांनी आयुष्यात काही काही म्हणून केलं नाही. काहीतरी थातुरमातुर शिक्षण. मग कुणाच्यातरी वशिल्याने सरकारी नोकरीत चिकटले. इमानेइतबारे त्यांनी ती नोकरी केली. त्यांच्या बायकोने दोन मुलांना जन्म दिला. त्यासाठी केलेली मेहनत हेच काय ते त्यांचे तरुणपणातले कष्ट!! बाकी ती पोरं आपोआप वाढली. मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मोठा झाला. शिक्षणाच्या बाबतीत ठोंब्या. एकदम बापाच्याच वळणावर गेला होता. त्यामुळे गणपतरावांनी हातपाय हलवण ओघाने आलंच. बापाचं कर्तव्य समजून ते मात्र त्यांनी पार पाडलं. नोकरीची दोन वर्ष शिल्लक असताना तब्ब्येतीच्या कारणास्तव त्यांनी व्हॉलन्टरी रिटायरमेंट घेतली. अनुकंपा तत्वावर मुलगा त्यांच्या जागी जॉईन झाला. मुलीला त्यांनी व्यवस्थित मुलगा बघून दिला. मुंबईला माहीमजवळ चांगलं दोन खोल्यांचं 'घर' असणारा जावई होता त्यांचा. पण हे सगळं दुस-या जन्मात..! पहिल्यात कर्तव्याच्या मानाने भोपळा होता..

तसं अंगावर आलंच तर गणपतराव काम करायचे. अगदीच नाही असं नाही. पण स्वतःहून जावून काय करतील तर शपथ. 'सांगकाम्या आणि हो नाम्या' म्हणतात न तसला प्रकार.पहिल्यांदा त्यांची गणपत नावाने ओळख होती. 'ए गणपत या फाईल्स उरकून टाक,आज मला घरी लवकर जायचंय' म्हणून कोणी सांगितलं कि गणपत करायचा, चकार शब्द न काढता. पण कोण अती करायला लागलं तर 'हो हो' म्हणून करायचाच नाही. शेवटी ते त्याचं काम नसायचं त्यामुळे त्याला साहेब बोलू शकत नसे. त्याने कधीही साहेबाकडे जावून प्रमोशन मागितलं नाही कि वाढीव महागाई भत्ता. सरकारच्या कृपेने आणि देवाच्या दयेने ते त्याला मिळत गेलं.

तर हा गणपत सरळ मार्गी जगत होता. गेला दिवस आपला म्हणत होता. आयुष्यात काही अनपेक्षित घडत नव्हतं आणि घडावं अशी त्याची अपेक्षा सुद्धा नव्हती. त्याची लाख नसेल पण नियतीची हवी ना?

वय वर्ष अठ्ठावन्न असताना गणपतला हार्ट attack आला. अचानक. झोपेत असताना. आणि गणपत गेला. आम्हाला सकाळी सात वाजता कोणीतरी बोलवायला आलं. आम्ही धावत पळत गेलो. बायको धाय मोकलून रडत होती. दोन्ही पोरं- तरुणपणातली- सुन्न होऊन बसली होती. पोरगी रडून थकली होती आणि पोराच्या चेह-यावरचं भविष्याबद्दलचं प्रश्नचिन्ह ठळकपणे उठून दिसत होतं.

"सकाळी पाणी मागितलं हो साडेपाच वाजता.." गणपतच्या बायकोच्या रडव्या हेलांमधून मी शब्द टिपून काढत होतो.. "मी म्हटलं उठा आणि जाऊन घ्या स्वतःच्या हातांनी.." पुन्हा टिपेचा स्वर "गेले पिऊन आले आणि झोपले.. साडेसहाचा गजर बंद करायला त्यांना उठवलं तेव्हा उठेचनात....." स्वर टिपेचा... आर्ततेचा... वाईट वाटलं.
'भला माणूस..'
'कधी कोणाचं मागून खाल्लं नाही,पाच पैशाची उधारी नाही, कोणाला दुखावलं नाही मग इतक्यात कसं व्हावं असं?'
'....पोरांचं काय होणार?'
आणि विशेषतः
'...पोरीचं कसं होणार?'
वगैरे पठडीतल्या आणि 'असल्या'वेळी करायच्या गावगप्पा सुरु झाल्या. नेहमी 'असल्या' कामात पुढाकार घेणा-या लोकांनी तिरडी बांधली, मर्तिकाचं सामान मागवलं/आणलं गेलं. गणपतचे नातेवाईक मोजकेच आणि जवळच्या गावातलेच होते. गणपत गेल्याचा सांगावा पोचताच अर्ध्या पाऊण तासात सगळा गोतावळा त्याला पोचवायला जमला म्हणजे बघा.

कार्यवाल्या भटजींनी गणपतच्या मुलाला 'काय कसं' वगैरे सूचना दिल्या. तो आणि आम्ही तिघे असे आमच्या खांद्यावर गणपतला घेऊन स्मशानात गेलो. भलताच जड होता तो आणि ऐन गृह्स्थाश्रमाच्या वयात आउट झाल्यामुळे सुमसुमीत सुद्धा होता! पण गेलेल्या माणसाबद्दल असलं भलतं सलतं बोलू नये म्हणून मी जिभेला आवर घातला.

लाकडं रचलेली होती. गणपतला तिथे ठेवला, भटजी ने गरुड पुराणातले वेचे म्हटले.. गणपतच्या मुलाने भोक पडलेलं मडकं घेऊन फे-या मारल्या आणि चितेला आग लावणार इतक्यात चमत्कार झाला!

गणपत चितेवरच उठून बसला!!

भटजीच्या तोंडाला बुडबुडे आले.. गणपतची बायको झीट येवून पडली, पोरीची वाचा बसली आणि पोरगा हातातल्या पेटत्या लाकडासकट धूम पळाला. फटाका पेटवल्यावर लहान मुलं पळतात अगदी जसाच्या तसा.. त्याला बघून गर्दीसुद्धा 'होय्य..होय्य.. पळा पळा..भूत भूत' करत सैरावरा पळत सुटली.. साहजिकच त्यात मीसुद्धा होतो..

जरा लांब गेल्यावर काही लोकांच्या जीवात जीव आला.. परिस्थितीचं भान आलं. त्यातही मी होतो! आम्ही काहीजण थांबलो. एव्हाना गणपत स्वतःच्या पायांनी चितेवरून खाली उतरला आणि लोकांना ओरडून काही सांगण्याच्या भानगडीत न पडता (ओरडून बोलणं हा त्याचा पिंडच नव्हता म्हणा!) आडव्या पडलेल्या बायको आणि थरथरत बसलेल्या पोरीकडे गेला. "अगं मी जिवंत आहे" त्यांना तो सांगत होता. "मेलो होतो पण आता जिवंत आहे मी. भूत नाहीये मी. बघ हात लावून." पण हात लावायला कोणी धजावेना. मी पाहिलं. गणपतचे पाय आमच्यासारखेच होते! मग मीच पुढे झालो आणि हात लावला. तो त्याच्या शरीराला अडला.. अंगपण गरम होतं. गणपत खरंच जिवंत होता. थोड्यावेळाने त्याची बायको शुद्धीवर आली, पोरगी बोलायला लागली.. मुलगा पण न पेटलेल्या चितेकडे परतला. सगळ्यांना गोळा करून आम्ही त्याच्या घरी गेलो.

बहुतेक बंद पडलेलं हृदय कशामुळे तरी चालू झालं असावं. धक्क्यामुळे बंद पडलेलं घड्याळ चालू होतं तसं.पण गणपतकडे वेगळीच स्टोरी होती.

"मी वर गेलो. तर गेटवर हि मोठ्ठी लाईन. चित्रगुप्त स्वतः एन्ट-या घेत होता सगळ्यांच्या. यमराज शेजारी राहून बघत होते.. आणि सगळे यमदूत आपापले आत्मे रेडयांवर बसवून लायनीतून पुढे पुढे सरकत होते..एका रेड्यावर दोन आत्मे." गणपतराव सांगत होते.
हो.. याचवेळी गणपतचे गणपतराव झाले असावेत. कारण स्वर्गाचा दरवाजा ठोठावून आलेला माणूस होता तो आता.
"चित्रगुप्त बहुतेक लोकांच्या इथल्या जमिनीवरच्या कार्याचा आढावा घेऊन स्वर्ग कि नरक अशी विभागणी करत होते. मी यांच्या चिंतेत " बायकापोरांकडे बोट दाखवत गणपतराव म्हणाले.
"दोन वर्षांची सर्विस बाकी होती.. एलआयसीच्या पॉलीश्यांचे कागद कुठे ठेवलेत तेसुद्धा हिला सांगितलं नव्हतं.पोरगा नोकरीला नाही..पोरीचं लग्नाचं वय झालंय नुकतं. पस्तिशीनंतर लग्न करण्याचा हा तोटा असतो बघा..रिटायर्ड होईस्तोवर पोरं हातात पण आलेली नसतात.."
"यमदुताच्या रेड्यावर बसून तुम्ही पस्तिशीनंतर केलेल्या लग्नाच्या फायदा तोट्यांवर विचार करत होतात?" न राहवून मी विचारलं.
"नाही नाही.. ते आपलं आता सुचलं म्हणून तुम्हाला सांगितलं" गणपतराव वदले..
"माझा नंबर आल्यावर यमदुताने माझी कारकीर्द सांगायला सुरुवात केली. चित्रगुप्ताच्या चेह-यावरचे भाव बदलत गेले. मलापण कळेना हा कोणाचं कसलं काम सांगत आहे. काहीच माझ्या भूतकाळाशी जुळत नव्हतं"
"मग?" आमचं कुतूहल आत्ताशी चाळवायला लागलं होतं. तोपर्यंत मी 'गणपत येडा झाला' असं कन्क्लूजन काढण्यापर्यंत पोचलो होतो.
"मग काय..चित्रगुप्त भडकला.. म्हणे ' कोणाला उचलून आणलंस ? इतकी वर्ष झाली इथे आणि असली चूक कशी काय करतोस?' मला काहीच समजेना. यमदूत बावरून गेला. यमराज पुढे धावले. चित्रगुप्ताने त्यांना कसले तरी रेकॉर्ड्स दाखवले. ब्यालेंस शीट सारखा काहीतरी प्रकार होता. यमराजांनी आत लक्ष घातलं. आणि यमदुता ला समजावत म्हणाले 'अरे याला अठ्ठ्यात्तराव्या वर्षी आणायचा आहे,इतक्यात कसं काय आणलंस?तुला सांगितलेला तो गणपत वेगळा. यांच्या मागच्या घरातला. यमदूत मान खाली घालून होता. 'याच काय करायचं?' त्याने दबलेल्या आवाजात विचारलं. ' ते मी बघतो.. तू तुझं काम नीट कर' असं म्हणत यमराजाने माझ्या छातीवरच लाथ घातली!" गणपतराव सांगत होते..
"तिथून मी उलट मागच्या बाजूला खाली पडलो तोच जाग आली..! मला वाटलं स्वप्न आहे पण नव्हे खरंच मेलो होतो मी! तुम्ही तर मला जाळायला निघाला होतात' हर्षोल्ल्हासित होऊन गणपतराव सांगत होते..

आम्ही एकमेकांची तोंडं बघायला लागलो. हा माणूस सांगतो ते खरं कि खोटं? शहानिशा कोण आणि कशी करणार? कि खरंच वेड लागलंय? उत्तर लवकर शोधायला हवं होतं नाहीतर आम्हाला वेड लागायची पाळी आली असती! गणपतरावांनी ते ओळखलं.

"खोटं वाटतंय न तुम्हाला?" त्यांनी विचारलं. "मग एक काम करूया.. पाठीमागच्या घरातल्या गणपतला भेटून येवू. चित्रगुप्ताच्या म्हणण्यानुसार त्याची इनिंग संपली आहे" गणपतराव वर जाऊन आल्यापासून स्मार्ट कि काय म्हणतात ना तसे झाले होते!

'काय हरकत आहे. चेक तरी करून घेऊ. ' असा विचार करून आम्ही तिघे चौघे खानविलकरांच्या घरी गेलो.

" काय वहिनी.. आजोबा कुठे आहेत?' त्यांच्या सुनेला आम्ही विचारल.
" बाबांची तब्ब्येत बिघडलीय भावजी, हस्पिटलात भरती केलंय काल.हे तिकडेच आहेत. मी नुकतीच आले."
आम्ही एकमेकांची तोंडं बघायला लागलो! गणपतराव आमच्याकडे बघून सूचक हसले.
"माझ्या मर्तिकाचं सामान परत नका करू, परस्पर इकडे आणायला सांगा.." ते हळूच माझ्या कानात पुटपुटले. तेवढ्यात फोन वाजला..वहिनी लगबगीने आत गेल्या आणि थोड्या वेळाने तोंडावर पदर दाबून बाहेर आल्या.
"बाबा गेले.. यांचा होता फोन." आम्ही तिकडून गुपचूप हॉस्पिटल मध्ये गेलो.

गणपतरावांना जिवंत जाळण्याचा अघोरी प्रकार टळल्यापासूनच्या अर्ध्या तासात ही पुढची न्यूज होती. त्यामुळे एकाला सूचना देवून स्मशानातली रचलेली चिता कोणी विस्कटणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलं. मघाचेच सोपस्कार पुन्हा झाले. या गणपतरावांचे नातेवाईक एव्हाना झाल्या प्रकारातून स्थिरावले होते. त्यांना गणपतरावांनी सगळी कथा नव्याने सांगून अचंबित करून टाकलं. मग त्यांनीच 'गणपतराव-दुसरे' यांच्या कार्याला गर्दी केली. चितेजवळ मात्र सगळे दबकूनच राहिले. न जाणो हा पण उठला तर!! पण तस काही झालं नाही..

गणपतराव पहिले स्वर्ग बघून आले होते हे नक्की.. मग ताबडतोब त्यांनी हालचाली करायला सुरुवात केली. तब्ब्येतीच्या कारणावरून त्यांनी रिटायरमेंट मागितली. साहेबांना सुद्धा त्यांनी हि कहाणी सुनावली असणारच! साहेबांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला वरून मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यायचं कबूल केलं.

मुलगी तर अशीही ह्याच्या त्याच्या बरोबर उंडारत होतीच.. त्यामुळे तिला लग्नासाठी तयार करायला त्यांना फारसे कष्ट पडले नाहीत! एका पायावर तयार होती मुलगी.प्रश्न होता तो मुलाचा.. त्यासाठी त्यांना अतिप्रचंड कष्ट पडले.त्यांना हवा तसा जावई शोधायला त्यांनी ब-याच चपला झिजवल्या.. काही ठिकाणी पोरीची थेरं कानावर आली म्हणून पोरगी नाकारली, काही ठिकाणी पोराच्या अपेक्षा जास्त होत्या. सरतेशेवटी मुंबई चा जावई मिळाला. त्याला गावाबद्दल (आणि मुख्यत्वे मुलीबद्दल) जास्त माहिती नव्हती आणि इंटरेस्ट ही नव्हता. गणपतरावांचा दुसरा जन्म भरून पावला.

मुलीच्या लग्नाचा उपद्व्याप संपतो न संपतो तोपर्यंत मुलगा लग्नाला आला.. पण गणपतरावांची पुंजी कमी झाली होती त्यामुळे त्यांनी आणि मुलाने थोडी कळ काढायचं ठरवलं. तरीही मुलीच्या वेळी झाली तशी गडबड होवू नये म्हणून त्यांनी आधीच चाचपणी करायला सुरुवात केली. कोणाची मुलगी लग्नाची आहे असं कळलं कि गणपतराव स्वतःहून चौकशीला जात. इतरांच्या अध्यात मध्यात न पडणारा माणूस लोकांची लग्नं जुळवायला पुढे पुढे करू लागला. गेल्या साठ वर्षात केली नसेल इतकी धावपळ त्यांनी त्यापुढच्या चार पाच वर्षांमध्ये केली!! एकाच आशेपायी - न जाणो त्या लग्नाच्या बाजारात आपला मुलगा सुद्धा खपला तर! मुलीसाठी दाबून हुंडा दिल्यानंतर त्याची वसुली होईल असं एक पण स्थळ त्यांना सापडत नव्हतं. पण शोध जोरात चालू होता.

असंच एक स्थळ बघून येत असताना गणपतरावांना बैलाने उडवलं!!
उत्तरार्ध:

४ टिप्पण्या:

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!