गुरुवार, १५ जानेवारी, २०१५

वर्दीतले सर

याला ‘एस एम’ मधे घाला असं खामकर सरांनी माझ्या बाबांना सांगितलं आणि पहिलीपासून माझा ‘एसेम’मधला प्रवास सुरू झाला.अगदी दहावीपर्यंत. खामकर सर हे एस. एम. हायस्कूल मधल्या कित्येकांसारखे माझेदेखील आद्य गुरु! तरीही या सुखद प्रवासात काही असे शिक्षक भेटले ज्यांचाशिवाय हा प्रवास नक्कीच साहसी आणि रंजक झाला नसता..

प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्यदिन हे एस एम च्या मुख्य ‘सणां’पैकीचे दिवस.लहानपणी माझे हे दोन्ही दिवस आई-बाबांच्या ऑफिस मधेच साजरे होत असत.पाचवीमधला स्वातंत्र्यदिवस हा माझा शाळेत साजरा होणारा पहिलाच स्वातंत्र्य दिवस होता. सात वाजायला अजून अवकाश होता तरीपण स्कूलबस च्या वेळेनुसार शाळेसमोरच्या प्रांगणात सगळी मुलं जमली होती. आमचे पी ई चे शिक्षक जरब दाखवून मुलांना शांत बसवत होते पण मुलांची चुळबूळ काही थांबत नव्हती. एक-दोन जणांनी फटके सुद्धा खाल्ले असावेत. तरीही हळू आवाजात गोंगाट चालूच होता. तो काही पूर्ण शमत नव्हता. त्याचवेळी एका बाजुला खाकी पोशाखधारी मुलांचा एक चमू उभा होता. शांत आणि शिस्तीत.सगळ्य़ांच्या पायात काळे कुट्ट चकाकणारे लेदरचे शूज,त्यात काळे सॉक्स,खाकी (आणि  ओवरसाईज्ड) हाफ पँट्स, त्यावर आमचे पट्टे असत त्याच्या तिप्पट रुंदीचे पट्टे,पूर्ण बाह्यांचे पण कोपरापर्यंत दुमडलेले शर्टस,खांद्यावर पिवळ्या रंगाची अक्षरं मिरवणारे लाल बिल्ले. डोक्यावर एका बाजूला कललेली कॅप आणि त्यावर लाल लोकरीचा गोंडा! त्यांच्यातलाच एक मुलगा त्यांना ऑर्डर्स देत होता आणि तो पूर्ण ग्रूप त्याप्रमाणे वागत होता. मी शेजारीपाजारी चौकशी करून घेतली. तेव्हा कळलं हि ‘एन सी सी’! त्यांचे सर अजून यायचे होते.तरीपण मुलं अजिबात दंगा करत नव्हती. शहाण्या मुलासारखी वागत होती. आमच्या वयाच्या मुलांसाठी ही खरंच कौतुकाची बाब होती.

तेवढ्यात त्यांचे सर आले. तसाच खाकी परंतु पूर्ण पोशाख आणि कडक भासणारा अवतार. आपली जागा घेउन त्यांनी हुकुम सोडला ‘परेssssड साव्धान’! आणि पुढच्या क्षणापासून ती जवळपास पन्नासजणांची पलटण कोणताही गडबड गोंधळ न घालता त्यांच्या सुचनेबरहुकुम वागू लागली. मला तेव्हा वाटलं होतं कि हि व्यक्ती बाहेरून फक्त एन सी सी च्या मुलांसाठी एस. एम. मध्ये येते परंतु नंतर  कळलं कि ते इथेच शिक्षक आहेत. ए एन पाटील सरांचं माझ्यावर पडलेलं पहिलंच इम्प्रेशन असं होतं. या व्यक्तिला पाहून कोणी आणि का भारावून जाउ नये? त्यावेळेपासून मला आपलंही एन सी सी मध्ये सिलेक्शन व्हावं असं प्रकर्षाने वाटत राहिलं.

मी सहावीमध्ये असताना आमच्या बंधुराजांचं एन सी सी मध्ये सिलेक्शन झालं आणि आमच्या घरात तो ड्रेस आला.शूज आले.गोंड्यावाली टोपी आली. सगळं  सगळं शाळेकडून मिळतं हे माझ्यासाठी अजून आश्चर्यजनक होतं. तेव्हा कळलं कि सर शुक्रवारी आणि शनिवारी शाळा सुटल्यानंतर थांबून मुलांकडून हे सगळं करून घेतात. मग कधी शाळेत थांबून मी दादा कशी practise करतो ते बघत असे.शाळा सुटल्यावर मैदानावर जमलेली --एन सी सी ची -- ग्रुप ग्रुप ने गप्पा मारत असणारी मुलं, सरांनी मैदानावर येत ‘फॉssssल इन’ अशी गर्जना केली कि उंचीनुसार एका रेषेत उभी रहात असत. ‘परेssssड साव्धान..विश्राम..’ एकापाठोपाठ एक ऑर्डर्स सुटत असत आणि मुलं न चुकता त्या फॉलो करत असत.

आठवीमध्ये `एन सी सी इच्छुकांनी ए एन पाटील सरांशी संपर्क साधावा अशी नोटीस फिरल्यानंतर लगोलगच्या सुट्टीत त्यांना जाऊन भेटणा-यांमध्ये मी होतो.  वरकरणी कडक वाटणारे सर प्रत्यक्षात बरेच सौम्य आहेत हे तेव्हा कळलं.  सरांनी उंची,वजन यासारखे बेसिक सिलेक्शन क्रायटेरिया लाऊन काही मुलं सिलेक्ट केली पण नंतर  "माझ्याकडे झालं म्हणून फायनल सिलेक्शन झालं असं नसतं. बटालियन चे ऑफिसर येउन फायनल करणार. "  सरांनी सांगितलं. त्याप्रमाणे  ऑफिसर्स आले त्यांनी ३०-४० इच्छुकांपैकी १८-20 जणांना घेतलं.   सुदैवाने मी त्यात  होतो परंतु ब-याच जणांचा भ्रमनिरास झाला.  काहींना  मनापासून आवड होती तरीही त्यांचं  सिलेक्शन होऊ शकलं नव्हत अशावेळी सरांनी स्वतःचे अधिकार  वापरून त्या मुलांना समाविष्ट करून घेतलं.   ज्या मुलांना त्यांनी घेतलं  त्यांचा ना  कोणामार्फत वशिला  होता , ना  सरांशी घरोब्याचे संबंध.  तरीही  केवळ नियमावर बोट न ठेवता मुलांची आवड मारली जाऊ नये म्हणून सरांनी त्यांच्यासाठी  निर्बंध थोडे शिथिल केले.

मग सुरु झाला फाईव्ह महाराष्ट्र बटालियन चा सराव. सरांची कदमताल ची ऑर्डर आली कि अजुनपण पोटात गोळा येतो..  'कदम्ताल एक.. दो.. एक.. दो..लेफ्ट राय्ट..लेफ्ट राय्ट..डावा. ..उजवा..डावा.. उजवा..एक.....एक..’ म्हणत मध्ये मध्ये एखाद्याला ‘लल्या... पाय कमरेपर्यंत उचलायचे..हे बघ.. हात हलता नयेत.. एक दो..एक दो..’ म्हणत स्वतः करुन दाखवत असत. आता लल्याला ते पहिल्या प्रयत्नात जमलं तर ठिक नाहीतर त्याला ते बरोबर जमेपर्यंत बाकिच्यांच्या कदमांचा ताल चुकायचा धोका निर्माण होत असे.  तरीही मुलं सरावाला  आवडीने हजर राहत असत.  कधी कधी  ट्रूपला  अगदीच मरगळ आली आहे असं वाटलं  कि सर मोठ्याने सांगत असत , 'काय रे हळू हळू चालताय? ती अमुक अमुक इयर ची batch अजून लक्षात आहे माझ्या .. ती पोरं चालायला लागली कि धुळीचा लोळ उठायचा.  अगदी बिल्डींग च्या वरपर्यंत जायचा .. आणि तुम्ही . बुटांवर पण धूळ बसत नाही तुमच्या !!" मग आम्ही अजून जोशात येउन  practice करायचो.  सर अगदी 'शर्टच्या स्लीव्हज कश्या फोल्ड करायच्या' इथपासून 'चालताना हात कुठपर्यंत  वर गेला पाहिजे' इथपर्यंत सगळ्या गोष्टी सांगत असत.

सव्वीस जानेवारी आला कि आमची practice अजून जोर धरायची . विद्यामंदिरच्या मुलांसमोर आपण उठून दिसलो पाहिजे हे एक परंपरागत कारण होतंच परंतु एन सी सी चा ड्रेस  घालून, प्रभातफेरीमधून कणकवली मध्ये  फिरायची ती एक संधी असे. कुठेही झेंडावंदन असलं तरी एन सी सी वाल्यांना सर्वात पुढे उभे राहता येत असे  आणि एएनपी या मानाचे मानकरी असत .  अशावेळी आम्हाला आमचाही अभिमान वाटत असे आणि सरांचाही!

National Integration Camp साठी सरांनी सार्जंट  आणि लान्स कार्पोलर  या नात्याने   मला आणि सुजित गवईला  बंगलोर ला पाठवलं होतं तेव्हा ते जातीने कोल्हापूरपर्यंत  सोडायला आले होते.  तिथुन पुढे  आमच्याबरोबर कोल्हापूर  च्या  शाळेतले सर सोबत करणार  होते. ते  सर त्यांच्या अपरोक्ष आमच्या सरांचं कौतुक  करत होते ते ऐकून खूप बरं  वाटलं होतं  .  पुढे मी तिथून बेस्ट कॅडेट रनर अपचं बक्षीस  घेऊन आलो तेव्हा सरांचा चेहरा कौतुकाने फुललेला अजूनही आठवतोय .  दुस-या  दिवशी वर्गातून नोटीस फिरली होती . एन सी सी संदर्भातल्या प्रावीण्याची तोपर्यंतची ती पहिली आणि एकमेव नोटीस.

त्यानंतरही  Annual Training Camp ला आम्हाला सर सोडायला तर आले  होते पण आमची राहायची व्यवस्था न लावताच गायब झाले. bag आणायला म्हणून गेले ते आलेच नाहीत. आम्ही त्यांना शोधलं  पण कुठे गेले काहीच कळेना. आम्ही नववीतली मुलं .  बरीचशी पहिल्यांदाच घराबाहेर  आलेली.  त्यात  पुन्हा त्या अथांग मैदानात इतक्या शाळांमधली मुलं.  एवढ्या गर्दीत काय करायचं सुचेना.. अखेर इकडे तिकडे चौकशी  करून आम्ही आमची व्यवस्था करून घेतली . तो एक  शिकण्यासारखा अनुभव होता.  पण तेव्हा मी मनातून  सरांवर खूप रागावलो होतो.  कॅम्प वरून परत आल्यावर मी सरांकडे याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनीही ते ऐकून घेतलं आणि म्हणाले " माझी चूक झाली खरी पण माझी bag ,आपण सगळे  गेलो होतो त्याच  गाडीत राहिली होती आणि ती गाडी परत गेली होती . त्यामुळे मी तिथेच एका सरांना तुमची  व्यवस्था करायला सांगून  bag आणायला गेलो. तिथून पुन्हा यायला काही साधन नव्हतं,  त्यामुळे मला परत येतापण आलं नाही ."  वास्तविक पाहता एका शिक्षकाकडून चुकीची स्पष्ट  कबुली आणि एवढ्या पारदर्शकतेची  अपेक्षा ठेवणेही गैर असते परंतु  या गोष्टीने त्यांच्या बद्दलचा  आदर मात्र दुणावला.

पुढे एम सी सी चा देखावा उभा  राहिला आणि शाळेत  खाकी वर्दिबद्दलचं कुतूहल तितकसं उरलं नाही.

पण फक्त एन सी सी हाच  त्यांचा विषय होता असं नव्हे .  दोन वर्ष ते आमचे क्लास टीचरदेखील होते. कोणाच्याही दबावाला बळी न पडता किंवा न जुमानता वर्गात सगळ्यांना समान न्यायाने वागवणारे जे मोजके शिक्षक होते त्यात ए एन पाटील सरांचं  नाव वरती होतं. आम्हाला ते एका वर्षी बीज-गणित शिकवत. त्यांचा शिकवण्यापेक्षा त्यांच्या वर्गातलं मोकळं ढाकळं  वातावरण मला जास्त आवडत असे.. वर्गात मुलांच्या शेजारी बेंचवर बसणारे देखील ते एकटेच आणि शाळेत येताना प्लेझंट वासाचं परफ्युम लावून येणारेदेखील ते एकटेच!  आम्ही आमच्या मित्र मंडळींना ज्या टोपण नावाने हाक मारत असू त्याच नावाने तेही  हाक मारत असत..  उदाहरणार्थ सिद्धेश ला सिद्धया , रमेश ला रम्या  वगैरे ! एखाद्या एन सी सी  कॅडेटने वर्गात बीज-गणिताच्या तासाला ग्राफ वरचे  बिंदू छोटे मोठे काढले  किंवा लाईन किंचीतशी जाड-बारीक झाली कि ते चिडत. " अरे लेका, एन सी सी  कॅडेट तू.. शिस्त कशी काय विसरतोस?  एकदा लावून घेतलेली शिस्त अंगात मुरली पाहिजे.."

त्यांनी कधी कोणाला ओरडून  'शांत बस ' असे म्हटलेले आठवत नाही ; परंतु त्यांच्या तासाला दंगा करण्याही  कोणाची हिम्मत झालेलीही आठवत नाही !
पुण्यात मी आणि रमेश सावंत, दोघेही  एस एम चेच विद्यार्थी तेव्हा एकाच कंपनीत होतो.  एकदा ऑफिस चं आउटिंग आटपून आम्ही परतत होतो .  .  आउटिंगच्या निमित्ताने शाळेच्या वनभोजनाचा ,सहलींचा, कॅम्प चा विषय निघाला. तेव्हा ए एन पाटील सरांचा देखील बोलण्यात उल्लेख झाला .  शास्त्री रोड वरून राहायच्या ठिकाणी  येत  असताना एका पी एम टी  stopवर सरांसारखं कोणीतरी दिसलं . आम्ही एकमेकांकडे पाहिलं. थबकून आम्ही पुन्हा पाहिलं तर प्रत्यक्ष सरच होते! तोच फिटनेस , तीच personality ! योगायोगाचं यापेक्षा चांगलं उदाहरण काय  असू शकेल ? ते काही कामानिमित्त पुण्यात मुलीकडे आले होते . आम्ही आग्रह केल्यावर  आमच्या बरोबर ते घरी आले , मनसोक्त गप्पा मारल्या,मन मोकळं  केलं आणि गेले.  शिक्षकांच्या हाताखालून  शेकडो मुलं दरवर्षी तयार होऊन निघत असतात तरी देखील इतक्या वर्षांनी अनपेक्षित ठिकाणी अचानक भेटूनही सरांनी आम्हाला नावानिशी ओळखले  हि आमच्यासाठी अभिमनाची  बाब होती.

आता सर रिटायर्ड झाले आहेत, कणकवली सोडून तांच्या  मूळ  गावी स्थायिक झाले आहेत.. कणकवलीत आल्यानंतर अजूनही एन सी सी मधली मुलं दिसतात..  एस एम च्या मैदानात  आताही परेडस होत असतील,  आताही ऑर्डर्स घुमत असतील, आताही धुरळा उडत असेल,  पण....

.... ए एन पाटील सरांशिवाय एस एम च्या  एन सी सी ची कल्पना करणंही अवघड हे देखील तितकच सत्य !!