मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

ताळेबंद-उरलेला

आंतरजालावरून साभार
ताळेबंद: जमेल तेवढा

आमच्या ऑफिसमध्ये घरभाड्याची पावती आणि प्रवासभत्ता (म्हणजे एल्टीये ) यावर करसवलत मिळते. त्यामुळे सरसकट सगळेच कुठूनतरी पावतीपुस्तक आणून पावत्या तयार करून सबमिट करतात. मीपण तसली एक पावती तयार करून त्यावर स्ट्याम्प तिकीट चिकटवत होतो. एक खोटी सही मारली कि पावती तयार!तेवढ्यात आमच्याच हापिसातला एक नुकताच नोकरीला लागलेला पोरगा येउन विचारतो कसा, "हा करता तो भ्रष्टाचार नाही का?" वरून "राजकारणी त्यांच्या लेवल वर भ्रष्टाचार करतात... तुम्ही तुमच्या!" असंही म्हणून गेला! नेमकं त्याचवेळेला माझ्या जिभेवर तिकीट होतं म्हणून वेळ निभावून नेता आली; नाहीतर त्याला काय प्रत्युत्तर द्यायचं हेच मला कळलं नसतं! एक ज्युनिअर येउन अपमान करून जातो म्हणजे काय? तर असो.

बाकी मला अशा ज्युनिअर्सचा, सुनेला सासुरवास करणाऱ्या सासवांचा, बायकोला मारझोड करणाऱ्या नवऱ्यांचा, शिक्षकांना उलट उत्तरं देणाऱ्या पोरांचा, रस्त्यात हुज्जत घालणाऱ्यांचा, बस मध्ये एका दाराने चढून कंडक्टर पोचायच्या आत  त्याच दाराने  उतरणाऱ्यांचा, तिकीट न काढताच लोकल प्रवास करणाऱ्यांचा, बायका-पोरींशी बिंधास  बोलणाऱ्यांचा, ऑफिसमध्ये बसून ऑफिसच्या वेळातच ऑफिसमधल्या लोकांकडे  ऑफिसमधल्या लोकांच्याच कागाळ्या करणाऱ्यांचा अशा अनेक लोकांचा वेळोवेळी प्रचंड आदर वाटत आला आहे. मानतो बुवा आपण त्यांच्या डेरिंग ला!! तसा मी मधून मधून इतर लोकांमागे जाऊन  (चौकात मामा नाहीये याची परत परत खात्री करून) सिग्नल वगैरे तोडतो परंतु यापेक्षा जास्त बंडखोरी या जन्मात जमेल असं  वाटत नाही. पोलिस कशाला अगदी होमगार्ड लोकांची पण मला दहशत वाटते. लहानपणी तर मी खाकी कपड्यामुळे पोष्टमन लोकांना पण घाबरत असे पण पुढे मोठा झाल्यावर टोपी आणि पोट यावरून मी पोलिस आणि पोष्टमन वेगवेगळे ओळखायला लागलो.

छंद म्हणायला गेलात तर तसा काहीच नाही. लहानपणी नाणी जमवायचा प्रयत्न केलेला आठवतोय पण भारतीय नाणी सोडून इतर देशांची नाणी जमवायची म्हणजे खायचं काम नाही हे लक्षात आल्यावर तो नाद सोडून दिला. मग सोपं पडेल म्हणून काड्यापेट्या जमवायला लागलो. त्या मात्र थोड्याफार जमवल्या. पण मी कोणाला माझ्या छंदाबद्दल सांगितले नव्हते. एकदा आमच्या मातोश्रींनी कचरा समजून सगळ्या काड्यापेट्या एकत्र करून त्याला काडी लावली. मी नसताना! मला ते कळल्यानंतर मी रडून धिंगाणा घातला होता. पुढे मोठा झाल्यावर बायोडाटा मध्ये कोणाचं तरी बघून मी 'लिसनिंग म्युझिक' असा छंद लिहायचो. पहिल्याच मुलाखतीत कुठल्या पद्धतीचं संगीत आवडतं ? आणि आवडते संगीतकार कोण वगैरे अवघड असे प्रश्न त्या छंदामुळे पडल्यामुळे माझी विकेट  पडली होती. ताबडतोबीने छंद बदलून मी "रिडिंग" करून टाकला! त्यापुढच्या इंटरव्यूत विचारल्या गेलेल्या "काय वाचायला आवडतं ?"  या  प्रश्नाचं माझं "पेपर" हे उत्तर ऐकून प्रश्नकर्ता गडबडल्याचं  आठवतंय!

व्यसन म्हणायला गेलात तर वडील पैसे देत होते तेव्हा बरीच केली.. 'जे मला पाहिजे ते मी मिळवतोच' ह्या जाहिरातीतल्या खोट्या आवेशापाई मी बरेच दिवस ब्रिस्टल ओढ़त असे.. नंतर मी पैसे कमवायला लागल्यावर फोर स्केअर वर आलो.. लग्न झाल्यावर मात्र व्यसन न करण्याचं व्यसन लागलं.. जेमतेम घरखर्च चालवू शकेन इतपत नोकरी मिळाल्यावर काही महिन्यातच स्थळ सांगून आलं. हे मुला मुलींनी बाहेर भेटायचं फ्याड मला तितकसं पसंत नव्हतं परंतु दोन्ही पार्ट्यां कडून आपण कसे एडवान्स आहोत हे दाखवायची स्पर्धा असल्याने ही नौबत आली होती.. शिवम हॉटेल ही इडली डोसा चापायची आणि सांबर ओरपायची जागा. भविष्याचे आराखडे हे रूपाली-वैशालीत बांधायचे या माझ्या मताला कोणी कसपटाची किंमत दिली नव्हती! "उलट त्या पोरीनेच सुचवलं आहे-थोडं स्वस्त.. थोड़े पैसे वाचवायला शिक.." असं सुनवण्यात आलं. 

मी थोडा भाव खायचा म्हणून उशिराच पोचलो तरी तिचा पत्ता नव्हता. मग काहीतरी चाळा पाहिजे म्हणून एक गुडनगरम मारली तेवढ्यात ती आली..  तिने मला ऑर्कुटवर पाहिलेलं  होतं त्यामुळे ओळखलं,  मी पण तिचा फोटो आधी बघितल्यामुळे(च) तिला ओळखलं. (हिच्या ऑर्कुटवर करीना कपूरचा फोटो लावला होता!) ती माझ्या दिशेने आली आणि हाय हॅलो च्या आधी तिने
"शी बाई हा वास कसला? तुम्ही सिग्रेट पिता की काय?" असा  प्रश्न केला!
कोणतीही मुलगी हे असं डायरेक् विचारू शकते हे मला माहीत नव्हतं..आणि "मुलगा सुस्थापित - निर्व्यसनी" अशी माझी धड़धड़ित खोटी जाहिरात केली गेली होती हे मला मुलीकडून कळलं! 
"आं.. नाही मी ते आपलं हॉल्स आणायला गेलो होतो.. तेव्हा एक मित्र भेटला तो सुट्टा मारत-म्हणजे ते फुकत-आपलं ते हे-सिगरेट ओढ़त होता आणि ते म्हणतात ना.. धूर…  धुर माझ्यावर सोडत होता.." उजव्या हाताची दोन बोटं ओठांसमोर हलवून मी तिला एक्सप्लेनेशन देत होतो आणि डाव्या हातातल्या दोन हॉल्स तिला देत होतो. 
" तेच म्हटलं, मला तर सांगितलं होतं की सुपारीच्या खांडाचंपण व्यसन नाही मुलाला.. मला हा सिग्रेटच्या धुराचा वास अजिबात सहन होत नाही.. लग्नानंतर तुम्ही असल्या मित्रांची संगत सोडाल तरच बोलू आपण पुढे!" आयुष्यात एक गोष्ट मी  स्वत:च्या मताने करत होतो ती पण आता सोडली पाहिजे! 'नाय' म्हटलं तर "मी फुकतो" याची जाहिरात होणार आणि पोरगी स्वतःहुन पटेल असं दाखवण्यासारखं माझ्याकडे काहीही नव्हतं आणि नाही! शाळा कॉलेजात " आपल्याला काय इंट्रेस्ट नाय रे पोरींबिरित! " असं सांगून पोरगी न पटण्याचं शल्य दोघाचौघात जाहिरपणे लपवता येत असे पण आयुष्याच्या शाळेत,आपल्याला फोटो बघून पसंत केलेलं असताना, निव्वळ सिगरेटीच्या मोहापायी आपण ते नाकारावे याची मला हिंमत होईना. पुढचा तास भर तिने माझा इण्टरव्यू घेतला आणि मी आयुष्यभर तिच्या ताटा खालचं मांजर बनून राहू शकतो याची तिने खात्री केल्यावर मी आमचं दोघांचं बिल भरलं.

असो. यथावकाश (वशिल्याने का होईना) नोकरी मिळाली, छोकरी मिळाली आणि छोकरी झाली सुद्धा! तशी ती होईपर्यंत लहान पोरं मला कधीच आवडली नाहीत. मी स्वतः लहान असेपर्यंत "मुले हि देवाघरची फुले" हे वाक्य मला आवडत असे पण मोठा झाल्यावर आणि नातेवाईकांची वगैरे खरोखरीची मुले बघितल्यानंतर वरचे वाक्य साफ खोटे आहे यावर माझा पक्का विश्वास बसला. कोणाच्याही घरी लहान मुल असले आणि मी काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर साधारण ९० टक्के वेळ हा त्या लहान पोराचं/पोरीचं कौतुक ऐकण्यात जातो! त्यात त्या लहानग्याने दाराची कडी कशी लावून घेतली इथपासून टीव्हीचा रिमोट कसा लपवून ठेवला इथपर्यंत सगळ्याचा समावेश असतो.
लहान मुलांनी चष्मा तोडला-कौतुक  ; मोठी चप्पल घातली आणि धडपडली-कौतुक ; घाणेरड्या पायाने गादीवर/सोफ्यावर चढून उडी मारली -कौतुक; पिठाचा डबा सांडला-कौतुक; झोपलेल्या माणसाची मिशी/शेंडी ओढली- कौतुक आणि वरून कित्ती लब्बाड माझं पिल्लू चं पालुपद! वास्तविक पाहता याच गोष्टी जर कुणा मोठ्याने केल्या तर त्याला अद्वातद्वा बोलणाऱ्यांना लहानाने केल्यावर त्याचं काहीच वाटत नाही हे विशेष! !

लग्नानंतर एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. म्हणजे त्याने बोलावलेलं मुलाच्या महिन्याभरानंतर केलेल्या बारशाला, पण स्पष्ट सांगायचं तर मी जेवणाच्या वेळेच्या जरा आधीच जातो. लग्न , मुंजी, वाढदिवस बारशी या सगळ्यात जेवण हाच मुख्य कार्यक्रम असतो.. तर फ्लेक्स वर आधीच छापून आणलेले आणि भिंती आणि पाळण्यावर लटकवलेले नाव बाळाला ठेवण्याचा औपचारिक कार्यक्रम आटपल्यावर आमच्या बायकोने त्याच्या गळ्याच्या शिरा ताणून रडणाऱ्या लहान म्हंजे अगदीच इतकुश्या मुलाला खेळवायला सुरुवात केली. तेवढ्यात मित्राच्या बायकोने तिला हाक मारली तर तिने ते लटांबर (दुपट्या बीपट्या  सकट) माझ्याकडे सोपवलं आणि आत गेली. त्या गोळ्याने रडणं थांबवून जरावेळ माझं निरीक्षण केलं. तोंडातून थुंकी काढून दाखवणे, फुर्रर्र करणे वगैरे शक्य तितके किळसवाणे प्रकार केले आणि एकदम हातपाय हलवायचे थांबला! मला माझं पोट गरम होत जातंय असं  जाणवलं आणि झटक्यात शर्ट ओलेते झाले! मी गडबडून बायकोला हाक मारली. तर तिने येउन "अग्गोबाई, थांब्ला कि रडायचा" वगैरे म्हणून त्या मूढ मंद गोळ्याचंच कौतुक करायला सुरवात केली! वरून मित्राच्या बायकोला बोलावून तिच्या पोराने माझ्या पोटावर फार मोठ्ठा पराक्रम गाजवला आहे अशा पद्धतीने तिला काहीबाही सांगू लागली. माझी अवस्था काय झाली म्हणून सांगू तुम्हाला! एकदा का पाणी कपड्यांच्या आतून पोटाच्या खाली उतरलं कि मग तुम्ही कोणाचे राहत नाही हे काय मी सांगायला हवं? असो! मित्र फिदीफिदी हसत इतरांना त्याचं पोर नेमकं ऑफिसला जायच्या वेळी त्याचे कपडे कसं भिजवतं जे कौतुकाने सांगत बसला.. वहिनींनी मित्राचे शर्ट प्यांट ऑफर केले खरे पण "प्रॉब्लेम बाहेरच्या कपड्यात नाहीये" हे चारचौघात सांगण्याचं अवसान मी काही जमवू शकलो नव्हतो! माझ्या भिडस्तपणामुळे हापिसात मला इतरांना माझंच  काम समजावून सांगत येत नाही, अहो साधं सलून वाल्याला केस कसे कापून हवे आहेत ते सांगता येत नाही. तर इतर कोणाच्या बायकोला एवढ्या अवघड गोष्टी कशा काय सांगणार? दुर्दैव म्हणजे या लहान कार्ट्याना कसा कोण जाणे पण मी आवडतो नाहीतर आईशिवाय कोणाकडेही गेल्यास कर्कश्श आवाजात भोकाड पसरणारी कार्टी माझ्याकडे शांत कशी काय राहिली असती? आमच्या मुलीच्या बाबतीत मी मात्र असं  काही करत नाही. माफक लाड करतो म्हणा.. पण ते वेगळं! आमची पोरगी या बाकीच्या कार्ट्यांसारखी नाहीये मुळी!!

बाकी तसा माझा हा भिडस्तपणा 'झाकली मुठ' सुद्धा ठरला आहे म्हणा! सासुरवाडीला गप्प बसून राहण्यामुळे काही अनपेक्षित गोष्टी पदरात पडल्या आहेत. हापिसात नेमाने दिवाळीला सलग सुट्ट्या मिळत आहेत. सासुरवाडीला पहिल्या दिवाळसणाला अंगठी दिल्यावर मी गप्प बसून राह्यलो तर सासर्च्यांनी 'मी नाराज आहे' असा अर्थ लावून चेन दिली. तरी मी गप्पच बसलो. बायकोने 'ते तस्सेच  आहेत' असं  सांगितलं नसतं तर अजून काहीतरी मिळालं असतं.  पण असो.. थोडक्यात सुख महत्वाचे! माझ्या मागे दागिने करून द्यायला तगादा लावणारी ही मला काही मिळतंय म्हटल्यावर नको म्हणते याचीच मला कमाल वाटली होती!

तर दागिन्यांनंतर आमच्या बायकोला (आणि त्यामुळे मला) कसलं कौतुक असेल तर सिनेमाचं. प्रत्यक्षात तर हिरो वाट्याला आला नाही तर निदान पडद्यावर बघून खुश होऊ हा हेतू असावा तिचा; पण माझी जाम गोची होते. मी एवढा इन्व्हॉल्व्ह होऊन जातो की विचारू नका.. पडद्यावर अमिताबच्चन (हे असंच म्हणतात ना?) ने रडण्यासाठी डोळे लाल केले कि माझ्या डोळ्यातून टीपं गळायला लागतात, कुठल्या सस्पेन्स सिनेमात दरवाजा करकरला कि माझी हवा टाईट होते, कोणी मारामारी करायला लागलं की उसना जोश चढतो! घरात टीव्ही वर पण बातम्या वगळता काही चालू असलं की माझं असं होतं. कितीही कंट्रोल करायचं म्हटलं तरी त्या हिरो च्या जागी स्वतःला बसवल्याशिवाय माझं सिनेमा बघणं पूर्ण होत नाही.  नवीन लग्न झाल्या झाल्या आमची ही 'चला न, पिच्चर्ला जावया' म्हणायची आणि आम्ही जायचो सुद्धा!! पण नंतर एकदा 'धूम थ्री' सिनेमा बघून आम्ही आमच्या हिरो होंडा सी-डी हंड्रेडवरून घरी आलो आणि त्यानंतर तिने परत कधी सिनेमाला जाण्याचा लकडा लावला नाही. का कोण जाणे! मग आम्ही सुद्धा कधी सिनेमा बघायला थेट थेटरात गेलो नाही! हल्ली त्या मैत्रिणी मैत्रिणी मिळूनच जातात. आपला त्याला सुद्धा आक्षेप नाही.. 

तर असं आपला अगदी आत्ताआत्तापर्यंत चा जीवनप्रवास.. जाम म्हणजे जाम बोर. पण लहानपणापासून  लाईफमध्ये तसं पब्लिकला खुलवून खुलवून सांगण्यासारखं काही घडलंच नाही. म्हटलं तर आताच्या तुलनेत गरिबी होती पण माझ्या बरोबरीचे सगळेच तसे होते तर माझ्याच गरिबीचं काय म्हणून मार्केटिंग करणार? 'चालत 4 किलोमीटर शाळेत जात असे' म्हणावं तर माझ्या शाळेतली सगळीच तशी येत असत! आणि शाळा जितकी आवडली नाही तितका जास्त मला तो जाण्यायेण्याचा प्रवास आवडत असे..लहानपणी 'मिणमिणत्या बल्बच्या उजेडात अभ्यास करत असे' म्हणावं तर झगझगीत ट्यूबच्या उजेडात अभ्यास करून मी जीवनात काय असा उजेड पाडणार होतो? माझ्या आयुष्यात घडलेले प्रसंग कित्येकांच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने घडलेच असतील पण म्हणून काय मी आत्मचरित्रच लिहायचं नाही काय?

तसं तिशीत गेल्यावर असलं काहीतरी लिहिणं हे अतीच होतं पण मला आताच लहानपणीचे किस्से अंधुक आठवतात तर आत्मचरित्र लिहीणाऱ्या  महान लोकांना सत्तर-ऐंशीव्या वर्षी त्यांच्या बालपणातले प्रसंग जशेच्या तशे कशे काय आठवतात कोण जाणे. आता तसाही महान बिहान होण्याचा माझा चान्स एव्हाना संपल्यातच जमा आहे.. पदरात (बायको आणि बायकोच्या पदरात ) मुलगी आहे. त्यामुळे अगदी काही असामान्य करायचा विचार जरी आला तरी परिस्थितीची जाणीव  कर्तृत्वाला लगाम घालते.. (वा वा! क्या बात है! असली वाक्य ऐकायला बरी वाटतात आणि मला कधी कधी सुचतात याचपण माझं मलाच कौतुक वाटतं.) म्हणून म्हटलं, आठवतंय तेवढं लिहून काढावं. अगदीच चरित्र लिहायचं झालं तर मूळ साचा तयार असावा! त्यातल्याच काही गोष्टी मीठमसाला लावून अजून रंजक करून टाकता येतील. मला उपयोगाला नाही आलं तरी इतरांना-त्यांच्या आत्मचरित्रात!

थोडक्यात एखाद्या सामान्य माणसाचा या वयापर्यन्तचा ताळेबंद थोडाबहुत असाच असेल. आतापर्यंत आयुष्यात जे जे घडलं आहे त्यातलं एवढंच लक्षात आहे त्यामुळे डायरेक 'संपलं' असं म्हणण्यापेक्षा एखाद्या साहित्यिकासारखं 'आटोपतं घेतो'! धन्यवाद...

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

ताळेबंद-जमेल तेवढा

आंतरजालावरून साभार
मी अमुक अमुक..अं हं हं.. लगेच फेसबुकवर शोधू नका.. तुम्हाला वाटतोय तो मी नव्हे. अहो खूपच कॉमन नाव आहे माझं. असो.. आज काय प्रयोजन.. तर तसं काहीच नाही. बोलावसं वाटलं म्हणून बोलतो. जेव्हापासून मला समज आली तेव्हापासून खूपदा हे असं फिलिंग येतं मला, पण घडाघडा बोलून टाकता येत नाही. शाळा कॉलेजात- वर्गात असताना ब-याचदा मला शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर येत असत..पण मी कधी बोललो नाही. गुरुजी बाई म्याडम किंवा सरांनी प्रश्न विचारला आणि 'मला उत्तर येतंय' असं वाटत असलं कि प्रत्येकवेळी 'ह्या..एवढं सोप्प असतं तर थोडीच विचारलं असतं?' किंवा 'त्या हुशार मुलाने/मुलीने हात वर नाय केला मग आपण कसा करायचा?'  किंवा ' सांगितलं आणि चुकलं तर? आणि मग सगळे हसले तर?' हा अधिकचा प्रश्न मला पडायचा आणि मी उत्तर देणं टाळायचो. नंतर कोणीतरी उत्तर दिलं आणि ते माझ्या उत्तराशी जुळत असलं कि हळहळ वाटायची.. तेव्हा आज ठरवलं कि वाटतंय न मग बोलून टाकूया..ऐकायचं ते ऐकतील.नाय ते सोडून देतील. इथे मार्क थोडी ना आहेत..

आता मी काही लेखक वगैरे नव्हे त्यामुळे साधं शुद्ध लिहायलाही जमत नाही. पण निदान नेहमी ऐकतो तसच्या तसं लिहायचा प्रयत्न करतो. सिंह शब्द 'सिंव्ह' असा म्हणायचा आणि 'सिंह' असा लिहायचा यामुळे काय साधतं ते मला पण कळलं नाही! (होय ला पद्धतशीर 'होय' लिहायचं पण नाय ला 'नाही' असं का? ते कळत नाय-आपलं-नाही) हल्ली शेजा-याचा तिसरीतला मुलगा किंवा पहिलीतली मुलगी असले प्रश्न विचारतात..उत्तर नाही आलं तरी त्यांचं कौतुक वाटतं. कबूलच करायचं झालं तर मला हा प्रश्न तिने विचारेपर्यंत पडला नव्हता! हल्लीची पिढी खूपच हुशार. जनरेशन ग्याप ला ग्याप म्हणायला लाज वाटावी एवढी मोठी झाली आहे ती..ग्याप कसली दरी आहे मोठ्ठीच्या मोठी.

मी शाळेत असताना, कधीतरी खर्चाला मिळणा-या ५ रुपयाच्या नोटेवर 'मैं धारक को अमुक अमुक रुपये अदा करने का वचन देता हुं' असं का लिहिलेलं असतं हा मला पडलेला आणि कोणाला उत्तर माहित नसलेला कठीण प्रश्न! मला असं प्रश्न पडला आणि पडू शकतो याचा मला कोण अभिमान वाटला होता. त्यानंतर मग कठीण म्हणावा असा प्रश्न पडला नाही. कधी पडलाच तर त्याच उत्तर 'येवढा मोठ्ठा झालास तरी साधं येवढं कळत नाही?' किंवा 'नुसता वाढला रेड्यासारखा पण अक्कल काडीची नाही' किंवा 'गप्प बस' यापैकी एक होतं. तसंही मी प्रश्न विचारतोय आणि समोरच्याने उत्तर देणं अपेक्षित आहे हे प्रसंग सुद्धा माझ्या आयुष्यात मोजकेच आले. अन्यथा बायको, शिक्षक, प्रोफेसर्स, नातेवाईक ,साहेब हा प्रवर्ग अनुक्रमे घर, शाळा,युनवर्सिटी,  हॉपीस या ठिकाणी खिंडीत गाठून मलाच प्रश्न विचारण्यासाठी जन्माला आला होता याबद्दल माझ्या मनात अजूनतागायत शंका नाही.

शाळेत शिकलो मराठी मिडीयम मधून पण फक्त म्हणायला आणि इलाज नव्हता म्हणून. अभ्यास वगैरे जेमतेमच केला. आता 'जेमतेम केला' म्हणजे तेवढाच यायचा. जास्त करायचा ठरवला असता तरी मला करता आला नसता.  आमची आई तर सुरुवातीला "आमच्या वेळी आम्हाला परिस्थिती मुळे  जमलं नाही, तुम्ही शिकून मोट्ठे व्हा' वगैरे डायलॉक्स मारायची. मी खूप इमोश्नल  होऊन जायचो आणि तावातावाने पुस्तकाचं पहिलं पान वाचून काढायचो.  इंग्रजीचं असेल तर डिक्शनरी वगैरे उघडून बसायचो.पण कितीही इमोशनल झालो तरी माझा उत्साह दीड पानात गळून पडायचा. कांबळी नि तेंडल्याचं करियर जास्त आकर्षक वाटायचं! अशी कित्येक पुस्तकांची पहिली पानं मी कित्येकदा नव्याने वाचली आहेत पण परीक्षेत कधीच पहिल्या पानात उत्तर असणारा प्रश्न कधीच विचारत नाहीत हे इतक्या परीक्षांच्या अनुभवांवरून मी छातीठोकपणे सांगू शकतो! अपवाद आमच्या दहावीत असणारा 'नरिंद्रबासा भेटी अनुसरण' नावाचा टुकार एक पानी धडा! तो अक्खा धडा पाठ असूनही त्यावरच्या एकाही प्रश्नाचं उत्तर धड जमलं नाय बुवा. त्या धड्यावर थोडक्यात उत्तरं असूदेत किंवा संदर्भासहित स्पष्टीकरण असुदेत मी जवळपास सगळा धडाच लिहीत असे आणि जमतील तितके मार्क गोळा करीत असे!

तर एवढा(स्सा) अभ्यास करूनपण आईचं  तेच पालुपद!  "आमच्या वेळी आम्हाला परिस्थितीमुळे जमलं नाही आणि हे कार्टं  बघा!" एवढाच काय तो वाक्यात बदल. त्यामुळे मी माझं बरचसं लहानपण मी खूप मोठ्ठ्या भावनिक दबावाखाली काढलं. पण इतरांना आणि त्यावेळी मलादेखील ते कळलं नाही. जरा मोठं झाल्यावर एकदा मला बाहेरून परीक्षा देता येतात ते कळलं. मला वाटलं आईसाठी हि चांगली संधी आहे. पुढे एकदा तिने तो पठडीतला डायलॉक मारल्यावर मी म्हटलं कि "आई, आता तू अभ्यास करून बाहेरून परीक्षा देऊ शकतेस!" तर जी भडकली म्हणता! पाठीचं धीरड  होईपर्यंत धोपटलं  मला. जाम रडलो होतो तेव्हा. त्यानंतर समजलं कि   मला निव्वळ इमोशनल ब्ल्याकमेल करण्यासाठीच तिला ते वाक्य आवडायचं कारण त्यानंतर तिने कधीच हे वाक्य माझ्यावर फेकलं नाही!

बाबांनी तर मला जाम धुतला आहे. माझ्याच वस्तू मोडणे, हरवणे, वापरण्याच्या लायकीच्या न ठेवणे, नवीन वस्तूंसाठी हट्ट करणे, बेहिशेबी मालमत्ता जमवण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या लक्षात येईल इतका जास्त वेळ खेळणे अथवा घराबाहेर घालवणे, अभ्यास न करणे इत्यादी (माझ्या दृष्टीने) किरकोळ गुन्ह्यांकरता त्यांनी आपला हात साफ करून घेतला आहे. कधी कधी तर त्यांना फक्त खुमखुमी आली म्हणूनही फालतू कारण उकरून काढून धोपटला असावा असा माझा कयास आहे! मी मोठा झालो आणि सरकार-मध्यमवर्ग, पोलीस-मोर्चेकरी, सरकारी अधिकारी- गरजू व्यक्ती याची नाती बघतो तेव्हा कळतंय कि उलट मारू न शकणाऱ्याला असंच धोपटण्यात कोणालाही मजाच येत असावी! आमचं  कुठलं एवढं सुदैव?

आता जेमतेम तिशीचा आहे मी.. थोड इकडे तिकडे..(खरंतर बराचसा तिकडेच) पण आताच 'आमच्या काळात हे असं होतं' म्हणण्यासारखी परिस्थिती बदलली आहे.  काय महाग झाल्याहेत वस्तू. सोनं 30000 रुपये तोळा झालंय म्हणे.. जेमतेम 3000 रुपये तोळा असतानाचे दिवस माहित आहेत आहेत मला.. पेट्रोल तर 10 रुपयाने होतं. आमची आजी लहानपणी 'आमच्या काळात 300 रुपयाने होतं सोनं' वगैरे गोष्टी सांगायची पण त्या हिशेबाने मी सत्तरीत पोचल्यावर आताचे रेट असणं अपेक्षित होतं पण काहीतरी गंडलंय खरं. महागाई वाढली असं म्हणायला गेलो तर परवा टीव्ही  घेतला, आमच्या बाबांनी दहा-पंधरा वर्षापूर्वी घेतला होता त्याच किंमतीत आणि  त्याच्यापेक्षा कैकपट भारी. काय पिक्चर क्वालीटी आहे म्हणून सांगू..

लहानपणी या टीव्ही वरची 'मम्मी' बघून मला शिवाजी महाराजांसारखं  'अशीच अमुची आई असती वगैरे वाटायचं'  पण आमच्या आईकडून तर बहुतेकदा मार आणि रोजच्या दोन वेळच्या जेवण्याव्यतिरिक्त इतर काही खायलाही मिळालंही नाही..  मॅगी वगैरे तर लांबची गोष्ट! तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराज आणि त्यांच्यासारख्या मोठ्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींना ते मोठे झाल्यावर महत्व आलं असावं. कारण एकदा एका १ ऑगष्टला टिळकांवरती बाकीच्यांनी केलेल्या भाषणं प्रेरित होऊन, मी वर्गात 'मी कागद फाडला नाही मी कपटे उचलणार नाही असं सांगितलं होतं' पण त्याला कोणीच 'बाणेदारपणा' वगैरे म्हटलं नाही. बाईंनी २५ उठाबशा काढायला लावल्या आणि झाडू घेऊन सगळा व्हरांडा झाडायला लावला होता. तेव्हापासून माझी हि समजूत दृढ होत गेली आहे.

'उच्च' शिक्षणासाठी (म्हणजे बी ए) मुंबईत गेल्यानंतर कॉलेजामधली एकंदर परिस्थिती बघता मला मराठी मिडीयम मधून शिकल्याची तशी लाजच वाटायची. बाहेरच्या राज्यातून आलेली मुलं हिंदी इंग्रजी बोलून एकमेकांवर ,शिक्षकांवर आणि विशेषकरून मुलींवर छाप पडत असत. आलेल्या मुलांवर मी उगीच हिंदीतून बोलून इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करायचो. ती पोरं हिंदीतून बोलायची तेव्हा मला कधी मराठी बोलावसं वाटलं नाही. मला वाटायचं कि असं केलं तर पोरं मलाच हसतील.आणि फ़क्त मीच असा नव्हतो..बरेच होते.. 'इंग्रजी बोलता न येण्याचा न्यूनगंड फ़क्त हिंदी बोलून दूर सारता येतो' या मताचे.. त्यामुळे माझं इंग्रजी तसंच राहिलं आणि मराठी असल्याचा सुगावा इतरांना लागू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहिलो..आईवडिलांनी इंग्लिश मिडीयम च्या शाळेत न घातल्याबद्दल त्यांना दूषणं  देत बसलो!बरेचसे तसंच करायचे.

एक मात्र होतं, कॉलेजात गुजराती पोरं एकमेकांशी गुजरातीतून बोलत, आंध्रची तेलुगुतून, केरळची मल्याळीतून परंतु हीच मुलं शिक्षकांशी, जमत असेल तर अस्खलित, नसेल तर तोडक्या मोडक्या इंग्रजीतून बोलत.. आम्ही मराठी मात्र एकमेकांशीही हिंदीतून बोलत असू आणि शिक्षकांशीही.. मराठी वापरली ती फ़क्त शिव्यांपुरती! मराठी शिकू पाहणाऱ्या परप्रांतियांना शिकवल्या त्या मराठी शिव्या! त्या मुलांना कधी मराठीमुळे अडेल अशी वेळच येऊ दिली नाही.. कायम त्यांचा भाषान्तरकार म्हणून वावरलो.पण मी मिक्स नाही होउ शकलो.. खरतर त्यानाच मी कितपत हवा होतो काय माहीत! त्यांच्या ग्रुप मध्ये मी असताना ते एकमेकांशी त्यांच्या भाषेत बोलत असत; मला समजत नाही याचा विचार न करता.. परंतु मी मात्र, ग्रुपमध्ये एखादाही मराठी न समजणारा असा कोणी असेल तर त्याला कळावं  म्हणून न चुकता हिंदीतून बोलत असे. सहिष्णुता कि सगळा व्हरन्याक असल्याचा परिणाम! कोण जाणे? असो.. आता मुलीला इंग्रजी मीडियम शाळेत घालून पापक्षालन करीन म्हणतो..

शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी फार आटोकाट प्रयत्न केले..  पण स्वतःची पब्लिसिटी करणं मला जमलंच नाही. 'मी आहे तसाच मला घ्या आणि मला हव्या त्या पगारावर ते पण मुंबईतच!!' हा मित्रांच्या टोळक्या बरोबर जमवलेला उसना एट्टीट्यूड पहिल्या काही मुलाखतीत गळून पडला.. "तुम्ही म्हणाल ते आणि पडेल ते काम करायला तयार आहे..काही महीने फुकट करतो हवं तर! तेही कुठेपण" इथपर्यंत माझं ट्रांझिशन व्हायला काहीच दिवस पुरले. बाबांच्या वशिल्याने मी पुण्यात आता आहे तिथे नोकरीला लागलो. तिथपासून आजवर केवळ नोकरी टिकवणे हा माझा उद्देश राहिला आहे. नोकरीवरुन तड़काफड़की काढू नये आणि शक्यतो सुट्टीच्या दिवशी सुट्टी मिळावी या दोन माफक अपेक्षा घेऊन मी पाट्या टाकत आहे! 

घरी आलो की मात्र नेमाने दमल्याची ऍक्टिंग करतो.. ते पण मला सुरुवातीला माहित नव्हतं पण नवीन लग्न झाल्यानंतर  पहिले काही दिवस  ऑफिसातून आल्यावर बायको ' दमला असाल ना, चहा करते' असं म्हणत असे.. दिवसातला तो तासभर बसल्या बसल्या चहा मिळतो, कुठे जायचा धोशा मागे लागत नाही, हवं ते चॅनल बघता येतं, कसल्या घरगुती तक्रारी सांगितल्या जात नाही, डोळा लागला तरी खपून जातं या आणि अशा विविध फायद्यांची जाणीव झाल्यामुळे मी ती एक्टिंग करायला लागलो आणि नंतर ती अंगवळणीच पडली! नाहीतर दिवसभर खुर्चीत बसून कसला आलाय थकवा? माझ्या बघण्यातला बैठं काम करणारा कोणीही नोकरदार दिवसभर मान मोडून फक्त काम करतोय आणि खरोखर 'दमलाय-बिमलाय' असे पाहण्यात नाही.. पण वर्षानुवर्षे ऑफिसमधून येणाऱ्या नोकरदार पुरुषवर्गाला घरात हक्काने मिळणारा परंपरागत वेळ आपण का उपभोगू नये हे आपले माझे मत! अर्थात कच्चेच! 

नोकरीच्या ठिकाणी सुद्धा माझी फारशी पक्की मतं नसतात. त्याक्षणी त्यावेळी मला जे पटेल तेच माझं त्यावेळचं मत असतं.  आता बघा, सरकारी लोक, राजकारणी हे लोक करत असणाऱ्या करप्शन विरोधात मी कधीकधी तावातावाने बोलतो  (म्हणजे अजूनपर्यंत तीनदा बोललोय) आणि माझा राग व्यक्त करतो. सगळीकडेच. परवा तर म्हणजे गंमतच झाली....

ताळेबंद : उरलेला

मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

प्लेसमेंट(ल) : उत्तरार्ध

पूर्वार्ध:
…पण तसंच होतं! सुदैवाने माझं नाव त्यात होतं.. साधारण 10 15 मुलं 'हिटलिस्ट' वर होती. म्हणजे पुढच्या राउंडला तरी मासळीबाजार नसणार! पण कसचं काय! पुढचा राउंड तिसरयाच् कॉलेज ला होता आणि तिथेही 8 9 कॉलेजची पोरं होती...
--X-O-X--
"गो थ्रू दिज टू प्रोफाइल्स. द अदर पॅनेल वांट्स यू टू इंटरव्यू देम." मी प्रोफाईल्स  चाळतो. दोघांपैकी aptitude चे मार्क्स जास्त  आहेत त्याला मी बोलवतो. चेहरा बघितल्यावर मला ग्रुप डिस्कशन चा राउंड आठवतो. हा पोरगा बोलतो फर्मास! एकदम टू  द पॉइंट! बघू काय सांगतो ते.
" प्लीज"   मी खुर्चीकडे हात दाखवून त्याला बसायला सांगतो आणि त्याचा रेझुमे चाळायला लागतो.
इंटरव्यू सुरु होतो. त्याचा कॉन्फीडंन्स हा ओवरकॉन्फीडंन्स नाहीये ना हे चेक करणारे, काही ऑनलाईन न मिळणारे ट्रीकी क्वेश्चन्स, काही तयार केलेली पझल्स मी त्याला विचारतो. बाकीच्यांना विचारली तशीच पण तीच नाही. न जाणो आधी बाहेर गेलेल्यांना याने काही विचारलं असेल तर! कारण मीही तेच करायचो!!
कॉलेजला गेलो तर हीssss  गर्दी! आमच्या कंपनीच्या पुढच्या राउंडसाठीच शंभरएक जण! मी अवाक!! च्यायला हि सगळी पोरं त्या त्या कॉलेज ची शॉर्टलिस्टेड पोरं असणार. दहा कॉलेजेस जरी असली तरी झाले कि शंभर. मी आवंढा गिळला. कंपनी दहा-पंधरा लोक घेईल अशी सुरुवातीला अटकळ होती पण अख्ख्या  युनिवर्सिटीतून दहा पंधरा घेईल असा कोणी अंदाजच बांधला नव्हता.
"ऐसा कोई करता है  क्या? कुछ राउंड एक तरफ  बाकी के राउंड दुसरी तरफ! हमारे कॉलेज  के कुछ लोग तो  आयेही नही" तरीपण इतकं पब्लिक होतं! जास्त पब्लिक म्हणजे जास्त कॉम्पीटिशन असा साधा सरळ हिशोब होता.
"हि पहिलीच कंपनी असं  करणारी"
"नवीन ट्रेंड सेट करतायत,दुसरं काही नाही"
आमच्या टी पी ओ ने सांगितलं कि आता सिम्पोजिअम होणारेत. मी कधीच हा प्रकार actively केला नव्हता. पण आता काय आलिया भोगासी असावे सादर!!
दहा दहा चे ग्रुपस करून चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. जो जी चिठ्ठी उचलेल त्याने त्या विषयावर आपल्या ग्रुप मधल्या उरलेल्या नऊ  जणांना ३ मिनिटांत आपले विचार सांगायचे आणि उरलेल्या ७ मिनिटात ते जे काही प्रश्न विचारतील त्यांची उत्तर देऊन चर्चा करायची असा तो प्रकार होता.
आमच्या ग्रुप च्या सगळ्यांचं आटपायला दोन-अडीच तास लागले. यातून निवडले जाणाऱ्यांचेच इंटरव्यू होणार होते. सिम्पोजिअमचे निकाल कन्सोलिडेट होऊन यायला तासभर लागला. ज्यांची नावं पुकारली जात होती ती मुलं मांदियाळीतून निघून आतल्या हॉल मध्ये जात होती.तेवढ्यात…. माझ्या नावाचा पुकारा झाला!
--X-O-X--
मी मान वर करून बघितलं. आमची एच आर पर्सन मलाच हाक मारत होती. "वि नीड टू  डिक्लेअर रिझल्ट्स बिफोर फाय… कॉलेज  स्टाफ साडेपांच बजे निकाल जाता है. धिस इज द लास्ट वन. शाल आय सेंड हर इन?"
"डू  आय have अ चॉईस ?" मी विचारल्यावर ती हसून शेवटच्या उमेदवाराला बोलावते.
"बी कम्फर्टेबल! लेट्स बिगीन विथ योर इंट्रोडक्षन.."
" माय नेम इज…. "
एक कान तिकडे ठेऊन मी परत बारकाईने तिचा सी व्ही वाचू लागतो.
" यू  have  स्कोर्ड गुड मार्क्स इन टेन्थ as  वेल as , व्हॉट  वेन्ट  रॉंग  इन इंजिनियरिंग?"
"एक्चुअली माय  मदर एक्स्पायर्ड व्हेन आय वॉज इन स्कूल…"
तिच्या पेरेंट्स पैकी  कोणीतरी एक तिच्या लहानपणीच वारलेलं आहे हे त्याच्या कौटुंबिक माहितीवरून कळलं परंतु इंजिनियरिंगच्या चारही वर्षांचे मार्क्स कमी असण्याशी त्याचा काय संबंध? सहानुभूती मिळवायला बघतेय का ही ?
--X-O-X--
 हृदयातली धडधड थोडी मंदावली. आता शेवटचा मुलाखतीचा राउंड. माझा आतापर्यंत वीक ठरलेला पॉइंट. केबिन मध्ये बसलेले ३ जण इंटरव्यू घेंत होते. एकामागोमाग एक मुलं आत जाउन बाहेर येत होती. काही दहा मिनिटात, काही वीस तर काही अर्ध्या अर्ध्या तासानंतर!  माझं नाव पुकारलं गेलं. साधारण १० -१५ मिनिटं प्रश्नोत्तरं  झाली. मी बाहेर आलो. इंटरव्यूअर्स च्या मनाचा थांग घेऊन आडाखे बांधणं कठीण होतं असं एकंदरीत जाणवत होतं. असो जे होईल ते होईल असा विचार करून मी बाहेर पडलो. संध्याकाळी ५ वाजता रिझल्ट जाहीर होतील असं  सांगण्यात आलं होतं. माझी मुलाखत पहिल्या काही मुलातंच असल्याने मला साधारण ४ तास घालवायचे होते. सकाळपासून या कॉलेज मध्ये इकडेतिकडे पळापळ करून वैताग आला होता. ४ तास करायचं तरी काय? माझ्या कॉलेजची  जी पोरं होती त्यापैकी मोजकीच उरली होती, त्यात माझ्या ओळखीचं असं  कोणीच नव्हतं. सिलेक्ट कि रिजेक्ट ते कळायला थांबायलाच हवं होतं.  शेवटी जवळच्याच एका मल्टीप्लेक्स मध्ये गेलो आणि जो लगेचचा शो होता त्याचं  तिकीट काढून जाऊन बसलो!. नको ती विचारचक्र आणि नको ती तगमग! निदान हा थोडा वेळ तरी डोक्याला शॉट नाही. सिनेमा संपला मी बाहेर आलो आणि परत कॉलेजमध्ये गेलो तर कळलं कि अजून प्रोसेस चालूच आहे!! आज निकाल लागण्याची शक्यता शून्य पूर्णांक शून्य शून्य एक इतकी आहे! तसाही एवढ्याश्या शक्यतेसाठी जीवाला त्रास करून घेणारा मी नव्हतो. सिलेक्ट झालो तर उद्याही कळेल पण इथे थांबून रिजेक्ट झालो तर परतीचा प्रवास सुद्धा कंटाळवाणा होणार. उरलेली संध्याकाळ आणि रात्र बोंबलणार ते वेगळच! मी सरळ कलटी  मारली आणि अर्ध्या तासात घरीसुद्धा आलो!
--X-O-X--
"अगर मै हिंदी मी बोलू तो चलेगा क्या?"
" मुझे शायद चलता मगर हमारी कंपनी जिन क्लायंट्स के लिये काम करती है उन्हे हिंदी नही समझती!"
"ok सर, आय विल टॉक इन इंग्लिश"
"शाल वी  प्रोसिड?"
मुलाखत पुढे चालू होते. अभ्यासाव्यतिरिक्त केलेल्या कामांची माहिती, काही कार्यक्रमांमधला सक्रिय सहभाग, अनुभव या अनुषंगाने गाडी पुढे पुढे सरकतच राहते.
--X-O-X--
एक सिम्पोजिअम, एक इंटरव्यू, एक सिनेमा  आणि जाण्यायेण्याचा ट्राफिकमधला मोठ्ठा प्रवास एवढा दिवसाचा हिशेब जमवून मी बेडवर पडलो. कॉलेजमधल्या दिवसांत एका दिवसात एवढं काम खूपच होतं! तेवढ्यात माझा फोन वाजला.
"अरे कुठे आहेस तू? तुझं नाव घेतलंय इकडे" दबक्या आवाजात पलीकडला बोलला
"कोणी?"
"अरे कोणी काय कोणी? तू सिलेक्ट झाला आहेस!" परत दबका आवाज आला
"क्काय??" मी जवळजवळ ओरडलोच "नक्की?"
"मग मी काय उगीच सांगतोय. तू ये इकडे पुढचा एक राउंड आहे बहुतेक."
"अरे काय चाललंय यांचं? डायरेक्ट म्यानेजर निवडतायत  कि काय?" मी वैतागलो
"अरे आता वीस पोरं सिलेक्ट केली आहेत, पण त्यांना सगळ्यांना भेटायचं आहे"
"पण मी परत आलोय आता"
"मग काय झालं ये परत  इकडे"
"पण मला अजून अर्धा तास….  "
"बघ बाबा काय ते… मी सांगायचं काम केलं"
"प्लीज त्यांना सांग मी अर्ध्या तासात पोचतो"
"बरं मी सांगतो पण फक्त इन्फर्म करणार हां मी, कन्विन्स नाही"
"thanks मित्रा! पोचतोच मी "

पुढच्या वीस पंचवीस मिनिटात एका एकदम जवळच्या मित्राने बहुतेक "हि नोकरी मिळाली नाही तर मी आयुष्यातून उठणार" असा समज करून घेऊन अतिशय धोकादायक पद्धतीने बाईक चालवत मला त्या कॉलेज मध्ये पोचवलं! पुढचा राउंड  सुरु झाला होता.
"व्हेअर वेर यू ?"
"सर वन ऑफ माय फ्रेंड मेट विथ an accident! "  युद्धात, प्रेमात आणि आता प्लेसमेंट मध्ये सगळं माफ असतं अशी मी समजूत काढून घेतली आणि धडधडीत खोटं बोललो! "वी admitted हिम इन दीनदयाळ हॉस्पिटल. आय had  टू  चेंज क्लोथ्स  and  कम " मला कपडे बदलून यावं लागलं असं  मी माझ्या त्यावेळच्या इंग्रजीनुसार भाषांतरित करून सांगितलं. खोटं खोटंच!
"ओह, हाऊ  इज हि नाऊ?"
"नाऊ  हि इज ओके सर"
"ओके, वि had गीवन अ पझल टू  एवरीवन फिफ्टीन मिनिट्स back. नाऊ  सीन्स यु आ हिय, यु कॅन टेक धिस challenge बट  यू  have  टू  सीट इन  द केबिन, यू वील गेट थर्टी मिनिट्स"
"ओके सर" दीर्घ निश्वास सोडून मी केबिन मध्ये बसलो. कोडं सुटायला साधारण पाच मिनिटं लागली!  मला वाटलं काहीतरी चुकलं कि काय!! पुढची पाच मिनिट मला दुसरं काही सुचत नाही म्हटल्यावर मी पेपर परत द्यायला बाहेर गेलो.  त्यांनी  माझं उत्तर  पाहिलं…
"डिड  यू नो धीस अल्रेडी ?" क्लासरूम मधली बाकीची पोरं गेला अर्धा पाउण  तास झगडत होती आणि मी पाच मिनिटात उत्तर काढलं यामुळे  मी कुठून तरी कॉपी पेस्ट केलं कि काय अशी शंका येउन त्यांनी विचारलं.
"नो सर." मी माझं लॉजिक त्यांना समजावून सांगितलं. सक्सेसफुली!!
वीसपैकी चौदा मुलं सिलेक्ट झाली! माझं नाव माझ्या कानांवर पडलं तेव्हा शरीरावरचा भार उतरून शरीर एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं!!
--X-O-X--
प्रोजेक्ट manager ने एक छोटेखानी भाषण केलं. सगळीच मुलं कशी चांगली होती परंतु आम्हाला काहींनाच चान्स देता येईल वगैरे वगैरे! समोर वाट बघणाऱ्या मुलांना त्यात काडीमात्र इंटरेस्ट नव्हता परंतु आम्हाला मान द्यायचा म्हणून मान हलवत होती ती बिचारी! एच आर ची ऑफर लेटर्स तयार होऊन हातात येईपर्यंत भाषण चाललं.  थोड्याच वेळात सिलेक्ट झालेल्या मुलांची नावं पुकारली गेली. एकेका  नावाबरोबर जल्लोष होत होता. २ panels ची मिळून ६ नावं जाहीर झाली. बाकीच्यांचे चेहरे पडले. सिलेक्ट झालेल्या मुलांनी येउन आमच्याशी हात मिळवले. मग त्यांच्याबरोबर पुन्हा एक छोटेखानी फोटोसेशन.
--X-O-X--
ऑफर लेटर हातात आलं. मी मोकळा श्वास सोडला! झालो एकदाचा सिलेक्ट!! केवढं ओझं उतरलं डोक्यावरचं… आता यापुढे कसली हुरहूर नाही कि जीवाला घोर नाही. कॉलेज  संपेपर्यंत आता नाटक, आर्ट  सर्कल आणि जमेल तसा अभ्यास. इंटरव्यू तर इतक्यात द्यायचाच नाही आयुष्यात! उशिरा का होईना प्लेसमेंट झाली तीसुद्धा कॉलेज मधल्या हायेस्ट पेयिंग कंपनीत. देर आये मगर दुरुस्त आये… या आधीची रिजेक्शन्स, टोमणे, माझ्या क्षमते विषयी घेतल्या गेलेल्या शंका एका क्षणात विसरून गेलो होतो मी.  आता होता निखळ आनंद. जो होता है अच्छे  के लिये होता है. घरी फोन करून कळवलं…आता रात्री मित्रांबरोबर पार्टी!!
--X-O-X--
कॉलेजच्या टी पी ओ नी  आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आटोपताच आम्ही सगळे बाहेर पडतो. चला! इथला प्लेसमेंटस चा खेळ आटोपला. आता नवीन कॉलेज ,नवीन मुलं . हातातला ब्लेझर गाडीत ठेऊन, टाय मोकळा करत मी गाडीत बसतो. कॉलेजमधून बाहेर पडता पडता गाडी स्लो करून मी मागे वळून कॉलेजकडे पाहतो… माझा मीच दिसल्याचा मला भास होतो. याच कॉलेजमध्ये, नऊ वर्षापूर्वी झालेल्या एका कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळालेलं ऑफर लेटर घेऊन, याच वाटेवरून गेटकडे धावणारा!

रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

प्लेसमेंट(ल) : पूर्वार्ध

"मे  आय कम इन सर? " किलकिल्या दरवाजातून बघणारा चेहरा मला विचारतो...
"यस प्लीज" खोटं हसू चेहऱ्यावर आणून मी म्हणतो. जरा स्थिरस्थावर झाल्यावर
"सो कॅन यु प्लीज टेल मी अबौट योर्सेल्फ?" ने प्रश्नोत्तरांचा ओघ सुरु होतो… एका पाठोपाठ एक कॅन्डीडेट्स येणार  असतात. नॉलेज , कॉन्फीडन्स, बॉडी  लँग्वेज वगैरे नाही नाही त्या गोष्टी वापरून मला१५ पैकी ३ लोक निवडायचे असतात… आधीच aptitude, ग्रुप डिस्कशन यामध्ये अर्धा दिवस संपलेला असतो. त्यामुळे साधारण दहा मिनिटं ते अर्ध्या तासात एक या हिशेबाने मी मुलाखती घेत असतो. feedback फॉर्म्स भरून द्यायला थोडा वेळ मिळतो तेव्हा मी (बहुधा डीन च्या) केबीन च्या खिडकीतून बाहेर पाहत उगीचच सिनेमात दाखवतात तसं थंडावलेल्या कॉफीचे घुटके घेत उभा राहतो…

"फोर्ब्ज मार्शल आलीये, तू बसणार नाहीयेस का?" पुरुषोत्तम ची practice चालू असताना कोणीतरी येउन म्हणाल्यावर मी पळतच तिकडे गेलो. पहिल्यांदा aptitude टेस्ट होती. मी ती दिली. त्यात shortlist  होणाऱ्या  लोकांची टेक्निकल टेस्ट झाली . त्यामधून काही मुलं सिलेक्ट झाली…aptitude नंतर रिझल्ट लागणार असल्यामुळे तिथंच  थांबावं  लागलं-- तीच परिस्थिती टेक्निकल नंतर. मुलाखतीसाठी निवड झालेल्या मोजक्या मुलांमध्ये माझं नाव आलं आणि अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार पहिलंच! जेव्हा माझ्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर ने माझ्याकडे पाहिलं  तेव्हाच मला पहिल्यांदा माझा अजागळ  "पुरुषोत्तमी" अवतार जाणवला!

"असा जाणारेस इंटरव्यूला ?" त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा  मराठी अनुवाद. (एकांकिकेत मी मरतो आणि त्याक्षणी जमिनीवर लोळण  घेतो  असा सीन असल्यामुळे ) मळकं गोल गळ्याचं टी शर्ट आणि जमिनीच्या बाजूला घासून फाटलेली मळकी जीन्स, त्याखाली फ्लोटर्स असा माझा अवतार मला जाणवला. समोर सुटाबुटात वावरणारे कंपनीतले लोक होते. "मी पटकन कपडे बदलून येतो"
"अरे मुर्खा, तुला आत बोलवताहेत  ते" (पुन्हा सोयीस्कर मराठी अनुवाद!)
"सर प्लीज त्यांना सांगा ना, मी चटकन तयार होऊन येतो"
यापुढे आमच्यात जो संवाद झाला त्यानंतर "टीपीओ या व्यक्तीचा उगम हा मुळात भाव खाण्यासाठी आणि असहकार्य करण्यासाठी झाला आहे" असे माझे मत तयार झाले!

धावत पळत जाऊन मी विनोदी वेशभूषा करून आलो. कसेतरी विंचरलेले केस, घाई गडबडीने टक-इन केलेलं शर्ट, कोणाचेतरी मागून घेतलेले थोड्या मापाचे पायातून बाहेर निघणारे शूज अशा अवतारात बदकचालीने मी पुन्हा तिथे पोहोचलो. टीपीओ तिथे नव्हता,
"माझा इंटरव्यू होता" हातात फाईल्स घेऊन लगबगीने ये जा करणाऱ्या एका बाईला मी म्हटलं.
"सो?" तिने माझ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं…
"अं,,, मी,,,"
"तुझं नाव ?" --अनुवाद! हातातल्या फाईल्समधले कागद चाळत तिने विचारलं.
मी नाव सांगितलं. ती एच आर होती. त्यामुळे आमच्यात पुढे जो सुखसंवाद झाला तो पुढील प्रमाणे  अनुवादित….
"तुझं  नाव सगळ्यात पहिल्यांदा कॉल औट  केलं होतं "
मी- "खरंतर  माझे कपडे… "
"वेळेची काही किंमत आहे कि नाही तुला? हे कॉलेज नाही कॉर्पोरेट कंपनी आहे" तिचं  कॉलेज  बहुधा वेळा पाळत नसावं !
मी - "आएम सॉरी "
"सॉरी ? तू इंटरव्यू साठी आलाहेस आणि तुला वेळेत येता येत नाही?" वगैरे वगैरे….
मी तिला उलट उत्तर देत निर्लज्जासारखा तिथेच उभा राहिलो. ती तिथून तावातावाने निघून गेली. आणि आमचा टीपीओ लांबून मजा बघत होता!! सुदैवाने सगळ्यात शेवटी मला मुलाखतीकरता आत बोलवण्यात आलं. मी आतापर्यंत दिलेली ती सर्वोत्कृष्ट मुलाखत असावी. इंटरव्यूअर ने मला चहा ऑफर केला आम्ही इतरही गप्पा मारल्या आणि मी बाहेर पडलो.

थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार होता आणि आमच्या टीपीओनं सांगितलं कि 'फायनली कोणाकोणाला घ्यायचं ते त्या अमुक अमुक madam आणि इंटरव्यू पँनल ठरवणार आहेत,' बोलता बोलता त्याने जो दिशानिर्देश केला तो त्या सुखसंवाद करणाऱ्या madam  कडेच! म्हणजे माझं भविष्य मी मघाशीच ठरवलं होतं!!
इंटरव्यू हा फक्त फार्स होता!! मी चमत्काराची अपेक्षा करत होतो परंतु केबिन मध्ये madam च्या विरुद्ध बाजूला बसलेले panel मेम्बर्स बघून निकाल काही फारसा सुखावह नसणार हे कळतच  होतं! फायनल सहापैकी चार लोक निवडले गेले होते. मी त्यात नव्हतो! बदकासारखा चालत मी घरी पोचलो आणि पहिल्यांदा कपड्यांचा एक सेट तयार करून ठेवला आणि माझ्या मापाचे बूट कोणाकडे आहेत ते ताबडतोब बघायचंही ठरवून टाकलं!

नंतर कधीतरी इमर्सन आली. यावेळी मात्र मी ठरवलेले कपडे घालून कॅम्पस साठी पोचलो. तयारीने! एप्टीट्यूड मधून शॉर्ट लिस्ट झालो मग टेक्नीकल क्लिअर केली..सगळे निकाल पूर्वीसारखेच येत गेले.. अगदी इंटरव्यूचा सुद्धा! :) पण ड्रामेटिकली.. दहा जण इंटरव्यू साठी सिलेक्ट झाले होते त्यापैकी 4 जणांची नाव पुकारण्यात आली. त्यात माझं नाव होतं.एक गोड शिरशिरी अंगभर सळसळत गेली. त्यापाठोपाठ "except these names rest all are selected" असे शब्द कानात जाळ ओतत गेले. क्षणापूर्वी असणारं "झालं बुवा सिलेक्शन" हे क्षणभराचं फिलिंग त्या वाक्यात मातीमोल झालं!
--X-O-X--
" दिज आर रेस्ट ऑफ़ द फॉर्म्स.. या एका कैंडीडेटला एच आर राउंड साठी घ्या. या एकाला त्या पॅनेलकड़े पाठवा. आएम इन डायलेमा." मी सूचना देत एच आर ने दिलेले बाकीचे सी व्ही नजरेखालुन घालतो. "Objective : to pursue challenging career in an organization that would enable blah blah blah.." जर हिला विचारलं की तुझं करिअर ऑब्जेक्टीव् एका दमात..एवढं कशाला? नुसतं पाठ म्हणून दाखवता येईल का? तर सांगता येणार नाही.. तीस चाळीस टक्के माहिती म्हणजे निव्वळ निरुपयोगी! ऑनलाइन जगात घरचा पत्ता पासपोर्ट नंबर आईवडीलांचे पूर्ण नाव कॉलेजातल्या कुठल्यातरी इव्हेंट चं नुसतं पार्टीसिपेशन हे रेझुमी वर कशाला हवं? पण असो! 
मी किलकिल्या दरवाजात उभ्या एच आर rep ला हातातल्या सी व्ही वरचं नाव वाचून दाखवतो.... दरवाजा बंद होतो आणि थोड्याच वेळात पुढच्या उमेदवाराच्या चेहऱ्यासकट पुन्हा किलकिला होतो...
--X-O-X--
"इंटरव्यूला बाहेर पडतोस म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव करायला पाहिजे तुला.. मैं इंटरव्यूतक पहुँचता तो कभी बाहर नहीं निकलता" छुपा अर्थ स्पोकन इंग्लिश मधे वीक आहेस तू..पासून "काही नाही रे होशील सिलेक्ट.. आमची तर एप्टीट्यूडच crack करायचे वांधे आहेत" पर्यन्त सगळ्या पद्धतीचे सल्ले मिळत होते. तीन कॉलेजचे उमेदवार एकत्र असल्याने फिल्टर लावायला सोपं पड़ावं म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स ने टेक्निकल मधून शॉर्ट लिस्टेड लोकांना ग्रुप डिस्कशनला बोलावलं होतं. आमच्या ग्रुप ला ब्रेन ड्रेन हा विषय होता.. स्वदेस च्या शाहरुख चं उदाहरण देऊन मी बऱ्यापैकी बोलबच्चन दिले.. 12 जणांच्या आमच्या ग्रुप मधून 3 जण पी आय साठी निवडले गेले.. मी त्यात होतो. कमाल म्हणजे ग्रुप डिस्कशन मधून पुढे न गेलेल्या लोकांमधे "माझं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव व्हायला पाहिजे" म्हणणाऱ्या व्यक्ती होत्या.. पर्सनल इंटरव्यू छान झाला.. आमच्या स्ट्रीमचे आम्ही दोघेजण होतो  पण त्यांना एकच रिक्वायरमेंट होती.  सिलेक्ट झालेल्या लोकांना ऑफर लेटर्स लगेच मिळणार अशी वदंता होती. ती खरी ठरली.. काही लोक खाकी लिफाफे घेऊन आले आणि आमच्यापैकी देशपांडे नावाच्या मुलीच्या हातात तो लिफाफा पडला. नशीबाने (किंवा इतर जे काही फॅक्टर्स असतात त्या सगळ्यांनी) पुन्हा एकदा टांग दिली होती!  संधी सारखी सारखी दरवाजा ठोठावत होती पण कॅम्पस सिलेक्शनचं गणित काही सुटता सुटत नव्हतं..

बॅक्सटर फार्माच्या प्रिलिमनरी राउंड मधून पुढे गेलेल्या लोकांचा जीडीपीआय चा एकच राउंड होता..  तिथंही इंटरव्यूतुन बाहेर पडलो. मँकलुईड फार्मा ला पण तेच. त्यांनी तर मी आणि अजून एकजण सोडून सगळ्यांना घेतलं! :)  माझ्यासाठी तर ही  हाईट  होती!! काहीतरी चुकत होतं खास पण काय तेच कळत नव्हतं आणि कुणी सांगणारंही नव्हतं..

वर्ष संपत होतं तसं कंपन्यांच्या ओघ आटला होता. आता चुकून माकुन एखादी कंपनी येत होती परंतु माझ्या स्ट्रीम साठी नव्हती किंवा माझे एवरेज मार्क्स पुरेसे नव्हते किंवा टी पी ओ शी निर्माण झालेली कटुता यापैकी किंवा अशा अनेक तत्कालीन कारणांमुळे मला अपियर होता येत नव्हतं..  बरोबरीचे बरेच लोक प्लेस झाले होते त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंट हा विनाकारण प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. आतापर्यंत मी इंटरव्यू मधून कसा बाहेर पडलो हे ऐकण्यात कोणाला काही स्वारस्य असेल असं वाटत नव्हतं!
--X-O-X--
..ही आतापर्यंतची तिसरी कॉफी होती. "Have you had your lunch" मी उगाच समोरच्याला कम्फर्टेबल फिल करवायचा प्रयत्न केला. त्यानं नाही म्हटलं असतं तर मी त्याला "जा दोन घास खाऊन घे" असं मुळीच म्हणणार नसतो! कोणतंही उत्तर चालू शकेल असा तो एक प्रश्न असतो परंतु काहीजण त्याचंही उत्तर फार सीरियस होऊन देतात.. जसं की आज उपास आहे, सकाळचा नाश्ता कसा भरपेट होता वगैरे! ज्याचा त्याचा प्रश्न! साला हा ए सी पण ना.. ही उरलेली कॉफी पण गारढोण होऊन गेली!
--X-O-X--
"एक्स एल डायनेमिक? कसली कंपनी आहे ही? सब प्राइम मॉरगेज पहिल्यांदा ऐकतोय मी" मी म्हटलं. "तुला काय करायचंय? तीन लाखाचं पॅकेज देतेय. एवढा पगार देत असतील तर मी दरवाजात उभा राहून येणाजाणाऱ्याला सॅल्यूट मारायला पण तयार आहे!" मित्राने ऐकीव माहिती सांगितली. मी घाईघाईने आमच्या कम्युनिकेशन सेंटर कड़े गेलो.. तुडुंब गर्दी होती. कमी मार्क्सचा क्रायटेरिया आणि ज्यांचं फ़क्त एका कंपनीत सिलेक्शन झालं आहे त्यांना बसण्याची संधी यामुळे एवढं पब्लिक जमलं होतं! इथं माझं एका कंपनीशी जमता जमत नव्हतं आणि हि आधी कुठे ना कुठे सिलेक्ट झालेली मुलं जास्त पैशाच्या आशेने इथंही गर्दी करत होती!

एप्टीट्यूडसाठी तीन चार क्लासरूम्स भरून मुलं होती. आधी म्हटलेली काही अलरेडी  प्लेस् झालेली मुलं आणि बाकीचा सगळा उरलेला कचरा.. माझ्यासकट! त्यातून कंपनीने एक क्लासरूम भरेल इतकी मुलं सिलेक्ट केली! त्यांची बिझनेस कॉम्प्रिहेन्शनची टेस्ट झाली. ही टेस्ट म्हणजे अक्षरशः तीन पानांचा इंग्लिशचा पेपर होता. असली टेस्ट कोणीच घेतली नव्हती आतापर्यंत. त्यात शॉर्टलिस्ट होणाऱ्यांची नावं दुसऱ्या दिवशी जाहीर होणार असं सांगितलं गेलं. 

दुसऱ्या दिवशी एका मित्राचा फोन आला की कॉलेजच्या गेटवर शॉर्टलिस्टेड मुलांची नावं लागली आहेत. मी चकितच झालो! पोरांच्या इज्जतीचे वाभाडे डायरेक्ट कॉलेजच्या वेशीवर? असं कसं कोणी करेल?

उत्तरार्ध:

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

एक चवदार कॉफी!!


तरुण मुलं आणि त्यांचं  लग्न हा त्यांच्या जिव्हाळ्यापेक्षा त्यांच्या घरच्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. काय? पटतंय ना हे स्टेटमेंट? जर तुमचं उत्तर हो असेल तर 'कॉफी आणि बरंच काही' तुमच्यासाठी आहे. तुमचं वय, तुमची जनरेशन, तुमचं कॉर्पोरेट स्टेटस यापैकी कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला फरक पडणार नाही ! खरंच!!

सेन्सॉर बोर्डानं किंवा निर्मात्यांनी 'बरंच काही आणि कॉफी' कि 'कॉफी आणि बरंच काही' या नावात घातलेल्या गोंधळामुळं पिक्चरचं पाळण्यातलं नाव आणि शाळेतलं नाव यामध्ये गडबड असली तरी एकदा सिनेमा चालू झाल्यावर त्या गडबडगोंधळाचं नामोनिशाण दिसत नाही. रवि जाधव हा माणूस निर्मात्यांमध्ये असेल तर डोळे झाकून सिनेमाच्या उच्च निर्मितीमुल्यांवर विश्वास दाखवावा एवढं स्टेटस  त्यानं जमवलं आहे! तो स्वतः डिरेक्टर नसला तरी!! 'रेगे' वरची त्याची छाप, अभिजित पानसे च्या आडूनही दिसून येते तसंच इथेही झालंय.

अगदीच तरुणपणी नोकऱ्या मिळायला लागल्यानंतर पहिल्यांदा  तरुणाई पसरली ती बिपीओ आणि केपीओ मध्ये त्यानंतर आय टी कंपन्यांमध्ये. मग कामाचा लोड, मिळणारा पैसा, प्रोजेक्टच्या अग्रेसिव्ह डेडलाईन्स आणि हायरार्कीत वर चढायची घाई या नादात लग्न, सेटलमेंट, पर्सनल लाईफ, आणि नाती मागे पडत गेली. नेमका याच विषयाला हात घालत  याच पार्श्वभूमीचा वापर करत  'कॉफी.. ' तयार व्हायला लागते आणि पुढे पुढे तीची रंगत वाढत जाते.

उपवर परंतु नॉन-लग्नेच्छुक मुलामुलींचा बराच सुकाळ आहे. निदान आताच्या काळात तरी. आपल्याला लग्न करायचं आहे का? किंबहुना  आपल्याला का लग्न करायचं आहे? आपल्याला कसा/कशी पार्टनर हवा/हवी आहे? असे असंख्य प्रश्न त्यांना पडलेले असतात परंतु कामाच्या धबडग्यात असेल किंवा इच्छा नसल्यामुळे असेल त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या भानगडीत हे लोक पडत नाहीत. आईवडील मात्र आपल्या कर्तव्य असल्याच्या थाटात किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या मुलांसाठी स्थळ शोधत असतात. 

असंच मित्राच्या मुलाचं 'स्थळ' लहानपणीच्या मित्राची (मोठी झालेली) मुलगी बघायच्या कार्यक्रमाला येतं आणि चित्रपट सुरु होतो. लिबरल कुटुंब आणि त्यात मोकळंढाकळं वातावरण असल्यामुळे हा कार्यक्रम काही तितकासा फॉर्मल होत नाही. अरेंज्ड लग्नाला दोघांचाही फारसा सपोर्ट नसतो त्यामुळे जाई (प्रार्थना बेहरे) त्याला- अनिष (भूषण प्रधान) ला आपल्या लाईफ  मधल्या घटना सांगत जाते आणि चित्रपट उलगडत जातो. तिची आणि निषादची झालेली पहिली भेट (जी फारशी लक्षात राहण्यासारखी पण नसते) इथपासून ती आजच्या दिवसापर्यंत छोट्या मोठ्या गोष्टींनी  भरलेला पेटारा ती अनिषसमोर उघडून टाकते. तिकडे कधी नव्हे ते जाई ला भेटायला बोलावून तिची (वेळेनंतरही) वाट पाहणारा  थोडासा अबोल असणारा निषाद (वैभव तत्ववादी) जे घडतंय त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न  करत असतो. 

ऑफिसमधला पहिला प्रोजेक्ट संपल्यावर आणि रिसोर्स रीअलोकेशन झाल्यानंतर त्यांना एकमेकांची उणीव जाणवायला लागते. सिनेमाचा प्रभाव असणा-या आपल्यावर 'हंसी  तो फंसी' किंवा 'प्यार है तो पलट के देखेगी' असल्या बालिश कल्पना म्हणजे प्रेम असलं काहीबाही जे बॉलीवूड ने ठसवलं आहे ते या दोघांच्याही डोक्यात आहे. तसलं काहीही वास्तव जीवनात होत नसल्यानं, जे होतंय ते प्रेम आहे कि नुसतं  infatuation आहे हेच त्या दोघांनाही कळत  नाही. जाईला एकदम मेमरेबल 'प्रपोज' हवाय आणि निषादला माहितीये कि त्याचं लाईफ ,त्याचा स्वभाव फिल्मी नाहीये. त्याला साधं I  like  you  बोलणंही कठीण जातं तर प्रेमाचा खुल्लमखुल्ला  इजहार करणं तर दूरची गोष्ट!! त्यामुळे कोणीही व्यक्त होत नाही आणि त्यामुळेच गोष्टी अडकून पडलेल्या असतात. त्यांना या प्रेमाची कोणीतरी जाणीव करून दिली पाहिजे ना? तशी जाणीव कोणी करून देतं का ? नुसती मैत्री आणि मैत्रीपलीकडचं नातं यातल्या सीमारेषा तशाच राहतात कि पुसल्या जातात? या प्रश्नांची उत्तरं  सिनेमागृहात जाऊन शोधायला पाहिजेत. 

संपूर्ण सिनेमात कुठेही 'कथा' नावाखाली कोंबलेला मेलोड्रामा नाही, भावनांचे विनाकारण हसू रडू आणणारे हिंदोळे नाहीत, खलनायक किंवा  प्रेमाच्या विरोधात असणारे आई-बाबा नाहीत, 'दुनिया कि कोई भी ताकत' च्या विरोधात लढणारे नायक नायिका नाहीत, समाजासाठी संदेश वगैरे तर नाहीच नाही तरी ही कंटेपररी पद्धतीने खुलत जाणारी लव्ह स्टोरी आहे! निखळ, हलकीफुलकी, रोमेंटिक! 

फक्त निषाद आणि जाईच नव्हे तर सिनेमातले इतरही लोक आपली छाप सोडतात. विशेष करून आभा! (नेहा महाजन)  तिने तिची वैचारिक दृष्ट्या 'मोठी' असणारी लहान बहिण मस्त साकारली आहे. दरवेळी नव्या  मुलीच्या प्रेमात पडून नंतर तोंडावर पडणाऱ्या  सुयश टिळकने निषादचा मावसभाऊ-निलेश म्हणून उत्तम काम केलं आहे. तो इनोसंटली देत असणारे सल्ले चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाहीत! बोजड संवाद आणि उदात्त तत्त्वज्ञान न सांगणा-या पटकथेमुळे सिनेमा आजूबाजूला घडणा-या घटना असल्यासारखाच वाटतो. 

वैभव तत्ववादी च्या वाट्याला पहिल्यांदा 'अमर प्रेम' सारखी टुकार सिरियल आणि त्यानंतर 'तुझ माझ जमेना' कि अशाच काहीतरी नावाची डेली सोप आली होती! त्याचं आणि टीव्ही सिरियलचं काही जमलं नाही पण या सिनेमात पहिल्यांदाच त्याला खरा अभिनय वगैरे करायची संधी मिळाली असं  वाटतंय, त्याने चीज केलंय. प्रार्थना बेहरे का कोण जाणे , क्लोज अप शॉट  मध्ये बऱ्याचदा ('मितवा' मधेही ) ऐश्वर्या राय सारखी दिसते असं  वाटतं. पण तिनेही चब्बी मराठी मुलगी खूप छान साकारली आहे. पुण्यातली  टिपिकल फमिली साकारण्यात दिग्दर्शक नव्वद टक्के तरी यशस्वी ठरला आहे हे मान्य करायलाच हवं!

सिनेमात दिसणारं ऑफिस असो, घर (जाईच्या भाषेतला साधा थ्री बी एच के चा flat !) असो कि कॉफी शॉप… प्रत्येक लोकेशनला एक प्रकारचा फ्रेशनेस आहे. तीच गोष्ट लागू होते charactersच्या कपड्यांच्या रंगसंगतीला! संपूर्ण सिनेमा संपेपर्यंत ते फ्रेश वातावरण प्रत्येक प्रसंगाला वेगळ्या  उंचीवर नेउन ठेवतं. 'रंग हे नवे नवे' हे मल्टीलिंग्वल गाणं तर खासच!! एकूणच काय तर मुलगा असो व मुलगी , स्त्री असो व पुरुष , आई असो व बाबा किंवा अशाच जोड्यांपैकी कोणीही असो, प्रत्येकाने किमान एकदा जाऊन या 'फिल्टर्ड' कॉफीचा आस्वाद घ्यायलाच हवा!!