बुधवार, ५ डिसेंबर, २०१२

हुंकार



रस्त्यावरून एक स्मॉल कार मार्गक्रमणा करत होती. गाडीच्या आय पी वरच्या घड्याळात रात्रीचे ११ वाजले होते. रस्ता फक्त नावाला डीस्ट्रीक्ट हायवे. रुंदीला छोटासाच. नुसता म्हणायला दोन पदरी. समोरून ट्रक आला तर गाडी आधीच जेमतेम असणा-या टार रोड वरून खाली उतरवावी लागणार हे नक्की! पण सुदैवाने रस्त्याला कोणीच नव्हतं.

ना ट्राफिक, ना वर्दळ, ना वस्तीची चिन्ह. गाडी चालवणा-यासाठी म्हटलं तर चांगलंच पण काही विपरीत घडलं तर मदतीसाठी सुद्धा कोणी येणार नाही अशी जागा!

शक्य तितक्या लवकर आपापली घरं गाठायची असा चौघांचाही प्लान होता.. आशू, सॅम, अन्या आणि पमू.. पैकी पमू एकटीच मुलगी. हायवे चा कंटाळवाणा रस्ता सॅम ने काटल्या नंतर स्टीअरिंग व्हीलचा ताबा आता खडतर रस्त्यांचा राजा म्हणजेच अन्याकडे आला होता. हायवे सोडून या मधल्या रस्त्याने घुसायची आयडिया आशूची.. मुलखाचा फट्टू! निघाल्यापासूनच 'बारा वाजायच्या आत घर गाठायचं' हा धोशा घेऊन बसलेला.. आता सगळ्यांनाच माहित होतं कि सरळ रस्त्याने गेलं तर बाराच काय तर रात्री दीड वाजला तरी पोहोचणं शक्य नव्हतं. एकवेळ गाडी फास्ट नेता येईल पण टोल नाक्याची गर्दी जाम टंगवते! पण आशूने गुगल map मधून एक नवाच रस्ता शोधून काढला होता. 'डीस्ट्रीक्ट हायवे' असा उल्लेख असल्यामुळे बाकीचे लोक सुद्धा जायला तयार झाले. तेवढाच एक नवा रस्ता कळेल आणि लवकरसुद्धा पोचता येईल असा सगळ्यांचा कयास होता.

पण एकंदरीत रस्ता बघितल्यावर त्याला हाय वे म्हणायचे कि नाही असा प्रश्न पडला होता. सुरुवातीचा थोडा रस्ता चांगला होता. नंतर आनंदीआनंद होता. मुख्य हाय वे पासून दहा एक किलोमीटर पर्यंत वर्दळ होती कारण तिथे एक गाव होतं. तिथपर्यंत माणसांची चाहूल तरी होती.आता तर ते पण नव्हतं.. रस्ता जास्त वाहतुकीचा नव्हता त्यामुळे फारसा खराब नव्हता पण त्यामुळे आपसूकच रस्ता जिथे खराब झाला होता तिथे दुरुस्त करायचे कष्टही घेण्यात आले नव्हते. चांगला रस्ता; मधेच एक खराब patch अशी परिस्थिती होती..

गप्पांचे विषय संपले नसले तरी बडबड करायचा कंटाळा आला होता. सी डी प्लेयर वर तीच तीच गाणी ऐकून सगळ्यांचा जीव जाम वैतागला होता. रेडीओ कोणताही सिग्नल रिसीव्ह करत नव्हता. गाडीची काच ओपन केली तरी घुसणा-या वा-याचा आवाज भीतीदायक वाटत होता. आणि काचा बंद केल्यावर सगळ्यांनाच गाडीतली शांतता भयाण वाटत होती.

" ए काहीतरी टॉपिक काढून बोला ना रे.. मला भीती वाटतेय शांततेची" पमू म्हणाली
"हो रे.. " आशूने अपेक्षेप्रमाणे दुजोरा दिला.
" तासाभरात पोचू काय रे... ? अमानवी वेळ सुरु व्हायच्या आत पोचलो तर बरं.." तो पुढे म्हणाला..
"ए .. असलं काहीतरी बोलणार असलास तर शांत बसलेलं बरं.. आधीच बाहेरचं वातावरण हे असं त्यात हा असले शब्द वापरतोय.."
"तर काय.." सॅम ने आशूला टपली मारली
"मग काय? ए, पण तुम्हा लोकांना हा रस्ता जरा जास्तच सुनसान वाटत नाही काय रे ? " अन्या विचारायला लागला.
"तुला आणि पमूला तरी समोर गाडीचे लाईट्स दिसताहेत, आम्हा दोघांना मागच्या सीट वरून फक्त काळोख आणि काळोखच दिसतो आहे."
"आणि कित्ती झाडं ही?" पमूने म्हटलं..
"गाणी तरी लावा.. असं एकमेकांना घाबरवत राहण्यापेक्षा ते तरी बरं.." -आशू
"हो आणि तेवढाच आवाजही होत राहील.. " पमूने री ओढली
"कसले फट्टू आहात रे दोघेपण.." अन्या म्हणाला आणि टाळीसाठी त्याने हात मागे-सॅमकडे नेला..

पमू ने सीडी प्लेयर ऑन केला. गाडीचं panel झळाळून उठलं.
तेवढ्यात अन्याने डोळ्याच्या कोप-यातून उजवीकडच्या खिडकीत बघितलं आणि तो गडबडला.
अचानक त्याने स्टीअरिन्ग व्हील डावीकडे वळवलं आणि क्षणार्धात परत सरळ केलं.
बेसावध असणा-या बाकीच्या तिघांचाही तोल गेला.. सॅम आणि पमू गाडीच्या विंडो ग्लासेस वर आपटले तर आशू सॅमवर!

"अरे हळूsss"
"सॉरी गाय्झ, खिडकीत बघितल्यावर मी दचकलो.."
"क्काय? काय दिसलं तुला?"
" मला वाटलं कोणीतरी तिकडून आलं कि काय.."
"... " त्याच्या या वाक्याने एका क्षणात सगळ्यांची हवा गुल झाली नसती तरच नवल!
"अक्चुअली या टेप panel च्या लाईट्स चं रिफ्लेक्शन पडतंय न काचेत.. मी तिकडे बघत होतो. इतक्यात बहुतेक इकडे पमूने आवाज वाढवायला हात फिरवला. त्यामुळे मला भास झाला कि कोणीतरी आलं कि काय या बाजूने.."
"कित्ती घाबरवलंस आम्हाला"
"डोन्ट वरी या..."
"अरे अरे अरे... समोर बघ.."

एक रस्त्याचा अतिप्रचंड वाईट patch अचानक समोर आला होता. गप्पा मारण्याच्या गडबडीत अन्याचं लक्ष हटलं होतं तेवढ्यात हा खराब रस्ता आला होता. स्पीड मधून गाडी स्लो करे-करेपर्यंत एका प्रचंड खड्ड्यातून गेलीच! मोठ्ठा आवाजही आला.. पुढच्या बाजूचा बम्पर रस्त्याला घासला असणार यात शंकाच नव्हती!! एकापाठोपाठ एक चिकटून चिकटून असे खड्डे होते की स्टीअरिन्ग चाकांना कंट्रोल करण्याऐवजी चाकं स्टीअरिन्गला कंट्रोल करत होती.. निदान असं वाटत तरी होतं... कारण पहिल्या दणक्यानेच अन्याचा डावा हात व्हीलवरून सटकला होता. गियर शिफ्ट करायलाही वेळ न मिळाल्यामुळे अपेक्षेप्रमाणेच काही अंतरातच आचके देऊन गाडी बंद पडली होती..सगळेजण शिव्या घालायला लागले..

अन्याने गाडी पुन्हा चालू करण्याआधी सवयीप्रमाणे दिवे, एसी आणि टेप बंद केला.. स्टार्टर मारण्याआधी त्याच्या कानाने एका आवाजाचा वेध घेतला. कोणीतरी गुणगुणत होतं..
हुं...हुं...हुं...
एका संथ लयीत.. त्याने दुर्लक्ष केलं आणि स्टार्टर मारला..
...पहिला प्रयत्न फेल गेला.. त्याने पुन्हा एक अटेम्प्ट केला ... आवाज करून गाडी बंद पडत होती..
अजून एक प्रयत्न आणि...आणि काही फारस भयप्रद न घडता तिस-या प्रयत्नात गाडी चालू झाली..

पुन्हा तोच रस्ता.. तीच स्मशान शांतता.. पण तो आवाज सुद्धा.. हुंकार भरल्यासारखा!!
"ए तुमच्यापैकी कोणाचा मोबाईल वाजतोय का ?"
"माझा नाही बुवा" -पमू
"माझापण नाही" -आशू
"माझाही.. पण का रे?" -सॅम
"तुम्हाला कोणाला गाण्याचा आवाज येत नाहीये का? मोबाईलच्या स्पीकर वर काहीतरी उशी वगैरे ठेवली की त्याचा आवाज बाहेर पडू शकत नाही त्यामुळे येतो ना ? तसा.. किंवा सायलेंट मोड वर असताना फोन कसा वाजतो ? तसा... कोणाचा सेल खाली पडलाय का बघा जरा लाईट लावून.." अन्या जास्तच खोलात शिरायला बघत होता..
"आमचे सेल्स आमच्या खिशातच आहेत आणि तुझा तिथे dash बोर्डवर" पमुने म्हटलं
हुं...हुं...हुं...हुं...
"ए होय रे मला पण येतोय ..बहुतेक कुठेतरी लांबवर गाणी चालू असतील लाउड स्पीकर वर" आशू म्हणाला.
काही क्षण शांततेत गेले..
हुं...हुं...हुं...
आवाज येतच होता ..

"पण बाहेरचा आवाज गाडीत कसा काय येईल?"
"आपण मगाशी दाणकन आपटलो त्यामुळे गाडीचं काही निखळलं नाही ना?"
"मलापण मगाशी तीच शंका आली... पण इतका बारीक आवाज नाही येणार आणि तो पण असा गुणगुणल्यासारखा.." खिडकीची काच जराशी खाली करत अन्या म्हणाला.. " बघ वा-याचा आवाज आला कि तो आवाज बंद होतो.. निदान ऐकू तरी येत नाही!" त्याने काच बंद केली..
हुं...हुं...हुं...हुं...हुं...हुं...

आता सगळ्यांना तो आवाज स्पष्ट पणे ऐकू येत होता.. सगळ्यांची तंतरली होती..
"नक्कीच हा आवाज लाउड स्पीकर वरच्या गाण्यांचा नाहीये.. नाहीतर इतका वेळ येत राहिला नसता." सॅम म्हणाला
"हो आणि मगाशी काच खाली केली तेव्हाही ऐकू आला नाही..फक्त वा-याच्याच आवाज येत होता" अन्या ने अनुमोदन दिलं..
हुं...हुं...हुं...हुं...
"जरी तो तसा असता तरी आता आपण बरेच किलोमीटर्स पुढे आलो आहोत आणि आवाज तर इतक्या जवळून येतोय.."

रस्त्यात परत खड्ड्यांचा patch आला.. अन्याने कचकावून ब्रेक्स लावत ३ सेकंदात गाडी १० च्या स्पीडवर आणली. कशामुळे तरी पमू दचकली आणि पाठोपाठ हात जोरजोरात झटकत तिने जोरात किंकाळी फोडली.. आणि पाय उचलून सीटवर घेतले.. तिच्या किंकाळीने सगळ्यांचे धाबे दणाणले!

"काय झालं अगं?" अन्याने विचारलं
पमूने डोळे गच्च मिटून घेतले होते.
"अगं बोल ना..." सॅम म्हणाला
"इथून पटकन लांब चल.."
"अगं पण झालं काय?"
"या खिडकीतून कोणीतरी माझ्या हातावर उडी मारली.. आणि नन्तर गाडीत.. म्हणजे आता 'ते' गाडीत पडलंय.."
"अन्या.. पटकन गाडी पळव आणि वस्तीच्या ठिकाणी घे.. " आशूची प्रॉपर फाटली होती!!

हुं...हुं...हुं...हुं... आवाज चालूच होता!

" गप रे.. " सॅम म्हणाला.. " अन्या आरामात चल.. नाहीतर स्पीडच्या नादात आपटायचो कुठेतरी...आणि काय ग पमू" पमूकडे वळत सॅमने विचारलं "खिडकी तर बंद आहे.. कोणी आणि कसं काय उडी मारू शकतं तुझ्यावर?"
पमू आता भानावर आली.. "काय? खिडकी बंद आहे?" तिने लाईट लावला.. टिश्यू पेपरचा बॉक्स खाली पडला होता. अन्याचा अचानक लावलेल्या ब्रेक्स मुळे तो panel वरून घसरून पमूच्या हातावर पडला असावा.. आणि ती घाबरली..

मघापासून कानाचा ठाव घेणारा तो हुंकार आता काळजाचा ठाव घेत होता..बाकीच्या आवाजांना ओवरराईड करून आता फक्त तोच आवाज येत ऐकू येत होता.. कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी..

"ए थांबून बघूया तरी का कसला आवाज आहे ते?"
"ए.. नको हां.. अंधा-या रात्री अनोळखी ठिकाणी नको थांबू.." आशू.
"पण हाच आवाज गाडीचा काळ ठरायचा आणि जबरदस्तीने थांबावं लागायचं.." सॅम म्हणाला..
"हो बरोबर आहे.. मी गाडी बाजूला घेतोय.."
"जरा पुढे चल ना.. पुढे तो बोर्ड दिसतोय तिथे..तिथे रस्ता असेल. म्हणजे काहीतरी वस्ती असेल" सॅम ने सुचवलं.
अन्याने गाडी हळू केली.

हुं...हुं...हुं...हुं... चा आवाज जास्तच स्पष्ट येऊ लागला..
बोर्डच्या जवळून रस्त्याला एक फाटा फुटला होता. बोर्डवर गावांची नाव लिहिली होती..
अचानक पमू पुन्हा ओरडली..
"ए चला इथून .. चला पटकन.. हीच जागा मिळाली होती तुम्हाला थांबायला..?" तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेत प्रश्न विचारला..
"काय झालं काय पण? अन्याने विचारलं..
"त्या बोर्ड वर काय लिहिलंय ते वाच"
सॅम आणि अन्याने बोर्ड वाचताच क्षणभर त्यांची पण टरकली! फाट्याच्या दिशेने दिशादर्शक बाण दाखवून
त्यावर लिहिलं होतं.. 'भूतलवाडी' !!!
आशू गर्भगळीत झाला होता..

"ए .. पमू चं म्हणणं बरोबर आहे.. निघू आपण लगेच इथून" काप-या आवाजात तो बोलला..
"मुळीच नाही.." गाडीचं इग्निशन बंद करत अन्या ठामपणे म्हणाला.. "भित्यापाठी ब्रम्ह राक्षस म्हणतात तो असा . ती 'भूत'ल'वाडी' नाहीये तर 'भू'तल'वाडी' आहे...भू म्हणजे जमीन.. तल ..म्हणजे सपाट किंवा तळ यापैकी काहीतरी पण 'भूताशी रिलेटेड नक्कीच काही नाहीये.."
आवाज अजूनही येत होता.. हुं...हुं...हुं...हुं...
"गाडीचं  इंजिन बंद आहे.. टेप बंद आहे.. रेडीओ बंद आहे.. कोणाचाही मोबाईल वाजत नाहीये.. मग हा आवाज कसला असेल?" अन्याने मागे वळून सॅमला विचारलं..
"सॅम.. काय असेल रे .?"
"काहीच कळत नाहीये रे..." सॅम म्हणाला.. त्याचा पण धीर हळू हळू सुटत चालला होता..
"मला तर वाटतंय आपल्याला भुताने पद्धतशीर सापळ्यात अडकवलंय " काप-या आवाजात आशू म्हणाला.
"अन्या..चल ना रे इथून..मला खूप भीती वाटतेय.." पमूने दुजोरा दिला..

तेवढ्यात मागून एका गाडीच्या फ्लड लाईट्सचा झोत गाडीत पडला.. चौघांच्याही जीवात जीव आला. तरीही आशूने शंका काढली.. " ए.. कशावर भरवसा ठेवू नका.. इल्युजन असेल.. !! तू गाडी स्टार्ट कर आणि निघ.." गाडीचा प्रकाश पडला तरी हुंकार ऐकू येतच होता. त्यात अजिबात चलबिचल नव्हती. त्या आवाजाच्या निर्मात्याला मागून येणा-या गाडीच्या अस्तित्वाचा काहीच फरक पडला नव्हता..

सॅमने मागच्या काचेतून गाडीच्या फ्लड लाईट्स कडे पहिलं.. मग काचेकडे पाहिलं आणि तो ओरडला....
"हे बघा भू sssss त..!!!"
पमूने डोळे गच्च मिटले .. आशू ने तिकडे मान न वळवता हनुमान चालीसा गुणगुणायला सुरुवात केली.
अन्याने मागे वळून बघितलं.. नन्तर सॅम कडे बघितलं आणि दोघेही खळखळून हसायला लागले ..
दोघांच्या हसण्याचा आवाज ऐकून पमूने डोळे उघडले.. आशुने स्तोत्र थांबवलं .. दोघांनीही माना वळवून मागे पाहिलं...

...त्यांच्याच गाडीच्या त्या काचेवर रियर वायपर फिरत होता.. एका संथ लयीत..

पहिल्यांदा आपटलेल्या खड्यात जेव्हा अन्याचा डावा हात व्हीलवरून स्लीप झाला होता तेव्हा स्टीअरिन्गशेजारी असणारं वायपरचं लीवर खाली झालं होतं. त्यामुळे त्याच्या आणि इतरांच्याही नकळत गाडीचा रियर वायपर चालू झाला होता.

सुक्या काचेवर पाण्याशिवाय घासणारा त्या वायपरचा रबर एका लयीत आवाज करत होता....
हुं...हुं...हुं...हुं... !!!!

मी मराठी लाईव्ह दैनिकाच्या 'ब्लॉगांश' सदरात प्रकाशित

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

मृत्यू असावा तर असा!!

आयुष्यात ब-याच व्यक्ती पाहिल्या..काहींची चरित्रं वाचली.. वर्णनं ऐकली..काहींवर बनलेले सिनेमे पाहिले, सिरीयल्स बघितल्या.. सगळ्यांमधून एकाच संदेश मिळाला. 'जीवन असावं तर असं!' पण परवा पहिल्यांदा असं  वाटलं कि 'मृत्यू असावा तर असा!!'
वीस हजारांचं पोलीस दल, तीन स्पेशल आर सी एफ च्या तुकड्या , वीस एक लाखांचा जनसमुदाय..आणि सार्वजनिक जीवनाला स्वयंघोषित पॉज! इतक्या लोकांना दुखावून एखाद्याला घेऊन जाताना यमानेही दोन क्षण विचार केला असेल.

राजकारण या शब्दाची उकल व्हायला लागण्याच माझं वय होतं तेव्हा या माणसाच्या नावाचा दबदबा होता. नव्हे.. चुकलो! दरारा होता... सेना म्हणजे हाणामारी, कापाकापी, सेना म्हणजे तोडफोड,हातापाई आणि हो मुख्य म्हणजे सेना म्हणजे शिव-सेना असाच सरळ हिशोब होता. त्यामुळे शिवसैनिक (आणि कोकणात सिवसैनिक !!) म्हटला कि कुतूहलापेक्षा भीती जास्त वाटत असे..

मग जशी अक्कल यायला लागली , पेपर पहिल्या पानापासून वाचता येऊ लागले तेव्हा कळलं कि सैनिक करतात ते 'रिमोट कंट्रोल' ने दिलेल्या आदेशावरून.. आणि हेही कळलं कि एका माणसाच्या हाकेवर तमाम महाराष्ट्र उभा राहतो तो असाच नव्हे काही. काहीतरी जादू आहे .. हृदयाला हात घालणारे शब्द आहेत.. मनाला साद घालणारी शैली आहे. विरोधकही नावापुढे 'साहेब' हा शब्द जोडतात म्हणजे काहीतरी आहे..

अशाच एका काळात सच्च्या 'सिव'सैनिकाच्या घरावर हल्ला झाला होता.. एका खुनाला चिथावणी दिल्याच्या संशयावरून. हल्लेकरी विरोधी पक्षातले होते..हल्ल्यानंतर प्रत्यक्ष दर्शींनी सांगितलं कि संपूर्ण घरात तोडफोड करण्यात आली होती.. घरात दोनच गोष्टी सुखरूप राहिल्या होत्या . एक शिवाजी राजांची तसबीर आणि दुसरी साहेबांची!

काळ  पुढे सरकला तसं कळलं कि शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणा-याच्या मनातही या माणसाबद्दल अढी नाही. असला तर तो फक्त आदर! किंबहुना प्रत्येकाचे शिवसेना सोडण्याचे कारणही कधीच शिवसेनाप्रमुख हे नव्हतं. देवस्वरूप मानलं सगळ्यांनी त्यांना.

टीव्ही मधल्या चर्चासत्रातली एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे अंत्ययात्रेसाठी आलेल्या लाखोच्या जनसागराला ना त्यांनी नगरसेवक बनवलं होतं , ना आमदार, ना खासदार..  हे लोक होते ज्यांना त्यांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. प्रत्यक्ष ओळख नसताना त्यांच्यासाठी ढसाढसा रडणारे लोक पहिले तेव्हा त्यांना ' हिंदूहृदयसम्राट' कशासाठी म्हणत त्याच उत्तरही मिळालं!

मराठीपणाचा धोशा लावताना हिंदी आणि इंग्रजीवरची त्यांची पकड तोंडात बोटं घालायला लावणारी होती. अस्खलित  इंग्रजी मध्ये दिलेल्या त्यांच्या मुलाखती ऐकल्या कि 'मराठी माणूस... मराठी माणूस...' चा जाप करणारी व्यक्ती ती हीच का असा प्रश्न पडत असे..मी त्यांचं तरुणपण पाहिलं नाही पण उतरत्या वयात देखील ऐन तारुण्यातल्या घटना ज्या डिटेल्स सहित ते सांगत ते पाहून त्यांच्या तल्लख स्मृतीचं आश्चर्यही वाटत असे.

भारतासारख्या देशातही जातीपलीकडे जाऊन राजकारण करता येतं हे तमाम राजकारण्यांना आणि जनतेला या व्यक्तीने पहिल्यांदा शिकवलं. अमुक एक समाजाचा नेता हे समीकरण त्यांच्या कारकिर्दीत कधीच दिसलं नाही. जो जिथे काम करतो त्याला तिथे संधी मिळणार तिकीट मिळणार असा सरळसोट आणि रास्त हिशोब दिसत असे.. त्यांची बरीचशी विधानं हि जनसामान्यांच्या मनातली होती आणि त्यामुळे आपलेपणाची वाटणारीही होती. असो..त्यांचा राजकारण,समाजकारण आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरंच काही छापून  येत आहे, येत राहील,आणि माझी समजही नसेल त्याबद्दल लिहिण्याची कदाचित....

तरीपण..

यापुढे जेव्हा जेव्हा  कोणी "माझ्या बंधुंनो , भगिनींनो आणि मातांनो " अशी साद देईल....
जेव्हा जेव्हा कोणाचा रुद्राक्षांच्या माळेत गुरफटलेला हात हवेत जाईल...
कमरेवर हात ठेवलेला आणि भगवी शाल पांघरून घेतलेला कोणताही पाठमोरा माणूस जेव्हा जेव्हा दिसेल... किंवा जेव्हा जेव्हा रिमोट-कंट्रोल ,शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट यापैकी एखादा शब्द कानावर पडेल तेव्हा तेव्हा मेंदूमध्ये ज्याची प्रतिमा तयार होईल ती व्यक्ती एकच असेल.. आणि ती ओळखायला कोणत्याही 'विशेषनामा'ची गरज पडणार नाही!!

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

द गोल्डन आईड लायन!!

'आम्ही' (आदरार्थी मी या अर्थी) 'वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर' या नावाने दाखवल्या जाणा-या चित्रपटांपैकी एक अतिप्रचंड टुकार रिमेक बघितला.. आणि हे लिहायचे सुचले. सदर टुकार हे विशेषण सिनेमा साठी नसून रिमेक साठी आहे हे लक्षात घ्यावे! नाव 'रावडी राठोर..' मूळ 'व्हर्जिनल' चित्रपट ज्यांनी पहिला असेल त्यांना हे पटेल.. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी लेखाचा पहिला प्याराग्राफ वगळून लेख वाचायला सुरुवात केली तरी हरकत नाही. अर्थात इथपर्यंत पोचायला तो वाचवा लागणारच पण असो..

लेखाचा मूळ मुद्दा मुव्ही नसून मुव्हीचा हिरो आहे .. पहिला नव्हे दुसरा नव्हे तर तिसरा हिरो. यापूर्वी दबंग स्टाईल मध्ये पदार्पण केलेला आणि उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळवलेला हिरो. यावर बरेच दिवस लिहावं लिहावं म्हणत होतो पण जमलं नाही.. हा सिनेमा पाहिल्यावर मात्र म्हटलं आता 'आळस सगळा झाडोनी' हे काम हातावेगळं केलंच पाहिजे नाहीतर प्रकरण हाताबाहेर जायचं. तर त्या हीरोचं नाव आहे....
सोनाक्षीबाई सिन्हा!! द गोल्डन आईड लायन!!
म्याडमची तथाकथित 'मादक' अदा !

हो हो.. बरोबरच लिहिलं आहे मी! सोनाक्षी सिन्हा या व्यक्तिमत्वाला 'हिरोईन' या क्याटेगरीत क्लासिफाय करायचं आमचं धाडस नाही बुवा! तिला एकतर हिरोतरी समजा नाहीतर बाईतरी!मुळात सोनाक्षी सिन्हा कोणत्याही चित्रपटात जो कोणता 'किरदार' करते त्यावेळी हिरोचं तिच्याबरोबर अफेअर आहे असं न वाटता एक्स्ट्राम्यारीटल अफेअर आहे असं आम्हाला वाटतं.

बाप इंडष्ट्री  मध्ये मोठा माणूस असेल तर कोण, कसं आणि काय होऊ शकतं याची जी मोजकी उदाहरणं आहेत त्यापैकी सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा हि मजबूत नावं! सोनाक्षी हे तर अंगापिंडाने
सुद्धा मजबूत असणारं उदाहरण!!

चेह-यावरची रेघ अथवा माशीसुद्धा (ज्यावेळी हलायला पाहिजे त्यावेळी) हलू  न देता ज्या मख्खपणे ही अभिनेत्री वावरते तिला जर उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळू शकतो तर आमचा तमाम सिनेसृष्टीला सवाल आहे कि याच न्यायाने आतापर्यंत एकदापण अजय देवगणला उत्कृष्ट नृत्याचा पुरस्कार का बरे मिळाला नाही? आणि डायलॉग काय तर म्हणे "थप्पड से डर नही लगता साब..प्यार से लगता है!" आम्ही तर पुढे जाऊन असे म्हणतो कि हिला डरायची काहीच जरुरी नाही, 'डर' त्याला वाटायला पाहिजे ज्याच्या प्रेमात ही पडेल..

एखाद्या अभिनेत्रीला आवश्यक असणारं, जरा बरं दिसण्याचं, सौजन्य तरी दाखवावं कि नाही या बयेनं (कि या बाईनं)? तर ते पण नाही. हां...आता रुंद भाल प्रदेश हे सौन्दर्याच लक्षण असतं असं म्हणतात. पण हे (अव)लक्षण तिच्याबाबतीत जरा जास्तच ठळकपणे उठून दिसतं. भुवयांच्या वरून तिची कपाळपट्टी सुरु तर होते पण अर्धं डोकं संपलं तरी पट्टी काही संपायचं नाव घेत नाही. फेसवॉश च्या किती ट्युब्ज ती महिन्याकाठी संपवत असेल याचा हिशेबच न ठेवलेला बरा..

तिचे बलदंड बाहू पाहिल्यानंतर तिचं रक्षण करायला कोण्या सलमान खान ची गरज का पडावी हा बाळबोध प्रश्न आम्हाला 'दबंग' हा सिनेमा पाहताना पडला होता.त्या चित्रपटात तर तिच्या पडद्यावरच्या एन्ट्रीलाच तिने विस्तीर्ण पाठ दाखवल्यानंतर या दृश्याला 'सेन्सॉर'वाल्यांना 'किळस' या क्याटेगरी अंतर्गत कात्री कशी लावावीशी वाटली नाही कोण जाणे!

'ओ माय गॉड' या सिनेमातला न पाहण्यासारखा कोणता भाग असेल तर ते 'गो गो गोविंदा' वालं गाणं. बिचा-या प्रभुदेवाला तिला नाच शिकवताना काय यातायात करावी लागली असेल ते (प्रभू) देवालाच ठाऊक. त्या बिचा-याने केलेले वेडेवाकडे अंगविक्षेप हिरो लोकांना सुद्धा नाकी नउ आणत असतात मग एखाद्या बाईला शिकवताना तर विचारूच नका! ज्या पद्धतीने गरीब पद्धतीचे कपडे (फाटलेली प्यांट आणि बटनं तुटलेला आणि गाठ मारून अंगावर घातलेला शर्ट ) घालून तिने प्रभू देवासारखं नाचल्याचा आव आणत जो उच्छाद मांडला आहे त्यावरून तर आम्हाला हा पिक्चर बघायची सुद्धा छाती होत नव्हती परंतु काही पेपरवाल्यांनी या सिनेमात ती फक्त एवढ्याच गाण्यापुरती आहे आणि सिनेमाशी तिचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा केल्यामुळे आम्ही हा सिनेमा पहायचं धाडस केलं.

"कमर या कमरा?" संभ्रमावस्थेतील राठोडसाहेब
रावडी राठोर (कि राठोड ) मध्ये "चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया" हे गाणं आम्ही सुरुवातीला 'पतली कमर पे' असं ऐकलं होतं. जेव्हा आम्ही ते पुन्हा ऐकलं तेव्हा गाण्यात उल्लेखिलेली ती 'कमर' नेहमीसारखी 'पतली' नसून  'चिकनी ' आहे हे आम्हाला कळलं. ज्यावेळी आम्ही ते गाणं आमच्या या या चक्षुंनी पाहिलं तेव्हा गीतकाराने मूळ (आणि सर्वत्र वापरली जाणारी ) 'पतली कमर' ही टर्म बदलून 'चिकनी कमर' का केलं असावं हे आम्हाला उमगलं आणि पटलं सुद्धा! कारण त्या कमरेचा साईड  व्ह्यू हा सामान्य कमरांच्या  फ्रंट व्ह्यू इतका होता! काय बिशाद होती कोणाची तिला पतली कमर म्हणून हिणवायची? तिला जर गीतकाराने 'पतली' असं संबोधलं असतं तर त्याला बिचा-याला 'पतली गली' पकडून इंडस्ट्री सोडावी लागली असती. असो! पण ज्या पद्धतीने ती या गाण्यात नाचली आहे ते पाहिल्यावर 'बृहन्नडेने भर दरबारात जे नृत्य केलं होतं ते कसं दिसलं असावं' हे
आमचं ब-याच दिवसांपासून असणारं कुतूहल शमलं,तो भाग वेगळा. यासाठी आम्ही तिचे आयुष्यभर ऋणी राहू!

सोनाक्षी बाईंचे जोकर सारखे चित्रपट (सुरुवातीला आमचं मत होतं कि चित्रपटाचं नाव या बाईवरून ठेवण्यात आलं आहे कि काय? परंतु आधीच्या अनेक मतांप्रमाणे हे मत देखील चुकीचे निघाले! ) बघायचं धैर्य काही आम्हाला अखेरपर्यंत एकवटता आले नाही. अगदी केबल वरून तो फुकट प्रसारित झाला तरीही! आता तर 'सन ऑफ सरदार' नावाच्या सिनेमात ती दिसणार आहे. एकंदरीत (संजय दत्तशी [कि तो तिचा भाऊ आहे ?] तिचे लग्न होताना दिसते आणि अजय देवगण दुःखी कष्टी होतो तो ) प्रोमो बघताना सिनेमाचा विषय जरठ विवाह , विधवा पुनर्विवाह किंवा तत्सम काहीतरी सामाजिक बांधिलकी जपणारा असावा असा आमचा कयास आहे. अर्थात, आधीच्या चुकलेल्या कयासांप्रमाणे हा अंदाजदेखील चुकणार हे सांगणे न लगे!

चांगल्या ब्यानरच्या सिनेमांमुळे किंवा सिनेमाच्या हिरोंमुळे सोनाक्षी बाईंच करियर त्यांना सध्या हिरोईन म्हणून प्रमोट करून पाहत असलं तरी तिचं भवितव्य तीच जाणे. परंतु आम्हास मनापासून विश्वास आहे कि सोनाक्षीबाईंनी बॉलीवूडला हिरोईन दिली नाही तरी 'रेडीमेड आई' मात्र नक्कीच दिली आहे!

तिच्या भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देऊन (आणि तिची फ्यान मंडळी आम्हाला फटकावायच्या आत) आम्ही आवरतं घेतो !

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

कोणे एके दिवशी : उत्तरार्ध

पूर्वार्ध :
"मी इथच बसवलं होतं ग त्यांना.." सासूबाई रडायला लागल्या होत्या..
"आई तू रडू नकोस ग.. नक्की आठवून बघ"
 माणसाने आणि मेव्हण्याने आजूबाजूला धावत जावून पाहिलं. सगळीकडे माणसंच माणसं होती, त्या रखवालदाराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. कोणी सापडलं नाही.कोणाला काहीच सुचेना.
थोड्या वेळाने रखवालदार आला. तो नैसर्गिक विधी आटपायला गेला होता. माणसाला असा राग आला त्याचा! तो नसताना म्हातारी कुठे गेली असेल तर? इथे दुसरा माणूस बसवायचा नाही का? त्याने स्वतःलाच प्रश्न विचारले.
"दादा, इथे एक आजीबाई बसल्या होत्या.."
"मी बसवलं होतं, तुम्हाला सांगून गेले होते.." सासूबाईना थोडासा धीर आला..
"हां  हां.. त्यी  बायी  व्हय.. ग्येली त्यी. मला म्हनली घरी जात्ये नि गेली.."
"कुठे घरी? अशी कशी जाईल? तुम्ही विचारलं नाहीत?"
"अवो मी कसं नि काय इचारू? कुटं हाय तुजं घर मनून? माजा काय संमंद कोन कुटं जातंय तेच्याशी?"
माणूस प्रश्न विचारून पस्तावला होता.. यावर काय बोलावं त्याला सुचेना...
" त्या इथल्या नाहीत.. बरं पण कुठल्या बाजूला गेली ते तरी सांगाल ?" मेव्हण्याने विचारलं..
"ह्या  बाजूला.."  भक्त निवासाच्या दिशेने त्याने बोट दाखवलं. वेळ न दवडता मेव्हणा भक्त निवासाकडे धावत सुटला. माणसाला काही सुधरेना.
त्याने बायकोला सगळ्यांना घेऊन भक्त निवासाकडे यायच्या सूचना दिल्या आणि तोही तिकडे झपाझप निघाला. जाताना नजर आजूबाजूला भिरभिरत होती. आईला भक्तनिवासाची खोली माहित असण्याची शक्यता फारच कमी होती आणि मुख्य म्हणजे खोलीची चावी माणसाजवळ होती!  दुस-या फ्लोअर वर पोचेपर्यंत मेव्हणा पडलेला चेहरा घेऊन येत होता.

"तुम्ही सगळ्या खोल्यांमध्ये शोधून बघा. चुकून कोणाच्या तरी खोलीत गेली असेल तर.. आम्ही जरा  आजूबाजूच्या एरियात शोधून बघतो." माणूस सांगत होता.
"ए मुलांनो आमच्याबरोबरच राहा. नाहीतर अजून ताप व्हायचा डोक्याला.." माणसाचं फ्रस्ट्रेशन वाढलं होतं.

म्हातारीला शोधायला सगळेजण वा-यासारखे सैरावैरा सुटले होते.

दुपारचे साडेतीन

"असं  कसं सोडून गेलात तुम्ही लोक म्हातारीला एकटीला? तेपण एवढं सोनं अंगावर असताना?"  चौकीतला पी एस आय 'मिसिंग' चा एफ आय आर नोंदवून घेताना विचारत होता. कोणाकडे काहीच उत्तर नव्हतं.
"पाटील, तुम्ही सांगितलेलं वर्णन लिहून घ्या आणि सगळ्यांना फोन करून ताबडतोब कळवा." तो एकापाठोपाठ एक सूचना करत होता
" अशोकराव, २ माणसं रेल्वे लाईन, स्टेशन आणि जवळच्या इलाक्यात जाऊदेत.. कोणीपण अननोन म्हातारी बाई दिसली तर विचारपूस करा. आणि हो, कुठे बॉडी दिसली तरी ताबडतोब रिपोर्ट करा म्हणून सांगा" तो शांतपणे सांगत होता. माणसाच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.
"साहेब तसं  काही झालेलं नसेल"
"हो पण आपल्याला शक्यता विचारात घेतली पाहिजे कि नाही. तुम्हीच तर म्हणताय कि बीपी ची गोळी घेतली नाही तर ती दुपारपर्यंत उभी सुद्धा राहू शकत नाही म्हणून..."
"हो.." माणसाच्या काळजातली धडधड कमी व्हायचं नाव घेईना.

"तुम्ही तुमच्या परीने शोध चालू ठेवा.. एफायार पण लॉग केला आहे मी. आमची माणसंही कामाला लावली आहेत.. काही काळजी करू नका. अहो अशी केस पेंडिंग राहिली तर संस्थानाची पण बदनामी होईल.. डोन्ट वरी. सद्गुरू आहेत!"

संध्याकाळचे साडेपाच :
संस्थानातल्या आवारातच एका ओट्यावर माणूस सुन्न होऊन बसला होता. एकूण एक कानाकोपरा धुंडाळून झाला होता. अगदी एकेका भिकारीणीकडे देखील निरखून पाहून झाले होते.
धाकटा  मुलगाही घामेजलेल्या अंगाने बसला होता. दोघांच्याही पोटात  अन्नाचा कण  नव्हता.
"काहीतरी खाऊन घेतोस का?"
"नको बाबा.. भूक नाहीये "
"ज्यूस तरी पी"  तो मुलाला जवळच्याच गाडीवर घेऊन गेला.
"काय सांगायचं रे तुझ्या काका आणि आत्यांना?" माणसाने मुलाला विचारलं."आई हरवली म्हणून?" माणसाला अश्रू आवरेनात."ते सुद्धा इतकेजण सोबत असताना?"
"बाबा, रडू नका न.. सापडेल आजी कुठेतरी." बापाला रडताना पाहून मुलाला ज्यूस घशाखाली उतरेना.
लांबून मेव्हणा येताना दिसला. म्लान, गलितगात्र झालेला. पोलिसाने एक बॉडी  ओळखायला बोलावलं होतं. माणसाचा धीर होत नव्हता म्हणून मेव्हणा गेला होता. माणसाने अश्रू पुसले. वाईट बातमी नसावी म्हणून सद्गुरुंची प्रार्थना केली.
" सुदैवाने आजींची नाहीये 'ती' बॉडी. पोलीस म्हणताहेत असं  कधी घडलं नाही. इथल्या रेकॉर्ड्स  मध्ये माणसं हरवल्याची नोंद नाही. सापडेल सापडेल म्हणताहेत पण अजून त्यांच्याकडे पण काही खबर नाही."
 माणसाने निःश्वास सोडला.
"खावून घे रे काहीतरी" त्याने मेव्हण्याला सुचवलं. मेव्हणा वडापाव च्या गाडीकडे वळला.
थोड्या वेळातच मोठा मुलगा आणि बायको एका दिशेने आले , त्याचवेळी सासूबाई आणि तिची सूनही पोहोचले. कोणाच्याच हाताला काही लागलं नव्हतं.
"ती जाणारी आजी आपली नव्हे न?" लांब दिसणारी एक म्हातारी दाखवत मोठ्या मुलाने विचारलं. क्षणभर सगळ्यांचे चेहरे डवरले. पण नंतर लुगड्याचा रंग बघताच ते  पुन्हा कोमेजले.

"आता तर चालणारी म्हातारी शोधूनही उपयोग नाही. मला वाटत नाही आई आता उभं राहायच्या अवस्थेत असतील." बायको ने सत्यावर बोट ठेवलं.
सगळे हताश झाले होते.
"एक सद्गुरूच बाहेर काढतील या संकटातून " मेव्हण्याने विश्वासाने म्हटलं.

संध्याकाळचे सहा:
दुपारपासून म्हातारी गावातल्या रस्त्यावरून फिरत होती. रस्ताही ओळखीचा वाटत नव्हता आणि लोकही. इतकी वर्ष या गावात राहून आपण रस्ता चुकतो याबद्दल तिला विषाद वाटलाच होता पण गावात कोणीही आपल्याला ओळखत नाही याचा जास्त ! पण तरीही कोणीतरी निदान मुलाच्या तरी ओळखीपाळखीचं माणूस भेटेल या आशेवर ती चालत होती. तेवढ्यात म्हातारीला एक शेती दिसली. बायका राबत होत्या. पायवाटेने ती खाली उतरली.
"ए मुली.. तुला माझ घर माहित आहे का?" तिने एका बाईला विचारलं.
"कोण ग आजी तू ? कुठे राहतेस?"
"मला नेमका पत्ता नाही सांगता यायचा. पण असाच रस्ता आहे. जास्वंदीची खूप झाडं आहेत आमच्या परसात."
बायका आपापसात चर्चा करू लागल्या.
'वेडी झालली दिसत्ये ह्यी म्हातारी'
'नाय ग..खानदानी आसंल.'
'कशावरून'
'आगं , आंगावर  दागिनं बग'
'व्हय गं.. रस्ता चुकल्याली दिसते' त्यांची चर्चा चालू असताना म्हातारी तिथून निघाली. पायवाटेने वर जाऊन मघाच्याच डांबरी रस्त्याने थोडं पुढे गेल्यावर एक साधारणसं तिच्या घरासारखंच  दिसणारं घर तिला दिसलं. घर बंद होतं. परसात जास्वंद नव्हती तर कापूस होता. घराच्या अंगणात जाऊन म्हातारी उन्ह उतरेपर्यंत बसून राहिली.

रात्रीचे साडेआठ:

म्हातारी तशीच बसली होती. एकटीच. उपाशीपोटी. दिवसभर चालून गमावलेलं त्राण तिला उठून उभंसुद्धा राहू देत नव्हतं. घर बंद होतं. एवढा काळोख झाला तरी नातवंडं शाळेतून परत आली नव्हती , मुलगा आणि सून सुद्धा ऑफिसमधून परतले नव्हते. 'घराचा दरवाजा कुलूपबंद करून कसे गेले हे लोक, ते सुद्धा मी इथे असताना?' म्हातारीला समजत नव्हतं. तिने स्वतःच शोध घ्यायचं ठरवलं आणि एका नव्या निर्धाराने ती बाहेर पडली.

रस्त्यावरून सायकल घेऊन चाललेल्या एका पांथस्थाला तिने थांबवलं.
"अहो, माझा मुलगा दिसला का हो तुम्हाला?"
"आजे, कोन तू नि कुटनं आलीस? तुज्या मुलाचं  नाव काय है?"
आजीने मुलाचं नाव सांगितलं आणि यायच्या दिशेकडे हात दाखवून 'कुटनं आलीस' चं उत्तर पण दिलं
"घर बंद करून कुठे गेलेत सगळे देवाला ठाऊक.." म्हातारी पुटपुटली
"आं ? काय म्हनलीस?" त्याने विचारलं.
"काही नाही .. निदान आमच्या शेजा-यांकडे तरी नेऊन सोडा तोपर्यंत.." म्हातारीने त्याला विनवणी केली..
"कोन हैत तुज्ये श्येजारी?
आधीचं मुलाचं आडनाव ऐकताच पांथस्थाचा बळावलेला संशय शेजा-यांच आडनाव ऐकताच दृढ झाला. त्याने ताडलं कि म्हातारी इथली -- या गावातली दिसत नाही . बहुतेक भ्रमिष्ट होऊन रस्ता चुकलेली दिसते. अंगावर एवढे दागिने घेऊन रात्रीचं एकटी फिरायचं धाडस इतर कोणी करणार नाही!
"आजे, मी सोडतो तुला घराकडं माज्या सायकलच्या शीटवर बश्शील?"
"नाही जमणार मला"
"बरं मंग चालत चलशील?"
"बरं" म्हातारी चालायला लागली.

रात्रीचे साडेनऊ :
"आजे तू थांब हितं" पांथस्थाने घराच्या बाहेर सायकल लावली आणि तो आत गेला. म्हातारी चिंताग्रस्त झाली. "कुठे घेऊन आलाय हा? ठिकाण तर ओळखीचं वाटत नाही. आपल्याला लुटायचा तर डाव नसेल याचा? घर दाखवायच्या बहाण्याने इथपर्यंत घेउन आला. आता आपले दागिने लुटून पोबारा केला तर? "  नाही नाही ते विचार तिच्या डोक्यात यायला लागले.
"माझ्या मुलाची पोलिसात ओळख आहे हां .. सांगून ठेवते.." पंधरा वीस मिनिटात हातपाय धुउन तो बाहेर येताच म्हातारीने त्याच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला.
तो शांतपणे हसला.
"बरं मंग.. माजे आये..चाल.. पोलीस टेशनात जाऊ.."
"मला नको नेऊ तिकडे.. मी काय चोर आहे ? तुला सोडणार नाही माझा मुलगा" म्हातारीने हल्ला सुरूच ठेवला.
"निदान तुजं घर तर शोदुया?" त्याने विचारलं..
"बघ हां ..घर शोधायच्या बहाण्याने मला लुटायचा डाव असला तर आधीच सांगते.. माझी नुसती हाडं आहेत.. उगीच झटापट करायला जाशील आणि माझा जीव जायचा.."
पांथस्थ पुन्हा हसला. त्याने आजीचा हात धरला आणि हळू हळू तो चालू लागला. म्हातारी कभिन्न अंधारातून त्याच्या मागून चालायला लागली.

रात्रीचे अकरा:
अर्ध्या तासापासून माणूस समाधीसमोर बसून होता. सगळे प्रयत्न थकले होते. गात्रं थकली होती. सगळे पर्याय चाचपून झाले होते. पोलिसांनी "बॉडी matching  टू  डिसक्रीप्शन - अलाईव्ह ऑर डेड" च्या सूचना देऊनही हाती काही लागलं नव्हतं.
"सद्गुरू , तुमच्याकडे आजपर्यंत काही मागायची वेळ आली नव्हती पण आज आली आहे...  मी माझी आई मागतो. माझी आई मला परत द्या.. मला आई परत द्या सद्गुरू.. इतक्या वर्षांच्या भक्तीनंतरही तुमच्या अस्तित्वावर माझं जे काही प्रश्नचिन्ह होतं त्यावर शिक्कामोर्तब करायचं कि ते कायमस्वरूपी मिटवून टाकायचं याचा निर्णय आज तुम्ही घ्यायचा आहे. पण एक निक्षून सांगतो, जर इथून मी आईविना परतलो तर तुमच्या दारात कधी पाउल टाकणार नाही.." माणूस ढसा ढसा रडू लागला..

रात्रीचे अकरा वाजून पाच मिनिटं :
खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. विषण्ण  मनाने कोणीतरी दरवाजा उघडला. बाहेर हवालदार उभा होता.
"तुम्ही सांगितलेल्या वर्णनाची आजी मिळाली आहे.. मुलाला घेऊन या असा धोशा लावलाय.मला वाटतं तुमच्याच आजी आहेत त्या. चौकीवर येऊन बघता का जरा?"सगळेजण वेड्यासारखे धावत सुटले.
"देवळात जाऊन बाबांना सांगून ये"  माणसाच्या बायकोने धाकटया मुलाला सांगितलं आणि कुलूप लावून तीदेखील चौकीच्या दिशेने पळत सुटली.

रात्रीचे सव्वा अकरा :
आजीला समोर बघून सगळ्यांच्या संयमाचे बांध कोसळले होते.. एकमेकांच्या गळ्यात पडून सगळे रडत होते. पोलिसांचे सुद्धा डोळे पाणावले होते..
"एक भला माणूस सोडून गेला यांना इथे."  पोलीस सांगत होते.
"त्यांना थांबवायचं नाही का?" माणूस विचारात होता..
"तेच ना .. त्यांना 'थांबा' म्हणत होतो तर 'नाही' म्हणाले.. म्हणाले 'खूप उशीर झाला आहे. घरी बायकामुलं वाट  बघत असतील' मग कसं थांबवणार.? तुम्ही बघून घ्या दागिने-बिगीने.. काही चोरीला वगैरे गेलंय  का?"
"साहेब, माझी आई मिळाली एवढं खूप आहे. तुम्हीच हे पैसे ठेवा थोडे. बक्षीस म्हणून." माणूस म्हणाला
"अहो पैसे कसले देताय.. आम्ही आमचं कर्तव्य केलं.."
"असू दे साहेब..  त्या भल्या माणसाला द्या शक्य झालं तर.."
"कुठे गेलेलात सगळे मला सोडून?" म्हातारीने सगळ्याने प्रतिसवाल केला..
लहान मुलाइतकी ती निरागसता पाहून कोणालाच हसावं कि रडावं ते सुचेना!!
"आम्ही कि तू ?"
"अरे असं काय? काल रात्री रस्ता चुकला तेव्हा घरी परत आलो ना आपण सगळे? मग? आणि आपलं घर बंद करून तुम्हीच लोक गेलेलात कुठेतरी.."
तेवढ्यात मेव्हणा आला.
"कुठे होतास रे?" माणसाने विचारलं.
"आजीला सुरक्षित आणलंस तर ११ प्रदक्षिणा घालेन मंदिराला, असा नवस केला होता सद्गुरूंना.. तो पूर्ण करून आलो" मेव्हणा म्हणाला.
माणसाने डोळे मिटून घेतले. प्रत्यक्ष सद्गुरुंचं नसलं तरी, कधीही न झालेलं सद्गुरुंच्या अस्तित्वाचं दर्शन त्याला झालं होतं. सगळ्या शंका-कुशंका पूर्ण मिटल्या होत्या..

पहाटेचे साडेसहा वाजले होते..
भक्त निवासाच्या गेट मधून एक राखाडी तवेरा बाहेर पडत होती.. आतमध्ये 'माणूस' आणि त्याचा कुटुंबकबीला होता..
माणूस पुन्हा एकदा खुश होता..

समाप्त

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

कोणे एके दिवशी : पूर्वार्ध

पहाटेचे साडेसहा वाजले होते..
भक्त निवासाच्या गेट मधून एक राखाडी तवेरा  आत येत होती.. आतमध्ये 'माणूस' आणि त्याचा कुटुंबकबीला होता..
माणूस खुश होता..
आदला दिवस :
राहतं घर ते सद्गुरूचं संस्थान हि त्याची दरवर्षीची वारी.. आठ-साडेआठशे किलोमीटरचा प्रवास आणि पुन्हा तेवढाच परतीचा रस्ता.. दरवर्षी एसटी महामंडळावर भिस्त ठेवून त्याचा हा प्रवास असे. डायरेक्ट बस सेवा उपलब्ध नसल्याने एकतर तीन टप्प्याचा प्रवास.. प्रत्येकवेळी रिझर्वेशनमुळे सीट नक्की असे पण हक्काची सीट मिळवायला देखील कोण कष्ट पडत.. आधी स्थानकावर जावून गुर्मीत असणा-या आणि उलट उत्तरं करणा-या अधिका-यांकडून रिझर्वेशन मिळवायचं, नन्तर गर्दीमध्ये घुसून आपल्या  बायकोला आणि पोरांना आता घ्यायचं, मग बसमध्ये नाही नाही त्या लोकांच्या नादाला लागावं लागायचं, त्यांनी practically अडवलेली सीट कायदेशीररित्या आपण कशी रिझर्व केली आहे हे त्यांना पटवून द्यायचं..एक ना दोन! एक टप्पा संपला  कि स्थानकावरच पुढची बस येईतो वाट पहा.. मग बस बदला पुन्हा तोच कंटाळवाणा खेळ..

जरी सद्गुरुंच्या अस्तित्वाचं दर्शन त्याला कधी झाल नव्हत तरी त्यांच्यावरची निस्सीम भक्ती त्याला दरवर्षी तिकडे खेचून नेत असे.. 'हि ओढ आहे म्हणजेच त्यांचं अस्तित्व आहे' असं समजून, बारा -चौदा (किंवा त्यापेक्षा जास्तच ) तासांचा प्रवास आणि मग नंतरची चार तासांची भक्तांची रांग पूर्ण करून तो समाधीपाशी पोचला कि शीण कुठल्याकुठे  पळून जात असे.. त्यांच्या मूर्तीचे आश्वासक डोळे मन प्रफुल्लीत करत असत. दोन मिनिटं भक्तिभावाने केलेली आराधना ; त्याला आधीचे दगदगीचे चोवीस तास विसरायची आणि पुढच्या सगळ्याला सामोरं जायचं बळ देत असे.

पहिल्यांदाच तो गाडी ठरवून सदगुरुंच्या पायाशी आला होता.. दरवर्षी जातात म्हणून यावेळेला 'मी पण येते' म्हणून त्याच्या सासूने सुद्धा टुमणं लावलं होतं, आई सुद्धा 'मला एकदा घेऊन जा' म्हणत होती.. आता एवढ्या म्हाता-या लोकांना घेऊन बस प्रवास करणं तोही अश्या पद्धतीने म्हणजे जीवाला अजूनच घोर. त्यामुळे हे गाडीचं प्रकरण करावं लागलं होतं.. मेव्हण्याला गाडी चालवता येत असे त्यामुळे त्याने त्याच्या मित्राची गाडी घेतली होती.

आदली
रात्र :
आता सगळे म्हणतात, पण गाडी सुद्धा तितकीशी आरामदायी नसते हे त्याला एव्हाना कळून चुकलं होतं. दिवसाचा साडेचारशे किलोमीटरचा पहिला टप्पा सुखरूप झाला पण पुण्यातल्या नातेवाईकांकडे घेतलेल्या   थोड्याश्या विश्रांती नंतरच्या रात्रीच्या प्रवासात एका रिकाम्या आणि सरळसोट  रस्त्यावर मेव्हण्याला डुलकी लागल्यासारखी झाली होती. त्यामुळे गाडीला छोटासा झटका बसला होता.
"तू झोपतोस का जरा? " विचारल्यावर 'घाबरू नका हो भावोजी,परत असं नाही होणार असं सांगून' मेव्हण्याने त्याला आश्वस्त केलं होतं पण हे कारण, अख्ख्या प्रवासभर माणसाची झोप उडायला पुरेसं होतं. मागे सासूबाई, आई आणि बायको निश्चिंत झोपल्या होत्या , एकदम शेवटच्या सीट्स वर मुलं आणि मेव्हण्याची बायको झोपली होती..

सारखं सारखं एका जागेवर बसून मुलं वैतागली होती . माणसाच्या आईला मुळात एवढ्या लांबच्या प्रवासाची सवय नव्हती .. इतका वेळ बसून ती फार अवघडून गेली होती . त्यात वय जास्त आणि वरून ब्लड प्रेशर अर्थात बीपी चा त्रास.. तिला संध्याकाळी निघतानाच भ्रम वाहायला सुरुवात झाली होती ..  'काय झालं रे? कधी पोचणार आपण? नको तो प्रवास .. परत मागे जावूया ..'  असं काहीबाही सांगून ती आपल्या मुलाचं मन वळवू पाहत होती . पण माणूस आधीच शिणला होता . 'गप बस ग आई जरा.. अगं ए तिच्या बी पी च्या गोळ्या दे तिला घेतल्या नसतील तर... ' असं बायकोला ओरडून तो पुढे बघत बसला.. आता ते आठवल्या नन्तर त्याला जरा भरून आलं. ' आपण तेव्हा पुढचे परतीचे प्लान्स करत होतो. दर्शन लवकर आटपल तर लगोलग निघायचं... तेवढीच एक सुट्टी वाचेल. वगैरे वगैरे. त्यामुळे आवाज चढला.. पण काही झालं तरी आपल्या म्हातारीची आपणच काळजी घ्यायला हवी' असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला.

त्यात रात्री एका ठिकाणी रस्ता चुकला!! मेव्हण्याने कुठेतरी चुकीचा रस्ता पकडला आणि २ एक किलोमीटर गाडी पळवली . मग माणसाच्या लक्षात आलं कि गडबड झाली ..  चिडचिड होणं ओघानं आलंच! मेव्हण्याला चार शब्द सुनावून झाले.  माणसाच्या वरच्या पट्टीतल्या आवाजाने गाडीतले सगळे जागे झाले होते.

"काय झालं, अहो? कशाला ओरडताय त्या बिचा-याला पण?" बायकोचा काळजीयुक्त सवाल..
"बघ याला.. झोप म्हटलं जरा वेळ, तर ते पण नाही. शेवटी चुकवला रस्ता. सांगत होतो, त्या टर्न वर लक्ष ठेव म्हणून... आता मागे जाण्याशिवाय पर्याय पण नाही"
"असेल अहो रस्ता इथून" तिने समजावणीच्या सुरात म्हटलं.
"कशाला उगाच? तो मागे जायचं म्हणतोय तर जाऊ या गं घरी.. कंटाळा आला या प्रवासाचा. किती वेळ गाडी चाललीच आहे. बसून बसून पाठीला रग लागली, हाडं दुखायला लागली माझी... पोरं पण कंटाळली आहेत " अर्ध्यात उठलेल्या म्हातारीने विषय समजून न घेताच रडगाणं सुरु केलं.

तिकडे दुर्लक्ष करून माणूस मेव्ह्ण्याला सूचना द्यायला लागला. गाडी वळवायला पण जागा नव्हती एवढ्या चिंचोळ्या रस्त्याला गाडी लागली होती. मग त्याने पण मान खाली घालून गाडी रिवर्स घेतली..म्हातारीची बडबड  चालूच होती. पण इतरांना झोप अनावर झाली होती. माणूस सवयीने तिचं बोलणं टाळायला शिकला होता आणि मेव्हण्याला तर जागं राहायला त्या आवाजाची मदत होत होती.

पहाटेचे  पावणेसात :

पहाटे  गावात शिरल्यानंतर संस्थानाचा पत्ता शोधताना परत नाकीनउ आले कारण एसटीची सवय. पण शेवटी ते पोचलेच! माणसाने धावतपळत जाऊन भक्त निवासाच्या बुकिंगच्या रांगेत जागा अडवली आणि थोड्या वेळात रूम्स च्या किल्ल्या घेऊन तो परत आला. एव्हाना मेव्हणा ड्रायव्हर च्या भूमिकेतून हमालाच्या भूमिकेत शिरला होता आणि त्याने सगळं सामान गाडीतून काढून खाली मांडलं होतं.

"चला,  बरं झालं रूम्स अवेलेबल होत्या. दोन रूम मिळाल्या आहेत.. चटचट सामान हलवूया आणि आंघोळी आटपून दर्शनाच्या रांगेत उभं राहू. लवकर गेलो तर गर्दी कमी असेल.' माणूस एकापाठोपाठ एक सूचना देत होता आणि बाकीचे त्या फॉलो  करत होते.

सकाळचे सव्वा आठ :

तासा दीड तासात सगळे रेडी होते. संस्थानाच्या दारात पोचताच माणसाला समजलं यंदापासून सगळ्या भक्तांसाठी वेगळी सोय करण्यात आलेली आहे. पुरुष, स्त्रिया आणि वृद्ध यांसाठी तीन वेगवेगळ्या रंग करण्यात आलेल्या आहेत. माणसाला बरं वाटलं. दर्शन देत नसले तरी सद्गुरू अनुभव देतात ते खरं आहे.त्याने स्वतःशीच विचार केला. म्हाता-यांना भल्यामोठ्या लायीन्मधून बसत उठत नेण्यापेक्षा हे बरं झालं. लगेच तो आणि मेव्हणा 'पुरुष', बायका आणि मुलं 'स्त्रिया' व सासुबाई  आणि आई 'वृद्ध' अशी विभागणी झाली.

दुपारचे पावणे दोन :
तब्बल साडे पाच तासांच्या भल्यामोठ्या रांगेनंतर दर्शन मिळाले. गाभा-यातून बाहेर पडताच त्यांच्या  'स्त्रिया' आणि लहान मुलं दिसली आणि माणसाच्या चेह-यावर हसू खुललं. 'चला, मुख्य काम झालं.'  तो पुटपुटला. कडकडून भूक लागली होती. पोरं मरगळलेली होती.
' आई आणि तुझी आई कुठेयत?' त्याने पृच्छा केली.
'येतीलच इतक्यात' बायको म्हणाली आणि सगळे  गाभा-याकडे डोळे लावून बसले. "छान झालं न दर्शन?'" म्हणेपर्यंत सासूबाई बाहेर पडल्या. आता पाठोपाठ आई येईल म्हणून त्याने डोकावून पाहिलं.

"आज्जी दिसत नाही ती?" मुलांनी एव्हाना ते हेरलं होतं.
"थांबा रे.. आई कुठे राहिली?" त्याने विचारलं.
'आई, अगं आई कुठायत?' पाठोपाठ बायकोने विचारलं.
"आई, अहो विसरलात कि काय त्यांना?" बायकोच्या भावजयीचा प्रश्न.
"कुठे मागे राहिल्या कि काय?' मेव्हणा 
"थांबा, थांबा" सासूबाई म्हणाल्या. " या माझ्या मागून" सगळे तिच्या मागून मुख्य दरवाज्याकडे जाऊ लागले.
"त्यांना उभं राहवेना, कालची दगदग खूप झाली. भ्रम पण व्हायला लागले आहेत. 'घरी जाऊया' म्हणायला लागल्या. म्हटलं अहो विहीणबाई  बरं वाटत नाही का? तुम्हाला झेपत नसेल तर रांगेबाहेर बसून विश्रांती घ्या. नंतर बोलावते तुम्हाला. तर म्हणाल्या मला काही झेपणार नाही. तुम्ही सगळे दर्शन घेऊन या. मी म्हटलं 'ठीक आहे ' आणि त्यांना आणून बाहेर बसवलं आणि तिथल्या शिपायाला सांगितलं 'आजींकडे लक्ष ठेवा' म्हणून" सासूबाईंची बडबड अखंड चालू होती. सगळे तिच्यामागून लगबग चालत होते.

एका बाकाकडे  आल्यानंतर सासुबाईन्चा चेहरा पांढराफटक पडला..
"काय झालं आई? कुठे बसवलं होतंस त्यांना?"
"इथेच.." सासूबाईंना काहीच सुधरेना.. घेरी आल्यासारखं व्हायला लागलं..
"कुठे इथेच? इथे तर कोणीच नाहीये"
माणसाची आई त्या बेंचवर बसलेली नव्हती!!

उत्तरार्ध :