सोमवार, २१ जून, २०१०

पाऊस.. सोहळा झाला...




या वीकएंड ला कोल्हापूरला जाऊन आलो.. एका जवळच्या मित्राचं लग्न होतं.. पहिल्यांदा ग्रुपने जायचा प्लान होता.. पण नेहमीप्रमाणे तो शेवटच्या क्षणी फिसकटला! मग काय? सुख के सब साथी दुख में सिर्फ ST ! त्यामुळे निघालो ST नेच.. ब-याच दिवसांनी असा दिवसा उजेडी लांबचा प्रवास करायचा योग आला.. नाहीतर शक्यतो रात्रीच निघतो कुठे जायचं असलं तर.. मला तशी बसल्या बसल्या झोपही लागते आणि सकाळी उठल्यावर इच्छित स्थळी पोहोचलेलो असतो त्यामुळे प्रवासाचा शीण जाणवत नाही.. ६.३० च्या ST ने साधारण १०-१५ मिनिटात पुणे सोडलं आणि घाटात पोहोचलो.. हल्ली ST च्या सीट्स पद्धतशीर असतात पूर्वीच्या तुलनेत आणि मला सुदैवाने एकदम पुढची सीट मिळाली होती त्यामुळे समोरच्या रस्त्याचा पूर्ण व्ह्यू दिसत होता आणि विंडो सीट आणि दरवाज्याच्या काचेतून बाहेरचं दृश्यही दिसत होतं.. घाटात ST ने नेहमीच्या सवयीने आरडाओरडा करायला सुरुवात केली.. मीपण त्यावर उपाय म्हणून इअरफोन्स चढवले आणि मस्त मराठी गाण्यांची प्लेलिस्ट चालू केली.. पहाटे उठल्यामुळे डोळ्यांवर झोप आली होती..कानात छान म्युझिक आणि समोरचा रस्ता बघितल्यानंतर झोप कुठच्या कुठे पळून गेली.. अर्ध्या पाउण तासात गाडी हायवे ला आली.. नुकताच पाऊस पडून गेला होता आणि तो कॉंक्रीट चा नेहमी राखाडी दिसणार रस्ता काळाभोर दिसत होता.. पुस्तकात असल्या टाईपचं वर्णन करायचं असतं तर हमखास "नुकत्याच न्हालेल्या स्त्रीसारखं " वगैरे वगैरे टाकता आलं असतं असा एक विचारही मनाला चाटून गेला!

मग मला जाणवलं कि मी खरंच हा रस्ता अशा पद्धतीने पाहिला नाहीये.. जरी पाहिला असेल तर तो कोणत्यातरी (आणि अर्थात कोणाच्यातरी!) कार मधून पाहिलाय.. त्यामुळे ज्या टाईपचा व्ह्यू मला आता दिसत होता तसा याआधी कधी दिसला नव्हता.. एकतर कार जमिनीलगत असल्याने 'रस्ता' असा दिसत नाही.. समोर एक पट्टा दिसत असतो.. जसं जसं पुढे सरकतो तसा तसा त्या पट्ट्याचा पुढचा भाग दिसत जातो.. आपण आपली त्यावर गाडी चालवायची! पण ST मधून याच पट्ट्याचा लांबपर्यंतचा व्ह्यू दिसत होता.. एकदम एक नंबर! हे सालं सुवर्ण चतुश्कोनाचं काम मात्र भारी झालंय.. रुंद सलग रस्ता, डिव्हायडरवर झाडं- बीडं.. रस्त्याच्या मधोमध ते पांढरे पट्टे, वळण्यासाठीच्या खुणा, रस्त्याच्या साईड ला ते रिफ्लेक्टर्स,हिरवे दिशादर्शक बोर्ड्स.. गावांवरून बांधलेले फ्लायओवर्स.. तिथे रस्त्याच्या कडेला बांधलेलं रेलिंग वगैरे.. छानच झालंय सगळं! आणि आता पावसात धुऊन निघाल्यामुळे सगळंच स्वच्छ स्वच्छ वाटत होतं. गाडीचा आवाज (माझ्या कानांपर्यंत) येत नसल्यामुळे गाडी संथ लयीत जात आहे अस वाटत होतं.. कानात मिलिंद इंगळेचा घासून गुळगुळीत झालेला 'गारवा' जाणवत होता..! मधूनच संदीप खरे,सलील कुलकर्णी वगैरे मंडळी आपली अदाकारी पेश करत होती.. त्याचं आटपलं की पुन्हा सौमित्र 'पाऊस म्हणजे हे आणि पाऊस म्हणजे ते...' वगैरे सांगत होता. थोडक्यात चहाचा कप सोडून सगळ्या गोष्टी जुळून येत होत्या..

सातारा आणि कराड सोडलं तेव्हा ९.३०-१० वगैरे वाजले होते तरीपण एक आल्हाददायक वातावरण तयार झाल होतं. मी स्वतः करत काहीच नव्हतो पण राहून राहून उगीचच प्रसन्न वाटत होतं.. प्रत्येकजण आपल्या धुंदीत आहे अस वाटत होतं.. ११ वाजता कोल्हापुरात पोहचलो तेव्हा मळभ दाटून आला होता मात्र पाऊस पडला नव्हता.. ४:३० तासात जवळपास २५० किलोमीटरचं अंतर कापलं होत बसने.. कमाल आहे. हे अंतर कापायला १० वर्षापूर्वी ८ तास लागायचे.. काही मिनिट्स जास्तच पण कमी नाही.. आणि प्रवासाचा कंटाळा येण्याचा तर प्रश्नच नव्हता. सगळ आठवून मग मगाशी अर्धवट राहिलेलं चित्र माझ्या परीने पूर्ण करण्यासाठी मी 'स्थानका'समोरच्या कुठल्याश्या हॉटेल मध्ये वडासांबार आणि चहा घेतला.. मग लग्न कार्यालयात पोचलो.. रिक्षावाल्याने वैश्विक नियमानुसार अख्ख्या गावाला (इथे शहराला) प्रदक्षिणा घालून मला इच्छित स्थळी पोचवलं आणि दीडपट भाडंही घेतलं.. पण मला मूड खराब करायचा नव्हता (खरंतर तिथल्या धट्ट्याकट्ट्या रिक्षावाल्यांशी भांडायला गट्स हवेत ना? )..

लग्नसमारंभ झोकात पार पडला.. मी मस्त कुर्ता वगैरे घालून मिरवलं.. जुने मित्र वगैरे वगळता फारसं कोणी ओळखत नव्हतंच.. त्यामुळे उगीच इकडे तिकडे सूचक फिरत राहिलो.. काही 'प्रेक्षणीय' दिसतंय का पाहत.. पण भ्रमनिरास झाला.. आजकाल सुंदर मुली एकच लग्नसमारंभ अटेंड करतात असं दिसतं! त्यांचं स्वतःचंच!! त्यामुळे थोडी निराशा झाली.. थोडक्यात एवढा पेहराव फुकट गेला.. जेवणाच्या पंगती आटोपल्यावर ओळखीच्या लोकांसोबत गप्पा टप्पा झाल्या. सगळ्यांचे अर्थात परत पुण्यात यायचे प्लान्स चालू होते. आहेरच्या formalities झाल्यावर परतीच्या रस्त्याला लागलो. आलोच आहे तर जाता जाता अम्बाबाईलापण भेटून येऊ म्हणत तिथे एक pit -stop घेतला. मुख-दर्शन घेतलं. हे देखील बरं झालं.. नाहीतर आपण शिस्तीत लाईन मध्ये उभं राहून कसंबसं गाभा-यात पोचणार आणि तिथला हवालदार (की जो कोणी असतो तो) आपण भोज्ज्या केला हे समजताच पिटाळून लावणार.. त्यापेक्षा हे कितीतरी बरं! कितीही वेळ उभं राहा.. मागून छळायला कोणी नाही..! त्यामुळे जरा अजूनच बर वाटलं.. मनात म्हटलं लग्न वगळता ही ट्रीप बरीच सत्कारणी लागली..!!

परत आलो तर कोल्हापूरच्या बस स्थानकावर अलोट जनसमुदाय ! सगळी जनता पुण्याला जाणा-या गाड्यांच्या प्रतीक्षेत.. येताना ठरवलं होत की जाताना मस्त वोल्वोने जाऊ पण कसलं काय आणि फाटक्यात पाय म्हणतात न तसं झालं.. त्याचं बुकिंग सकाळीच झालं होतं आणि पुणे गाडी आली की एकतर आधीच रिझर्व्ड नाहीतर पब्लिक मस्त मुसंड्या मारून जागा अडवत होतं.. एकंदरीत निभाव लागणं मुश्कील दिसू लागलं. कोल्हापूर पुण्यापासून ४.३० तासाच्या अंतरावर आल्यामुळे वीकेंडला येणारं पब्लिक वाढलं असावं! शुक्रवारी ऑफिस सुटलं की रात्री १०:३० वाजता जेवायला कोल्हापुरातल्या घरी हजर! विशेषत: मुलींची संख्या जास्त वाढल्यामुळे वोल्वो वगैरे सारख्या सोफिस्टीकेटेड गाड्यांचं बुकिंग आधीच फुल होत असावं! म्हटलं, 'सारं काही सुरळीत घडत असताना काहीतरी खूप मोठ्ठ विपरीत घडायची तयारी चालू असते..' हा मर्फीचा नियम आता आपल्याला लागू होतो की काय? तेवढ्यात अंबाबाई पावली! एक जादा बस धावून आली.. धावून म्हणजे शब्दश: बस आमच्यावर धावून आली आणि नंतर आम्ही सगळे बसवर धावून गेलो.. आत घुसलो तर पूर्ण बस रिकामी! मागून गर्दीचा लोट येत होता.. रिस्क नको म्हणून मी शेवटून दुसरी सीट पटकावली.. विंडो-सीट.. डाव्या बाजूने उन्हं येत होती आणि मी उजवीकडे! (मला कसल्यापण गोष्टीचं कौतुक वाटतं आजकाल!) पुन्हा कोल्हापुरातून बाहेर येईपर्यंतचा त्रास वगळता सुखद प्रवास सुरु झाला.. मी डोळे मिटून सकाळचं दृश्य आठवत होतो.. साथीला इअरफोन आणि मोबाईल होताच! अर्ध्या एक तासात मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ५.३०-६.०० लाच पावसाने काळोख केला होता आणि लांबवरच्या डोंगरांमध्ये कोसळणारा पाऊस दिसतही होता.. मात्र आमचा रस्ता कोरडा! कानात साधना सरगम "ढग दाटुनी येतात.." असं आळवत होती.. याला योगायोग म्हणायचं की आणखी काही? थोड्याच वेळात पावसाची रिपरिप चालू झाली... एका मोठ्या सरीतून बस पास झाली.. आणि वाटून गेलं खरंच आता तो वाफाळता चहा घेऊन कुठेतरी घुटके घेत बसलो असतो तर किती मजा आली असती!! पण अंबाबाईच्या दर्शनाने कमावलेलं पुण्य खर्च होत होतं बहुधा! कारण आमची बस एका 'अतीत' नावाच्या ठिकाणी थांबली! थोड्याच वेळात... वरून मध्ये मध्ये पावसाचे थेंब पडत होते आणि मी तसाच उभं राहून चहाचा आस्वाद घेत होतो! सकाळ पासून मनात रंगवलेलं चित्र फायनली पूर्ण झालं!

रात्री दहा-एक वाजता घरी पोहोचलो तेव्हा ५०० किलोमीटर वगैरे पार करून आल्यासारखं अजिबात वाटलं नाही उलट मनातून जरा जास्तच फ्रेश झाल्यासारखा वाटत होतं! आणि मी गुणगुणत होतो.. "पाऊस.. सोहळा झाला... कोसळत्या आठवणींचा.. कधी उधाणता तर केव्हा थेंबांच्या संथ लयींचा... "