शुक्रवार, २७ जुलै, २०१२

अपुले मरण पाहिले म्या डोळा! : उत्तरार्ध

पूर्वार्ध :
आपली भडक लाल पिशवी नाचवत नाचवत रस्ता क्रॉस करत असताना भर रस्त्यातून शोधत येवून बैलोबाने यांनाच ढुशी दिली आणि साधी-सुधी नाही. शिंग डायरेक्ट पोटाच्या आतमध्ये आणि आतडं पोटाच्या बाहेर!!! शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यावर त्याला जे वाटलं असेल तेच फिलिंग गणपतरावांनी घेतलं असणार यात शंकेला वावच नाही. फक्त 'दगा दगा' ओरडत बसायची गणपतरावांची ताकद नव्हती. त्याऐवजी ते तत्क्षणी बेशुद्ध पडले.
हॉस्पिटलात डॉक्टर लोकांनी त्यांचं आतडं होतं तसं कोंबून पोटाला टाके घातले आणि त्यांच्या खिशाचे टाके मात्र उसवले! शुद्धीवर आल्यावर ते स्वतःच सांगायला लागले. लोक म्हणत होते, 'अहो एवढं रक्त गेलं वाहून.. आम्हाला वाटलं आता जगता कि नाही'
तर म्हणे " मी कसला मरतो? अजून पंधरा वर्ष आहेत माझी.. काही केलं नसतत ना तरी हातावर आतडं घेऊन जगलो असतो." कसंनुस हसत गणपतराव म्हणाले. (मला कल्पनेने शिसारी आली आणि )लोकांना पश्चाताप झाला. गणपतरावांना हॉस्पिटल मध्ये भरती केल्याचा आणि त्यापेक्षा त्यांचे पैसे वाया घालवल्याचा!

त्यात्क्षणी त्यांना साक्षात्कार झाला असावा कि 'मृत्यू माहित असताना कशाला मेंढरासारखं घाबरत घाबरत जगायचं?' मग तर काय विचारूच नका.. दरम्यानच्या काळात गणपराव उठसुठ ब-याच ठिकाणी धडपडले, अपघातातून वाचले, जिवावरच्या संकटातून बचावले.. विश्वास बसणार नाही पण मध्येच एकदा  श्वानदंशातूनही कोणतेही इंजेक्शन न देता विनाविषबाधा सुखरूप सुटले.
"हे अति झालं गणपतराव" मी म्हटलं..
"काही होत नाही हो मला"
"असं कसं, आता साधा कुत्रा होता म्हणून वाचला असाल.. उद्या पिसाळलेला कुत्रा चावला तर? बर आता इंजेक्शनही फ्री असतं सरकारी हॉस्पीटलात!"
"चौदाच्या चौदा? बेंबीत घ्यायची असतात ती ?"
"अहो हल्ली तीनच असतात.. आहात कुठे आणि हल्ली 'नेहमीच्या ठिकाणी' देतात.. कशाला उगीच रिस्क घेता?" मी म्हटलं. गणपतरावांनी मान हलवली पण त्यांनी काही ते फारसं मनावर घेतलं नाही असं वाटलं.
गणपतराव आता 'हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी' वगैरे सरंडर करत होते..
"बरोब्बर पंचाहत्तराव्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स घेणार आणि मोठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पण घेणार accident रायडर सोबत.. बसायचा तो बसूदेत प्रीमिअम. काय चिंता नाही!" गणपतराव म्हणायचे..
ते आता उजवीकडे-डावीकडे न बघता रस्ता ओलांडत होते..रियल इस्टेट मध्ये गुंतवणुका करत होते. बिनधास्त रिस्क घेत होते... ओ एन जी सी सारख्या १०-२० वर्षात ग्रोथ होणा-या ऑईल कंपन्यांचे शेअर्स घेत होते.. फार्मा कंपन्यांच्या स्टेक्समध्ये आर्थिक उलाढाल करत होते.. कशाची आणि कोणाची तमा बाळगत नव्हते.. कोणी काही म्हणालं तर सांगायचे "अजून बरीच वर्ष आहेत हो जायला मला, तो पर्यंत बायका मुलांची तजवीज करून घेतो!" तर थोडक्यात मृत्यू ची वेळ माहित असल्याचा ते पुरेपूर लाभ घेत होते.

या भानगडी करता करता त्यांचं घरातून लक्ष उडायला लागलं. मुलाच्या लग्नाचा विषय बाजूलाच पडला. फादरान्ची ही परिस्थिती बघता त्यांच्या कार्ट्याला आपल्या लग्नाचं काही खरं दिसेना. त्याने मग मारून मुटकून प्रेम बीम केलं आणि कुठूनतरी मुलगी पळवून आणली. (मुलीला बघताच 'प्रेम मारून मुटकून' केलेलं असाव यावर कोणाचापण विश्वास बसावा! असो..) मुलाने देवळात हार तुरे घालून लग्न उरकलं आणि दमदार हुंड्याची गणपतरावांची स्वप्न त्याने धुळीला मिळवली. मुलीने पण काही काळातच पोराची चॉईस कशी होती याबद्दलचं इतरांचं म्हणणं खरं ठरवत घरात भांडणं उकरून काढली.

बारीकसारीक कारणांवरून घरात आदळआपट व्हायला लागली. सासू सुनेचं वाजायला लागलं. गणपतराव आणि त्यांचा मुलगा मधल्या मध्ये भरडले जायला लागले.
काही झालं कि बायको त्यांच्याकडे यायची.. " बघा ना अहो.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... कसली भवानी घेऊन आलय कार्टं .. आम्हाला म्हातारपणी छळायला.. कोणास ठावूक? जरा इन्टरेष्ट घेऊन त्याचं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"
मग थोड्या वेळाने मुलगा यायचा.. "ओ पप्पा.. आईला समजावा ओ जरा.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... .. उच्छाद मांडलाय दोघींनी.. जरा इन्टरेष्ट घेऊन माझं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"
मग सूनबाई यायची.. " पप्पा.. कसली सासू मिळाली आहे मला.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... कसा संसार केलात या बाईबरोबर कोण जाणे.. झक मारली आणि लग्न करून इकडे यायची बुद्धी झाली.. तुम्ही तरी सांगायचं तुमची बायको असली आहे ते.. जरा इन्टरेष्ट घेऊन तुमच्या पोराचं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"

गणपतरावांच जगणं मुश्कील व्हायला लागलं.. त्यात पोरगी जावयाबरोबर बिनसलं म्हणून परत आली.. जावयाच्या नाकदु-या काढायला त्यांना मुंबईच्या खेपा वाढवायला लागल्या.. प्रचंड त्रास होत होता.. पण इतक्यात मरणार नाही या गृहितकावर गणपतराव सगळ्या गोष्टी आपापल्या परीनं सेट करायचा प्रयत्न करत होते.. तरीही आवाक्याबाहेर गेलेल्या गोष्टी सावरता येत नाहीत.. घरच्या कटकटीना वैतागून मुलानं वेगळा संसार थाटला.. गावातच भाड्याने राहायला लागला. आई वडिलांना एकटं टाकून! त्यांच्या बायकोने आकांत केला.. थयथयाट केला. कोणाला ती आवरता आवरेना.. सर्वांसमक्ष "तू 'आम्हाला' मेलास" म्हणून सांगितलं आणि गणपतरावांना न विचारताच आपल्या बाजूला करून घेतलं..
...जिवंतपणी मरण ते वेगळं काय असतं?

गणपतरावांच्या मागची साडेसाती काही सुटेना.. मुलाच्या उत्पन्नाच्या भरवशावर सगळे पैसे लाँग टर्म प्लान्स मध्ये इन्वेस्ट करून ठेवलेले आणि आता हातात काही नव्हत... बायकोच्या नकळत मुलाच्या दारात जावं लागलं. मुलानेही (त्याला न शोभणारा) समजूतदारपणा दाखवत महिन्याला पैसे द्यायला सुरुवात केली..
सगळं असून गणपतराव सगळं गमावून बसले होते. 'देवा यापेक्षा मरण बरं.. ' ते विनवणी करत होते पण हिशेबाप्रमाणे अजून दहा वर्ष तरी शिल्लक होती.

तब्बल पाच वर्षानंतर त्यांचा मुलगा घरी परतला. सून सुधारली होती.सासू सुधारायच्या पलीकडे होती पण तिला पण बरंच काही उमगलं होतं. तिच्यासाठी काय! आधी नवरा जिवंत झाला आणि आता मुलगा!

गणपतरावांना हर्षवायू व्हायचाच बाकी होता आणि आनंदाच्या भरात नको ते झालं.. सततच्या विचारांनी शारीरिक आणि मानसिक त्रास वाढला होताच.. आता अचानक हे अस झाल्याने वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी गणपतरावांना paralysis चा attack आला. डायरेक्ट अर्धी बाजूच निकामी. डॉक्टर लोकांनी सांगितलं, " तब्ब्येत खणखणीत आहे..फक्त हातपाय हलवता नाही येणार!"
"म्हणजे मग राहिलं काय?" गणपतरावांनी विचारलं.. पण डॉक्टरांकडे उत्तर नव्हतं ! सगळं सुरळीत होता होता दैवाने डाव टाकला..
"असल्या जगण्यापेक्षा मेलो असतो तर बरं.." गणपतराव उघडउघड म्हणत असत "पण कानात यमराज गुंजतोय ना.. म्हणतो 'अरे याला अठ्ठ्यात्तराव्या वर्षी आणायचा आहे' .. !!"

एकेकाळी मरण लांब आहे म्हणून हर्षोत्सव साजरा करणारा माणूस आता मरणाची आराधना करत होता ! आम्हाला त्यांचे हाल बघवत नव्हते

फ़िजिओथेरपिस्टच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना थोड फार उठता यायला लागलं.. पण स्वतःच्या पायांवर उभ राहता येईल कि नाही याबद्दल शंकाच होती.. दरम्यानच्या काळात बायको,मुलगा आणि सुनेने बरेच उपचार केले.. गणपतरावांच्या गुंतवणुकीचे थोडेफार रिटर्न्सही येवू लागले होते. 'बरोब्बर पंचाहत्तराव्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स' घ्यायचं त्यांचे मनसुबे 'नॉन एलीजीबिलीटी' मुळे उधळले गेले होते.
आयुष्याच्या पुढच्या अध्यायात अधाशासारखे कमावलेले पैसे शेवटच्या काळात संपले होते.. जेवढी गंगाजळी त्यांनी सुरुवातीला जमा करून ठेवली होती तेवढीच आता उरली होती.

हल्लीच गणपतरावांचा जावई आणि मुलगी तिच्या माहेरपणाला आलेली असताना एके दिवशी त्यांचा मुलगा त्यांची कुठल्या तरी गुंतवणुकीचे अनपेक्षितपणे आलेले रिटर्न्स पप्पांना दाखवायला घेऊन आला
"पप्पा किती पैसे मिळालेत बघा.. अमुक एक लाख"
"काय म्हणतोस? " म्हणत गणपतराव चक्क स्वतःहून स्वतःच्या पायावर ते उभे राहिले. अचानक.. "अरे हे बघ काय.." ते ओरडले!!
मुलगा दोन्ही आनंदाच्या बातम्या द्यायला स्वयंपाक खोलीकडे पळाला.. आणि इकडे गणपतराव छाती धरून कोसळले..
आम्ही त्यांच्या जावई आणि मुलाबरोबर जाऊन त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती करून आलो..

त्यांच्या घरी आल्यावर गणपतरावांच्या बायकोने सुनेला आमच्यासाठी चहा टाकायला सांगितला.. योगायोगाने वीस वर्षापूर्वी गणपतरावांच्या पहिल्या मृत्युच्या वेळी आम्हीच चार पाच जण असेच आणि इथेच बसलो होतो.. त्या आठवणी निघाल्या. त्यावेळी दणाणलेले धाबे आठवून आम्ही दबकत दबकत हसलो..
गणपतरावांच्या मुलीने चहा आणून दिला..

तेवढ्यात चार पाच जणांच एक टोळकं अंगणात येवून टपकलं.. वरच्या आळीतले होते ते सगळे. गणपत बारशिंगेच्या इथले. हा गणपत बारशिंगे सुद्धा साधा माणूस. कोणाच्या फारसा अध्यात मध्यात नसलेला. मुख्य म्हणजे आमच्या उठण्या बसण्यात नसलेला! असो.. तर तो स्वतः सुद्धा त्यांच्याबरोबर होता.

" काय गं  मुली.. पप्पा कुठे आहेत?' गणपतरावांच्या  मुलीला त्या ग्रुपमधल्या एका वयस्कर माणसाने विचारलं.
" पप्पांची तब्ब्येत बिघडलीय काका,  हस्पिटलात भरती केलंय..हे आणि दादा तिकडेच आहेत. हेपण गेले होते सगळे.. आताच आले."
आम्ही सगळेच अवाक होऊन एकमेकांची तोंडं बघायला लागलो! सेम टू सेम संवाद वीस वर्षापूर्वी घडला होता.. यावेळी जरी आम्ही दर्शक असलो तरी त्यावेळी आम्हीच त्या संवादाचे कर्ते होतो ! एखाद्या सिनेमाचा रिमेक बघावा अशी आमची अवस्था झाली होती. गणपत बारशिंगे आमच्याकडे बघून 'बघितलात? मी सांगत होतो ना?' या अर्थाने सूचक हसला आणि हळूच त्याच्या शेजारी उभ्या असणा-याच्या कानात पुटपुटला. तो काय बोलला असणार ते मी ताडलं!! तो नक्कीच बोलला असणार कि 'माझ्या मर्तिकाचं सामान परत नका करू, परस्पर इकडे आणायला सांगा..' कारण वीस वर्षापूर्वी हेच शब्द आमच्या गणपतरावांनी माझ्या कानात सांगितले होते! मी पुढचा प्रसंग आठवला आणि कानात जीव गोळा करून बसलो.. आता फोनची रिंग अपेक्षित होती. आणि तेच झालं.. कोणी काही बोलणार एवढ्यात फोन वाजला..सून लगबगीने आत गेली आणि थोड्या वेळाने तोंडावर पदर दाबून बाहेर आली.
"पप्पा गेले.. यांचा होता फोन.."

गणपतरावांच्या बायकोने आकांत करून गाव गोळा केला.. सून सैरभैर झाली. पोरगी पहिल्या वेळेसारखीच सुन्न  होऊन बसली..
तर अशा त-हेने अत्यंत नाटकी पद्धतीने गणपतराव ढू ss म झाले.. मी बारशिंगेच्या मंडळींकडे गेलो आणि शांतपणे म्हटलं.. " चिता रचलेली असेल तर विस्कटायला सांगू नका! आटपून टाकू तिथेच. जवळचे  इथेच आहेत आणि नातेवाईक पण पोचतील अर्ध्या एक तासात."
ते सगळे चकित होऊन माझ्याकडे बघत राहिले. 
काहीही असो पण मला राहून राहून एकच प्रश्न पडतोय कि सारखं सारखं कन्फ्यूज होणा-या त्या यमदूताला यमराजाने नोकरीवरून डिसमिस केलं असेल का?

(समाप्त )

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

अपुले मरण पाहिले म्या डोळा!: पूर्वार्ध

गणपतराव ढूssssम झाले. 'ढूssssम' म्हणजे गेले वर! हि खरं म्हणजे महत्व देण्यासारखी बातमी नाही. आता वय वर्ष अठ्ठ्याहत्तर म्हणजे आजकालच्या जमान्यात खूप झालं. हल्ली सत्तरीतच अर्ध्या गोव-या मसणात गेलेल्या असतात पब्लिकच्या.. त्यामानाने गणपतरावांनी बरेच पावसाळे पाहिले. मग मी का सांगतोय हे सगळं? तर सांगण्यामागच कारण हे कि, माणसं एकदाच मरतात परंतु आमचे गणपतराव दुस-यांदा मेले!!

पहिल्या मरणापूर्वी जगण्याव्यतिरिक्त त्यांनी आयुष्यात काही काही म्हणून केलं नाही. काहीतरी थातुरमातुर शिक्षण. मग कुणाच्यातरी वशिल्याने सरकारी नोकरीत चिकटले. इमानेइतबारे त्यांनी ती नोकरी केली. त्यांच्या बायकोने दोन मुलांना जन्म दिला. त्यासाठी केलेली मेहनत हेच काय ते त्यांचे तरुणपणातले कष्ट!! बाकी ती पोरं आपोआप वाढली. मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मोठा झाला. शिक्षणाच्या बाबतीत ठोंब्या. एकदम बापाच्याच वळणावर गेला होता. त्यामुळे गणपतरावांनी हातपाय हलवण ओघाने आलंच. बापाचं कर्तव्य समजून ते मात्र त्यांनी पार पाडलं. नोकरीची दोन वर्ष शिल्लक असताना तब्ब्येतीच्या कारणास्तव त्यांनी व्हॉलन्टरी रिटायरमेंट घेतली. अनुकंपा तत्वावर मुलगा त्यांच्या जागी जॉईन झाला. मुलीला त्यांनी व्यवस्थित मुलगा बघून दिला. मुंबईला माहीमजवळ चांगलं दोन खोल्यांचं 'घर' असणारा जावई होता त्यांचा. पण हे सगळं दुस-या जन्मात..! पहिल्यात कर्तव्याच्या मानाने भोपळा होता..

तसं अंगावर आलंच तर गणपतराव काम करायचे. अगदीच नाही असं नाही. पण स्वतःहून जावून काय करतील तर शपथ. 'सांगकाम्या आणि हो नाम्या' म्हणतात न तसला प्रकार.पहिल्यांदा त्यांची गणपत नावाने ओळख होती. 'ए गणपत या फाईल्स उरकून टाक,आज मला घरी लवकर जायचंय' म्हणून कोणी सांगितलं कि गणपत करायचा, चकार शब्द न काढता. पण कोण अती करायला लागलं तर 'हो हो' म्हणून करायचाच नाही. शेवटी ते त्याचं काम नसायचं त्यामुळे त्याला साहेब बोलू शकत नसे. त्याने कधीही साहेबाकडे जावून प्रमोशन मागितलं नाही कि वाढीव महागाई भत्ता. सरकारच्या कृपेने आणि देवाच्या दयेने ते त्याला मिळत गेलं.

तर हा गणपत सरळ मार्गी जगत होता. गेला दिवस आपला म्हणत होता. आयुष्यात काही अनपेक्षित घडत नव्हतं आणि घडावं अशी त्याची अपेक्षा सुद्धा नव्हती. त्याची लाख नसेल पण नियतीची हवी ना?

वय वर्ष अठ्ठावन्न असताना गणपतला हार्ट attack आला. अचानक. झोपेत असताना. आणि गणपत गेला. आम्हाला सकाळी सात वाजता कोणीतरी बोलवायला आलं. आम्ही धावत पळत गेलो. बायको धाय मोकलून रडत होती. दोन्ही पोरं- तरुणपणातली- सुन्न होऊन बसली होती. पोरगी रडून थकली होती आणि पोराच्या चेह-यावरचं भविष्याबद्दलचं प्रश्नचिन्ह ठळकपणे उठून दिसत होतं.

"सकाळी पाणी मागितलं हो साडेपाच वाजता.." गणपतच्या बायकोच्या रडव्या हेलांमधून मी शब्द टिपून काढत होतो.. "मी म्हटलं उठा आणि जाऊन घ्या स्वतःच्या हातांनी.." पुन्हा टिपेचा स्वर "गेले पिऊन आले आणि झोपले.. साडेसहाचा गजर बंद करायला त्यांना उठवलं तेव्हा उठेचनात....." स्वर टिपेचा... आर्ततेचा... वाईट वाटलं.
'भला माणूस..'
'कधी कोणाचं मागून खाल्लं नाही,पाच पैशाची उधारी नाही, कोणाला दुखावलं नाही मग इतक्यात कसं व्हावं असं?'
'....पोरांचं काय होणार?'
आणि विशेषतः
'...पोरीचं कसं होणार?'
वगैरे पठडीतल्या आणि 'असल्या'वेळी करायच्या गावगप्पा सुरु झाल्या. नेहमी 'असल्या' कामात पुढाकार घेणा-या लोकांनी तिरडी बांधली, मर्तिकाचं सामान मागवलं/आणलं गेलं. गणपतचे नातेवाईक मोजकेच आणि जवळच्या गावातलेच होते. गणपत गेल्याचा सांगावा पोचताच अर्ध्या पाऊण तासात सगळा गोतावळा त्याला पोचवायला जमला म्हणजे बघा.

कार्यवाल्या भटजींनी गणपतच्या मुलाला 'काय कसं' वगैरे सूचना दिल्या. तो आणि आम्ही तिघे असे आमच्या खांद्यावर गणपतला घेऊन स्मशानात गेलो. भलताच जड होता तो आणि ऐन गृह्स्थाश्रमाच्या वयात आउट झाल्यामुळे सुमसुमीत सुद्धा होता! पण गेलेल्या माणसाबद्दल असलं भलतं सलतं बोलू नये म्हणून मी जिभेला आवर घातला.

लाकडं रचलेली होती. गणपतला तिथे ठेवला, भटजी ने गरुड पुराणातले वेचे म्हटले.. गणपतच्या मुलाने भोक पडलेलं मडकं घेऊन फे-या मारल्या आणि चितेला आग लावणार इतक्यात चमत्कार झाला!

गणपत चितेवरच उठून बसला!!

भटजीच्या तोंडाला बुडबुडे आले.. गणपतची बायको झीट येवून पडली, पोरीची वाचा बसली आणि पोरगा हातातल्या पेटत्या लाकडासकट धूम पळाला. फटाका पेटवल्यावर लहान मुलं पळतात अगदी जसाच्या तसा.. त्याला बघून गर्दीसुद्धा 'होय्य..होय्य.. पळा पळा..भूत भूत' करत सैरावरा पळत सुटली.. साहजिकच त्यात मीसुद्धा होतो..

जरा लांब गेल्यावर काही लोकांच्या जीवात जीव आला.. परिस्थितीचं भान आलं. त्यातही मी होतो! आम्ही काहीजण थांबलो. एव्हाना गणपत स्वतःच्या पायांनी चितेवरून खाली उतरला आणि लोकांना ओरडून काही सांगण्याच्या भानगडीत न पडता (ओरडून बोलणं हा त्याचा पिंडच नव्हता म्हणा!) आडव्या पडलेल्या बायको आणि थरथरत बसलेल्या पोरीकडे गेला. "अगं मी जिवंत आहे" त्यांना तो सांगत होता. "मेलो होतो पण आता जिवंत आहे मी. भूत नाहीये मी. बघ हात लावून." पण हात लावायला कोणी धजावेना. मी पाहिलं. गणपतचे पाय आमच्यासारखेच होते! मग मीच पुढे झालो आणि हात लावला. तो त्याच्या शरीराला अडला.. अंगपण गरम होतं. गणपत खरंच जिवंत होता. थोड्यावेळाने त्याची बायको शुद्धीवर आली, पोरगी बोलायला लागली.. मुलगा पण न पेटलेल्या चितेकडे परतला. सगळ्यांना गोळा करून आम्ही त्याच्या घरी गेलो.

बहुतेक बंद पडलेलं हृदय कशामुळे तरी चालू झालं असावं. धक्क्यामुळे बंद पडलेलं घड्याळ चालू होतं तसं.पण गणपतकडे वेगळीच स्टोरी होती.

"मी वर गेलो. तर गेटवर हि मोठ्ठी लाईन. चित्रगुप्त स्वतः एन्ट-या घेत होता सगळ्यांच्या. यमराज शेजारी राहून बघत होते.. आणि सगळे यमदूत आपापले आत्मे रेडयांवर बसवून लायनीतून पुढे पुढे सरकत होते..एका रेड्यावर दोन आत्मे." गणपतराव सांगत होते.
हो.. याचवेळी गणपतचे गणपतराव झाले असावेत. कारण स्वर्गाचा दरवाजा ठोठावून आलेला माणूस होता तो आता.
"चित्रगुप्त बहुतेक लोकांच्या इथल्या जमिनीवरच्या कार्याचा आढावा घेऊन स्वर्ग कि नरक अशी विभागणी करत होते. मी यांच्या चिंतेत " बायकापोरांकडे बोट दाखवत गणपतराव म्हणाले.
"दोन वर्षांची सर्विस बाकी होती.. एलआयसीच्या पॉलीश्यांचे कागद कुठे ठेवलेत तेसुद्धा हिला सांगितलं नव्हतं.पोरगा नोकरीला नाही..पोरीचं लग्नाचं वय झालंय नुकतं. पस्तिशीनंतर लग्न करण्याचा हा तोटा असतो बघा..रिटायर्ड होईस्तोवर पोरं हातात पण आलेली नसतात.."
"यमदुताच्या रेड्यावर बसून तुम्ही पस्तिशीनंतर केलेल्या लग्नाच्या फायदा तोट्यांवर विचार करत होतात?" न राहवून मी विचारलं.
"नाही नाही.. ते आपलं आता सुचलं म्हणून तुम्हाला सांगितलं" गणपतराव वदले..
"माझा नंबर आल्यावर यमदुताने माझी कारकीर्द सांगायला सुरुवात केली. चित्रगुप्ताच्या चेह-यावरचे भाव बदलत गेले. मलापण कळेना हा कोणाचं कसलं काम सांगत आहे. काहीच माझ्या भूतकाळाशी जुळत नव्हतं"
"मग?" आमचं कुतूहल आत्ताशी चाळवायला लागलं होतं. तोपर्यंत मी 'गणपत येडा झाला' असं कन्क्लूजन काढण्यापर्यंत पोचलो होतो.
"मग काय..चित्रगुप्त भडकला.. म्हणे ' कोणाला उचलून आणलंस ? इतकी वर्ष झाली इथे आणि असली चूक कशी काय करतोस?' मला काहीच समजेना. यमदूत बावरून गेला. यमराज पुढे धावले. चित्रगुप्ताने त्यांना कसले तरी रेकॉर्ड्स दाखवले. ब्यालेंस शीट सारखा काहीतरी प्रकार होता. यमराजांनी आत लक्ष घातलं. आणि यमदुता ला समजावत म्हणाले 'अरे याला अठ्ठ्यात्तराव्या वर्षी आणायचा आहे,इतक्यात कसं काय आणलंस?तुला सांगितलेला तो गणपत वेगळा. यांच्या मागच्या घरातला. यमदूत मान खाली घालून होता. 'याच काय करायचं?' त्याने दबलेल्या आवाजात विचारलं. ' ते मी बघतो.. तू तुझं काम नीट कर' असं म्हणत यमराजाने माझ्या छातीवरच लाथ घातली!" गणपतराव सांगत होते..
"तिथून मी उलट मागच्या बाजूला खाली पडलो तोच जाग आली..! मला वाटलं स्वप्न आहे पण नव्हे खरंच मेलो होतो मी! तुम्ही तर मला जाळायला निघाला होतात' हर्षोल्ल्हासित होऊन गणपतराव सांगत होते..

आम्ही एकमेकांची तोंडं बघायला लागलो. हा माणूस सांगतो ते खरं कि खोटं? शहानिशा कोण आणि कशी करणार? कि खरंच वेड लागलंय? उत्तर लवकर शोधायला हवं होतं नाहीतर आम्हाला वेड लागायची पाळी आली असती! गणपतरावांनी ते ओळखलं.

"खोटं वाटतंय न तुम्हाला?" त्यांनी विचारलं. "मग एक काम करूया.. पाठीमागच्या घरातल्या गणपतला भेटून येवू. चित्रगुप्ताच्या म्हणण्यानुसार त्याची इनिंग संपली आहे" गणपतराव वर जाऊन आल्यापासून स्मार्ट कि काय म्हणतात ना तसे झाले होते!

'काय हरकत आहे. चेक तरी करून घेऊ. ' असा विचार करून आम्ही तिघे चौघे खानविलकरांच्या घरी गेलो.

" काय वहिनी.. आजोबा कुठे आहेत?' त्यांच्या सुनेला आम्ही विचारल.
" बाबांची तब्ब्येत बिघडलीय भावजी, हस्पिटलात भरती केलंय काल.हे तिकडेच आहेत. मी नुकतीच आले."
आम्ही एकमेकांची तोंडं बघायला लागलो! गणपतराव आमच्याकडे बघून सूचक हसले.
"माझ्या मर्तिकाचं सामान परत नका करू, परस्पर इकडे आणायला सांगा.." ते हळूच माझ्या कानात पुटपुटले. तेवढ्यात फोन वाजला..वहिनी लगबगीने आत गेल्या आणि थोड्या वेळाने तोंडावर पदर दाबून बाहेर आल्या.
"बाबा गेले.. यांचा होता फोन." आम्ही तिकडून गुपचूप हॉस्पिटल मध्ये गेलो.

गणपतरावांना जिवंत जाळण्याचा अघोरी प्रकार टळल्यापासूनच्या अर्ध्या तासात ही पुढची न्यूज होती. त्यामुळे एकाला सूचना देवून स्मशानातली रचलेली चिता कोणी विस्कटणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलं. मघाचेच सोपस्कार पुन्हा झाले. या गणपतरावांचे नातेवाईक एव्हाना झाल्या प्रकारातून स्थिरावले होते. त्यांना गणपतरावांनी सगळी कथा नव्याने सांगून अचंबित करून टाकलं. मग त्यांनीच 'गणपतराव-दुसरे' यांच्या कार्याला गर्दी केली. चितेजवळ मात्र सगळे दबकूनच राहिले. न जाणो हा पण उठला तर!! पण तस काही झालं नाही..

गणपतराव पहिले स्वर्ग बघून आले होते हे नक्की.. मग ताबडतोब त्यांनी हालचाली करायला सुरुवात केली. तब्ब्येतीच्या कारणावरून त्यांनी रिटायरमेंट मागितली. साहेबांना सुद्धा त्यांनी हि कहाणी सुनावली असणारच! साहेबांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला वरून मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यायचं कबूल केलं.

मुलगी तर अशीही ह्याच्या त्याच्या बरोबर उंडारत होतीच.. त्यामुळे तिला लग्नासाठी तयार करायला त्यांना फारसे कष्ट पडले नाहीत! एका पायावर तयार होती मुलगी.प्रश्न होता तो मुलाचा.. त्यासाठी त्यांना अतिप्रचंड कष्ट पडले.त्यांना हवा तसा जावई शोधायला त्यांनी ब-याच चपला झिजवल्या.. काही ठिकाणी पोरीची थेरं कानावर आली म्हणून पोरगी नाकारली, काही ठिकाणी पोराच्या अपेक्षा जास्त होत्या. सरतेशेवटी मुंबई चा जावई मिळाला. त्याला गावाबद्दल (आणि मुख्यत्वे मुलीबद्दल) जास्त माहिती नव्हती आणि इंटरेस्ट ही नव्हता. गणपतरावांचा दुसरा जन्म भरून पावला.

मुलीच्या लग्नाचा उपद्व्याप संपतो न संपतो तोपर्यंत मुलगा लग्नाला आला.. पण गणपतरावांची पुंजी कमी झाली होती त्यामुळे त्यांनी आणि मुलाने थोडी कळ काढायचं ठरवलं. तरीही मुलीच्या वेळी झाली तशी गडबड होवू नये म्हणून त्यांनी आधीच चाचपणी करायला सुरुवात केली. कोणाची मुलगी लग्नाची आहे असं कळलं कि गणपतराव स्वतःहून चौकशीला जात. इतरांच्या अध्यात मध्यात न पडणारा माणूस लोकांची लग्नं जुळवायला पुढे पुढे करू लागला. गेल्या साठ वर्षात केली नसेल इतकी धावपळ त्यांनी त्यापुढच्या चार पाच वर्षांमध्ये केली!! एकाच आशेपायी - न जाणो त्या लग्नाच्या बाजारात आपला मुलगा सुद्धा खपला तर! मुलीसाठी दाबून हुंडा दिल्यानंतर त्याची वसुली होईल असं एक पण स्थळ त्यांना सापडत नव्हतं. पण शोध जोरात चालू होता.

असंच एक स्थळ बघून येत असताना गणपतरावांना बैलाने उडवलं!!
उत्तरार्ध:

गुरुवार, २४ मे, २०१२

एका शोधयात्रेची कहाणी! उत्तरार्ध

पूर्वार्ध
पण प्रत्यक्षात झालं उलटच.
ग्यादरिंगच्या दुस-याच दिवशी एक कोणतरी पोरगा आला. सिनियर. वरच्या वर्गातला होता हे त्याच्या राठ दाढीमिशीवरून कळत होतं. त्याच्याबरोबर त्याची ग्यांग होती.
'काय रे ए. मस्ती आली का?' त्याने विचारलं
'नाही' मी म्हटलं..पण या प्रश्नाच हे उत्तर नसतं.
'ती बटीण.. तुझं माणूस कधीपास्न झालं रे?'
'अं... मं..आं..कोण म्हण्ट? ' मी गडबडलो..
'हां..अस्सं पायजे.. तिच्या फंदात नाय हां पडायचं..आपला आयटमाय तो'
मी गप्प बसलो. हवा गुल झाली होती. मी लगोलग झम्प्याला गाठला.
'तू तर बोल्ला होता ती त्यातली नाय्ये म्हणून'
'हं..ती त्यातली नायचाय. हा पोरगा तिच्या मागेयाय. ती सरळे रे पोरगी. आपण शुव्वरशॉट सांगतो. कोणालापण विचार पायजे तर'' झम्प्याने थोडा विचार केला..
'पोरगा तब्येतीने तगडा होता काय रे?'
'हो. एक नव्हता. तसले ४-५ होते'
झंप्या विचारात पडला.
'तुला दुसरी कोणी आवडते काय रे?' झम्प्याने विचारलं आणि माझी पहिली प्रेम कहाणी तिथल्या तिथे संपुष्टात आली. सुरु होण्याच्या आधीच.

जुनिअर कॉलेजात मुलीच्या बाबतीत माझी डाळ शिजली नाही पण बी कॉम ला एडमिशन घेतल्यानंतर सिनिअर कॉलेजात काहीतरी होईल असं चिन्ह दिसत होतं. कारण पोरं स्पष्टपणे मुलीबाबतच्या गोष्टी करत.. पब्लिक ला आता मैत्रीण नको होती डायरेक्ट 'गल्फ्रेंड'च हवी होती.
कॉलेजचा कट्टा असो किंवा कॅन्टीन ची टेबलं. मुलांचा घोळका जमलेला असला कि ९० टक्केवेळा हेच विषय चालू असत.
'च्याला.. ती आर्ट्सची भावे.. त्या ढेपल्याबरोबर हाय हां कायतरी शुवरशॉट..' इति झंप्या
'कशावरून रे..?' एकाने विचारलं
'अरे काय कशावरून..? डोळ्यांना दिसत नाय? कॉलेजात कितीवेळा बोल्ताना दिसतात. तो अनिरुत साला.. जळते रे' कोणीतरी म्हणालं
'ढेपल्याच नाव अनिरुद्ध आहे ? हे मला म्हायतीच नव्हत'  मी म्हटलं
'हो रे चायला! अनिरुत ढेपले. ठेपले म्हायती होते, ढेपले पयल्यांदाच कळले ' मग हास्याचे फवारे..
मुली ज्या मुलांबरोबर फिरतात त्या मुलांची आम्ही त्यांच्या मागे चेष्टा उडवायचो.. तेवढंच सुख!
'ए.. वयनी आली.. वयनी आली..' कोणीतरी म्हणायचं
'ए अम-या.. तुझी डाव आली बग' दुसरा
'ए अssमssर..' सगळे मोठ्याने ओरडत.
हास्याचे फवारे अजून जोरात उडत.

'काय कठीण नाय रे..पोरगी पटवायला काय लागतं?' झंप्या एकदा म्हणाला.
'मग तू का नाय पटवली?' माझा सरळ सवाल..
'आपल्याला तो नादच नाय. असली फालतुगिरी करायचीच नाय आपल्याला..'
'निदान मलातरी सांगशील?'
'तुला म्हून सांगतो. बॉडी बिल्डींग कर.'
'काय म्हणतोस ..मग पोरगी पटेल?'
'लिवून देतो.. आयशपत... अश्शी फिजीक बनव कि सलमान चाट पडला पायजे. पायजे तर मी पण येतो तुझ्याबरोबर.'  झंप्याशेठ म्हणाले.

आता असलं आपल्याला आयुष्यात जमणार नाही हे माहिती असूनपण मी त्याच्या नादाने व्यायाम करायला लागलो. पण बॉडीच एक लिमिट असतं. मुळातच हाडं असणा-या शरीरावर चढून चढून कितीसं मांस चढणार? आणि जिम मधलं निम्म पब्लिक 'आरशात आपण पूर्ण कसे दिसतो?' हे बघण्यासाठी येत होतं यावर माझा दृढ विश्वास बसला. त्यामुळे बॉडी बिल्डींग करण राहायचं बाजूला आणि भलत्याच गोष्टींवर चर्चा रंगायच्या.

'आयला, एफ वाय ला खूप नव्या पोरी आल्यात रे यंदा!' -झंप्या (बायसेप्स दिसताहेत का बघत)
'कोण आहे काय रे माल?' -मी (झंप्याचे बायसेप्स दिसताहेत का बघत)
'माल? अरे मालगाडी आहे मालगाडी..' -झंप्या (डम्बेल उचलल्याची फक्त एक्शन करत)
'काय सांगतोस काय?' -मी (झंप्याची एक्शन बघून माझे बायसेप्स नुसते बघत)
'मग काय खोटं बोलतो का काय?'  झंप्या म्हणायचा 'चार पाच मुली तरी खूप मस्त आहेत. च्यायला,२-४ म्हयने जाऊदेत मग आपली बॉडी बघ. नाय त्या पोरी वळून वळून बघत राहिल्या ना..'
असलं काहीतरी ऐकलं कि उगीच मला थोड स्फुरण यायचं.

३-४ महिन्यात 'हा आपला विषय नव्हे' हे मला कळून चुकलं. त्यातच 'ज्या संध्याकाळच्या वेळात पोरी बाहेर फिरतात त्यावेळी तू जातोस जिम मध्ये मग काय कप्पाळ पटणार मुली?' असल्या कमेंट्स मिळाल्यामुळे माझा जिमला जाण्याचा उरलासुरला उत्साह देखील मावळला.त्यानंतर मग माझं जिम ला जाणं होत राहिलं पण त्यात तो पूर्वीसारखा उत्साह,जोम, ती सळसळ राहिली नाही. (तो परत आणण्यासाठी काहीतरी गोळ्या असतात अस मला पेपर मधल्या जाहिराती वाचून वाटलं होतं पण तो 'जोश' 'जोम' वेगळा हे वेळीच कळलं म्हणून अनर्थ टळला! असो, विषयांतर झालं.) पण जिम प्रकरणातून एक चांगलं झालं कि अगदीच वाळलेल्या काठीयुक्त अंगावर मुठभर मांस चढलं. अक्षरशः !! प्रोटीन पावडर,सप्लीमेंट च्या मा-याने बॉडीला ब-यापैकी आकार आला. पण त्यामुळे सामाजिक जीवनात काही फरक पडला नाही. मुली वळून वळून मला पाहत आहेत अस जे काही स्वप्न माझ्यापुढे रंगवण्यात आलं होतं ते काही सत्यात उतरताना दिसेना!

मी चाचरत हि शंका जेव्हा जिमच्या ट्रेनर ला विचारली तेव्हा तो म्हणाला
''गाडी पाहिजे रे..'
'कशाला?' माझा बाळबोध प्रश्न.
'बुडाखाली घोडा असला न की पोरी लगेच पटतात.'
'काय म्हणतोस?' मी विचारलं.
"आता मी बघ. कशी आहे बिल्ट?" त्याने डोले शोले दाखवत विचारलं.. चेस्ट वरखाली हलवून दाखवली.
"चांगली आहे" मी त्याला अपेक्षित असणारं उत्तर दिलं पण एकंदरीत मला ते 'छाती हलवून दाखवण' कौशल्यापेक्षा हास्यास्पद वाटलं होतं
"पण सगळ्या पोरी..'" सुस्कारा सोडून तो म्हणाला " सकाळच्या ब्याच ला येतात. माझ्याकडून कार्डीओ म्हणा,वेट ट्रेनिंग म्हणा, एरोबिक्स म्हणा शिकतात आणि नंतर कुणाच्या तरी बाईकवर मागे बसून हिंडताना दिसतात. च्यायला..ती पोरं पण सुकडी बिकडी असतात रे" त्याने त्याचं दुःख मांडलं.
'म्हंजे बाईक घ्यायलाच हवी काय?'
'म्हंजे काय? बाईक असली की पोरगी फसली' तो म्हणाला.

मग आमच्या वडिलांच्या मागे मी टुमणं लावलं. घरापासून कॉलेज कसं लांब पडतं. क्लास ला जायचं झालं तर येण्याजाण्यातच कसा वेळ जातो वगैरे सांगून सांगून त्याचं मन मला वळवावं लागलं. त्यांनी झडती घेऊन का होईना, क्लास असेल तर त्यांची गाडी घेऊन जायला त्यांनी परमिशन दिली. बाबा आदम च्या जमान्यातली ती हिरो होंडा सी डी हंड्रेड कॉलेजात कायच्या कायच हिट झाली. मी गाडी घेऊन गेलो तर पोरं उगीच गोळा व्हायला लागली. मी म्हटलं, आता सगळं जमलंच.
पण महिना गेला ,२ महिने गेले ,३ महिने गेले मागची सीट रिकामीच होती. सुरुवाती सुरुवातीला मी पूर्ण गाडी पुसायचो मग मग काही जमत नाही दिसल्यावर फक्त बसायचा भाग मी साफ करायला लागलो. मागच्या सीटवरची धूळ तशीच राहायला लागली. मग एकदा एका मित्राने विचारलं.
'मित्रा, जरा मदत हवी होती'
'बोल ना दोस्ता'
'अरे जरा पमू ला घरी जायचं होतं.'
'कोण?'
'अरे प्रमिला.. माझी ती हि..'
'हां हां.. ओके. हां. मग ?'
'जरा बाईक देतोस का ? डोन्ट वरी.. आपण पेट्रोल भरणार. फुकट नाय मागत.'
साला आपल्या गल्फ्रेंडला सोडायला माझी गाडी मागत होता.. अशी जळत होती पण काय करणार? पॉकेटमनी तर पेट्रोल मध्ये खर्च होत होता. तेवढाच खर्च वाचेल असा विचार करून मी त्याला दिली शेवटी बाईक.
नंतर तर ती प्रथाच पडली. माझी गाडी लोकांच्या गल्फ्रेंड फिरवू लागली पण मी सुकाच राहिलो. गर्लफ्रेंडसुख म्हंजे काय ते मला मिळालंच नाही. गाडी आहे म्हटल्यावर पोरींशी थोड्या ओळखी झाल्या पण सगळ्या कोणाच्या ना कोणाच्या तरी गल्फ्रेंडस! पुढे पुढे तर असं झालं की मला माझ्या नकळत ड्रायवर च्या भूमिकेत ढकललं गेलं.. हि पोरं बिनधास्त आणि निर्लज्जपणे ' ए,तिला अमुक अमुक ठिकाणावरून तमुक तमुक ठिकाणी सोड ना ' म्हणून सांगू लागली. पेट्रोलचा सगळा खर्च दोस्तीखात्यात जमा होत होता. आता गल्फ्रेंड असणा-या या कुठल्या पोराकडे सल्ला मागितला तर ते -
"अरे बराय ना नाय्ये ते.. काय कमी लफडी असतात? फोन करा, त्यांचपण कार्ड रिचार्ज करा, कुठाय, काय करतोय त्याचे अपडेट देत -हा, आणायला नि पोचवायला जा, त्यांच्या खायचा प्यायचा खर्च करा आणि वरून नाटक सांभाळा. कोणी सांगितलाय तो ताप? सुखी आहेस!"  असं म्हणून मलाच या प्रकारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. साले स्वतः मजा करत होते आणि मला साधी मदत पण करायला तयार नव्हते! कृतघ्न कुठचे!
जिम मध्ये जाऊन ट्रेनर ला हा झोल सांगितला तर बेटा मला म्हणतो,
"ह्या.. सी डी हंड्रेड घेऊन कोणाला पोरी पटल्यात काय? वयस्कर लोकांची गाडी ती. पोरीसाठी कशी - पल्सर नायतर करिझ्मा पायजे"
मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पोरांना स्कूटी, स्पिरीट अगदी गेलाबाजार झिंग (Santro Xing नव्हे..कायनेटिक झिंग.. ती डबडा गाडी) वगैरे घेऊन आपापल्या गल्फ्रेंडना फिरवताना पाह्यलं होतं. माझ्याकडे तर गाडी नसणा-या  (बॉय)फ्रेंडस ची पण उदाहरणं होती. तेव्हा मला कळलं कि हा स्वतःचे फंडे जगन्मान्य असल्यासारखे सांगत होता. होता होता कॉलेज झालं पण त्या आनंदाला मी पारखाच राहिलो.

बी कॉम झाल्या झाल्या काकांच्या वशिल्याने मी रेवेन्यु डिपार्टमेंट मध्ये चिकटलो आणि तिथले एकंदर (स्त्री) चेहरे बघता माझी गर्लफ्रेंड बनवण्याची इच्छा आपोआपच दाबली गेली.वयस्कर लोकांमध्ये राहून,वावरून  मी माझ तारुण्य हरवून बसलो.तरीपण ऑफिसात इंटरनेट होतं. ऑर्कुट,फेसबुक वरनं 'दिसलं पोरीचं अकौंट कि पाठव फ्रेंड रिक्वेस्ट.. '; ' मुलीचा आय डी दिसला कि, कर याहू chat किंवा जी talk ला add ' असले प्रकार करून मी माझ्या काल्पनिक जगात शेकड्याने मैत्रिणी बनवल्या.आता त्या मैत्रिणींमध्ये ख-या मुली किती होत्या ते देवालाच माहित! कारण माझ्यासारख्या भाबड्या मुलाला उल्लू बनवणा-या पोरांची जनतेत कमी नाय्ये.. याहू आणि जी talk वर माझ्या भावनांशी काही मुलं (खोट्या खोट्या मुली बनून) खेळल्यानंतर मी ते थांबवलं. फेसबुक वर हजार- दीड हजार लोकांचा गोतावळा जमवला. काहीजणी करायच्या फ्रेंड रिक्वेस्ट, एक्सेप्ट तर काहीजणी (खरतर ब-याच जणी! ) रिजेक्ट करायच्या.शेकडो जणींनी मला ब्लॉक सुद्धा केलं. पण माझे प्रयत्न मी सोडले नाहीत!
"एवढ्या मैत्रिणी जमवल्या पण एकपण गल्फ्रेंड नाय रे झाली" मी झम्प्याला  म्हटलं."chat वर मी इतक्यांदा  'हाय' म्हटलं तर साधा एकदा 'हेल्लो' करायचं सौजन्य सुद्धा नाही दाखवत एकपण पोरगी. त्यांच्या फोटोला लाईक केलं,कमेंट टाकली तर thank you म्हणायचा उदारपणा दाखवत नाहीत कोणी..' माझ दुःख मी व्यक्त केलं.
"रिलेशनशिप स्टेटस 'इन अ रिलेशनशिप' ठेव. बघ कशा पोरी chat  करतात ते!" झंप्याने लगेच सुचवलं!
 या झंप्याला सगळ्या क्लृप्त्या कशा काय ठावूक असत कोण जाणे! त्याची कुठलीच युक्ती कमी यायची नाही पण निदान त्याच्याकडे माझ्या प्रश्नावर,तेवढ्यापुरतं तरी उत्तर तयार असायचं!!
'ते कसं काय?'
'अरे मग पोरींना वाटणार हा आधीच एंगेज आहे, काही धोका नाही.. मग त्या पुढे येतील'
'अरे पण मग मला कोण कशी काय पटेल?'
'ते पुढे बघता येईल ना! आता बोलायलातरी सुरुवात होऊंदे!'
झंप्याचा आर्टस ला 'लॉजिक' हा विषय असल्यामुळे (आणि त्याने तो दोनदा दिलेला असल्यामुळे) मी जास्त खोलात शिरलो नाही. पण त्याचं लॉजिक फेल गेलं हे वेगळं सांगायला नकोच.
फेसबुक वर सुद्धा मग 'प्रेम','ती', 'मुलगी', 'प्रेमभंग' इत्यादी विषयाशी संबंधित कविता, कथा, चित्र लाईक करण्याव्यतिरिक्त आणि काही वेळा 'एकतरी मैत्रीण असावी' वगैरे सारख्या कवितांवर सहानुभूतीच्या कमेंट्स देण्याशिवाय इतर काही मला जमू शकलं नाही..

असो!! भूतकाळ फारसा नव्हता आशादायक नव्हता. आता वर्तमानात येतो! (माझ्या वयाच्या तेवीसाव्या आणि) यंदाच्या वर्षीच घरच्यांनी लग्नाचं प्रकरण मांडलंय. मी म्हटलं 'एवढ्यात मला लग्न नाय करायचं' पण घरचे थोडीच ऐकताहेत? आता करणारच आहेत माझं लग्न म्हटल्यावर मला थोडी स्फूर्ती आली होती  पण  इथेही  घरच्यांच्या चाळणीतून मुली पास झाल्या तर त्या माझ्यापर्यंत येणार असा एकंदरीत प्रकार होता. याचा परिणाम म्हणून गेले सहा महिने एकपण मुलगी माझ्यापर्यंत पोचली नाही!

आणि आता सगळे अडथळे पार करून हे स्थळ पुढ्यात येवून पडलं आहे. फोटोही तोच, व्यक्तीही तीच, नाव आणि आडनाव पण तेच.. ही आमच्या शाळेतली बटीण!! आता अजून बरी दिसत्येय.  सालं काय करू कायच समजत नाय्ये..मी आधी 'मला एवढ्यात लग्न नाय करायचं' असं म्हटलेलं असल्यामुळे 'एंगेजमेंट आता करून ठेवू आणि लग्न सवडीने करू' म्हणताहेत. मला वाटतं होऊन जाऊदे असंच.. म्हणजे एंगेजमेंट आणि लग्नामधले सगळे दिवस गल्फ्रेंड म्हणून तिलाच फिरवायला मार्ग मोकळा! कसं?

मंगळवार, १५ मे, २०१२

एका शोधयात्रेची कहाणी : पूर्वार्ध

लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून या गोष्टी 'कळायला' लागल्या तेव्हापासून पोरगी पटवण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले पण एकही फळला नाही.

आता मी शाळेत असताना वर्गात जेव्हा मुला-मुलींच्या जोड्या जुळवल्या जायच्या तेव्हा हुशार मुलाला हुशार मुलीच्या नावाने चिडवलं जायचं.. म्हणजे ब-याचदा मुलांमध्ये पहिला नंबर वाला मुलगा आणि मुलींमधली पहिला नंबर वाली मुलगी .. तिची मैत्रीण आणि याचा मित्र यांची जोडी, गोरा मुलगा, गोरी मुलगी यांची जोडी, जवळ जवळ राहणारे आणि शाळेत एकत्र येणारे मुलगा मुलगी, आया आया मैत्रिणी असणा-या किंवा बाबा लोक मित्र असणा-या मुलगा मुलगी ची जोडी आणि अमुक अमुक नंबरच्या ब्यांचवर (याचा उच्चार असाच होता) बसणारा मुलगा आणि त्याच सरळ रेषेत मुलींच्या लायनीतल्या ब्यांचवर बसणारी मुलगी यांची जोडी अशा ढोबळमानाने जोड्या फार क्वचित ठरलेल्या आणि ब-याचदा जबरदस्तीने ठरवलेल्या होत्या..

आता या जोड्या रातोरात ठरल्या कि काय कोण जाणे पण मला कळेपर्यंत त्या ठरल्या होत्या एवढं नक्की.. शेवटची वर्गवारी वगळता इतर कुठेही मी फिट बसत नव्हतो. अभ्यासात सो सो म्हणजे सामान्य, मित्रमंडळी अतिसामान्य, रंगाने सावळा , आई बाबांच्या मित्र मैत्रिणींपैकी ब-याचजणांना सगळेच टोणगे. कोणाला आमच्या वर्गात असेल इतक्या वयाची मुलगी नाही.असलीच तर मोठी मुलगी..त्यामुळे तिला 'ताई' वगैरे म्हणावं लागत असे. असे सगळेच फासे उलटे पडले होते.निदान शेवटच्या वर्गवारीत का बसू नये असा विचार केला तर माझ्या लायनीत (म्हणजे शेवटून दुस-या) तिकडे एकावर्षी अगदीच कुरूप पोरगी होती.. नुसत्या कल्पनेनेच मलाच कसतरी वाटलं. तिच्या नावाने चिडवलं जाऊ नये असा पोरांचा कटाक्ष होता त्यामुळे तोही चान्स गेला.. दहावीच्या वर्षात एक ब-यापैकी मुलगी आली पण ती खूपच उंच होती आणि माझी दहावीपण होती (आणि तिची पण).

आता या चिडवाचिडवीच्या जोड्या सगळ्यांच्याच ठरवलेल्या नव्हत्या पण ज्यांना वाटत होतं त्यांच्यातरी होत्या.. म्हणजे उरलेल्या पोरांपैकी काहीजणांनी 'हि माझी' 'ती तुझी' असं आपलं आपणच ठरवून घेतलं होतं. आणि ज्यांनी ज्यांनी हे ठरवून घेतलं होतं ते इतरांना तसं सांगायचे आणि आपापसात चिडवा चिडवी ला सुरुवात करायचे म्हणजे ती पोरगी आली किवा गेली कि 'ए अमुक तमुक' म्हणून त्या पोरीला मुलाच्या नावाने हाक मारायची मग ती गोष्ट गावभर व्हायची. असा एकंदरीत प्रकार होता. सुरुवातीसुरुवातीला पोरीला कळायचं नाही पण मग सारखं सारखं तसं व्हायला लागलं कि हे आपल्यासाठीच आहे हे त्या पोरीला कळायचं. अगदीच शुंभ असली तर मग तिच्या मैत्रिणी तिला सांगायच्या. जर ती खुदकन हसली तर मग पोरांना चेव यायचा आणि मग विचारायलाच नको.

काही अति आगाऊ मुलांनी दुस-या वर्गात (चिडवलं जाईल याची )सेटिंग केली होती. मग ती दुस-या तुकडी मधली मुलगी असो किंवा खालच्या यत्तेतली. बरं..हि सगळी असली (मोजकी) जन संख्या, या एक्स्ट्रा करिक्युलर activities वगळता, शाळेत असताना वर्गातल्या इतर बहुसंख्य रयतेबरोबर थोडा (किंवा) फार अभ्यास करणे, शिक्षकांकडे लक्ष देणे, मधल्या सुट्टीत आणि पी टी च्या तासाला मनसोक्त खेळणे, मित्रमंडळात गप्पागोष्टी करणे, डबे खाणे वगैरे निरुपद्रवी आणि जनरली शाळेत करावयाच्या उद्योगात गुंग असे. हि जी 'बहुसंख्य रयता' असे त्यांना या गोष्टी म्हणजे (एकतर जमत नसत किंवा) 'लफडी' वाटत असत. त्यामुळे ते जाणीवपूर्वक यापासून दूर राहत असत. माझी मित्रमंडळी याच रयतेचा भाग असल्यमुळे माझी गोची झाली होती. म्हणतात ना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.

आधीच म्हटल्याप्रमाणे मी अभ्यासात अप्रगत, वरून सर्व प्रकारच्या खेळांमधला अकुशल कामगार. तसं तिसरीत असताना एकदा मला चमचा गोटी स्पर्धेत मला उत्तेजनार्थ मिळालं होतं पण ते कोणाला सांगण्या सारखं नाही. कला वगैरे विषयात काठावर पास.. एकदोनदा तर चित्रकलेच्या सरांनी माझी आणि वर्गातल्या अशाच काही कलाकारांची चित्र वर्गात जाहीरपणे दाखवून आम्हाला कुप्रसिद्ध केलं होतं. वास्तविक पाहता आमच्यासारखी चित्र काढणारे पिकासो , एम एफ हुसेन वगैरे लोक तर आलम दुनियेत फेमस होते. पण आमच्या सरांना आम्ही लीयोनार्डो दा विन्ची, राजा रवी वर्म्या सारखी चित्र काढणं अपेक्षित होतं.

स्टेज वर जाऊन काही करून दाखवावं म्हटलं तर एकदा समूह गीतात एकदम शेवटच्या लायनीत उभ राहून 'आ आ आ' असं करायचं होतं तर माझी तंतरली होती.. 'घाम फुटतो' म्हणजे काय ते चेहरा,मान, हात, पाय ,पंजे, पावलं इत्यादी इत्यादी युनिफॉर्म मधून उघड्या असणा-या झाडून सगळ्या अवयवातून बाहेर पडणारे घर्मबिंदू प्रात्यक्षिकासह समजावून सांगत होते, पाय लटपट कापत होते,घसा कोरडा पडला होता. तोंड तर मी उघडलं होतं पण घशातून आवाज बाहेर पडत नव्हता. पण समूह गीत असल्यामुळे ती गोष्ट खपून गेली. त्यानंतर मी स्टेज चा धसका घेतला तो आजतागायत! त्यामुळे वक्तृत्व, नाटक, रेकॉर्ड डान्स करून किंवा तिथे काही कलाकारी दाखवून मुलींच्या हृदयात जागा निर्माण करण्याची शक्यता सुद्धा संपुष्टात आली होती.तर मुलीच्या बाबतीत शाळेत माझं हे असं होतं. पण मनातून 'एकतरी मैत्रीण असावी' असं वाटत होतं.

कॉलेजात गेल्यावर बरेचसे संदर्भच बदलले. स्कर्ट वाल्या युनिफॉर्म मधून मुली पंजाबी ड्रेस वाला युनिफॉर्म वापरू लागल्या आणि आम्ही फुल प्यांट! एकदम मोठ्ठ झाल्यासारखं वाटायला लागलं मलापण. पण शाळेतून कोणी दुस-या कॉलेजात गेलं, कोणी शिक्षण सोडलं, कोणाची भांडणं झाली वगैरे वगैरे अगदीच काही अपवाद वगळता सगळ्या तथाकथित जोड्या फुटल्या!! पण मला याचा आसुरी आनंद सुद्धा लुटता आला नाही कारण मला आवडणा-या मुलींच्या तोपर्यंत नव्या जोड्या -चिडवाचिडवीच्या का होईना -पण व्हायला लागल्या होत्या. मी कोणात मिसळत नव्हतो म्हणून अनभिज्ञ होतो असं नव्हे पण शाळेत असताना मी जर माझ्या मित्रांपैकी कोणाला त्याला चिडवल्या जाणा-या मुलीबद्दल विचारलं तर मला मिळणारी प्रत्युत्तरं
' नाय रे.. कैपण कै?'
'पोरं काय..कायपण बोलतात. तू काय लक्ष देतो तिकडे..म्हणतात त्यांना म्हणायचं तर म्हणू दे'
' कोण म्हण्ट असं? सांग. मधल्या सुटीत बगतोच त्याच्याकडे'
'बाईंना नाव सांगेन हां असलं कायपण पसरवलंस तर'
अशी सरळसोट किंवा धमक्या च्या स्वरूपातली असत..

कॉलेजात गेल्यावर हीच उत्तरं बदलली!
' हां.. चिडवतात म्हणून काय झालं? पण आमच्यात तसलं काय नाय्ये '
' माझी मैत्रीण आहे ती.. नुसती मैत्रीण.समजलं?'
' कैपण कै बोल्तो? भयीण मानतो आपण तिला. '
' नुसतं बोल्तो म्हणजे कै तरी असायलाच हवं असा नियम आहे का?'

पण एकंदरीत आपल्याला कोणाच्यातरी नावाने चिडवतात याचं त्या पोरांना बरं वाटत होतं खरं.बरं.. पोरीसुद्धा अशा कि विचारायला नको.. काही काही पोरी तर आपल्याला त्या मुलाच्या नावाने चिडवतात म्हटल्यावर 'आपली स्वर्गात ज्याच्याशी गाठ मारली आहे तो जन्मोजन्मीचा साथीदार हाच' असं तेवढ्यापुरतं का होईना, समजून इतर मुली ज्यांना असं काही चिडवलं वगैरे जात नसे त्यांच्यासमोर शायनिंग मारत असत! त्या न चुकता वडाला फे-यापण मारत असतील कि काय अशी मला पुसट शंका येत असे पण मला कोणच कोणाच्या नावाने चिडवत नाही याचं फार वाईट वाटायचं आणि एकदा ते मी आमच्या मित्र मंडळीत बोलून दाखवलं.
'ए झंप्या... साला, कोणतरी पायजे यार.. एकतरी मैत्रीण हवी जिच्याशी निदान बोलता येईल..' झंप्या हा माझा बालमित्र. त्याच्याकडे मी मोकळेपणाने बोलू शकत असे.

दहावीच्या काळात मुलींबरोबर बोलणं सुद्धा एखादं पाप असावं इतकं अवघड झालं होतं. जरा कोणाशी कोण पोरगा बोलला कि लगेच चिडवायला सुरुवात.. 'एखाद्या मुलाची मैत्रीण' नावाची कन्सेप्ट फक्त पुस्तकातच असते कि काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत होती.अकरावीत उशिरा हि बंधनं थोडी शिथिल झाली होती. तरीपण सुरुवातीला म्हटलं तसं माझ्या ग्रुप मधली बरीचशी मुलं आपलं क्याराक्टर जपण्याच्या उद्देशाने 'मुलींशी बोलणं' हि भानगडच टाळत असत.
' येडा झाला का तू? कोणाशीपण कैपण कै बोलणार? कै बोलणार सांग तू पोरीशी?' झंप्याचा प्रतिप्रश्न.
' हां रे ते पण है.. तसं काय खास नाय, पण हेच. नोट्स बिट्स मागेन'
'एकदा मागशील.. मग पुढे काय?'
'परत देणार'
'काय? एडपट हायेस का?'
'मंजे कायतरी सुरुवात तर होईल! पुढचं पुढे बघेन'
'कुठली मुलगी आवडते तुला?' त्याला बहुतेक माझं म्हणणं पटलं होतं. तो स्वतः आयुष्यात कुठल्या मुलीशी बोलला होता कि नाही कोणास ठाऊक पण मला मदत करायला तो तत्पर होता.
'कोणपण चालेल.. जरा बरीशी हवी..'
'क्काय? ती काय भाजी आहे बाजारातली? '
'आता मला कै म्हायती? पण आपल्या वर्गातली भिंतीकडच्या लायनीतली,पुढनं चौथ्या ब्यांचवर बसते बघ ती.. लाम केसवाली. वेणी घालते बग. ती चांगली आहे..'
'कोण रे?? हां ती बटीण'
'भटीण? ती ब्राह्मण आहे?'
'नाय रे.. बटीण.. बटीण.. बट असते न तिची नेमी..म्हणून बटीण'
'हां.. हां.. मला वाटलं नॉन वेज बिन वेज खात नाय कि काय..' मी म्हणालो.
'आयला.. अजून बोलण्याचा पत्ता नाय्ये आणि तू खाते काय ते बघायला लागला..'
'च्च.. तसं नाय रे..पण आपलं विचारलं.. ए.. जमेल कै?'
'म काय झालं. तिच्यामागे खूप पोरं होती. पण ती त्यातली नाय'
'त्यातली म्हंजे?'
'म्हंजे त्यातली..ते तसंच असतं..असं म्हण्टात'
मी या क्षेत्रात फारच बाळबोध होतो कि आम्ही दोघे अज्ञानी असल्याने असला संवाद घडत होता कोणास ठाऊक!!

मी असलं विचारायची खोटी.. हि गोष्ट मित्रमंडळात पसरायला वेळ लागला नाही. मला तिच्या नावाने चिडवायला सुरुवात झाली. हे येवढ सोप्प असतं याची कल्पनाच नव्हती मला.. सालं मित्रमंडळ महत्वाची भूमिका बजावतं असल्या प्रकारात, हे गुपित मला उलगडलं.

शाळेत असताना पोरं आपल्या लायनीतल्या 'लायनी'वर लक्ष ठेवून ती इकडे कितीवेळा बघते याचा हिशोब I I I I अशा सांख्यिकी मध्ये शिकवलेल्या 'वारंवारता' च्या पद्धतीने कर्कटकाने ब्यांचवर रेषा मारून लक्षात ठेवत असत. आता कॉलेजात तसा हिशोब ठेवायला गेलं तर अख्खा बेंच २-४ महिन्यातच भरून गेला असता. तरीपण काही गुप्तहेर बिनपगारी हि कामं करत असत.
'आयला हो रे..तीपण तुज्याच कडे बघत असते'
'आपण घरी जायला सायकल stand वर उभे राहतो न तेव्हा ती पण उभी असते बघ..'
'अरे ती अमुक अमुक च्या शेजारी राहते'
'त्या तमुक तमुक ची खास आहे ती. तिच्याशी मैत्री कर आपोआप हि येईल बघ..'
एकापाठोपाठ एक सल्ले मिळत होते. मला माझं पहिलं प्रेम (तयार करून) मिळवून द्यायला कित्ती लोक तत्पर होते हे मला नव्यानेच कळत होतं.मग जो तो आपापल्या पद्धतीने हे पसरवायला लागला..मीपण खुश व्हायचो.
gathering ला तर कहर झाला. अगदी तिला समजेल असं बोलत होतं पब्लिक.

'तो चाललाय ना त्याचं आणि त्या एलेवंथ बी मधल्या टिंब टिंब पोरीचं कायतरी आये' असं मीच माझ्या मागे कोणालातरी बोलताना ऐकतोय अशी स्वप्न मला पडू लागली..

उत्तरार्ध

सोमवार, ५ मार्च, २०१२

वधू पाहिजे अर्थात आम्ही लग्नेच्छुक...!

(पुरुष वाचक असाल तर) डिस्क्लेमर : या ढोबळमानाने काढलेल्या कॅटेगरीज (मराठीत-क्याटेग-या) आहेत. उगीच स्वतःला यापैकी कुठेतरी फिट करून बघण्याचा अजिबात प्रयत्न करू नये आणि मुळातच सदर मतं फारशी मनाला लावून घेऊ नयेत. कारण वाचणा-याच्या भावना दुखावल्या गेल्या तर मी (हसण्याव्यतिरिक्त इतर) काहीच करू शकत नाही.




आम्ही उपवर -१
आम्ही पहिल्या प्रवर्गात मोडतो.. याला सर्वसामान्य (आणि सर्व) लोक अतिसामान्य असं म्हणतात. आम्हाला याचं कधी कधी वाईट वाटतं पण ब-याचदा काही फरक पडत नाही.. कारण तसंही लहानपणापासून आम्ही काही विशेष केलेलं नसतं.

आमच्या (स्वभावाने गरीब असणा-या) आई बाबांच्या आमच्याकडून काही अपेक्षा होत्या कि नाही ते कळेकळेपर्यंतच आम्ही प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत गेलो.. हुशार बिशार असलोच तरी मोजकेच. म्हणजे कसं आहे कि पहिल्या पाचात नंबर वगैरे आमच्या गोष्टी नव्हेत हे आम्हाला कधी कळलंच नाही. आम्ही आपले अभ्यास कर कर करून थकलो पण आधी मिळवलेल्या मार्कांच्या एक दोन टक्के..कधी मधी पाच सात टक्के प्रगती झाली पण तेवढे टक्के आमच्या आधीच्या नंबरच्या पुढे जायलाही उपयोगी पडले नाहीत!! पहिल्या पाचाचा तर विषयच सोडा.. अगदीच ढ जरी नसलो तरी अभ्यासाचं गणित काही सहजासहजी जमलं नाही हेही खरंच.

गुरुजी अथवा बाईंनी शाळेत कधी आम्हाला उत्तरं द्यायला उभं केलं नाही किंवा छडी मारल्याचंही आठवत नाही.
कदाचित त्यांना त्याचा फारसा फरक पडत नसावा.. कधी कधी ते आमचं नाव घेत असत पण आम्ही त्यांच्या खिजगणतीत आहोत हेच बघून तेव्हा आमची छाती फुलून येत असे.

मैत्रीच्या बाबतीत ही तेच.. त्या त्या क्षणाला आम्ही ज्या ज्या लोकांबरोबर होतो ते लोक मित्र असे आम्ही समजत गेलो. शाळा, कॉलेज, नोकरी यानुसार आमचे मित्र बदलत गेले. 'जानी दोस्त' असा नसेच आणि असला तर प्रत्येक वेळी वेगळा असे!

तर आम्ही चारचौघांसारखं शिकून नोकरीला लागतो. थोडे हातपाय मारल्यावर,थोड्या खस्ता खाल्ल्यावर चांगली नोकरी मिळते. शाळा कॉलेजात असताना देखील 'मुली' हा विषय आम्हाला तसा वर्ज्यच.. बोलणं वगैरे तर लांब. नंतरसुद्धा ती गोष्ट कधी जमली नाही आणि भविष्यात सुद्धा जमेल असं वाटत नाही. आमचा मित्रमंडळींचा गोतावळाही साधारण याच स्वरूपाचा असतो त्यामुळे मुलींबरोबर बोलणारा मुलगा देखील आम्हाला बोल्ड वाटतो! इतर लोक आम्हाला उद्देशून मुलींबद्दल आमच्यासमोर काही बोलले तर आम्ही कावरेबावरे होतो, लाजतो किंवा असंच काहीतरी करतो कारण आम्हाला त्या बोलण्याला कसं react करायचं हेच मुळी माहित नसतं..

अरेंज पद्धतीचं लग्न हे आमच्यासारख्या लोकांसाठी खरंच वरदान आहे.. नशीब असलं काहीतरी आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलंय आणि 'वधू-वर सूचक मंडळ' वाल्यांनी हि परंपरा पुढे चालू ठेवलीय!! नाहीतर आमच्यासारख्या मंडळींची लग्न झाली असती की नाही हे देवालाच ठाऊक... अप्पा आणि आक्का (आमच्या आई वडिलांना ब-याचदा आम्ही असंच काहीतरी म्हणतो!!), तुम्हाला मुलगी पसंत तर आम्हालाही पसंत!!

आम्ही उपवर -२

आमचा प्रवर्ग हा सामान्य मध्ये गणला जात असावा.. कारण आमच्यासारखे आम्हाला बरेच सापडतात. दर १० माणसातले ६ जण भेटल्यावर आम्हाला वाटतं कि 'अरे हे ध्यान आपल्यासारखंच आहे. आम्ही शिक्षण क्षेत्रात जरी भरीव कामगिरी केली नसली तरी वाईट तरी केलेली नसते. आमचे पालक चारचौघात आमचे नाव (अभिमानाने जरी नसले तरी) घेऊ शकतात असं आम्हाला तरी वाटत असतं.

शाळांमध्ये आम्ही हुशार, एवरेज, ढ,अति-ढ अशा सर्व प्रकारच्या क्याटेगरीत आढळून येतो.तसंच कॉलेजातपण आमचे मित्र बित्र ठरलेले असतात. पण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातले लोक समाविष्ट असतात. आम्ही आधीच्या गाळीव प्रवर्गाच्या तुलनेत बरेच active असतो. म्हणजे शाळा कॉलेजात असताना शिक्षणा व्यतिरिक्त आम्ही इतर ब-याच activities मध्ये सहभागी होतो जसे कि मुलामुलींच्या जोड्या जुळवणे, कुठल्यातरी पोरीच्या मागे लागणे (आणि तिला नको जीव होईपर्यंत छळणे) , कोणाबद्दलतरी गॉसिप्स करणे आणि पसरवणे वगैरे वगैरे. परंतु दुर्दैवाने त्याला शिक्षणसंस्थांचे पुरेसे पाठबळ न मिळाल्यामुळे या activities - एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये गणल्या गेल्या नाहीत.

कालमानानुसार आम्ही वेगवेगळ्या वयात त्या त्या वयाच्या मुलींच्या प्रेमात पडतो. आणि ही गोष्ट ब-याचदा ती मुलगी वगळता इतर सगळ्यांना माहित असते. काही तोंडफाटक्या मित्र अथवा मैत्रिणींच्या गोतावळ्याला जवळ केल्यामुळे क्वचित मुलीला सुद्धा ते समजतं पण ती मुलगी
१) आम्हाला अजिबात भाव देत नसल्यामुळे किंवा
२) (आमच्यालेखी) एका अतिशय फडतूस आणि अतिप्रचंड फालतू अशा मुलावर प्रेम करत असल्यामुळे किंवा
३) ती 'तसली' (म्हणजे कसली याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही) नसल्यामुळे किंवा
४)आमच्या भावना (आणि विचार) कधीच तिच्यापर्यंत पोहोचू आणि पोहोचवू शकत नसल्यामुळे

आमच्या प्रेमात पडत नाही! असे धक्के पचवून आम्ही शाबूत राहतो. नोक-या करतो,धंदे चालवतो परंतु हातपाय मारायचे काही सोडत नाही. कधी खुलेआम, कधी लपूनछपून. पण शेवटपर्यंत नौका काही किना-याला लागत नाही.

आमचे पालक अगदीच 'वधू-वर सूचक' पर्यंत पोचत नाहीत तरीपण नात्यातली मुलगी शोधायचे सगळे प्रयत्न करतात. आमचे सर्वसामान्य गुण 'युनिक' असल्यासारखं दाखवत मार्केटिंग करतात. उदाहरणार्थ मुलगी पटवण्यात आम्हाला आलेलं अपयश त्यांच्या जमेत नसल्यामुळे ते- हि गोष्ट 'संस्कार आहेत हो आमचे' अशा अर्थाने घेतात. आता सगळ्याच आई बापांना आपलं कार्टं हे 'बाब्या' वाटणं साहजिकच! त्याचा दोष त्यांना का द्यायचा? असो तर त्यांची (आर्थिक) पुण्याई, आमची (कवडीमोलाची) पदवी आणि (त्यामानाने तुटपुंजी) कमाई हे अग्रेसिव्ह मार्केटिंगचं त्याचं प्रमुख अस्त्र. अनोळखी, आर्थिक सुबत्तेच्या आधारावर घरात यायचं कि नाही ते ठरवणारी मुलगी, आणि आमचं तिच्या कुटुंबियांसमोर उभारलं जाणारं तद्दन भंपक चित्र... आम्हाला मनातून वाटत असतं हे सगळं चुकतंय पण आमच्याकडेही हे 'बरोबर' करायचा मार्ग नसतो. त्यातूनही ओळखीतली मुलगी मिळाली नाहीच तर 'मंडळं' आहेतच!

आम्ही उपवर-३

आम्ही असामान्य! म्हणजे काय? आहोतच! लग्नाला उभे राहिलो म्हणून पहिल्या दोन वर्गात गणना केलेली खपायची नाही हो आम्हाला! लहानपणापासून की काय ते माहित नाही पण समजायला लागल्यापासून मुलगी या समस्त वर्गावर प्रेम करणारे! कसे शिकलो कधी शिकलो ते कळत नाही पण जमतं बुवा ते.. आमचा प्रवर्ग त्यामुळे नेहमीच मुलींच्याच नव्हे तर मुलांच्यादेखील कुतूहलाचा विषय ठरतो..

आम्ही एकतर..
१)खूप देखणे,क्युट किंवा असेच काहीतरी...
२)खूप हुशार,स्मार्ट किंवा असेच काहीतरी...
३)कोणत्या न कोणत्यातरी कलेत, खेळात प्राविण्य मिळवलेले किंवा असेच काहीतरी...
४)बोलण्यात लाघवी,गोड किंवा असेच काहीतरी
किंवा वरीलपैकी काही कलागुणांच उपजतच मिश्रण असणारे असतो.

शाळा, कॉलेजात असताना आमच्या मागे (मागावर या अर्थी) काही मुली असतात पण आम्ही मात्र ठराविक मुलीच्या मागे असतो. ती मुलगी आम्हाला कधी मिळते कधी कधी मिळत नाही. मिळाली नाही तर आम्ही प्रयत्न करून, बोलबच्चन देऊन किंवा इतर प्रकारे इम्प्रेस करून ती (किंवा आम्हाला शोभेल अशी) मुलगी मिळवतोच. (इतर लोक त्याला पटवणे किंवा कटवणे असं शब्द वापरतात आणि आमच्याकडे सल्ला मागतात पण हि गोष्ट T-ट्वेंटी म्याच सारखी असते हे आम्ही त्यांना सांगू शकत नाही.तुमचा दिवस असला तर सगळं 'ओके' नाहीतर तुम्हीच 'ओकेबोके'! ) पण मग त्यामुळे आम्हाला प्रेम, नातं वगैरे या गोष्टींचा 'एहसास' कि काय म्हणतात तो झालेला असतो. आम्ही बाकीच्यांमध्ये मिसळणारे असलो तर आम्हाला मित्र लोकांमध्ये भलताच भाव-बिव मिळतो. आणि तसे नसलोच तर आमच्या गर्लफ्रेंडमुळे आम्हाला त्या गोष्टीची चिंता वाटत नाही. आम्ही त्या मुलीवर जीवापाड प्रेम करतो आणि ती सुद्धा तसं करत असते.(असं आम्हाला वाटतं असतं!)

जीवनाच्या ज्या टप्प्यावर आम्हाला आधाराची खरी गरज असते त्या वेळीच आमची सखी आम्हाला डिच देते.. (ब्रेक-अप नंतरच आम्ही हे असं काहीतरी बोलायला शिकतो.. बरं का!) मग स्वतःहून नवीन मुलगी शोधायचं आमचं धैर्य होत नाही किंबहुना आम्ही तसं करूच शकत नाही किंवा मग तिच्या तुलनेत वरचढ अशी कोणी भेटत नाही म्हणून मग पेरेंट्सच्या तोंडाकडे बघून आम्ही बोहल्यावर उभे राहतो.एकेकाळी आवडीची असणारी गोष्ट कधीकधी मनात इतकी घृणा निर्माण करते कि ती गोष्ट पाहिल्यावर तुमच्या मनात तिरस्काराशिवाय इतर कोणतीही भावना येत नाही, (मगाशी म्हटलं न.. असलं अवजड बोलायला आम्हाला फार कष्ट पडत नाहीत!) तसंच काहीसं आमचं 'मुलगी' या बाबतीत झालेलं असतं.

उलटपक्षी काहीवेळा आम्हीही नीच असतो. पटत नाही,विचार जुळत नाही,योग्यतेची नाही किंवा इतर काही अव्यवहार्य कारणांमुळे आम्हीही कल्टी डॉट कॉम चा आधार घेतो. कधी एकदा तर कधी कित्येकदा.. कधी एकीबरोबर तर कधी निरनिराळ्या मुलींबरोबर. इतरांना वाटतं कि आम्ही चीSSS प आहोत. पण मुळातच तो आमचा स्वभाव असतो. मुरड घालायची म्हटली तरी घालता येत नाही. ज्यावेळी खरोखर लग्न करायची वेळ येते तेव्हा आधीच्या अनुभवांवरून आम्हाला स्वतः मुलगी शोधायचं किंवा घरच्यांना सांगायचं डेअरिंग होत नाही.(असतो आम्ही भाकड!) पुर्वेतिहासानुसार पुढे जाऊन उगीच अंदाज चुकला तर काय घ्या? म्हणून आम्ही आई-वडिलांकडे हे काम सोपवतो.

प्रत्यक्षातली मुलगी असो किंवा matrimonial वरची.. या बाबतीत आम्ही पूर्णतः तटस्थ असतो!!

आमच्या पराक्रमामुळे नातेवाईकांचा आणि जवळच्या मित्रमंडळींचा तर पत्ताच कटलेला असतो. तरीपण आमचे mom - dad (अगदीच तर मम्मी पप्पा) साईटस वर आमच्या नावाने रजिस्ट्रेशन करून वधू संशोधन करत असतात ब्वा!! आता काय.. आम्हाला म्हणावच लागतं... यु आर राईट. यु नो मी बेटर than एनीबडी डू.. तुम्ही सांगाल त्या मुलीशी आम्ही लग्न करायला तयार आहोत. long live matrimonials !!

इत्यास्तु!!